आभार आपले वाचकांनो,आपण माझ्या आजवरच्या लेखाविषयी जे प्रेमाचे औदार्य दाखवले,त्याकरिता मी आपला शतशःऋणी आहे.बऱ्याच दिवसापासून ललित/नाटिकामय लेख लिहिण्याची इच्छा होती,ती"वंशाचा दिवा"या लेखातून आज पूर्ण केली.फक्त एकच विनंती आहे,लेख पूर्ण वाचा,तरच आपल्याला त्याचा योग्य तो बोध होईल.
"वंशाचा दिवा"
क्षय रोगाने पीडित असलेले सोपानराव यांचा परिवार अगदी लहान.बायको पार्वती,मुलगा अविनाश व सुन मानसी.दहा-बारा वर्षांपूर्वी मुलगी अनिताचा विवाह मोठा दिमाखदार पार पाडला.आता डोईवरचे ओझे खांद्यावर आल्याचे समाधान त्यांना वाटले व नंतर अविनाशलाही नोकरीला लावले,त्याचेही लग्न अगदी थाटामाटात केले.सर्व घराचा गाडा अगदी सुरळीत केला.आता वृद्धापकाळाने व क्षयाच्या आजाराने सोपानराव पुरते थकून गेलेले,परमेश्वराचा धावा करत होते.
सोपानराव : (मरणासन्न अवस्थेत अंथरुणाला खिळलेल्या सोपानरावांना खोकल्याची जोरात उबळ आली आणि कातर आवाजातच त्यांच्या मुखातून बोल निघाले.)
सुनबाई,मला सुटीचा चहा करुन देतीस का,तेवढाच सुकलेला घसा ओला होईल.(एवढेच बोलले आणि मनाशीच पुटपुटू लागले,काय ही आज आपली अवस्था.मुलाबाळांना लहानाचं मोठं करायचं,तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपायचं,त्यांच्यासाठी दिवस का रात्र पहायची नाही,नोकरी-व्यवसायात त्यांना गुंतून द्यायचं.स्वतःच्या कृश देहाकडे कधी कटाक्षही टाकायला उसंत मिळायची नाय,पण शेवट पदरी काय,तर पिण्यासाठी दुःखाचा रांजण भरलेला आणि खाण्यासाठी उपेक्षेची भाकर,हीच का आपली आयुष्यभराची मिळकत,हे विचार चघळत-चघळत त्यांना केव्हा डुलकी लागली,कळलेही नाही.)
मानसी: (अगदी नट्टापट्टा,साजशृंगार करून आपल्या कल्पनाविश्वात रमलेली.कधी एकदा गावाकडच्या कटकटीतून सुटते आणि मुंबईला नवऱ्याकडे जाऊन राहते,या विचारात तिचे मन आनंदाच्या झुल्यावर झोका घेत होते.सासर्याचा आवाज ऐकून जरा तिरस्काराने,)ह्या म्हाताऱ्याचाबी लय तरास सहन करावा लागतो मला.कधी चहा,कधी काढा,तर कधी दवाखाना यातच आपलं आयुष्य संपायचं.(असे एक ना अनेक कडवट शब्द बोलत-बोलतच चहाचा कप आणून सासऱ्यापुढे टेकवला.)
पार्वती : अहो,चहा थंड होईल बघा,घ्या की पटकन,का बिस्किटं देऊ.
सोपानराव : (खडबडून जागे होतात.)नाय नगं;अविनाश मुंबईला नोकरी करतो,पण बापाचं काय ध्यान होत नाय हरामखोराला,आपल्या म्हातार्या बापाला भेटायला कधी येणार हे देवच जाणे.पार्वती,तुला आठवतंय का ज्यावेळी आपल्याला पहिली पोरगी झाली अनिता,त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख खूपच वंगाळवाणी होतं,पण म्हाताऱ्या बापाला भेटायला ती तरी अधून-मधून येते आणि ईचारपूसही करते,पण ज्याच्यासाठी तू खूप जिवाचा आटापिटा केलास,म्हणे आपल्याला म्हातारपणाचा आधार आणि वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजेच,या विचाराने तुला त्यावेळी खूपच पछाडलं होतं आणि आज आपला हा वंशाचा दिवा तिकडच दिवे लावतोय,आपल्या आयुष्यातला दुःखाचा अंधार कधी संपवील,हे मला काय उमजनां झालंय बघ.
पार्वती : अहो नका धसका घेऊ धनी,सगळ ठीक होईल.लेकरू बाहेरगावी हाय,कामातून सवड झाल्यावर लगबगीनं येईल बघा,तुम्हाला भेटायला.
सोपानराव : अगं पण,मी जित हाय तवर आला तर हाय,नायतर तिरडी उचलायलाच यायचा.
पार्वती : अहो नका अस येड्यावाणी बोलू.मी हाय न्हवं.(असं बोलली आणि पार्वतीला जोराचा हुंदका दाटला.)
सोपानराव : खरं हाय,तुच आयुष्याची जोडीदार,कोण मुलगा-मुलगी आणि कोण नातेवाईक.सगळे सगळे स्वार्थ व पैशाचे लोभी,ऊसात रस हाय तवरच त्याची काळजी,रस काढल्यावर चोथ्याला कोण विचारतो म्हणा,त्याची जागा कचराकुंडीत,तस आपल झालय."जोवर अंगात रग,तोवर आपलं जग"म्हणतात ते खरं हाय बघ.तुझ्या ध्यानात हाय का,अविनाशला लहानपणी मेंदूज्वर झाला त्यायेळी पंधरा दिस कितीतरी दवाखाने पैसे नाही म्हणून,अंगाखांद्यावर त्याला उचलून घेऊन बदलले,उसने पैसे घेऊन लेकराचा जीव वाचवला.ते पैसे चार वर्षे गेली परत करायला.पण हेच लेकरं मोठे झाल्यावर माय-बापासाठी का नाय असं वागत,याच आश्चर्य वाटतं.का परमेश्वराने मायबापाच्या नशिबातच हाल-अपेष्टा लिवलेल्या असतात.
पार्वती : (मनोमन विचार करत होती,एवढा कणखर दगडा सारखा माणूस,ना कधी कोणापुढे झुकला,ना वाकला,पण आज पाण्यात मातीचा ढेकूळ ईरघळावा तसा मुलाच्या भेटीसाठी ईरघळून पाणी पाणी झालाय.नायतर खरंच हाय मायबाप कितीबी कणखर असूद्या पण लेकरांपुढे नक्कीच ईरघळून जातात.)मानसी,अगं अविनाशला फोन तरी लाव...
मानसी : हॅलो,अहो काय करताय,आई-बाबांना तुमची आठवण झाली होती. त्यांच्यासोबत बोला.
अविनाश : नाही,मी आता कामात आहे;संध्याकाळी फोन करतो.ओके,बाय.
अविनाश : (संध्याकाळी फोन लावतो) हॅलो,हा मानसी दे बाबांकडे,हा बाबा अविनाश बोलतोय,कसे आहात,इकडे माझे अतिशय महत्वाचे काम चालू आहे.त्यामुळे मला गावाकडे लवकर येता येणार नाही,काळजी घ्या.गोळ्या औषधांसाठी पैसे पाठवून देतो.
सोपानराव : अरे अविनाश मी आता लई दिसाचा सोबती नाय राहिलो रे.तवा तुला बघायची,भेटायची लय इच्छा हाय.तुझ्याबर खूप बोलायचय बघ.तुझ काम बापापेक्षाबी महत्वाच हाय का रे बाळा.
(तोपर्यंत फोन बंद होतो.)
पार्वती : अहो फोन बंद झाला वाटतं.असूद्या,कामाच्या घाईत असल लेकरू.
सोपानराव : मला वाटतं,जगात आपल्या बापापेक्षाही दुसरं जास्त महत्त्वाचं काम असल.जो दिवा स्वतःच्या कुटुंबाला दुःखात,अंधारात उजेड देऊ शकत नाय,त्या वंशाच्या दिव्याचा काय उपयोग म्हणा.इथं स्वतःचा बाप खितपत पडलाय,अन दवाखान्यात घेऊन जाणं तर दूरच पण याला भेटायलाबी येळ नाय.
अविनाश : (मनातच विचार करतो,घरी फोन करून कळवायला पाहिजे की,कामानिमित्त मी परदेशात चाललो आहे,परत आल्यावर तुम्हाला भेटायला येईल सर्वांना) हॅलो,मानसी मी कामानिमित्त परदेशात चाललो आहे.परत आल्यावर तुलाही मुंबईला घेऊन येईल आणि आईबाबांनाही भेटायला येईल.ओके बाय.
(सोपानरावांची अवस्था उन्हाळ्यामधील पानगळ झालेल्या झाडाप्रमाणे झाली,जवळ पानही नाही आणि फूलही नाही.मुलगा मुंबईला आणि मुलगी तिच्या सासरी,जेव्हा मुलगी अनिता त्यांना अधून मधून भेटायला येते,तेव्हा मायेचा ओलावा मिळून झाडाला पालवी फुटल्याप्रमाणे त्यांना बहरून आल्यासारख वाटतं.)
पार्वती : अहो,दोन घास खावा म्हणते,जीवाला बरं वाटल.
सोपानराव : अग,घशाखाली जातच नाय बघ.तू घे खाऊन,माझा नगं लय ईचार करू.
(सोपानरावांची तब्येत अचानक जास्त बिघडली.त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले.पण शरीरापेक्षा मनाने खचलेला सोपानराव कुठल्याच औषधाला साथ देईनासा झाला.शेवटी काळाने झडप घातली आणि सोपानराव सर्वांना सोडून अनंतात विलीन झाले.वार्ता वाऱ्याच्या वेगानं गावभर पसरली.अविनाशला फोन लावला तर समजलं की त्याला परदेशातून यायला दोन दिवस लागतील.)
गावकरी : अविनाशला येईपर्यंत मयत कशी ठेवायची.शरीर अगोदरच कुजलय सारं,ते शक्य नाही.जित होता तवर नाई भेटाया आला आणि आता काय राहिलया बाकी.म्हणतात ना दिव्याखाली अंधारच मग तो देव्हाऱ्यातला असो अगर वंशाचा.
(परदेशात अविनाशच्या मनात विचारांचे काहूर माजले,ज्या बापाने आपल्याला आजपर्यंत दुःखाची थोडीही भनक लागू दिली नाही.त्यांच्या दुःखी,कष्टी काळात आपण मात्र पैशावर आणि नोकरीवर अतीम प्रेम करत बसलो.साधा काटा टोचल म्हणून बाबांनी कधी अनवाणी चालू दिलं नाही.मुलाला ऊन लागतंय म्हणून स्वतःच्या डोईवरचा रुमाल सोडून माझ्या डोईवर बांधायचे.ताप आला तर रात्र रात्र माझ्यापाशी बसून राहायचे.माझे सर्व हट्ट कसोशीने पूर्ण करायचे.बाबा खरच मी चुकलो,मला क्षमा करा.या सर्व आठवणीने अविनाशला राहुन राहुन भरून यायचे.पाकीटात ठेवलेल्या बापाच्या फोटोकडे पाहत अश्रूंचा बांध फुटायचा आणि त्यामध्ये केलेल्या चुकांना गंगाजळी देण्याचा तो प्रयत्न करायचा.)
अविनाश : (दु:खी अंतकरणाने पुटपुटायचा) बाबा मला माफ करा...मी चुकलो.
(गावाकडे घरासमोर मयताच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू होते.मुलगी अनिता आली की,मयत करायची ठरते.अविनाश येईपर्यंत थांबणे शक्य नाही,असे गावातील मंडळी म्हणतात.अनितासह सर्व नातेवाईक,स्वकीय येतात.सर्वांना रुखरुख असते ती अविनाशची,एकुलता एक मुलगा पण बापाला अग्नीडाग द्यायला हजर नाही.अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पूर्ण केला जातो.)
दुसऱ्या दिवशी अविनाश परदेशातून येतो,पण शिल्लक राखेत असतात,फक्त बापाच्या काळ्याकुट्ट अस्थी आणि स्वतःच्या काळजात जिवंत आठवणी.
अविनाश : (मनाशीच)मला आठवतय,एकदा पावसाळ्याच्या दिवसात मित्रांबरोबर जांभळं खायला गेलो असताना,जांभळीची फांदी मोडून मी खाली दगडावर पडलो आणि डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला होता,बाबांना कळताक्षणी विद्युत वेगाने तेथे पोहोचले आणि मला पाठीवर टाकून डॉक्टरांकडे घेऊन गेले.जास्त रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी तातडीने रक्त भरावे लागेल असे सांगितले.'माझं रक्त कितीबी घ्या डाक्टर,पण पोराला काय होऊ देऊ नका'.हे बाबांच वाक्य आजही मला आठवतय.बाबा,मी तुमचा खूप मोठा अपराधी आहे.माफी मागायचा ही मला अधिकार नाही.खरतर आई-बाबा समजणं ही खूप मोठी गोष्ट,पण ती मला जमलीच नाही.मला तुमच्या दुःखातील,अंधारातील दिवा होता आलेच नाही,झालो फक्त तुमच्या"वंशाचा दिवा".
लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे (सर)
मु.पो.लोणी(स.),आष्टी
मो.९४२१३३६०५९
काय लिहू सर अंतकरण खूप ओले झाले आहे. खूपच छान
ReplyDelete