Tuesday, December 31, 2019

वंशाचा दिवा

आभार आपले वाचकांनो,आपण माझ्या आजवरच्या लेखाविषयी जे प्रेमाचे औदार्य दाखवले,त्याकरिता मी आपला शतशःऋणी आहे.बऱ्याच दिवसापासून ललित/नाटिकामय लेख लिहिण्याची इच्छा होती,ती"वंशाचा दिवा"या लेखातून आज पूर्ण केली.फक्त एकच विनंती आहे,लेख पूर्ण वाचा,तरच आपल्याला त्याचा योग्य तो बोध होईल.

       "वंशाचा दिवा"

क्षय रोगाने पीडित असलेले सोपानराव यांचा परिवार अगदी लहान.बायको पार्वती,मुलगा अविनाश व सुन मानसी.दहा-बारा वर्षांपूर्वी मुलगी अनिताचा विवाह मोठा दिमाखदार पार पाडला.आता डोईवरचे ओझे खांद्यावर आल्याचे समाधान त्यांना वाटले व नंतर अविनाशलाही नोकरीला लावले,त्याचेही लग्न अगदी थाटामाटात केले.सर्व घराचा गाडा अगदी सुरळीत केला.आता वृद्धापकाळाने व क्षयाच्या आजाराने सोपानराव पुरते थकून गेलेले,परमेश्वराचा धावा करत होते.

सोपानराव : (मरणासन्न अवस्थेत अंथरुणाला खिळलेल्या सोपानरावांना खोकल्याची जोरात उबळ आली आणि कातर आवाजातच त्यांच्या मुखातून बोल निघाले.)
सुनबाई,मला सुटीचा चहा करुन देतीस का,तेवढाच सुकलेला घसा ओला होईल.(एवढेच बोलले आणि मनाशीच पुटपुटू लागले,काय ही आज आपली अवस्था.मुलाबाळांना लहानाचं मोठं करायचं,तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपायचं,त्यांच्यासाठी दिवस का रात्र पहायची नाही,नोकरी-व्यवसायात त्यांना गुंतून द्यायचं.स्वतःच्या कृश देहाकडे कधी कटाक्षही टाकायला उसंत मिळायची नाय,पण शेवट पदरी काय,तर पिण्यासाठी दुःखाचा रांजण भरलेला आणि खाण्यासाठी उपेक्षेची भाकर,हीच का आपली आयुष्यभराची मिळकत,हे विचार चघळत-चघळत त्यांना केव्हा डुलकी लागली,कळलेही नाही.)

मानसी: (अगदी नट्टापट्टा,साजशृंगार करून आपल्या कल्पनाविश्वात रमलेली.कधी एकदा गावाकडच्या कटकटीतून सुटते आणि मुंबईला नवऱ्याकडे जाऊन राहते,या विचारात तिचे मन आनंदाच्या झुल्यावर झोका घेत होते.सासर्‍याचा आवाज ऐकून जरा तिरस्काराने,)ह्या म्हाताऱ्याचाबी लय तरास सहन करावा लागतो मला.कधी चहा,कधी काढा,तर कधी दवाखाना यातच आपलं आयुष्य संपायचं.(असे एक ना अनेक कडवट शब्द बोलत-बोलतच चहाचा कप आणून सासऱ्यापुढे टेकवला.)

पार्वती : अहो,चहा थंड होईल बघा,घ्या की पटकन,का बिस्किटं देऊ.

सोपानराव : (खडबडून जागे होतात.)नाय नगं;अविनाश मुंबईला नोकरी करतो,पण बापाचं काय ध्यान होत नाय हरामखोराला,आपल्या म्हातार्‍या बापाला भेटायला कधी येणार हे देवच जाणे.पार्वती,तुला आठवतंय का ज्यावेळी आपल्याला पहिली पोरगी झाली अनिता,त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख खूपच वंगाळवाणी होतं,पण म्हाताऱ्या बापाला भेटायला ती तरी अधून-मधून येते आणि ईचारपूसही करते,पण ज्याच्यासाठी तू खूप जिवाचा आटापिटा केलास,म्हणे आपल्याला म्हातारपणाचा आधार आणि वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजेच,या विचाराने तुला त्यावेळी खूपच पछाडलं होतं आणि आज आपला हा वंशाचा दिवा तिकडच दिवे लावतोय,आपल्या आयुष्यातला दुःखाचा अंधार कधी संपवील,हे मला काय उमजनां झालंय बघ.

पार्वती : अहो नका धसका घेऊ धनी,सगळ ठीक होईल.लेकरू बाहेरगावी हाय,कामातून सवड झाल्यावर लगबगीनं येईल बघा,तुम्हाला भेटायला.

सोपानराव : अगं पण,मी जित हाय तवर आला तर हाय,नायतर तिरडी उचलायलाच यायचा.

पार्वती : अहो नका अस येड्यावाणी बोलू.मी हाय न्हवं.(असं बोलली आणि पार्वतीला जोराचा हुंदका दाटला.)

सोपानराव : खरं हाय,तुच आयुष्याची जोडीदार,कोण मुलगा-मुलगी आणि कोण नातेवाईक.सगळे सगळे स्वार्थ व पैशाचे लोभी,ऊसात रस हाय तवरच त्याची काळजी,रस काढल्यावर चोथ्याला कोण विचारतो म्हणा,त्याची जागा कचराकुंडीत,तस आपल झालय."जोवर अंगात रग,तोवर आपलं जग"म्हणतात ते खरं हाय बघ.तुझ्या ध्यानात हाय का,अविनाशला लहानपणी मेंदूज्वर झाला त्यायेळी पंधरा दिस कितीतरी दवाखाने पैसे नाही म्हणून,अंगाखांद्यावर त्याला उचलून घेऊन बदलले,उसने पैसे घेऊन लेकराचा जीव वाचवला.ते पैसे चार वर्षे गेली परत करायला.पण हेच लेकरं मोठे झाल्यावर माय-बापासाठी का नाय असं वागत,याच आश्चर्य वाटतं.का परमेश्वराने मायबापाच्या नशिबातच हाल-अपेष्टा लिवलेल्या असतात.

पार्वती : (मनोमन विचार करत होती,एवढा कणखर दगडा सारखा माणूस,ना कधी कोणापुढे झुकला,ना वाकला,पण आज पाण्यात मातीचा ढेकूळ ईरघळावा तसा मुलाच्या भेटीसाठी ईरघळून पाणी पाणी झालाय.नायतर खरंच हाय मायबाप कितीबी कणखर असूद्या पण लेकरांपुढे नक्कीच ईरघळून जातात.)मानसी,अगं अविनाशला फोन तरी लाव...

मानसी : हॅलो,अहो काय करताय,आई-बाबांना तुमची आठवण झाली होती. त्यांच्यासोबत बोला.

अविनाश : नाही,मी आता कामात आहे;संध्याकाळी फोन करतो.ओके,बाय.

अविनाश : (संध्याकाळी फोन लावतो) हॅलो,हा मानसी दे बाबांकडे,हा बाबा अविनाश बोलतोय,कसे आहात,इकडे माझे अतिशय महत्वाचे काम चालू आहे.त्यामुळे मला गावाकडे लवकर येता येणार नाही,काळजी घ्या.गोळ्या औषधांसाठी पैसे पाठवून देतो.

सोपानराव : अरे अविनाश मी आता लई दिसाचा सोबती नाय राहिलो रे.तवा तुला बघायची,भेटायची लय इच्छा हाय.तुझ्याबर खूप बोलायचय बघ.तुझ काम बापापेक्षाबी महत्वाच हाय का रे बाळा.
(तोपर्यंत फोन बंद होतो.)

पार्वती : अहो फोन बंद झाला वाटतं.असूद्या,कामाच्या घाईत असल लेकरू.

सोपानराव : मला वाटतं,जगात आपल्या बापापेक्षाही दुसरं जास्त महत्त्वाचं काम असल.जो दिवा स्वतःच्या कुटुंबाला दुःखात,अंधारात उजेड देऊ शकत नाय,त्या वंशाच्या दिव्याचा काय उपयोग म्हणा.इथं स्वतःचा बाप खितपत पडलाय,अन दवाखान्यात घेऊन जाणं तर दूरच पण याला भेटायलाबी येळ नाय.

अविनाश : (मनातच विचार करतो,घरी फोन करून कळवायला पाहिजे की,कामानिमित्त मी परदेशात चाललो आहे,परत आल्यावर तुम्हाला भेटायला येईल सर्वांना) हॅलो,मानसी मी कामानिमित्त परदेशात चाललो आहे.परत आल्यावर तुलाही मुंबईला घेऊन येईल आणि आईबाबांनाही भेटायला येईल.ओके बाय.

(सोपानरावांची अवस्था उन्हाळ्यामधील पानगळ झालेल्या झाडाप्रमाणे झाली,जवळ पानही नाही आणि फूलही नाही.मुलगा मुंबईला आणि मुलगी तिच्या सासरी,जेव्हा मुलगी अनिता त्यांना अधून मधून भेटायला येते,तेव्हा मायेचा ओलावा मिळून झाडाला पालवी फुटल्याप्रमाणे त्यांना बहरून आल्यासारख वाटतं.)

पार्वती : अहो,दोन घास खावा म्हणते,जीवाला बरं वाटल.

सोपानराव : अग,घशाखाली जातच नाय बघ.तू घे खाऊन,माझा नगं लय ईचार करू.

(सोपानरावांची तब्येत अचानक जास्त बिघडली.त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले.पण शरीरापेक्षा मनाने खचलेला सोपानराव कुठल्याच औषधाला साथ देईनासा झाला.शेवटी काळाने झडप घातली आणि सोपानराव सर्वांना सोडून अनंतात विलीन झाले.वार्ता वाऱ्याच्या वेगानं गावभर पसरली.अविनाशला फोन लावला तर समजलं की त्याला परदेशातून यायला दोन दिवस लागतील.)

गावकरी : अविनाशला येईपर्यंत मयत कशी ठेवायची.शरीर अगोदरच कुजलय सारं,ते शक्य नाही.जित होता तवर नाई भेटाया आला आणि आता काय राहिलया बाकी.म्हणतात ना दिव्याखाली अंधारच मग तो देव्हाऱ्यातला असो अगर वंशाचा.

(परदेशात अविनाशच्या मनात विचारांचे काहूर माजले,ज्या बापाने आपल्याला आजपर्यंत दुःखाची थोडीही भनक लागू दिली नाही.त्यांच्या दुःखी,कष्टी काळात आपण मात्र पैशावर आणि नोकरीवर अतीम प्रेम करत बसलो.साधा काटा टोचल म्हणून बाबांनी कधी अनवाणी चालू दिलं नाही.मुलाला ऊन लागतंय म्हणून स्वतःच्या डोईवरचा रुमाल सोडून माझ्या डोईवर बांधायचे.ताप आला तर रात्र रात्र माझ्यापाशी बसून राहायचे.माझे सर्व हट्ट कसोशीने पूर्ण करायचे.बाबा खरच मी चुकलो,मला क्षमा करा.या सर्व आठवणीने अविनाशला राहुन राहुन भरून यायचे.पाकीटात ठेवलेल्या बापाच्या फोटोकडे पाहत अश्रूंचा बांध फुटायचा आणि त्यामध्ये केलेल्या चुकांना गंगाजळी देण्याचा तो प्रयत्न करायचा.)

अविनाश : (दु:खी अंतकरणाने पुटपुटायचा) बाबा मला माफ करा...मी चुकलो.

(गावाकडे घरासमोर मयताच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू होते.मुलगी अनिता आली की,मयत करायची ठरते.अविनाश येईपर्यंत थांबणे शक्य नाही,असे गावातील मंडळी म्हणतात.अनितासह सर्व नातेवाईक,स्वकीय येतात.सर्वांना रुखरुख असते ती अविनाशची,एकुलता एक मुलगा पण बापाला अग्नीडाग द्यायला हजर नाही.अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पूर्ण केला जातो.)

दुसऱ्या दिवशी अविनाश परदेशातून येतो,पण शिल्लक राखेत असतात,फक्त बापाच्या काळ्याकुट्ट अस्थी आणि स्वतःच्या काळजात जिवंत आठवणी.

अविनाश : (मनाशीच)मला आठवतय,एकदा पावसाळ्याच्या दिवसात मित्रांबरोबर जांभळं खायला गेलो असताना,जांभळीची फांदी मोडून मी खाली दगडावर पडलो आणि डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला होता,बाबांना कळताक्षणी विद्युत वेगाने तेथे पोहोचले आणि मला पाठीवर टाकून डॉक्टरांकडे घेऊन गेले.जास्त रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी तातडीने रक्त भरावे लागेल असे सांगितले.'माझं रक्त कितीबी घ्या डाक्टर,पण पोराला काय होऊ देऊ नका'.हे बाबांच वाक्य आजही मला आठवतय.बाबा,मी तुमचा खूप मोठा अपराधी आहे.माफी मागायचा ही मला अधिकार नाही.खरतर आई-बाबा समजणं ही खूप मोठी गोष्ट,पण ती मला जमलीच नाही.मला तुमच्या दुःखातील,अंधारातील दिवा होता आलेच नाही,झालो फक्त तुमच्या"वंशाचा दिवा".

                 लेखक,
       श्री.अजिनाथ सासवडे (सर)
         मु.पो.लोणी(स.),आष्टी
            मो.९४२१३३६०५९

Monday, December 30, 2019

बाकी दहा रुपये?

"बाकी दहा रुपये?"

             भगवान तसा खूप प्रामाणिक मुलगा.आठव्या इयत्तेत शिकत होता.जास्त हुशार नसला तरी प्रामाणिकता आणि नम्रता हे त्याचे गुणवैशिष्ट्य.सांगितलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करणारा.वर्गात कधी कुणाची खोडी नाही की चहाडी नाही.आपलं काम भलं आणि आपण भलं असा त्याचा स्वभाव.कुलकर्णी गुरुजींचा त्याच्यावर खूप विश्वास.गुरुजींना जेव्हा जेव्हा मदतीची आवश्यकता पडेल,तेव्हा तेव्हा भगवान देवदूतासारखा हजर होत असे.कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडली की,ते सरळ भगवानला सांगायचे.अगदी खडू असू द्या किंवा गुरुजींच्या घरचा किराणामाल,भाजीपाला सर्वकाही भगवान व्यवस्थितरीत्या घेऊन यायचा.त्यामध्ये त्यानी कधीही कसली कुचराई किंवा दिरंगाई केली नाही.एव्हाना गुरुजींचा कसा फायदा करता येईल,याची तो प्रत्येकवेळी काळजी घेत असे.गुरुजींनाही अभिमान वाटावा असेच त्याचे काम होते.गुरुजींच्या मुखातून शब्द बाहेर पडावा आणि भगवानने तो अलगदपणे झेलावा,हे अगदी ठरलेलंच.भगवानच्या नजरेत गुरुजींचे स्थान देवापेक्षा तसूभरही कमी नव्हते.एकवेळ देव प्रसन्न होऊन काही सांगितले तर भगवान टाळाटाळ करू शकतो,परंतु गुरुजींचे मात्र ऐकल्याशिवाय राहणार नाही.सर्व हिशोब अगदी चोख द्यायचा.गुरुजींचा तो अगदीच लाडका झालेला.
             एकदा बाजारच्या दिवशी गुरुजींनी शंभर रुपयाची नोट व यादी भगवानच्या हातावर टेकवून म्हणाले,भगवान ऑफिसमध्ये कोपऱ्यात एक पिशवी ठेवलेली आहे,ती घेऊन जा आणि बाजार घेऊन ये.गुरुजींनी काम सांगावं आणि विद्यार्थ्यांच्या अंगात उत्साह संचारावा,तसा भगवानही धावतच ऑफिसमध्ये गेला आणि पिशवी घेऊन गेटमधून बाहेर केव्हा पडला,हे गुरुजींना समजले सुद्धा नाही.संपूर्ण बाजारात फिरत राहिला.कुणाकडे भाजीपाला स्वस्त मिळतो,कुणाकडे महाग ह्या सर्व गोष्टींची भगवानला गुरुजींपेक्षाही जास्त माहिती होती.कारण प्रत्येकवेळी त्याचं हे ठरलेलेच काम असायचं.आज त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.उत्साहाने तो बाजार करू लागला.गुरुजी एखाद्या दिवशी जर बाजारात गेले तर ज्या माळ्याच्या मावशीकडे बाजार घेत तिच्याकडेच भगवानही शक्यतो जात असे.त्यादिवशी भगवानने बटाटे,वांगी,कोबी आणि गुरुजींना दुपारच्या जेवनात नेहमी आवडते,ती काकडीसह इतर काही भाजीपाला खरेदी केला.एका ठिकाणी सर्व भाजीपाला मिळत नाही,त्यामुळे त्याने माळ्याच्या मावशीकडे काही व इतर एक-दोन ठिकाणी भाजीपाला खरेदी करून शाळेकडे लढाई जिंकून आल्यासारखा तावातावातच चालू लागला.
        भगवानने वर्गाच्या एका कोपऱ्यात पिशवी ठेवून गुरुजींच्या हातात भाजीपाल्याची यादी दिली.आणि आपल्या जागेवर जाऊन बसला.गुरुजींनी सर्व यादी चेक करून पाहिली,सर्व सामानाच्या पैशांची बेरीज केली तर 90 रुपये झाली होती.गुरुजी भगवानला म्हणाले,अरे भगवान 90 रुपये झाले सगळे,बाकी दहा रुपये? भगवान आपल्या जागेवर जाऊन बसलेला उभा राहिला,आणि गुरुजींना म्हणाला,गुरुजी सगळं बरोबर आहे.पैसे काही उरले नाहीत,माझ्याकडे तर एक रूपयासुद्धा नाही.असे बोलल्यावर गुरुजींना भगवानच्या प्रामाणिकतेवर शंका वाटू लागली.भगवानला जवळ बोलावून घेतले आणि यादी दाखवली तर खरोखर दहा रुपये उरत होते.भगवानच्याही लक्षात आले नाही,की दहा रुपये गेले कुठे?तो गुरुजींना अगदी बेंबीच्या देठापासून सांगत होता,की माझ्याजवळ दहा रुपये नाहीत.पण गुरुजींना वाटले की,याने दहा रुपये कुठेतरी स्वतःसाठी चोरून खर्च केले आणि मला खोटे सांगत आहे.त्यामुळे ते जास्त चिडले.त्यांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी भगवानला चांगलच बेदम मारलं.सर्व विद्यार्थ्यांसमोर मारल्यामुळे भगवानलाही गुरुजींचा राग आला.जी चूक मी केलीच नाही,तिची शिक्षा तर देतायेत आणि तीही सर्वांसमोर,यामुळे भगवानचे मन खूप दुखावले गेले होते.तो मनामध्ये विचार करू लागला,की आपण एवढे गुरुजींचे काम केले,पण शेवटी काय फळ मिळाले,तर दहा रुपये चोरणारा चोर म्हणून शिक्षा.
         भगवानला मारल्यानंतर गुरुजींनाही मनोमन वाईट वाटले होते,पण त्याचा आता काय उपयोग.म्हणतात ना बूँद से गई ओ हौदसे नही आती,तसं भगवानची सर्व वर्गासमोर जी इज्जत गेली ती गेलीच.खूप दिवस ना गुरुजी भगवानशी बोलले,ना भगवान गुरुजींशी.गुरुजींना वाटायचे मी एवढा विश्वास टाकला आणि शेवटी ज्या गोष्टीची मी कल्पनाही करू शकत नव्हतो ती गोष्ट आज भगवानने केली.जे नाही ते करू लागला.काय उपयोग आपल्या संस्कारांचा.मला म्हणाला असता तर मी दहा सोडून त्याला वीस रुपये दिले असते.पण त्याने अशी चोरी करायला नको होती.भगवानला वाटायचे मी एवढे दिवस गुरुजींची सेवा केली,पण सर्व निष्फळ ठरली.कधी एक रुपयासुद्धा त्यांच्या पैशांतून मी माझ्याकडे ठेवला नाही.की स्वतःच्या जीवनासाठी खर्च केला नाही आणि आज आपल्यावरच चोरीचा आळ आला.वर्गातील सर्व विद्यार्थी भगवानकडे चोरटा या नजरेतूनच पाहू लागले.गुरुजींच्या मारण्यापेक्षा सर्व वर्गासमोर गेलेली इज्जत त्यामुळे भगवान खूप कष्टी झाला होता.
                पुढच्या बाजारच्या वेळी गुरुजी स्वतःच बाजारला गेले.त्यांना आता कोणाचाही भरोसा वाटत नव्हता.नेहमीप्रमाणे इकडे-तिकडे थोडाफार भाजीपाला घेतला आणि शेवटी माळ्याच्या मावशीकडे गेले.तिच्याकडे पाहिजे तो सर्व भाजीपाला खरेदी केला.माळ्याची मावशी विचारू लागली,गुरुजी आज तुम्ही आले व्हय,त्या भगवानला नाही पाठवलं बाजार करायला.अहो आजी काय खरं नाही या दुनियाच,मागच्या वेळेला मी त्याच्याकडे शंभर रुपये दिले आणि 90 रुपयांचा बाजार घेऊन आला आणि म्हणतो पैसे उरले नाहीत.पैसे तर चोरले आणि वरून खोटं बोलतोय.अहो गुरुजी,मीच त्याच्याकडून तुमचे पहिले मेथीच्या जुडीचे राहिलेले दहा रुपये मागच्यावेळी घेतले.पण त्याला तुम्हाला घाईगडबडीत सांगायचं आठवलं नसलं.तसा तो पोरगा चांगला हाय बघा.हे ऐकल्यावर गुरुजींचा ऊर भरून आला आणि मनातली मनात विचार करू लागले.अरेरे मी किती मोठी चूक केली,त्याच्याशी खूप कठोर वागलो.सर्व गोष्टीचा विचार न करताच त्याला खूप मारले.मलाही कळाले नाही,की त्यानी आत्तापर्यंत कधीही अशी चूक केली नाही,मग एक वेळेस चूक झाली तर आपण त्याला माफ करावे.भावनेच्या भरात आपण खूपच वाईट केलं.गुरुजींच्या काळजावर पश्चातापाचा भलामोठा दगडच पडला होता.
      धावतच गुरुजी शाळेमध्ये गेले आणि इकडे तिकडे भगवानला शोधू लागले.मधली मोठी सुट्टी झाली होती,मुलं मैदानावर खेळत होती.पण भगवान मात्र एकटाच एका कोपऱ्यामध्ये अपराध्यासारखा इतरांकडे पाहत खजीलपणे बसलेला होता.इतक्यात गुरुजी त्याच्याकडे येताना दिसले,तसे त्यानी आपले तोंड धडवले आणि तिथून पळ काढला,तो कायमचाच.गुरुजी भगवान भगवान म्हणून हाक मारू लागले,तोपर्यंत भगवानने आपले दप्तर उचलून शाळेचे गेटही पार केले होते.गुरुजी मात्र आता खूप बेचैन झाले होते,कारण न केलेल्या चुकीची शिक्षा भगवानला त्यांनी दिली होती.
     आता भगवान गेला तो कायमचाच,परत त्यानी कधी शाळेकडे तोंड फिरवले नाही.कारण दप्तराचे ओझे तो सहन करू शकत होता,पण अपराधीपणाचे ओझे डोक्यावर घेऊन त्याला शाळेकडे चालवत नव्हते.भगवानच्या मनाला झालेल्या जखमा यथावकाश भरून तर आल्या,पण त्याचे व्रण मात्र आयुष्यभर राहिले…



                    लेखक,
              श्री.अजिनाथ सासवडे (सर)
               मु.पो.लोणी(स),आष्टी
               मो.९४२१३३६०५९

Saturday, December 28, 2019

छावणी

                   "छावणी"

२०१८ साल पावसाअभावी अगदी कोरडे ठीक्कर गेले,कसेबसे रडतकडत शेतकऱ्यांनी ते पूर्णत्वास नेले.२०१९ साल उजाडले आता मात्र शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे काळेकुट्ट ढग जोरात वाहू लागले होते. ज्यांच्याकडे जनावरे नव्हती त्यांना थोडं हायसं वाटलं,उत्पन्न तर नाही,परंतु जवळ असलेले दहा-वीस रुपये, चाऱ्यासाठी खर्च होणारे,ते तरी वाचतील या विचाराने ते थोडे सुखावले.परंतु दूग्ध व्यवसाय असणाऱ्या शेतकऱ्यांना तर कुणीतरी जोरात कानशिलावर मारावी आणि डोळ्यासमोर फक्त अंधार दिसावा एवढी भयंकर परिस्थिती उद्भवली. जनावरे विकावी तर पोट कसे भरावे आणि नाही विकावी तर त्यांच्यासाठी चारापाण्याची व्यवस्था कशी करावी या विचाराने शेतकऱ्यांच्या काळजावर ओरखडे ओढले जात होते."इकडे आड आणि तिकडे विहीर" या द्विधा विचारात शेतकरी अडकला होता. मागील वर्षीचा जो थोडाफार चारा शिल्लक होता त्यानेही आता आपले हात वर केले होते. आता मात्र दुष्काळ नावाचे महाकाय भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवरचे काही केल्या उतरणार नाही,हे सर्वांना अगदी स्पष्ट दिसत होते.
           सरकारने दुष्काळी भागाची पाहणी केली आणि अहवाल मिळाला,आणखी तीन महिने पुरेल एवढा चारा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. आहो चार शेतकऱ्यांकडे चारा होता,परंतु बाकी लोकांनी काय करायचं मायबाप सरकार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या हृदयातून ओठापर्यंत येत होता.आता मात्र शेतकऱ्यांच्या पायाखालची जणू मातीच सरकली. छावण्यांना तूर्तास परवानगी मिळणार नाही, हे जाहीर झाले. अव्वाच्या सव्वा बाजारभावाने शेतकऱ्यांनी ऊस आणून जनावरांची पोटं भरली. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन शेतकरी जनावरांचे पोट भरू लागला. प्रत्येकाच्या डोक्यात एकाच विचाराने फेर धरला होता,की आपलं पशुधन वाचलं पाहिजे. पण पशुधन वाचवण्याच्या नादात स्वतःच्या शरीरातला रक्ताचा थेंब ना थेंब त्यांच्या विचारापाई आटत चालला होता आणि स्वतःचा प्राण मात्र पणाला लागत होता.
          घरात जे काही थोडेफार पैसे होते तेही शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी संपवले.बायकोच्या अंगावरील दागिने सुद्धा बँकेत तारण म्हणून ठेवले आणि आपल्या जनावरांना वाचवलं, खूपच दयनीय अवस्था झाली,पण गोठ्यातली गाय आणि धरणी माय कितीही संकट आले तरी कधी पणाला लावायची नसते,हे शेतकरी पुरता जाणून होता.
            २०१९ची तब्बल तीन महिने उलटून गेली तरीही ना चाऱ्याची सोय,ना छावण्यांची,आता मात्र शेतकरी राजा घायकुतीला आला होता. काय करावे आणि काय करू नये या विचाराने त्याच्या काळजात कपार पडल्यासारखं व्हायचं.काही शेतकरी, विविध शेतकरी संघटना,मोर्चे-आंदोलने करत होते,तेव्हा कुठे निद्रिस्त सरकार जागे झाले आणि बऱ्याच दिवसांचे भिजत घोंगडे एकदाचे मार्गी लागले. छावण्यांना परवानगी मिळाली. दुष्काळात पानगळ झालेल्या झाडाला चैत्रामध्ये थोडीशी पालवी फुटावी आणि त्या नवलाईने ते झाड आनंदाने फुलून जावे,तसे शेतकऱ्यांना झाले.
           आता जो तो कागद,कापड,बांबू आणने आणि छावणी बनवणे या कामात गुरफटून गेला होता. किती किती नव्हे ती प्रत्येकाच्या प्रयत्नांची शिकस्त चालू होती. आता आपल्या जनावरांना जीवदान मिळणार या विचाराने सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा स्पष्ट दिसत होती.आणि खिशाला लागलेली कात्रीही थांबणार, ह्या विचाराने प्रत्येकाच्या मनाला उभारी मिळत होती.
            छावण्या तयार झाल्या,आता लोकांची लगबघ सुरू झाली,जनावरे आणने,त्यांना व्यवस्थित बांधणे, कुट्टी मिळो अथवा ऊस,तो घ्यायचा आणि आपल्या जनावरांच्या मुखी घालायचा हेच सत्र सुरू झाले.चारा मिळाला की पाणी कधी येतय ह्याच चिंतेत,त्यासाठी टँकरच्या आवाजाकडे सर्वांच्या नजरा लागून राहायच्या. पाण्याचा टँकर आल्यानंतर सर्वांचीच धावपळ व्हायची. टँकरवाल्याला म्हणायचे अरे सकाळपासून आमच्या जनावरांना घोटभर पाणी नाही अगोदर आम्हाला पाणी दे ना भाऊ. टँकरवाला म्हणायचा नाही,आहो आज तुमचा नंबर उशिरा आहे. अगोदर खालच्या लाइनला द्यावे लागेल. मग जनावरे तसेच कधीकधी भर उन्हाळ्यात पाण्यावाचून दिवसभर ठेवावे लागत असे.कधी शेजाऱ्यांकडून थोडेफार पाणी आणून तेच पाजत असत. छावणीमध्ये मधमाशाप्रमाणे सर्व जनावरे जवळ जवळ असल्यामुळे कधीकधी त्यांचा एकच गलका व्हायचा कोणाचे जनावर ओरडतय आणि कोणाचे नाही याचा थांगपत्ताही लागत नसे. कधीकधी तर एखाद्याच्या छावणीत वारा घुसला की छावणीची छत्री होत असे,मग एकच कल्लोळ व्हायचा अरे पळापळा छावणी उडाली. मग सर्वांनी धावत जाऊन छावणी ओडून बांधायची,सर्व व्यवस्थित करायचं. ज्याने उभ्या हयातीत शेण टाकायचं कष्ट घेतल नाही,तो ही इकडे-तिकडे पाहून घुमानं शेण टाकू लागला.
            एखाद जनावर जर चुकून सुटलंच तर मालकाची त्याला धरताना मात्र त्रेधातिरपीट होत असे.ते जनावर किमान तासभर तरी हाती लागत नसतं, त्याच्याबरोबर मालकाचाही पूर्ण छावणीला फेरफटका घडून येत.काही जनावरांची अवस्था तर एवढी बिकट की समोर टाकलेल्या उसाच्या कांड्या चावण्या इतकाही त्राण त्यांच्या शरीरात उरला नव्हता. ऊस खाऊन खाऊन अगदी लदलद जनावरेही पार रोडकी होऊन गेली होती. सहजच जोराचा वारा आला तर जमिनीवर कोसळतील की काय,अशी शंकेची पाल शेतकऱ्यांच्या मनात नेहमी चुकचुकत असे. एखाद्या जनावराने दिवसभर शेपटीच हलवली नाही तर लोक म्हणायचे याचा अवतार संपला आता. छावणीत माशांचं तर एवढं साम्राज्य पसरलेलं की,जनावरांच्या अंगावर केस कमी एवढ्या माशा. दूध काढताना एखादी माशी गाईला चावली आणि दूध सांडले तर दिवसभराचा सगळा धंदा चौपट होत असे.सर्व जनावरे फक्त दिसायला,नाहीतर अंगावर त्यांच्या चमडी आणि हाडाचा सांगाडा सोडता कुठे मांसाचा लवलेशही राहिला नव्हता. अगदी खोलवर गेलेले डोळे,पोटाचे कातडे एकमेकाला चिकटलेले, कान खाली पाडलेले, सर्वांगाने काटा मारलेला,शेतकऱ्यांसारखी त्यांच्याही डोळ्यातून सदैव आसवे गळत, कदाचित शेतकऱ्यांचे दुःखही त्यांना कळत असावे.अशी वाईट अवस्था की पाहणाऱ्याच्या नजरेला ही वेदना होऊन काळजाचं पाणी पाणी व्हायचं.
            लोकांना छावणीत जा आणि घरी ये हाच मोठा उद्योग लागला होता. जनावर तर "एक ना धड भाराभर चिंध्या"असे झाले होते.वीस लिटर दूध देणारी गाई सुद्धा ओढून ताणून दहा-बारा लिटर दूध देत असे.काही जनावरांची अवस्था तर फारच बिकट झाली होती त्यांना बसली जागा उठवत नव्हती. काहींना तर रोज सकाळ-संध्याकाळ अंगाखाली काठ्या घालून उचलून उठवून बसवावे लागत.दररोज एकच खाद्य त्यामुळे शरीरातील कॅल्शियम तसेच इतर खनिज द्रव्ये कमी होऊन जनावर जागीच बसत,कधीकधी तर काही तिथेच गतप्राण होत असे.मग मालक बिचारा दोन-दोन दिवस जेवत नसे.कारण स्वतःच्या लेकरागत त्याला जीव लावलेला असतो.स्वत:च्या डोळ्यासमोर लहानाचे मोठे झालेले जनावर डोळ्यादेखत मरणं यापेक्षा वाईट दिवस शेतकऱ्यासाठी कोणता असू शकतो. अशी कितीतरी जनावरे छावणीत मरत असे.ढगातून सालभर थेंब कोसळला नाही,पण हे सर्व पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून मात्र दुःखाचे अश्रू रोजच टपकत असे.जनावरांना झालेल्या जखमा कितीतरी दिवस त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बऱ्या होत नसत.
            काही छावणी चालकांनी तर खूप पिळवणूक केली गोरगरिब शेतकऱ्यांची.१८ किलो चाऱ्याऐवजी कधीकधी १५ किलो, तर एखादवेळी अर्धेच माप दिले जाई.नंतर देऊ असे सांगून माप देत असत, त्यांचा नंतर कधी आलाच नाही."तोंड दाबून बुक्क्यांचा मार"अशी गत झाली होती शेतकऱ्यांची, मग लोक काय करणार बिचारी पाठीमागे शिव्या-श्राप देऊन मनातले दुःख कमी करायचे. कधी कधी तर छावणी चालकांची एवढी मुजोरी चाले की, ज्याला जमत नसेल त्याने गुरं घरी घेऊन जावे,असे म्हणत.पण शेतकरी"अडला हरी गाढवाचे पाय धरी"याप्रमाणे सर्व काही निमुटपणे सहन करत.
     छावणीत दुपारच्या वेळी कुणी कुणी पत्त्या खेळत असे, तर कुणी झोपा काढत, कुणाकुणाच्या गप्पांना फार उधाण येत असे.मग कुणी म्हणायचे असा दुष्काळ आम्ही उभ्या आयुष्यात पाहिला नाही. आमच्या काळी भरपूर पाणी असायचं,आम्ही उन्हाळ्यामध्ये शेतात जनावरं चारायला गेलो तर डोंगराच्या कडेला कुठबी कडेकपाऱ्यात हाताने पाणी घेऊन प्यायचो,आता काय ही परिस्थिती आली. तर कुणी म्हणे लोकांची नीतिमत्ताच बदलली म्हणून निसर्गही बदलला. काही विचारी लोक म्हणायचे,माणसाचे जीवन हे फुलांसारखेच असते का?कारण एकाच शेतात उमललेली फुल,पण काही देवाच्या पूजेसाठी जातात,काही सजावटीसाठी जातात,काही पायगड्यांवर पायदळी टाकले जातात, तर काही प्रेतावर टाकले जातात.त्याचप्रमाणे देवाने मानव जात बनवली,परंतु"काही तूपाशी तर काही उपाशी" हा भेदभाव का? शेती करणारे शेतकरी आणि पायदळी टाकलेली फुले यांच्यात तरी फरक उरलाय कुठे,कारण दोघांच्याही नशीबी तिरस्कार अथवा हेळसांडच आहे. खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात शेतकऱ्यांना. छावणीला चारा ऐवजी दावणीला चारा दिला असता तर काय बिघडलं असतं सरकारच,किमान आम्हाला घरी दोन घास सुखानं खायला मिळाले असते, असे खुप सारे जिव्हाळ्याचे विषय लोकांच्या मुखातून बाहेर येत असत. काहींचा तर कंठ दाटून येत असे बोलताना,छोटी-छोटी मुलं एका ठिकाणी,आई-वडील एका ठिकाणी तर नवरा-बायको भलत्याच ठिकाणी या सर्वांची ताटातूट छावणीने झाली होती.एकत्र कुटुंब या छावण्यांमुळे विभक्त झाले. खूप सारे बदल या छावणीने घडवून आले. जवळची माणसं दुरावली तर दूरची काही जवळ आली.सग्यांपासून अंतर मिळायला लागलं,तर इच्छा नसताना परक्यांशी संधान बांधावं लागलं.
             केवळ आर्थिकच नव्हे तर इतरही खूप सारे बदल शेतकऱ्यांच्या जीवनात घडून आले. एरवी जिथं कधी माणसाचा लवलेश नव्हता, तिथे आज माणसांची वर्दळ वाढली. डोंगराच्या कडेला पठारावर ओसाड पडलेल्या जागेवर आज माणसं रात्री-बेरात्री बिनधास्त जनावरांसाठी वास्तव्य करू लागली.
            शेवटी छावणीचे दिवस आपल्यावर का आले याचाही विचार होणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टीला तुम्ही-आम्ही सर्व मानव खऱ्या अर्थाने जबाबदार आहोत.अवास्तव प्रमाणात वृक्षतोड,कॉंक्रिटीकरण, औद्योगीकरण या सर्वांमुळे वृक्षांच्या जागेवर सिमेंटचे जंगल तयार झाले. त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारे आज काळाच्या पडद्याआड गेले आणि सिमेंटचे घरच आमचे सोयरे म्हणणारे तयार झाले. या सर्व गोष्टीला मानवाची बेताल वागणूक खऱ्या अर्थाने जबाबदार‌ आहे. शेताला बांध राहिला नाही की बांधावर झाड राहिले नाही. पाण्याचा अवाजवी वापर, अनावश्यक वृक्षतोड या सर्वांमुळे निसर्गानेही आपली साथ सोडली. त्यामुळे आपल्या सर्वांवर आज दुष्काळ,छावणी अशा प्रकारची संकटे ओढली गेली.हीच परिस्थिती राहिली तर आपल्याला एक दिवस पेट्रोलच्या दराने पाणीही विकत घ्यावे लागेल. वेळीच सावध होणे आवश्यक आहे. प्रत्येकानं पाणी,वृक्ष या सर्वांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तर कुठे आपण भविष्यातील भयानक परिस्थितीशी दोन हात करू. नाहीतर आपला सर्वनाश अटळ आहे. कितीही पैसा कमावला तरी शेवटी पिण्यासाठी पाण्याचीच गरज आहे आणि उन्हा-तान्हात शेतामध्ये,रस्त्याच्या कडेला विश्रांतीसाठी झाडाची नितांत आवश्यकता आहे. म्हणून त्याची तजवीज करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये,बांधावर,घराभोवती किमान पाच-दहा झाडे लावावीत.जगासाठी नाही,परंतु आपल्यासाठी कारण भविष्यात आपलीच पिढी झाडाखाली बसणार आहे,त्या झाडाची फळे चाखणार आहे,हा विचार पूसटसाही मनाला शिवला तरी आपण सुधारणेच्या विचाराकडे काही प्रमाणात का होईना झुकलो आहोत असे म्हणण्यास हरकत नाही.शेवटी"चमत्कारालाच नमस्कार"मिळतो हे प्रत्येकाने ध्यानी घ्यावे. बोलून काही होत नाही,कर्तृत्वालाच किंमत आहे.कर्तृत्वशून्य माणसाने कितीही गाजावाजा केला तरी लोक ऐकणार नाही.सुरुवात स्वतःपासून असावी,तर आपले अनुसरण होईल.आणि सुखाची शितल गंगामाई आपल्या दारी येईल व छावणीसारखे भयानक दिवस आपल्यावर येणार नाहीत.


                   लेखक,
          श्री. अजिनाथ सासवडे (सर)
          मु.पो. लोणी(सय्यदमीर),आष्टी
          मो.९४२१३३६०५९

        

Friday, December 27, 2019

माणूस

"माणूस"

      "माणूस"हा शब्द नुसता उच्चारला तरी आपल्याला जाणीव होते ती प्रेमळ,संवेदनशील,सहिष्णू अंतकरणाच्या,स्वच्छ व निर्मळ मनाच्या,साक्षात परमेश्वराच्या प्रतिकृतीची.किडे-मुंग्या,पशुपक्षी झाडाझुडपांच्या आश्रयी असलेल्या या प्राण्यांपेक्षा दोन हात,दोन पाय,विचार करण्याची क्षमता असलेला प्राणी,ज्याच्या हृदयात प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो म्हणजे माणूस,निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस.माणसाच्या बुद्धीची झेप एवढी की तो चंद्रावर पोहोचला,मंगळावरही आपल्या बुद्धीची छाप सोडू पाहत आहे.माणसाने समुद्र काबीज केले,नद्या अडवल्या नि इथेच घोळ झाला.माणसाने लहान मोठी जंगले ताब्यात घेतली तशी माणसाच्या मनातली हिरवळही संपली.पाखरांचे संसार उद्ध्वस्त केले.नि इथेच माणूस विनाशाकडे झुकू लागला.मोठमोठे समुद्र काबीज केले,पण मनात मात्र विचारांचे संकुचित डबके तयार झाले.परंतु हाच माणूस आज एवढा कसा बदलला याचे नवलच नव्हे तर घृणा वाटावी इतकी भयावह अवस्था आज दिसते.माणसं घराने जवळ आली,मात्र मनाने एकमेकांपासून तितकीच दुरावली.शेजाऱ्यांबद्दल प्रेमाऐवजी तिरस्कार वाटू लागला. स्वकियांबद्दलची प्रेमाची संततधार आटून गेली.
       जमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावाला ठार मारले,अभ्यास केला नाही म्हणून आईने आपल्या मुलाच्या तोंडात कांदा घालून हत्या केली,एवढेच नव्हे तर सांगितलेले काम केले नाही म्हणून आताताईपणे आईने सांडशी फेकून मारली नि मुलीचा जीव गेला.बापाने पैसे दिले नाही म्हणून मुलाने बापाच्या डोक्यात काठीचा प्रहार करून त्याला जिवे मारले.अशा घटना वर्तमानपत्रात वाचल्या,समाजात पाहिल्यानंतर हृदयाचा तिळपापड झाल्याशिवाय राहत नाही.
         किती शीघ्रकोपीपणा,किती अमानवीपणा म्हणावा हा,की माणुसकीच्या निर्लज्जतेचा कळस म्हणावा.ज्या पित्याला मुलांच्या हृदयात परमेश्वरापेक्षाही उच्च स्थान आहे,त्याच पित्याने स्वतःच्या मुलीवर अत्याचार करावा इथपर्यंत आपली भारतीय संस्कृती ढासळत गेली आहे. झाडाला जशी वाळवी लागते.तशी आज आपल्या संस्कृतीला या अमानुष विचारांची व कृत्त्यांची वाळवी लागली आहे.वेळीच आपण सावरलो नाही,तर एक दिवस नक्कीच वाळवी लागलेल्या झाडाप्रमाणे आपली भारतीय संस्कृती कोलमडून पडणार आहे.काम,क्रोध,पैशाचा हव्यास नि स्वतःच्या मोठेपणाचा डांगोरा पिटणाऱ्या या कलयुगातील माणूस किती स्वार्थांध झाला?याची गोळाबेरीज करणे अवघडच आहे.माणूस म्हणून जगताना माणसाला नक्की काय हवं आहे?मान,सन्मान,पैसा,की स्वतःचे श्रेष्ठत्व यांपैकी काय हवे?याचीच उकल त्याला होत नाही.
          कुठं गेली ती माणसं जी इतरांच्या मुलांनाही स्वतःच्या मुलांप्रमाणे जीव लावत असत.संध्याकाळी जेवण करताना वाटीभर भाजी शेजारच्या घरी नेऊन देत असत.आज उरलेली भाजी कचराकुंडीत टाकतील परंतु याची कोणाला तरी गरज आहे,हा विचार त्यांच्या मनाला पुसटसाही शिवणार नाही.कुठे गेली ती माणुसकीची बीजं.आज माणसाचे माणसाशी नाते दुरावले आणि पैशाशी घट्ट झाले आहे.तो पैसा जो ना तुम्हाला प्रेम देईल,ना तुमच्या भावनांना जाणून घेईल,ना दुःखात तुमच्या खांद्यावर आधाराचा हात देईल,त्यालाच आज आपण सर्वस्व मानून बसलो आहोत आणि ज्या माणसाने आपल्यात जगण्याची उमेद निर्माण केली,प्रेमांकुर फुलवला,संकटकाळी खंबीर साथ दिली आज त्याच माणसांना आपण पोरके होत चाललो आहोत.सजीव वस्तूपेक्षा निर्जीव वस्तूच सर्वांना हव्याहव्याशा वाटतात.ही कसली प्रगती,ही तर माणुसकीच्या वाटेवरील अधोगती,जनमानसात आज रुजू पाहत आहे.जीवनात पैशासाठी व आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जण आसुसला आहे,मी किती धनवान व लोकप्रिय हे दाखवण्याची जणू भाबडी स्पर्धाच सुरू आहे.
           हिंदू-,मुस्लीम,सीख,ईसाई या धर्माच्या पलीकडे माणुसकी हा धर्म सर्वप्रथम पृथ्वीतलावर अस्तित्त्वात आला,हे माणूस विसरूनच गेला आहे.जाती धर्मावरून होत असलेले संघर्ष ही एक माणसाची भळभरती जखम असून ती कुठवर भळभळत राहणार आहे,हा प्रश्न काळजाला सतत कुरतडत राहतो.पावलोपावली आज धर्म-अधर्माचे विखारी वारे वाहताना दिसतात.माणूस म्हणून आपण इतरांच्या भावनांची किती कदर करतो,यावरून माणुसकी जिवंत आहे की मेलेली हे ठरते,नाहीतर आपल्या भावनाही इतर माणसे पायदळीच तुडवणार हे निश्चित आहे,म्हणतात ना,'पेराल तसे उगवते'.माणूस म्हणून जीवनात काय हवे आहे,कोणते कार्य केल्याने माणसाचे जीवन सफल होईल,ह्याच गोष्टीपासून माणूस कोसो दूर आहे.स्वहिताबरोबर समाजहित व देशहित हेही तितकेच महत्त्वाचे आहे,कारण सर्व गोष्टीचा समतोल ठेवण्यासाठी या गोष्टीही तितक्याच लक्षवेधक ठरतात.निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे आणि आपण त्याची परतफेड करणे गरजेचे आहे.
         माणसे एकत्र कुटुंबात असतील तर त्यांना एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव असते.एकमेकांना एकमेकांची साथ मिळते,आधार मिळतो आणि बिकट काळी गडगडलेला मनुष्यही सावरला जातो व आपल्या जीवनाची बिघडलेली घडी नीट बसवतो.माणसांनी घरात सर्वांनी मिळून किमान दिवसातून एकदा तरी एकत्र जेवण करावे,त्यामुळे सुखदुःखाची विभागणी होते.विचारांची देवाण-घेवाण होते.आपलेपणाची भावना वृद्धिंगत होते व वात्सल्य आकार घेऊ लागते.घरी आणलेला पदार्थ सर्वांना देताना दातृत्व हा गुण वाढू लागतो.माणसे एकत्र असताना थोरामोठ्यांची अदब सांभाळून वागतात,त्यामुळे नम्रता,आदरभाव माणसाच्या ठायी वाढू लागतो.
       माणसाने माणसाशी माणूस म्हणून सद्वर्तन केले,तर माणसातील माणूस जिवंत आहे याची खात्री पटेल."मनभर आश्वासनापेक्षा कणभर मदत" नक्कीच उपयोगाची,नाहीतर 'मदतीचा हात देऊन माणुसकीची जात' निभावणारा माणूस आज क्वचितच दिसतो.कधीतरी एखाद्या गोरगरीब मुलाच्या हातात पाटी आणि पेन्सिल देऊन पहा तेव्हा कुठे माणूसकी स्वत:हात जिवंत आहे हे अनुभवास येईल.निसर्गातील होत असलेली झाडाझुडपांची कत्तल थांबून स्वतःच्या मुलाप्रमाणे जो त्या झाडांना कवेत घेईल,तेव्हा कुठे माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन होईल.मुलींच्या जन्माचे स्वागत आनंदाने करा.स्वतःची ओळख सांगताना जो मी प्रथम माणूस व तोही भारतीय आहे हे विसरणार नाही,तेव्हाच आपल्यातला माणूस  जिवंत आहे हे निदर्शनास येईल.माणूस म्हणून स्वतःच स्वतःची प्रेरणा वाढवा व इतरांनाही प्रोत्साहित करा.आपल्यासारखा या जगात कोणी नाही याचा अभिमान बाळगा आणि कामाला लागा नक्कीच माणुसकीचा पाठीराखा तुम्ही होऊ शकता,हे विसरू नका.इतरांवर भरोसा करा व स्वत:वरही भरोसा असू द्या.माणूस म्हणून सर्वांना बरोबर घेऊन चला तरच आपणही व इतरही सुख,समाधानाची गोड फळे आनंदाने चाखू.माणसाच्या जीवनाची माणुसकी हीच खरी पुंजी,ती सदैव आपल्या उरी बाळगून असा.माणूस म्हणून जन्माला आलात आणि माणूस म्हणूनच जगाचा अखेरचा निरोप घ्या.👏🏻

           लेखक,
       श्री.अजिनाथ सासवडे(सर)
       मु.पो.लोणी(स.)आष्टी
       मो.९४२१३३६०५९

चतुर व्यापारी

वाचकांना सांगू इच्छितो की,"चतुर व्यापारी"ही एक विनोदात्मक लघुकथा/बोधकथा वाटत असली तरी पैशाच्या लोभापायी अथवा लवकर श्रीमंत होण्याच्या नादात भ्रमिष्ट झालेल्या समाजाचे ही कथा प्रतिनिधित्व करते.स्वतःचे मन व बुद्धीने सारासार विचार न करता दुसर्‍यावर विश्वास ठेवणे किती घातक असते,हे या कथेतून आपल्याला पाहावयास मिळणार आहे.लेख लिहिता लिहिता ध्येय तेच फक्त मार्ग वेगळा,या हेतूने ही लघुकथा आपल्यासमोर मांडत आहे.

काही वर्षापूर्वी वाकडवाडी नावाच्या गावातील शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह भागवत असे.सर्व गाव अगदी सुखासमाधानाने,गुण्यागोविंदानं शेतीवाडीची कामे करत.एके दिवशी एक व्यापारी या गावांमध्ये आला आणि गावकऱ्यांना सांगू लागला,शेतीची कष्टाची कामे करून कुठवर तुम्ही जगणार,एवढे काबाडकष्ट करायचे आणि हाती शेवटी काय मिळतं तुमच्या,तर भोपळा,मी तुमच्यासाठी खूप सोपा आणि भरगच्च पैसे मिळवून देणारा उद्योग आणला आहे.आपण फक्त सर्वांनी मिळून गावच्या परिसरात असलेले माकड पकडायचे आणि प्रत्येक माकडाचे 500 रुपये माझ्याकडून घेऊन जायचे.सर्व लोक आनंदी झाले.फार सोपा उद्योग आहे.माकडाला एखादी भाकरी टाकली की,ती जवळ येणार आणि आपण त्यांना पकडणार.म्हणतात ना पैशाचा मोह आवरत नाही.तसे सर्वांनी होकार दर्शवून आपली तयारी दाखवली.सर्व गावकरी मंडळी जोमाने कामाला लागली."टाक भाकर आणि धर माकड"चळवळ सुरू झाली.प्रत्येकाच्या डोळ्यासमोर 500 ची नोट लखलख चमकू लागली.किती सोपे आहे,माकड आणायचे आणि 500 रुपये घेऊन जायचे.लगेच सर्व लोक माकडं धरुन आणू लागली व ते व्यापाऱ्याला देऊन 500 रुपये घेऊन जाऊ लागली."फुकटचं घावलं अन बापलेक धावलं"अशी गत झाली लोकांची.
काही दिवसातच गावातील माकडांची संख्या हळूहळू कमी झाली व माकडं मिळणे दुर्मिळ होऊ लागले.गावातील लोक चर्चा करू लागली,की आता माकडं मिळत नाहीत आणि कामही नाही,त्याकरिता आपण पुन्हा शेतीची कामे सुरु करू,परंतु व्यापारी चतुर होता त्याने लोकांना सांगितले,500 ऐवजी मी आता तुम्हाला 700 रुपये द्यायला तयार आहे.गावात नाही परंतु बाहेरगावी माकडं असतील तरी धरून आणा.लोक पुन्हा व्यापाऱ्याच्या आमिषाला बळी पडली व बाहेरच्या,शेजारच्या गावातील माकडे धरून आणू लागले आणि व्यापाऱ्याला विकून 700 रुपये मिळू लागली.म्हणून सर्वच गावकरी जोमात होती.आपल्या मदमस्त पैशाच्या धुंदीत धूंद होऊन गेले होते,कुणीही व्यापाऱ्याला विचारले नाही की,आपण या माकडांचे काय करता,आपल्याला यांचा काय उपयोग.प्रत्येकजण पैशाच्या जीवावर जीवनारुपी स्वप्नात रंग भरत होता,परंतु रंगवलेली स्वप्न काही दिवसातच भंग पावली. कालांतराने बाहेरगावचेही माकडं संपुष्टात आली.आता काय करावे या विचाराने लोक चिंतातुर झाले.हतबल होऊन लोक पुन्हा शेतीकडे वळू लागली.चतुर व्यापाऱ्याने जाणले की,आता खरोखरच सर्व माकडं संपली आहेत,जी आहेत ती माझ्याकडेच आहेत.त्याने युक्ती लढवली दुसऱ्या एका व्यापाऱ्याला त्या गावात बोलावले व मी माकड खरेदीसाठी आलो आहे,असे लोकांना सांगावयास सांगितले.दुसऱ्या व्यापाऱ्याने गावात दवंडी पिटवली की,मी दीड हजार रुपयाला एक माकड घेण्यास तयार आहे.तुमच्याकडे असतील तेवढी माकडं धरुन ठेवा.उद्या सकाळी आठ वाजता मी माकडं घेण्यास सुरू करणार आहे,जो अगोदर येईल त्याला चांगला मोबदला मिळणार आहे.लवकर लवकर माकडं आणून श्रीमंत व्हा.लोकांना आता नवलच वाटू लागले.लोकांना पुरेपूर माहित होते,की आता बाहेर तर माकडं नाहीत,जी आहेत ती पहिल्या व्यापाऱ्याकडेच आहेत.म्हणून लोक पुन्हा पहिल्या व्यापाऱ्याकडे गेले व त्याला म्हणाले आम्हाला माकडं हवी आहेत.तो म्हणाला काही हरकत नाही,मी तुम्हाला 1000 रुपयाला एक माकड द्यायला तयार आहे.सर्व गावकऱ्यांनी हजार-हजार रुपयाला पहिल्या व्यापाऱ्यांकडून माकडं विकत घेतली व दुसऱ्या व्यापाऱ्याला विकण्यासाठी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मंदिरातल्याप्रमाणे रांगा लावून बसली,परंतु दोन्ही व्यापाऱ्यांनी रातोरात तेथून पळ काढला होता.दुसऱ्या दिवशी सकाळी तेथे व्यापारी नव्हे तर,फक्त शिल्लक होती त्याची खोटी आश्वासने.सर्व लोकांना कळून चुकले होते की,आपल्याला व्यापाऱ्याने फसवले आहे,त्याने आपलीच माकडं,आपल्यालाच कामाला लावले आणि परत आपल्यालाच विकले आणि स्वतः मात्र मालामाल होऊन पसार झाला.ह्या कल्पक बुद्धिमत्तेचा लोकांना चमत्कारच नव्हे,तर विजेसमान धक्का बसला होता. लोक पुतळ्यागत स्तब्ध राहुन शून्य नजरेतून एकमेकांकडे पाहत होती.
एखादा व्यक्ती कुठलेही कार्य करताना त्याचा हेतू काय आहे,हे नक्कीच जाणून घेतलं पाहिजे.आता लोक निराशेच्या खाईत ढकलली गेली होती.घायाळ अंतःकरणाने ती सर्व माकडं जंगलामध्ये मोकळी सोडून देऊन लोक शेतीच्या कामाला लागली.जवळ थोडीफार रक्कम होती,तीही व्यापाराने लुटून नेली होती.त्यांची सर्व स्वप्ने दुभंगली होती.आता त्यांना कळाले होते,की श्रीमंत होण्याचा कुठलाही राजमार्ग नसून कष्ट करण्याची तयारी व दूरदृष्टी असणे आवश्यक आहे आणि जो जलद मार्ग स्वीकारतो त्याची लयलूट अथवा अपघात निश्चित आहे.जीवनामध्ये कोणताही माणूस फक्त मेहनत,योग्य नियोजन व बुद्धिमत्तेच्या जीवावरच श्रीमंत होऊ शकतो, हे सर्व गावकऱ्यांना आता खरोखरच पुरते उमजून आले होते.

           लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे (सर)    मु.पो.लोणी(स.),आष्टी
  मो.९४२१३३६०५९

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...