Wednesday, November 19, 2025

कथा - मेटे मामा

    *कथा*


               *मेटे मामा*


*लेखक- अजिनाथ सासवडे*

          

          मेटे मामा खरंतर आमच्या वडिलांचा मामा. पण आम्ही लहान-मोठे सगळेच त्याला मामा म्हणायचो. त्याच्या नशिबी दोन लग्नाचा योग आला. पण दोन्ही बायका आजारपणामुळे अर्ध्यावर सोडून गेल्यानं त्याचा वेलविस्तार काही वाढला नाही. संसाराच्या गाड्याला अवेळीच खीळ बसल्यानं तो पुढे धकला नाही. तिसऱ्या लग्नाच्या भानगडीत न पडता उरलेलं आयुष्य आर्धीकोर खाऊन शेवटास न्यावे हा विचार त्याच्या मनात ठाण मांडून बसला. आता जीवाभावाचं तर कोणी उरलं नाही. ढळत्या वयात कुण्या नातलगाचा आसरा घ्यावा आणि उरलेलं आयुष्य समाधानानं घालवावं म्हणून लोणी या त्याच्या बहिणीच्या गावी म्हणजे आमच्याकडे येऊन दहा-पाच शेळ्या सांभाळत आपलं पोटापुरतं काम तो करू लागला. 

       आमची परिस्थिती तशी बेताची होती. घर छोटंसं असल्यानं मामानी स्वतःसाठी घरामागं तिन मेढी रोवल्या. मेढीवर आडवे उभे वासे दोरीने करकचून बांधले. दोन्ही बाजूनं, वरून ऊसाचं पाचरट लावून त्यावर बदांट्या बांधल्या. पावसाळ्यात गळू नये म्हणून कोपटी चांगली शेकरली. पाचरटाखाली आतल्या बाजूनं तिला मेनकापड बांधलेलं. बंदाट्यात तुराटीच्या काड्या बांधून कोपीला छातीएवढ्या उंचीचा दरवाजा केलेला. पुरुषभर उंचीपेक्षाही जराशी कमी कोपटी चांगली निटस् वाटत होती. रात्रीच्या अंधारात दिवाबत्तीची सोय म्हणून एक मळक्या काचेचा जुना कंदील(प्रभाकर) एका लाकडी वाशाला कायमचा अडकवून ठेवलेला. 

       "मामा कोपी लई मस्त केली राव." असे शेजारी-पाजारी कोपीचं कोडकौतुक करी. त्यानं मामा हरखून जाई आणि मग त्याला हायसं वाटायचं.   

         मी दहा-बारा न् धाकला भाऊ आठ-दहा वर्षांचा असल जेव्हा मामा साठीच्या घरात होता. आम्हा दोघा भावंडापैकी मामाचा माझ्यावर भारी जीव. एखादी थोरली वस्तू माणसानं आपली म्हणावी, तसा मी थोरला असल्याकारणाने मामानं मला आपलंसं केलं. गोरा वर्ण, धडधाकट बांधा. नाकीडोळी नीटस्. दात अगदी देखणे न् मजबूत. डोळ्याला तेवढा चष्मा लागलेला. चष्म्याच्या दांड्यांना करदोरा बांधून पाठीमागून केसांवर चढवलेला. डोळ्यावरचा चष्मा नाकावर आला तरी तो वर घ्यायचा त्याला भान नसे. डोळ्यावरून चष्मा जसा-जसा खाली येई तशी मान पाठीमागे झुकवून समोर बघत चालायचा. पण चष्मा काही वर घ्यायचा नाही. पांढऱ्या धोतरावरती जराशी मळकट कोपरी. कोपरीच्या एका खिशात सदानकदा तंबाखूची छोटीशी कापडी पिशवी कोंबलेली. त्यामुळे तो खिसा सारखा फुगीर वाटायचा. भास व्हायचा की, काहीतरी खाण्याची वस्तू खिशात दडवून ठेवलीय. आणि मग शाळेतून घरी आल्यावर मी अधून-मधून कोपरीचा खिसा चाचपडत असायचो. पण तंबाखूच्या पिशवी बिगर दुसरं काही हाती यायचं नाही. तंबाखू सांडू नये म्हणून पिशवीच्या तोंडाला एक बारीक दोरी जोडलेली. दोरीनं पिशवीला दोन गाठी मारलेल्या म्हणजे तंबाखू सुरक्षित राहील या हेतूनं. कोपरीच्या दुसऱ्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत दहा-वीस रुपयाच्या चार-दोन नोटा ठेवलेल्या. कधी-कधी बाजारहून शेळी, बोकड विकून आल्यावर शंभाराच्या नोटाही असायच्या. त्या खिशात मामा हात घालू द्यायचा नाही. त्याची नजर चुकवून भसकन् हात घातला न् प्लास्टिकची पिशवी काढली तर मामा माझ्यावर रागवायचा.

         "त्याच्यात पैसे हायेतं, आण् इकडं. हारून जातील." असं तो म्हटला तरी मी पिशवीतले पैसे बाहेर काढून किती आहेत हे तपासून बघितल्याशिवाय परत करायचो नाही. कधी कधी मामाच् म्हणायचा, "अरे मोजून बघ बरं हे सगळे किती भरतेत?" शेळी, करडू विकून आल्यावर पैसे देताना व्यापाऱ्याने आपल्याला फसवलं तर नाही ना? म्हणून तो माझ्याकडून सगळ्या नोटा बरोबर आहेत का? याची खात्री करून घेत असे. मी पैसे मोजून बरोबर आहेत असे सांगितल्यावर मामाचा जीव भांड्यात पडे. मोजून झाल्यावर मी हटकून मोठी नोट माझ्याजवळ ठेवून घेई आणि मला पाहिजेत म्हणायचो.

    "एवढे कशाला पाहिजे तुला, इकडं आन मी देतो तुला सुट्टे पैसे हायेत माझ्याजवळ." आणि मग तो मला खाऊसाठी पाच-दहा रुपयाची एखादी नोट देई. माझ्याजवळची मोठी नोट माघारी देईपर्यंत मामाचा जीव झुरणीला लागलेला असायचा. व्यवस्थित घडी घालून प्लॅस्टिकच्या पिशवीत सगळे पैसे ठेवून कोपरीच्या खिशात घातल्यावर मात्र मामाच्या चेहर्‍यावर हसू उमलायचं.

      पायांतल्या कातडी वहाना उन्हात वाळलेल्या भाकरीगत वाकड्या झालेल्या. मामा बोलून-चालून सरळ माणूस. ठग नाही. वागण्यात अगदी निटस्. कधी कुणाची खोडी नाही की चहाडी नाही. साधेपणाने जगणारा. आपलं काम भलं नि आपण असा त्याचा स्वभाव. बाप्पूनं मामाला आश्रा दिल्यानं तो सुखा समाधानाचे सुस्कारे सोडत होता. 

     मी पाचव्या इयत्तेत गेलेलो. शाळेपेक्षा शेळ्या-करडं, गुरंढोरं यांच्यातच मी जास्त रमायचो. शाळा अशीतशीच चालू होती. मी शाळेतून घरी आलो. दप्तर घराच्या एका कोपऱ्यात भिरकावलं नि मोठ्या नजरेने मी मामाला हुडकू लागलो. तिन्हीसांज होत आलेली, पण कुणीकडूनही शेळ्या घेऊन येताना मामा दिसेना. गायांच्या गोठ्यात मेडीला बांधलेलं कुत्र्याचं पिल्लूही नजरेस पडेना. कुरतडून टाकलेली आर्धी दोरी मात्र खांबाजवळ मेलेल्या सापासारखी वाकडी-तिकडी पडलेली दिसत होती. मोकाट कुत्री पिलाला चावत्याल म्हणून मामा सोबत घेऊन तर गेला नसेल? पण कुरतडलेली आर्धी दोरी खांबाला शिल्लक कशी? मी सैरभैर झालो. इकडं-तिकडं शोधाशोध करू लागलो. रेल्वे जवळून जाताना जसे धडधडते तसे काळीज धडधड करू लागले. त्याचं काही बरं-वाईट तर…? निरभ्र आकाशात एकाएक काळेकुट्ट ढग जमा होऊन वरवर चढावेत तसे विचारचक्र मनात धावू लागले. तितक्यात गोठ्याच्या एका कोपऱ्यात आळं करून पडलेलं पिल्लू दिसलं. माझ्या जीवात जीव आला. पटकन त्याला उचलून घेतले. अलवारपणे कुरवाळले. दुसर्‍या एका दोरीनं पहिल्या जागेवर बांधून वाटीभर दूध ठेवलं आणि पुन्हा मामा आलाय कि नाही ते पाहू लागलो. मनाच्या किनाऱ्याला राहून-राहून शिक्षकांचे दुपारचे बोल लाटांसारखे धडका देत होते, "ज्यांना ज्यांना नवोदयच्या परीक्षेला बसायचे आहे त्यांनी लवकरात लवकर परीक्षा फी जमा करावी. परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे आष्टीला आहे." परीक्षा कशी असेल यापेक्षा आष्टी बघायला मिळणार, एसटीने प्रवास करत बाहेरची झाडं, झुडपं, गावं बघायला मिळतील या विचारानेच मी पार हरखून गेलेलो. परीक्षेला बसायचं म्हणून मनाशी पक्का निर्धार केलेला. काहीही असो परीक्षेच्या निमित्ताने आष्टी बघायला तर मिळेल. गुरुजींनी आष्टीविषयी मनात जागवलेलं कुतूहल विलोभनीय होते. "मोठे शहर आहे. तीन-चार मजली इमारतीमध्ये परीक्षा होते. संपूर्ण तालुक्यातून मुलं येतात, अनुभव येतो." जमीनीवर पाऊस पडला की ती जशी जराशी फुगून वर येते तसे गुरूजींचे बोल आठवल्यावर माझ्या मनाचा गाभारा फुलून वर येई. पैसे तर लागणार होतेच परंतु, एवढ्या मोठ्या गावाची सफर करायला मिळतेय ते का थोडे होते. आष्टीला जाण्याच्या विचारातून मी बाहेर आलो. नजरेने पुन्हा मामाचा शोधाशोध करू लागलो. घराजवळचं असलेल्या लिंबाच्या झाडावर खारूताईसारखं सरसर चढून सगळीकडे न्याहाळून पाहिलं. तेव्हा मामा घरापासून तिन-चार खुटनाच्या अंतरावर पांदीच्या कडेनं शेळ्यामागे झोकांड्या घेत येताना दिसला. 

        मी सरसर लिंबावरून खाली उतरलो. अनवाणी पायाने पाऊल वाट तुडवत निघालो धावतपळत. पाच मिनिटांत मामाला आडवा ठाकलो. धाप लागल्यानं मोठा श्वास सोडला.

  "लई पळत आलास र्ं?" मामानं प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.

   "असंच.." दम टाकतं मी उत्तर दिले.

 मनातली गोष्ट लपवत सुरवातीला मी मुळ विषयाकडे गेलो नाही. 

       "आज शेरडा लई फुगल्यात मामा." मी सहजचं म्हणालो.

एक बारीक करडू चलून-चलून पार थकलेलं. अधूनमधून ते जागीच उभा राहायचं नि अगदी बेंबीच्या देठापासून मॅऽऽऽमॅऽऽऽ असं ओरडायचं. मी पटकन त्याला उचलून पोटाशी धरले. आणि शेळ्यामागे चालू लागलो. मोठी करडं दिवसभर आपल्या आईला पिऊ नये म्हणून शेळ्यांच्या काशेला पिशवी घातलेली. एका शेळीची पिशवी सुटून जमीनीला टेकून लोळत चाललेली. तिन्हीसांज झाल्यानं सूर्य किरणे डोळ्यात तीरासारखी घुसत होती. मामा उभा राहिला. आपला हात वक्राकार करून भुवयांवर धरत मागं राहिलेले करडं आलेत की नाही? हे डोळे बारीक करून बघू लागला. मागं राहिलेल्या करडांच्या ओढीनं शेळ्याही चालता-चालता मध्येच थांबून पाठीमागं बघत अमॅऽऽ अमॅऽऽ असा गलका करायच्या. तान्ही करडं घरीच असलेल्या शेरडा त्यांच्या ओढीनं पुढच्या तोंडाला चाललेल्या.

       टुणटुण उड्या मारत मागं राहिलेल्या करडांनी अर्ध्या मिनिटात आम्हाला गाठलं. शेळ्यांसह मामाचा जीव सुखावला. 

      "मामा आमची नवोदयची परीक्षा हे. मला परीक्षेला बसायचंय." मी हळुवारपणे बोललो.

      "मग बसना, चांगली गोष्ट हे."

    "अरं पण परीक्षा थेट आष्टीला हे." मी म्हणालो.

      "काय? लई लांब हे रं..चुकशील-बिकशील तिकडं." हसत हसत मामा बोलला.

बोलत-चालत आम्ही आमच्या निवडुंगाच्या वावराजवळ आलो. पांदीत असलेल्या निवडुंगाच्या झाडाला जाम चिकटून बसलेली लाली लाल बोंडं मला दुरूनच खुणावू लागली. तोंडाला पाणी सुटले आणि मी मामाला एकाएक म्हणालो,

   "मामा मला लेडुंगाची बोंडं खायची. काढून दे ना."

         "लय काटे हे त्याला, जीभीला टोचत्यान, कशाला उद्योग करून घेतो." मामा कंटाळवाण्या स्वरात बोलला. मी इरीला पेटलेलो बघून मामानं मला शेळ्यांना लक्ष ठेवायला सांगितले. मी पीकाच्या कडेला उभा राहिलो. तोपर्यंत मामानं काठीनं डिवचून-डिवचून तिन-चार बोंडं खाली पाढली. हळुवारपणे दगड-मातीला घासून-पुसून मला दिली. आवडत असूनही मी भीतभीतच खाल्ली. चवदार लागली. बराच वेळ जीभेवर चव रेंगाळत होती. 

    "मामा शेरडा एवढ्या फुगल्यात तरी पुन्हा-पुन्हा जोंधळ्याकडे ओढ का बरं घेत्यात? हे काय कळत नाही." मी सहजचं म्हणालो.

  "शेळ्यांची जातंच लय वढळ, पोटफुगुस्तोर खाल्लं तरी त्यांचं समाधान नाही आणि घराच्या वाटंला लागल्यावं तर हमखास मालात तोंड घालणार म्हणजे घालणार." मामा बोलत होता. जस जसं घर नजरेच्या टप्प्यात आले तस-तशी शेळ्यांची धावपळ पाहण्याजोगी होती. ही तिच्यापुढे की ती तिच्यापुढे. मागेपुढे होत शेळ्या घराजवळ येऊन थबकल्या. तान्ही करडं दिवसभर कुत्र्यांच्या भीतीपोटी झापाखाली डालून ठेवलेली. ज्या शेळीचं करडू झापाखाली डालून ठेवलेलं ती त्याच्याभोवती गोल गोल यरझऱ्या घालू लागली. मी शेळ्यांच्या पावलावर पाऊल देत धावत-पळत आलेलो. मामा लंगडत लंगडत पाठीमागून येत होता. तो घराजवळ आला. शेळ्या आपापल्या मेखीला बांधल्या. तोपर्यंत तान्ह्या करडांनी मॅऽऽमॅऽऽमॅऽऽ असा एकच गलका केला. मामाने पटकन झाप वर केला. करडं आपापल्या आईकडे सुसाट निघाली. थानाला तोंड लावून चराचरा दूध गोठू लागली. शेळ्याही आपापल्या करडांना चटाचटा चाटू लागल्या. बोकड तर त्याच्या बाजूचे दूध पिऊन पुन्हा दुसऱ्या बाजूचे पिण्यासाठी धडपड करी. दूध पिल्यानंतर मामानं बोकडांना पायांमध्ये गच्च पकडून ठेवलं. एक-दोन मिनिटांत करडं पोटभर दूध पिऊन अंगणात आनंदाने टुणटुण उड्या मारू लागली.

       थोडा वेळ त्यांचाबी पाय मोकळा होईल म्हणून मामान् त्यांना हिंडू दिलं. दिवस मावळला. हळूहळू कडूसं पडायला लागलं. मामान् कोपीचं दार केव्हाच उघडले होते. गार वारा सुटला होता. कोपीवरची पाचरटाची मोकळी पानं वारा आल्यावर नागिनीगत डुलत होती. शेळ्या डोळे मिटून रवंथ करत बसल्या. रानात गेलेली घरातील सगळी माणसं एकेक करून घरी येऊ लागली. झाडून-लोटून झाल्यावर दिवाबत्ती लागली. चूल पेटली. दिवसभर मुकं मुकं असणारं घर सायंकाळी बोलायला लागलं. चहा उकळला. चहाचा सुगंध घराच्या अवतीभवती दरवळू लागला. इतक्यात आईने "चहा घेऊन जारे तिकडे." म्हणून जोरात आवाज दिला. चहा म्हटल्यावर मी पळतच गेलो. कपबशी भरून चहा हातात घेऊन आलो. मामान् सुर्ऽऽ सुर्ऽऽ करत चहा ओढला. मीही प्यालो. कोपीच्या समोरच शेळ्यांना निवाऱ्यासाठी छोटंसं छप्पर बनवलेलं. छपरात नेहमीप्रमाणे भगवान चिलीम ओढत होता. त्याच्या वासानं सगळं वातावरण दूषित झालेलं. मी म्हटलं "बॉयलर पेटलाय वाटतं." तो खीऽऽ खीऽऽ करत हसू लागला. बऱ्याच वेळेपासून गाया हंबरू लागलेल्या. बाप्पूनी मला जोरात आवाज दिला.

        "ऐ पोरा चल लवकर, खुराक ठू गायांनला."

   मामानी हलकेच मला दटावलं, "पळपळ तोवा बाप हाका मारतोय."

मी उठलो, पळतचं खुराकाची घमेली उचलली, गायांना खुराक मांडला. खुराक खाऊन रिकामी झाल्यावर मी घमेली लगेचच एका जागेवर ठेवली. पुन्हा घरामागं मामाजवळ येऊन बसलो. मनात विचारचक्र फिरू लागले, सांगितलेली परीक्षा फी उद्या द्यावी लागेल. बराच वेळ वाफ कोंढल्यावर कुकरची शिट्टी वाजावी तसा उमाळा आला नि मी म्हटलं, 

     "मामा मला पैसे देना..उद्या परीक्षा फी द्यायची सरला."

"बाप्पूला माग ना.." मामा म्हणाला.

    "ते नाय द्यायचे…तू दी." मी लडीवाळपणे बोललो.

"माझ्याजवळ नाहीत.. जमलं तर उद्या कुणाकडून बघून देईन. एक काम कर बरं, ह्या डायरीवर लिहून ठूलेले पैसे वाच बरं कोणा-कोणाला किती तारखेला दिलेत."

    मी बरीच नावं, तारखा आणि दिलेले पैसे वाचले. मामा आठवू लागला. बराच वेळ आम्ही इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत बसलो. एकमेकांचे चेहरे काही दिसत नव्हते. अंधाराने आपले हात-पाय पसरवलेले होते. रात्रीचे जेवण उरकले. फक्त जेवणापुरताच कंदील मामानं पेटवला. जेवण झाल्यावर कंदीलाचा खटका दाबून वातीवर जोराची फुंकर मारत मामाने कंदील विझवला. अंथरूणावर अंग टाकून हळू आवाजात आम्ही बोलत होतो. बोलता-बोलता कधी झोप लागली कळले सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मामानं पैसे दिलेल्या लोकांचे घर गाठले. मात्र पदरी पैशाऐवजी निराशाच पडली. शाळेत दिवसभर डोक्यात विचार घोळत होते, मामाला पैसे मिळाले असतील? आता उद्या नवोदय परीक्षेची फी देऊन टाकू सरला म्हणजे आपला परीक्षेला जाण्याचा मार्ग मोकळा होईल. तिसऱ्या प्रहरी शाळेतून घरी आलो. कालच्यासारखेच पुन्हा मामाकडे धावत पळत गेलो, परंतु दुरूनच मामाच्या चेहऱ्यावर सुतकी कळा अवतरलेली दिसत होती. 

     "कुणी एक रुपयाही दिला नाही." असे मामा मला काकुळतीला येऊन सांगू लागला. परंतु आज मात्र मी मामाला सळो कि पळो करून सोडले.

   "काहीही असो आज मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजेच." असा मी रागाच्या भरात हेकाच धरला.

   "दोन दिवस थोडं थांब. सोमवारी वाळकीच्या बाजाराला जाऊन एक बोकड विकून टाकतो आणि तुला पैसे देतो." असे मामा मला विश्वास देत बोलू लागला.

    त्यादिवशी सायंकाळी घरी आल्यावर आम्ही कोपी म्होरं बैठक टाकलेली. आम्ही दोघा भावांनी गावातून आणलेल्या कुत्र्याच्या पिलाला मी गोंजारत होतो. हिंदी भाषेविषयी मनात फारच कुतुहल होते. हिंदी चित्रपटांचा मनावर भारी पगडा. कुत्र्याला हिंदीत काय म्हणत असावेत हा विचार मला अनेक दिवसांपासून स्वस्थ बसू देईना म्हणून मी मामाला सहज विचारू लागलो.

    "मामा, ऐ मामा.. कुत्र्याला हिंदीत काय म्हणतेत ते सांगा ना?" 

  "अरे मला नाही सांगता येत."

"नाही म्हंजे.. काहीही असलं तरी तुला सांगावंच लागल."

 दिवस मावळतीला भगवानचा चिलीम ओढण्याचा कार्यक्रम काही केल्या चुकत नव्हता. तो आपल्या नादात झुरक्या मागून झुरके ओढत होता. मी मामाला सारखं विचारून-विचारून जेरीस आणलं. मला वाटायचं मामाला माहीत असूनही तो मला मुद्दामहून सांगत नाही. माझ्या डोक्यात कुत्र्याला हिंदीत काय म्हणतात याचं खूळ बसलेलं. सारखं सारखं विचारून मी त्रास देतोय म्हणून माझा नाद मोडण्यासाठी मामा सहजपणे म्हणाला,"कुत्र्याला हिंदीत 'कुत्ता बोले उसका' असं म्हणत्यात." ते ऐकल्यावर मात्र भगवान चिलीम ओढता-ओढता खदखदून हसू लागला. त्याचं तोंड चिलमीला बिलगलेलं असलं तरी कान सदैव आमच्या बोलण्याकडे असायचे. भगवानच्या हसण्यावरून मला जाणवले, की मामा मला गंडवतोय.

   "उगा काहीतरी सांगू नको, खरं सांग ना..?" मी म्हटलं. 

    "अरे खरंच सांगतोय मी." मामा पोटतिडकीने बोलत होता. तेव्हापासून भगवानचीन् माझी गाठभेट झाली की तो मला हटकून म्हणायचा, "कुत्ता बोले उसका कुडंहे." मी चपापल्यासारखा व्हायचो.

     सोमवारी झुंजुमुंजू पहाटेच मामानं चांगलं शेलकं बोकड(बंड्याला) बाजाराला विकायला नेलं. मी उठल्यावर बघतोय तर बाकीच्या शेळ्या जीथल्या तिथं होत्या पण बंड्यान् मामा काही दिसत नव्हते. मी समजून चुकलो मामा बाजारला गेलाय वाटतं. दिवसभर माझं मन फुलपाखरासारखं इकडून-तिकडं, तिकडून-इकडं धाव घेई. शिक्षकांच्या शिकवण्याकडे माझे जरासेही लक्ष लागत नव्हते. आता मामाचे बोकड विकून झाले असेल? पैसे मिळाले असतील? अशा नाना विचारात माझे मन राहून-राहून गढून जायचे. कधी एकदाची शाळा सुटतेय आणि घरी जाऊन मामाला भेटतोय असे जीवाला झालेलं. दिवस सरता सरेना. मुंगीच्या चालीने सूर्य हळूहळू चाललेला. एकदाची शाळा सुटली आणि मी शाळेतून घरी परतलो. मामा बाजाराहून येऊन शेळ्या चारायला गेलेला. मी थेट रानातच मामाला गाठलं. मामा दिसल्यावर माझ्या चेहऱ्यावर हसू फुटले. आता आपल्याला परीक्षेला जायचे पक्के झालेच म्हणून समजा. पाटातील पाण्यासारखा माझा चेहरा खुलला. मी मामाच्या पाठीमागून जाऊन अचानक भाॅ‌ऽऽ केले. मामानं चमकून मागं पाहिलं. पण जरासाही दचकला नाही, त्याला माझी सवय माहीत होती.

        "आला का?" 

       "हा, पळतच आलो आज शाळेतून. बोकड ईकलं?"

      "हा, तुझ्या नवंदय का फवंदय परीक्षेसाठी चांगलं बोकड विकावं लागलं ना. लय चांगला होता बंड्या, पण दिला सस्ता-महाग करून."

     "पैसे आणले?" जराशीही उसंत न घेता मी बोलत होतो.

   "हा आणले बाबा."

       "बघुदे"

"आता मी काय पळून चाललोय? घरी गेल्यावर संध्याकाळी देतो."

      "नाय नाय आत्ता दाखवं, आपण मोजून बघू." 

      "लई हाट्टी पोरगं, त्याचीच टर पुरी करणार.."

मामानं प्लॅस्टिकच्या पिशवीत निटनेटके घडी घालून ठेवलेले पैसे अलगद बाहेर काढले आणि माझ्या हातात दिले. मी तर आनंदाच्या लाटांवर तरंगायलाच लागलो. सगळे पैसे मोजले.

        "शाळेत जाताना उद्या सकाळी पैसे घेऊन जा, आता माझ्याजवळ ठेवतो." मामा म्हणाला.

    दिवस मावळायला गेलेला. झाडाझुडपांवर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे ते पिवळसर लाल रंगाचा गिलावा दिल्यासारखे वाटत होते. सायंकाळ झाली. रात्र झाली. गार वारा अंगाला झोंबत होता. तरीही मी मामाच्या सोबतच नेहमीसारखा. मामाच्या लळ्यानं मला कायमचं जखडून ठेवलेलं. त्याचाही माझ्यात जीवा अडकलेला. सकाळी मामाने मला फी पुरते पैसे दिले. मी शाळेत फी जमा केली. महिन्या दोन महिन्यात परीक्षा होती. परीक्षेला जाताना मला मामाने बोकडाचे आलेले तीनशे रुपये दिले. परीक्षा अगदी चांगली गेली. दिवसामागून दिवस लोटले. सुट्टीच्या दिवशी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी मामाला शेपटासारखा चिकटलेलो असायचो. शेजारी-पाजारी नेहमी म्हणायचे, "मामा ही पोरगं भाकरीच्या उरावर कांदा कशाला घेऊन फिरतो." मी कधीकधी एखाद्या जागेवर खूतून बसलो, की मामाला कष्टी मनाने खांद्यावर उचलून घ्यायला लागायचं. काट्या-कुपाट्या, नांगरलेल्या रानातून मोठ मोठे पाऊल टाकत मामा शेळ्या जवळ करत असे. मी खांद्यावर बसून असल्याने त्याचा जीव पार जेरीस यायचा आणि मग कधी कधी म्हणायचा, "च्यायला ह्या पोराचे, नको नको केलंय यानी." ओरडायचा, रागवायचा. पण मला खांद्यावरून खाली मात्र उतरवत नसे. मीही फार जिद्दी. जिथं मामा मला उतरवायचा तिथून चार पाऊल पुढे टाकल तर जणू मला शपथ. त्याच जागेवर घट्ट पाय रोवून उभा राहायचो. दोन पावले मागे फिरून मामा मला उचलून घ्यायचा. भरपूर लाड पुरवायचा. मागल ती गोष्ट हजर करायचा‌. अधूनमधून दळण आणायला साकतला गेला की खाऊ घेऊन यायचा. कुठंही गेला तरी रिकाम्या हाताने कधी माघारी यायचा नाही. त्याला कुणी काही खायला दिलं तर ते माझ्यासाठी लावून ठेवायचा. जीवापाड प्रेम करायचा माझ्यावर. बहुदा अनेकजण म्हणायचे, "मामा तू याचे एवढे लाड करतो, म्हातारपणी ही पोरगं सांभाळीन का तुला?" 

     हसत हसत मामा बोलायचा, "त्याची बायको सांभाळीन ना, भाकर तुकडा दिला बसं झालं. मला तरी काय लागतंय बापड्याला?" 

     वर्षामागून वर्ष सरत होते. मामा आता थकत चाललेला. मी सातव्या वर्गात पोहोचलो होतो. एके रात्री मामाचे अन् माझे भांडण झाले. मी सकाळी उठून पाहतो तर मामा गायब झालेला. भांडण झाल्यानं अथवा काहीतरी कारणानं मामा भल्या पहाटेच कुठेतरी निघून गेला. दोन-तीन दिवसानंतर समजले की मामा अंभोरा या त्याच्या गावी गवळ्यांच्या गोठ्यावर राहतो आहे. मी उदास उदास राहू लागलो. कशातही मन लागत नव्हते. माझे अन् मामाचे भांडण झालेला प्रसंग काळजावर ओरखडे ओडत होता. मी लहान होतो तरीही आपल्याकडून घोडचूक झाल्याची जाणीव मला होत होती. महिन्याभरात निरोप आला की मामा आजारी पडलाय. मला राहवेना. मी आज्जीला म्हणालो, "आपण मामाला भेटायला जाऊ. आणि त्याला इकडं घेऊन येऊ." 

       आज्जीन् मी अंभोऱ्याला पाई चालत गेलो. मामाजवळ पोहोचलो. कृश देहयष्टी, खोलवर गेलेले डोळे, खोकून खोकून छातीचा पिंजरा उघडा पडलेला. मामाच्या शरीरात एवढा मोठा झालेला बदल मला पाहवेना. लाजेनं मी पाणी पाणी झालो. माझ्यामुळे मामा आज खितपत पडलाय ही बोचनी काळजाला लागत होती. काय बोलावे म्हणून मला शब्दच सूचेना. आज्जी बोलू लागली, "उठं, अजिनाथ तुला न्यायला आलाय." तितक्यात मामाला खोकल्याची जोरात उबळ आली. खोकून शांत झाल्यावर जोराचा श्वास भरत मामा मला बोलला, "काय काळजी करू नको. जरा बरं वाटलं की येतो मी चार-आठ दिवसांत. अभ्यास करतो का? अभ्यास करून मोठा माणूस व्हायचं. शेरडा, करडात काय नाय बघ.." मला भडभडून आले. घसा कोरडा पडला. मनानं दटावूनही जीभ काही बोलण्यास धजावत नव्हती. श्वास कोंडून जीभ दगडागत झालेली. मी नुसतीच मान डोलावली.

           दुसऱ्या दिवशी आम्ही रिकाम्या हाताने माघारी आलो. मामाची काळजी लागलेली होतीच. शाळेत, घरी कुठेच मन लागत नव्हते. एके दिवशी आम्ही पोरं पोरं लघवीच्या सुट्टीत शाळेतून गावातल्या घरी आलेलो. ओसरीवर थंडगार पाण्याचा माठ ठेवलेला असायचा कायम. घटाघटा पाणी पिलो. मला पाहिल्याबरोबर सुनंदा काकी म्हणू लागली, "अजिनाथ तू नाही गेला काय अंबोऱ्याला? मामा वारला ना.." बसं हे शब्द कानावर पडले आणि आपलं काळीज कुणीतरी दगडानं ठेचतंय असं वाटू लागलं. कंठ दाटून आला. श्वास गुदमरला. आवाज फुटेना. जीभेला जखडून ठेवल्यागत झालेलं. अवतीभवती पोरं असूनही हुंदका फुटून मी फुंदुफुंदु रडू लागलो. धावत शाळेत गेलो‌. डोळे पुसत दप्तर घेऊन रानच्या वाटेला लागलो. छोटा भाऊ सोबत होता. गावकुसाबाहेर बाप्पू भेटले. "पोरांनो, मी अंभोऱ्याला चाललोय, यायला उशीर होईन गायांना चारापाणी करा. इकडं तिकडं फिरू नका." असे सांगून सायकलवर टांग टाकून ते निघून गेले.

      आम्ही चपळाईने घरी आलो. मी भीतभीत शेजारच्या अप्पाला सायकल मागितली. त्यांनीही दिली. सायकलवर टांग टाकून कुठेही न थांबता मी नेटानं अंभोरा जवळ करू लागलो. अंभोरा जसजसे जवळ येऊ लागले तसतशी माझ्या सायकलची गती दुप्पट वाढली. ओढीनं. मी तेथे पोहोचलो. मला पाहून सर्वांनाच रडू कोसळले. अनेकांनी मला जवळ ओढून घेतले. तोंडावरून, पाठीवरून हात फिरवला. पाणावलेले डोळे पुसले. "मामासाठी एवढ्या लांबून लेकरू एकटं सायकलवर आलंय" म्हणून अनेकांनी नवल केले. मयत झाली होती. मामाचा चेहरा तरी बघायला मिळेल म्हणून मी अग्निडाग दिलेल्या जागेकडे धाव घेतली. पण सर्व संपले होते. सरण जळून राख झाली होती. राखेखालचा लालबुंद विस्तव वाऱ्याच्या झुळकीसरशी बाहेर डोकावत होता. त्यानं बजावलेल्या चोख कार्याची पावती तो मला मोठ्या दिमतीनं देत होता. निखाऱ्यानं राखराख केलेल्या मामाच्या स्थूल देहाच्या आठवणीत रमून मी तसाच एकटक राखेकडे पाहत राहिलो..


      

   लेखक 

  अजिनाथ सासवडे

     आष्टी, बीड

   मो.९४२१३३६०५९

  

      


  

      


मैत्री

 


           "मैत्री"



          दोस्त, सखा, साथी असे नाना पर्यायी शब्द मित्रांसाठी आवर्जून वापरतात. मनुष्य आयुष्यामध्ये अंतर्बाह्यरित्या किती किती बदलत जातो. जुन्या गोष्टींना काळाआड मागे टाकत नवीन गोष्टी आपल्याशा करतो. बालपणीच्या मित्रांची तारुण्यात देखील साथ राहील याची शक्यताही नसते. तथा तारुण्यातील मित्र म्हातारपणापर्यंत टिकून राहतील हे ही ठाम नसते. स्वतःच्या आयुष्यात बदल घडवण्याचा शिरस्ता प्रत्येकजण अंगिकारतो. परंतु निस्वार्थ भावनेतून तयार होते ते म्हणजे मैत्रीचे नाते. जगातल्या कुठल्याही व्यक्तीसमोर आपले दुःख उलघडून मांडताना अल्पसा का होईना मनात संकोच निर्माण होतो, की हा आपली कमजोरी किंवा आपल्या दुःखाचे भांडवल करून आपल्या विरुद्ध दंड थोपटणार तर नाही ना? फक्त एकमेव मैत्रीच्या नात्यात आपण सुख-दुःख सांगताना संकोच, भय बाळगत नाही. अथवा कमीपणाची भावना मनामध्ये निर्माण होत नाही. आपण आपल्या जिवलग मित्राला अगदी निःसंकोचपणे सर्वकाही सांगत असतो. तोही मनात कसलाही किंतु न धरता निःसंकोचपणे ऐकून घेत असतो. 

     मनातील सल ज्याला उघडून दाखवल्यावर हलके हलके वाटू लागते, ते म्हणजे फक्त जिवलग मित्राला. जीवनामध्ये कुणाचे कुणाबरोबर मैत्रीचे धागे जुळतील हे सांगता येत नाही. मैत्रीच्या नात्याला कुठल्याही परिसीमा नाहीत. एकमेकांच्या विचारांची हातमिळवणी झाली म्हणजे मैत्रीचा धागा घट्ट होतो. मैत्री ही धर्म, जात, वर्ण, रंग, रूप, या सर्वांच्या पलीकडे. रक्ताचे नाते हे कुंडीतील झाडाप्रमाणे बंधनात वाढत असते. त्याला खूपदा जातीपातीच्या मर्यादा येतात. परंतु मैत्रीच्या नात्याला कुठलेही बंधन नाही अथवा ते वाढायला कुठलाही अडसर नाही. समाजातील सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरांचे जोखड झुगारून मैत्रीचे नाते फुलत असते. मैत्रीत इतर गोष्टींपेक्षा सुखदुःखाचे आदान-प्रदानचं जास्त होते. दुःखाच्या चटक्याने झालेल्या जखमांवर फुंकर घालत-घालत मैत्रीचे नाते घनिष्ठ होते.

             बहुतांशी लोकांच्या जीवनात प्रगती तथा अधोगती मित्रांवर अबाधित असते. ऐन उमेदीच्या काळात योग्य मित्रांची साथ लाभली तर जीवनातील अडथळे विनासायास पार करून आपला प्रवास सुखकर होतो. अन्यथा कुसंगतीने चांगले जीवनही धुळीस मिळते. "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो" असे म्हटले जाते, कारण सुसंगती अन् सदविचार हे माणसाचा जीवनपट बदलून टाकतात. वाईटाच्या संगतीने वाईटचं घडणार हे निश्चित.

        गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा असा कुठलासा भेदाभेद मैत्रीमध्ये नसतो. मैत्री जन्म घेते ती निस्वार्थ आणि निखळ भावनेतून. जमीन आणि पाण्याच्या मिलनातून बीजाला अंकुर फुटून कोंबाचे रोप तयार होते, तसे माणसा-माणसांत सद्विचाराचे बीजारोपण होऊन मैत्रीचे रोपटे तयार होते. मात्र मैत्रीच्या रोपट्याला आवश्यकता असते ती आधाररूपी संततधारेची. तर ते वटवृक्षसारखे अजन्म टिकून राहते. अन्यथा अल्पकाळातच पाण्याअभावी एखादे रोप कोमेजून जावे त्याप्रमाणे मैत्रीही त्याठिकाणी खंडित होते. मैत्री जुळते ती सहकार्य, प्रेम, आधार नि एकमेकांना कठीण परिस्थितीत दिलेली साथ या भावनेतून. मैत्रीत एकमेकांच्या मनातील भावनांची कदर करणे महत्त्वाचे. पैसा, मानसन्मान, प्रतिष्ठा या गोष्टींच्या पलीकडे असते ती मैत्री. मैत्रीत पैशाची उर्मी तग धरत नाही. मैत्री टिकून राहते ती प्रेमाची संततधार सदैव बरसत राहिल्यानं. सुखदुःखात, पडत्या काळात, अडीअडचणीच्या प्रसंगी खंबीरपणे साथ देतो तोच खरा मित्र. स्वार्थी भावनेतून जन्म घेतलेली मैत्री पत्त्याच्या बंगल्यासारखी क्षणात कोसळून नष्ट होते. मैत्री म्हणजे एकमेकांची साथ, सोबत उठणे-बसणे, एवढेच मैत्रीचे नाते नसून मित्राला मित्रासाठी वेळप्रसंगी भाऊ, आई, वडील, गुरु या सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. आईसारखे कधीतरी मित्राला प्रेमाने समजावून सांगणे. धीर खचलेल्या काळात भावासारखा मदतीचा हात पुढे करणे. चुकीच्या वेळी वडिलांसारखे कठोर शब्दात खडे बोल सुनावणे. कठीण प्रसंगात अथवा दिशाहीन अवस्थेत गुरुसारखे मार्ग दाखवणे, या सर्व भूमिका मित्राने यथासांगपणे चोख पार पाडल्या तर त्याची एका उत्तम मित्रात गणना झाल्याशिवाय राहत नाही.

      कृष्ण-सुदामा, कृष्णार्जुन, कर्ण-दुर्योधन हे घनिष्ठ मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरणं. चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत ज्यांच्या मैत्रीची मशाल तेवत राहील असे महारत्न. श्रीकृष्ण द्वारकेचा राजा असून देखील आपला बालपणीचा मित्र सुदामा आपल्याला भेटायला द्वारकानगरीत आला आहे, हे समजल्यावर सिंहासन सोडून धावतचं आपल्या महालाच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. फाटके कपडे, कृश देहयष्टी, मलीन चेहरा अशी सुदामाची काया असतानासुद्धा त्याला प्रेमाने आलिंगन देऊन श्रीकृष्णाने मिठी मारली. माझा बालपणीचा मित्र आहे, मग तो गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी श्रीकृष्णाने गंगाजळी दिली होती. ज्याच्या उषा-पायथ्याशी दारिद्रय, गरीबी, ठाण मांडून बसलेली आहे, अशा सुदामाला त्याची संपूर्ण सुदामनगरी श्रीकृष्ण सोन्याची करून देतो, ते केवळ मित्राचं नातं नि मैत्रीच्या जपवणूकीसाठी. सुदाम्याचे मलीन कपडे आणि कृश देह पाहून द्वारका नगरीतील सर्वांनी त्याची कुचेष्टा मांडली. दरिद्री, भिकारी अशी नाना प्रकारची विशेषणं लावून सर्वजण त्याची अवहेलना करत होते. परंतु कृष्णाने मात्र सुदाम्याचा आदरातिथ्य करण्यात कसलीही कुचराई केली नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठा म्हणून त्याचे कृष्णाने दर्शन घेतले आणि सुदामाने आणलेले मुठभर पोहे दोघांनी एका ताटात एकमेकांना घास भरवत मिष्टान्न समजून ग्रहण केले. यापेक्षा वेगळी मैत्री काय असावी?

     कृष्णार्जुन यांची मैत्रीही अशीच एकमेकांची सदैव पाठीराखी, सुख-दुःखात एकमेकांना आधार देणारी, पाठीवर प्रेमाची थाप देणारी. मैत्रीसाठी कुरुक्षेत्रातील कौरव-पांडवांच्या युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य श्रीकृष्णाने स्वीकारावे, यापेक्षा घनिष्ठ मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण असू शकेल? जो द्वारकाधीश, संपूर्ण द्वारकानगरीचा राजा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत आहे. हे केवळ मैत्रीसाठीच. मैत्रित राजा असो अथवा रंक तेथे लहान-मोठा या गोष्टींना थारा नसतो.

       कर्ण आणि दुर्योधन यांचीही मैत्री अशाच प्रकारची. दुर्योधनाचा व्यवहार नि वागणूक दोन्हीही धर्माला सोडून होते. दुर्योधन सदैव धर्माला आपल्या पायदळी तुडवत असे. परंतु आपल्याला वाईट काळात दुर्योधनाने साथ दिली, भक्कम आधार दिला, त्याकारणाने दुर्योधन चुकीच्या मार्गाने जात असूनसुद्धा त्याची शेवटपर्यंत कर्णाने साथ सोडली नाही, ही मैत्री. जगासाठी तो लाख वाईट असो, परंतु माझ्यासाठी तो एक देवदूतच आहे. म्हणून त्याची साथ कर्णाने शेवटपर्यंत दिली. दुर्योधनाच्या संगतीत आपला विनाश अटळ आहे, हे कर्णाला माहीत असूनही त्यानं मैत्रीखातर त्याची साथ सोडली नाही. शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक आहे, तोपर्यंत मी दुर्योधनासाठीच लढणार अशी कर्णाने आपल्या मनाशी खूणगाठ बांधलेली.

     अगदी अलीकडच्या काळातील शोले चित्रपटातील जय-वीरूची मैत्री आपणा सर्वांना ज्ञात आहे. मित्राच्या जीवासाठी स्वतःच्या जीवाचीही फिकीर न करणारी खरी मैत्री. आपला या ठिकाणी निश्र्चितच घात होणार आहे, हे माहीत असूनसुद्धा जयने वीरुला मैत्रीची शपथ देऊन पलायन करण्यास सांगितले. मैत्री असावी झाड नि सावलीसारखी. मैत्री असावी फुल नि वासासारखी. मैत्री असावी तर सूर्य न् प्रकाशासारखी सदैव एकमेकांची साथ देणारी. आयुष्यात कितीही बाका प्रसंग उद्धवला तरी, त्यामध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहणे, एकमेकांची साथ देणे, हीच तर खरी मैत्रीची गुणवैशिष्ट्ये. मैत्रीमध्ये तरी असे काय अपेक्षित असते? सुखदुःखात सहभागी होणे, एकमेकांच्या पडत्या काळात आधार देणे, खचलेल्या अवस्थेत प्रेमाची थाप देणे यापलीकडे मैत्रीत काही अपेक्षित आहे? पैसा, संपत्ती ही जीवन मार्गातील साधने, परंतु आपल्या हयातीत अन् आपण नसल्यावरही जीवंत राहते, ती फक्त आपली मैत्री.

       कधीकधी मित्रामित्रांमध्ये काही कारणास्तव खटके उडतात, अनबन होते, तर कधीकधी वैचारिक मतभेदांमुळे मैत्रीत फूट पडली जाते. परंतु या सर्व गोष्टींना वेळप्रसंगी बगल देऊन मित्रांनी मनाचा उदारपणा दाखवून एकमेकांशी प्रेमाचे असलेले ऋणानुबंध दृढ करावे. मैत्रीत फूट पडल्यानं किंवा धाग्यासारखे कधीकधी तुटून नंतर दिलेली गाठ ही काळजामध्ये घर करून बसते. मैत्री ही पत्त्यांच्या बंगल्यागत तकलादूपणे उभी नसावी. मैत्रीत प्रेमाची, आपलेपणाची पाया भरणी अगदी भक्कमपणे करून त्यावर इमारत उभी असावी. तरचं ती अंतिम क्षणापर्यंत तग धरून राहते. खरी मैत्री कधी एकमेकांना एकमेकांचा विसर पडू देत नाही. मैत्री ही अंतरावर नाहीतर अंतर्मनात असणाऱ्या एकमेकांच्या सहृदयतेच्या मजबूत धाग्यांवर टिकून असते.


दैनिक झुंजारनेता ०७ ऑगस्ट, २०२०


      लेखक,

  अजिनाथ सासवडे

  मु.पो.लोणी, आष्टी

दुरभाष:९४२१३३६०५९





Sunday, March 26, 2023

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..


              "तीन भावांची किमया"


      भाऊ-भाऊ म्हटलं का एकमेकांविषयी तू-तू, मी-मी, हेवेदावे हे अगदी वाऱ्यासारखे येतात नि जातात. एकाजवळ असलेली एखादी वस्तू दुसऱ्यांनाही हवीच हवी. मग ती छोटी असो अथवा मोठी. नमतं घेण्यास कुणीही तयार नसतो. फार फार तर आजचं उद्यावर ढकललं जाईल. पण एक दिवसाची उदारता पाण्याच्या बुडबुड्यासारखी अल्पावधीतच नष्ट होणारी. मला मिळो अथवा न मिळो, पण त्याला द्या म्हणणारे राम-लक्ष्मण क्वचितचं. प्रत्येकजण स्वार्थ, मीपणाच्या पाण्यात डुबक्या मारणारा. स्वत:चे लाड पुरवून घेण्यात जो तो सरसावलेला. हरेकजण स्वतःचा चांगुलपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन भाऊ देखील त्याला अपवाद कसे ठरतील? 

      प्रत्येक ऋतूची एकमेकांशी जणू चुरसच लागलेली, की कोण श्रेष्ठ? आपल्या एकट्यामुळेच सजीवसृष्टी सुरळीत चालत असल्याची सगळ्यांची मनोधारणा. माझ्याशिवाय सजीवांचे जगणे कठीण. मानवजातीसह सगळ्याच सजीवांसाठी आपण खूप महत्त्वाचे आहोत, या आंतरिक स्वाभिमानयुक्त भावनेचा प्रत्येकाला हेवा. थोरला कोण? अन् धाकटा कोण? या शंकायुक्त प्रश्नाविषयी सगळ्यांच्याच मनात अराजक. हे पाहुण्यांसारखे येतात न् जातात. यांचं येणं-जाणं हे सगळ्यांच्या मनाला हुरहूर लावणारं. न सांगता आश्चर्याचा धक्का देत दाखल होणार अन् पुन्हा सगळ्यांची नजर चुकवून कधी परागंदा होतील याचाही भरवसा नाही. एकदा रमल्यावर जास्तीचा काळ पाहुण्यांसारखेच त्यांचे महत्त्व कमी करणारा नि लोकांच्या नजरेत कमीपणाची भावना उत्पन्न करणारा. तिरस्कारयुक्त करड्या नजरा पडून नाराजीचे सूर उठू लागले, की आपण आपसुकच ओळखून घ्यायचं बहुदा आपली निघण्याची वेळ झाली. जास्त दिवसाच्या पाहुण्यांना जसे मान, मरातब राहत नाही. पाहुण्यांसमोर पती-पत्नी एकमेकांवर तोंड टाकू लागले, की पाहुण्याने समजून घ्यावे, बहुतेक हा आपल्याला निघण्याचा संकेत आहे. हे भांडण यांचे नसून आपल्यावरील रागाचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटत आहे. तसे जास्त दिवस स्थिरावल्यावर यांचे मोल कमी होऊन जाते. रोजच मिळणाऱ्या एखाद्या रूचकर पदार्थाला पाहूनही माणसं जसे दिवसागणिक नाक-तोंड वाकडं करतात, तसेच काहीसे यांच्याबाबतही होत असावे.

          वसंतातील नवलाई घेऊन येतो तो उन्हाळा. सगळ्यांनाच या नाविन्याची ओढ. थंडीने गारठलेल्या चराचरातील सगळ्याच चेताचेतांना उब देतो तो उन्हाळा. झाडा-फुलांची थंडीने एकमेकांना बिलगून असलेली पानं टवकारून पाहू लागतात. माणसांना हा जास्तीचे काम देत नाही, आरामच आराम. ह्याची जास्तीची आस लागलेली असते, ती लग्नाळू तरूणांना. शाळेतील पोरांसह गुरुजनांचा तर हा फारचं लाडका. हा दाखल होतोय कुठं नाही की यांना सुट्ट्या मंजूर. मग सगळेच आनंदाने फुलपाखराप्रमाणे बागडण्यासाठी मोकळे. वर्षभर कष्टाने शिणलेल्या बळीराजाचे मन याच्या आगमनाने झाडाच्या फांदीवर हेलकावे घेणाऱ्या पक्षागत आनंदाने डोलू लागते. कामातून उसंत मिळते, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतात, दिलजमाई होते. दूरदेशी गेलेले सरकारचे गुलाम (नोकरदार) गावाकडे येऊन सगळ्यांच्या गाठीभेटी घेतात, विचारपूस करतात. सगळ्यांवर प्रेमाचा वर्षाव करणारा उन्हाळा कितीही तापट असला तरी याच्या काळात सगळ्यांचेच खिसे मात्र थंडावलेले असतात. तरीही एक अनामिक समाधान काळजात घर करते, की याच्या निमित्तानं प्रेमाच्या माणसाची गळाभेट झाली. आपलेपणाची जाणीव करून देतो तो उन्हाळा. आपल्यांना आपलसं करून प्रेमाचा धागा घट्ट करतो. कितीही तापट असला तरी आपल्या भेटीला येताना थंडगार फळांची अमृतधारा घेऊनचं हजर होतो. आंबा, टरबूज, खरबूज, संत्रा, मोसंबी अशा नानाविध प्रकारच्या आंबटगोड फळांच्या मेजवानीने भरलेले ताट आपल्यासमोर मांडतो. सूर्यदेवाचं याच्यावर भलतचं प्रेम. उन्हाळा आणि सूर्यदेव एकमेकांच्या हातात हात घालूनचं चालतात. यांची मैत्री जगजाहीर. थकलेल्यांसाठी उन्हाळा हा एक सुवर्णकाळ. उन्हाळा सदैव तापटपणाचा सदरा घालून असला तरीही जास्त रममाण झालेला पाहून पावसाळ्याला पोटशूळ उठतो. तो अचानक मध्येच वळवाच्या रूपानं हजेरी लावतो अन् उन्हाळ्याला काढता पाय घेण्यास भाग पाडतो. आपण लवकरचं दाखल होत असून सर्वांनी आपापली कामं तातडीनं उरकून टाकावी, ही वार्ता देऊन जातो. 

          उन्हाळा जडपावलांनी जातोय कुठं नाहीतर अगदी धूमधडाक्यात वाजत-गाजत नवरदेवासारखा येतो, तो पावसाळा. मंडपाच्या दारात नवरदेव यावा अन् त्याचे रूप पाहण्याकरिता जमलेल्या आसनस्थ मंडळींनी गरागर माना वळवाव्यात, त्याप्रमाणे याचे सर्वांनाच विलक्षण आकर्षण. उन्हाळ्यात घामाघूम झालेला पावसाळ्याच्या थंडगार शीतल सरींची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. पावसाळा शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता पाहुणा. हा आला म्हणजे याचे स्वागत कशाने करू न् कशाने नाही असे शेतकऱ्याला होऊन जाते. घरात, आडोशाला बसलेल्या सगळ्यांना याच्या येण्याची थंडगार वार्‍याच्या रूपानं चाहूल लागली, की रस्त्यावर, अंगणात येऊन सगळेजण अगदी आनंदाने त्याचे नाचून, गाऊन स्वागत करतात. काहीजण त्याच्या प्रेमसरीत मनसोक्त चिंबचिंब होईपर्यंत न्हाऊन घेतात. ढगांचे अक्राळ-विक्राळ रूप हलक्या काळजाच्या माणसाला धडकी भरवणारे. ढगांमध्ये धुमश्चक्री सुरू झाल्यावर वीज भीतीपोटी धरणीचा आश्रय करत होत्याची नव्हती होऊन जाते. ढगांच्या संघर्षातून त्यांचे अश्रू धाराच्या रूपानं वाहू लागतात. याचा डांगोरा जास्त, काम कमी. आसमंतात बेछूट गोळीबार करणारा हा. याचा नेम क्वचितच लागतो, नाहीतर एरव्ही विनाकारणचं बोंब उठवून आपली शक्ती खर्ची घालतो. पण याने जर एखाद्या वाटसरूला अरण्यात, रस्त्यात मधेच गाठले, तर त्याला मात्र पुरता सळो की पळो करून बेफाम झोडपून काढतो. गवळणींची वाट कृष्णानं अडवावी न् डोक्यावरचे मटके फोडून त्यांना दह्या-दुधानं अंघोळ घालावी तसे वाटसरूंना ढगांचे माठ फोडून पावसाळा अंघोळ घालतो. वाटा अडवण्यात हा फारच निष्णात. 'कहीपे निगाहे कहीपे निशाना' असा हा आगळावेगळ्या गुणावगुणांचा. दिसतो दुसरीकडे आणि अचानक प्रकट होतो तिसरीकडेच. भलतीकडेच जाऊन नदी, ओढ्याच्या मार्गाने पाण्याच्या रूपात अचानक कधी वाट अडविल याचाही नेम नाही.

        हा शेतकऱ्यांना कधी शांत बसू देत नाही. एक पाय रोवत एक उपसत हा शेतकऱ्यांना घामेघूम करून टाकतो. नोकरदारांना कधीकधी उसंत देतो. याचे निमित्त करून शाळेतील मुलं घरी खेळण्याचा भरपूर आनंद घेतात. याच्या आगमनाचे कारण शाळेला दांडी मारण्यापूरतं पुरेसं ठरतं. झाडाझुडपांचं वर्षभराचं कळकटलेलं अंग धूवून त्यांना स्वच्छ आंघोळ घालण्याचं काम याच्याकडे ठरलेलं. याचाही अतिरेक झाला की, रुंदावलेले चेहरे हळूहळू बारीक होऊ लागतात. कधी एकदाचा जातो म्हणून मनोमन खडे फोडतात. कित्येकांना तर मोकळा श्वासही घेता येत नाही, गुदमरल्यासारखे वाटू लागते. इकडे-तिकडे कामानिमित्त घराबाहेर पडायचं म्हटल्यावर अगदी जीवावर बेतल्यासारखं होतं. छत्री, रेनकोटांनाही सोन्याचे दिवस येतात. ढाल म्हणून छत्री, रेनकोट यांचा याच्यापासून बचाव करण्यासाठी उपयोग करावा लागतो. एकदा गेल्यावर मात्र मनाला फार चटका लावून जातो, की आता परत कधी येणार? झाडंझुडपं, वेली याच्या येण्यानं जेवढे आनंदी झालेले असतात, त्यापेक्षा कैकपटीनं हा जाताना पाहून दुःखी होतात.

              हिवाळा हा फुलासारखा नाजूकच. अलवार पावलांनी कधी येतो न् घरात शिरतो याचा पत्ताही लागू देत नाही. पावसाळ्याच्या परतीची न् याच्या आगमनाची वाट एकच. कधी कधी हा पावसाळ्यालाही माघारी चालण्याचा आग्रह करतो. नव्हे-नव्हेतर घेऊनही येतो. पावसाळ्याची परतीची चाल अगदी संथ. त्याला घाटात विसावा घेईपर्यंत हिवाळा त्याच्या अगोदर येऊन धडकतो नि नंतर कधी कधी एखादी वारी पावसाळ्याचीही होऊन जाते. गाठोड्यात मागील वर्षी बांधून ठेवलेल्या स्वेटरचा शोधाशोध केव्हा सुरू होतो, याचा पत्ताही लागत नाही. अंगावर स्वेटर चढल्यावर कळते, की हिवाळा नामक पाहूना घरात येऊन थबकला आहे. त्याच्यापासून आपला बचाव करायचा असेल तर अंगावर स्वेटर, हातापायात मोजे, नाका-कानाभोवती मफलर हा सगळा साज त्याच्याशी दोन हात करण्यासाठी. पण कितीही सावध राहण्याचा प्रयत्न केला, तरी तो तुमच्या गालांना, ओठांना आपल्या हाताने ओरबाडल्याशिवाय सोडत नाही.

         हिवाळ्याची अनामिक ओढ लागलेली असते ती गरम कपडे विकणाऱ्या दुकानदारांना. वर्षभर दुकानात आराम केल्यामुळे वर्षभराच्या कामाची भरपाई या दिवसात करण्याचा त्यांनी जणू पणचं केलेला असतो. एरव्ही शे-दोनशे रुपयांचा माल ह्या दिवसात दामदुपटीने व्याजासह वसूल केला जातो. हा पाहुणा स्वतःच्या अंगावर उन्हाची लकेर सुद्धा पडू देत नाही. तिमिरातच याच्या सर्व गोष्टी घडत असतात. याच्यापुढे सूर्यदेवाची प्रखरताही थरथरू लागते. हिवाळा घरात शिरला की तो घरच्या लोकांनाही नादी लावून बाहेर निघू देत नाही. घरातच गरमागरम चहा, भजी असे पदार्थ आपल्या सेवेसाठी करायला भाग पाडतो. नाक्यावर, रस्त्याच्या कडेच्या ठेल्यावर गरमागरम भाजलेली कणसं, शेंगा, भजी, समोसे, वडापाव, चहा या पदार्थांना बेसुमार मानमरातब मिळू लागतो. काम कमी नि उचापती जास्त हेचं याचं वैशिष्ट्य. चहा तर त्याचा जीव की प्राण. पाणी आणि हिवाळा यांचं विळ्या-भोपळ्याचे वैर. त्यांची गाठभेट अगदीच दुर्मिळ. गरमागरम पदार्थांना सोन्याचा भाव येतो.

     उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वाटणी पुरते भाऊ, बाकी गुणावगुण एकमेकांच्या विरुद्ध. भाऊ-भाऊ अन् वाटणी असमान अशक्य. जेवढे एकाला तेवढे दुसऱ्यांनाही. त्यामुळे तर कदाचित भावाला वाटेकरी हा समानार्थी शब्द मिळाला असावा. असे हे तीन भाऊ वर्षातले दिवस सुद्धा समसमान वाटून घेतात. कुणाला कमी नाही, कुणाला ज्यादा नाही. या तिघांची गाठभेट एकावेळी तशी दूर्लभच. नावाला भाऊ असून काय कामाचे? कर्मतर परस्परविरुद्ध. या तीनही भावांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपली एक वेगळीच छबी जनमाणसांच्या मनामध्ये निर्माण केली आहे. त्याचे दर्शन लोकांना ते वेळोवेळी घढवतात. कुणाला कमी तर कुणाला जास्त मान त्यादैनिकातसोलार्यामुळे प्राप्त झालेला. पण ते मात्र आपले गुणावगुण कधी सोडत नाहीत.


        लेखक

   अजिनाथ सासवडे

मो.९४२१३३६०५९

Wednesday, October 12, 2022

व्यक्ती तितक्या प्रकृती

          "व्यक्ती तितक्या प्रकृती"


       

       संपूर्ण विश्वभ्रमण केले तरीही रंगरूपाने तंतोतंत जुळणाऱ्या दोन एकसमान व्यक्ती भेटणे निश्चितच दुर्धर आहे. कदाचित दिसण्यात एकसारखेपणा असेलही परंतु असण्यात वेगळेपण हमखास सिद्ध होईल. अगदी हुबेहुब दिसणाऱ्या जुळ्या भावंडात देखील बाह्यांगाखेरीज अंतरंगात तफावत असल्याबिगर राहत नाही. स्वार्थी-निस्वार्थी, प्रेमळ-कठोर, अबोल-बोलका, भित्रा-धाडशी या अन् अशा अनेक गुणावगुणांमध्ये त्यांच्यात भेदाभेद नक्कीच जाणवेल. काही व्यक्ती अगदी वामनमूर्ती तर काही खूपच उंच. काही प्रसन्न मुद्रेच्या तर काही अवघ्या जगाचं संकट त्यांच्यावरचं कोसळल्यावाणी उदास चेहरा मिरवत असतात.

          व्यक्ती-व्यक्तींमध्ये नाना प्रकारचे अंतर स्थळ-कालपरत्वे आपल्याला जाणवते. ऑफिसात काम करणाऱ्या व्यक्तींपेक्षा शेतात काम करणाऱ्या व्यक्ती हसत मुखाने नजिक आलेल्या व्यक्तीचे स्वागत करतात. ऑफिसात काम करणाऱ्या व्यक्ती नेहमीच तुसडेपणाने वागताना दिसतात. एकांतवासात त्यांच्या चेहऱ्यावरची कळी खुललेली असते, परंतु त्यांच्याकडे कुणी माणूस येताना दिसला, की त्यांचा चेहरा आकाशातील ढगासारखा हळूहळू काळवंडू लागतो. सात जन्माचे वैर असल्यागत ते त्याच्याकडे तिरस्कारयुक्त नजरेने पाहत राहतात. स्वतःचे काम इमानेइतबारे करण्याऐवजी वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यात नि इतरांच्या कागाळ्या करण्यातचं कित्येकांचा वेळ निघून जातो. हरेकाला वाटते की या जगात सगळ्यात जास्त कामाचा उपद्व्याप आपल्याच नशिबी आला आहे. आपल्याशिवाय कुठलेच काम होणे शक्य नाही, हा त्यांचा गोड गैरसमज कुणी दूर करू शकला तर नवलचं. बहुदा वाणाने नव्हेतर गुणाने समान असणाऱ्या व्यक्तींची रास लवकर जुळते. गुणाने सारख्या असणार्‍या व्यक्तींची मैत्री सदोदित टिकून राहते. एकमेकांचे उणेदुणे काढणे त्यांना न परवडण्यासारखे असते, कारण दोघेही एकाच माळेत गुंफलेले असतात. सडपातळ बांधा असलेल्या व्यक्तीला शरीराने धष्टपुष्ट व्यक्तींविषयी आकर्षण राहते. आपण त्याच्यासारखे ऐटबाज असतो तर किती बरे झाले असते, ही बोचणी लावणारी गोष्ट त्यांच्या मनाला क्षणात स्पर्शून जाते. शरीराने चौरसाकार धारण केलेल्या व्यक्तींना बहुदा पिळदार शरीरयष्टीच्या व्यक्तींविषयी अनामिक ओढ लागून राहते.

         काही व्यक्तींचे जीवन एवढे निरंक असते, की त्यांना जीवनात सुख अन् दुःख, आपला अन् परका या गोष्टींनी काही फरक पडत नाही तथा हे भावचं जणू त्यांच्या आयुष्यातून परागंदा झाल्यासारखे असतात. कुठल्या प्रसंगात कोणती प्रतिक्रिया द्यावी याचे त्यांना भानही उरलेले नसते. फक्त शून्य नजरेतून ते पाहत राहतात. 'जन्माला आला हेला नि पाणी वाहून मेला' अशी यांची गत. जीवन मिळाले म्हणून ते ढकलत राहायचे. दुसऱ्यांसाठी तर सोडा, पण स्वतःसाठी काही करण्याचीही यांच्याकडे उदारता नसते. फक्त नि फक्त काम भले अन् हे. सामाजिक, नैतिक जबाबदारी राहूद्या कौटुंबिक जबाबदारीही यांनी पूर्णपणे झिडकारून टाकलेली निदर्शनास येते. जीवनात त्याग करण्याजोगी कुठली बाब नि भोगण्याजोगी कुठली? यांमधील अंतर न कळण्याइतपत यांचे आपल्या बुद्धीशी हाडवैर. सर्वांगाने परिपूर्ण असून देखील केवळ समाजाच्या विचारापोटी हे आपले आयुष्य रडतरावासारखे जगतात. जीवन जगताना कुठे हात सैल सोडावा अन् कुठे खमता घ्यावा याचा ताळेबंद यांना कधीच जमत नाही.

     काही व्यक्ती तर एवढ्या प्रचंड पैशाच्या लोभी की त्यांना पैसा हेच जीवन वाटते. पैशाअभावी ते क्षणभरही तग धरू शकत. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडू लागतो त्याहून अधिक बेचैनी यांना बकोटीला पैसा नसल्यावर सुटते. त्यांच्या जीवाची नुसती घालमेल होत राहते. पैशाची उभ असली तरच त्यांना हायसं वाटतं नाहीतर जीवन निरर्थक वाटते. आई-वडील, पत्नी, मुलं या सर्वांहून अधिक पैशावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कितीतरी आकृत्या पावलोपावली भेटतात. प्रेम, ममत्त्व, आपलेपणा, दया या शब्दांना त्यांनी स्वत:च्या शब्दकोशातून केव्हाच हद्दपार केलेले असते. फक्त स्वतःच्या नावे पैसा असला म्हणजे झालं. परगावी गेल्यावर दिवसभर वणवण अन्नपाण्याबिगर भटकतील पण चार पैशाचं काही विकत घेऊन स्वतःच्या पोटाला खातील तर शपथ.

     काही महाशयांनी एवढा एकलकोंडेपणा अंगिकारलेला, की इतरांबरोबर चौकशीवजा हिताफाराचे दोन बरे-वाईट शब्द बोलतील तर यांना महापाप लागण्याची शक्यता. फक्त मी न् माझे यापलीकडे यांना काहीही सुचत नाही. दुसऱ्याची उन्नती होत असेल तर काहींना असा पोटसूळ सूटतो, की त्यांचं चित्त थाऱ्यावर राहत नाही. श्रीमंत झाला तर दोन नंबरची कमाई आहे त्याला नि गरीब राहिला तर दळबद्री, बेअक्कल आहे, अशा ठेवणीतल्या मोठमोठ्या विशेषणांची पोटतिडकीने फैर झाडतात.

      मी तर काही अशी माणसं पाहिली, की ज्यांनी आयुष्यात इतरांना नावं ठेवण्याखेरीज काही केलं नाही. सगळ्यांना उठता-बसता नावं ठेवणं जणू यांच्या हक्काचा मामला आहे. काही व्यक्तींशी आंबट-गोड कसेही बोला पण कुत्र्याच्या शेपटागत यांचं बोलणं कायमचं वाकडं ते वाकडंच. सरळ बोलतील तर ते महा पातकाचे धनी होतील, अशी जणू त्यांना भिती असते. दुसऱ्याच्या पोळीवरचं तूप आपल्या पोळीवर कसं ओढता येईल यामागे बरेचसे महाशय उद्युक्त असतात. दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ, अडचणी निर्माण करण्यात काहींना मोठा रस वाटतो नि त्याचाच बडेजाव चारचौघात करण्यात ते मोठी धन्यता मानतात. एखाद्याच्या पेटत्या घरावर आपली पोळी भाजणारेही कैक असतात. पण 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' या उक्तीचा त्यांना विसर पडलेला दिसतो. आपण जे करतो ते सर्व योग्यचं आहे, हा यांचा गैरसमज दूर होईल तर नवल. 

       काहीजणांच्या बुद्धीवर सर्व नियंत्रण दुसर्‍याचे. स्वतःची बुद्धी गहाण ठेवून कळसूत्री बाहुलीप्रमाणे इतरांच्या तालावर नाचणारे समाज बांधव खूप आहेत. कुणाकुणाला फुशारकी मारण्यात भारी शान वाटते. घडलेला प्रसंग तेलमीठ लावून सांगण्यात काही लोकांचा फारचं हातखंडा असतो. हातभर लाकडाला सव्वाहात छिलपी निघाल्याचे ते मोठ्या हिरीरीने सांगतात. काही महान विभूती लाखो हृदयांवर आपलं नाव कोरून जातात, तर काहींना आपल्या संपूर्ण हयातीत बायको-मुलांच्या हृदयात तसूभरही जागा मिळवता येत नाही. काही व्यक्तींच्या अंगी एवढा भाबडेपणा की आपण एखादे कार्य कुणासाठी करत आहोत याचेही त्यांना भान राहत नाही. काहींना वेड पांघरून पेडगावला जाण्यात थोर आनंद. विचार अन् आचारामध्ये जमीन-आसमानाचे अंतर असणारे बहुसंख्य, पण विचारानुसार कृती करणारे अगदीच नगण्य. जमदग्नीचा अवतार असलेले काही गृहस्थ सर्वांगाने आग ओकत असतात. निखारा हाती धरावा, परंतु यांच्याशी वाद घालून स्वत:चा बुद्धीभेद करून घेऊ नये. अशा लोकांना सुधारण्याकरीता कुठलीही मात्रा कामी येत नाही. 

      सर्वांगाने पुरुषोत्तम होणे कठीण असले तरी माणूस म्हणून सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून सर्वसमावेशक स्वहितासह समाजहित जोपासने आणि अति स्वार्थार्त वृत्ती त्यागून अल्पशी परोपकारी वृत्ती धारण केल्यास काय गैर? जीवनामध्ये कमावलेली जी काही धनदौलत, संपत्ती आहे, ती शेवटी परस्वाधीनचं होणार आहे. इतरांच्या उपयोगी पडण्यातचं मोठे पुण्य आहे. आपल्या अंतरंगाला चिकटलेल्या षड्रिपूंचे दहन करून आपले जीवन कृतार्थ करावे. साधूसंतांनी आपल्या परोपकाररूपी सद्कार्याने मातृभूमीचे पांग फेडले. आपल्याकडून त्यांच्यासारखे काम भलेही न होवो, पण मातृभूमीच्या ॠणार्थ देश, धर्म, समाज कार्यासाठी थोडेसे तरी झटावे. रंजल्या, गांजलेल्या दिशाभूल झालेल्या वाटसरूंना मार्गस्थ करावे, हेच मोठे महतभाग्य.



            लेखक

       अजिनाथ सासवडे सर

        लोणी (स), आष्टी

        मो.९४२१३३६०५९

Wednesday, February 16, 2022

वेळ

               वेळ



   वेळ हा फक्त दोन अक्षरी शब्द, परंतु याचं थोडही मागं-पुढं होणं खूप काही बदलून टाकतं. प्रत्येकाच्या आयुष्याचं गणित बरोबर किंवा चूक हे वेळच ठरवते. अमुक-अमुक वेळी तमुक-तमुक गोष्ट करायलाच हवी हा निसर्ग नियम. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात कुठलाही शहाणपणा नाही. प्रत्येकाच्या आयुष्यातील इयत्ता दहावीचे वर्ष हे महत्वाचे आहे असे सगळ्यांनी सांगून देखील आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याने अपयशाचे धनी झालो तर ती गोष्ट पुन्हा कधीही न भरून येण्यासारखी आहे. वेळ निघून गेल्यानंतर आपण कितीही हळहळ व्यक्त केली तरी झालेल्या गोष्टीमध्ये आपण बदल करू शकत नाहीत हे तितकेच खरे. त्याकरिता गोष्ट घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्याखेरीज पुर्वनियोजन हवे. सर्वकाही वेळेला आणि वेळेनुसार ठरत असते. वेळेच्या बाबतीत जराशी कुचराई देखील फार महागात पडते, परंतु तरीसुद्धा हरेककजण वेळेच्या बाबतीत गाफील का राहतो? हा प्रश्न न उमजणाराच वाटतो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर ह्या-ह्या वेळी गाडी येऊ शकते किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे कुणाचातरी जीव जाऊ शकतो हे माहीत असूनही अनेक कर्मचारी वेळेला लापरवाही करतात. म्हणजे यांना उंटावरचे शहाणे म्हणावे? की आणखी काही हेही उमजत नाही.

     वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ संपली की सर्व संपले. हाजिर तो वजीर. अशा प्रकारचे अनेक वाक्य आपल्या कानावर वेळोवेळी घणाघात करूनही आपण मात्र त्याकडे नजरांदाज करत राहतो. एखादी गोष्ट वेळेत न घडल्याने अवघ्या जीवनाची वाताहत झालेली अनेक उदाहरणे आपण पाहतो. युद्धकाळात काही मिनिटे किंवा सेकंदांचा झालेला उशीर कित्येकांच्या जीवावर बेतला जातो. एखाद्याविषयी बोलताना आपण सहजपणे बोलून जातो, "तो खूप मोठा माणूस आहे" तर अनेकदा असेही म्हणतो, "पैसा खूप मौल्यवान आहे." पण सारासार विचाराने शेवटी या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो, की ना पैसा मोठा, ना माणूस मोठा, मोठी असते ती वेळ. पैशाने दुरावलेला माणूस उद्या जवळ येऊ शकतो तर आपल्या अपरंपार कष्टाने पैसाही मिळू शकतो, परंतु माणूस आणि पैशाची सर्व शक्ती पणाला लावूनही गेलेली वेळ मात्र परत आणू शकत नाही. एवढी वेळेत ताकत आहे. वेळेचे गणित वेळच सोडवू शकते. अन्य कोणीही नाही. काही गोष्टीसाठी वेळ येण्याची वाट पाहावी लागते तर काहींसाठी वेळ जाऊ द्यावी लागते. ठराविक वेळेलाच येणाऱ्या गाडीची वाट पाहत बसावे लागते तर परीक्षेच्या काळात भरभर वेळ जाऊ नये असे सारखे वाटत राहते. माणूस कितीही पुढारला असला तरी वेळेला सलाम करून तिच्यापुढे गुढेगे टेकवतोच. 

       आयुष्यभर आपल्याला सगळेच गुरु मार्गदर्शन करत राहतात. पुरातन काळातील तसेच सद्यस्थितीतील अनेक उदाहरण दाखले देऊन वेळेचे महत्त्व आपल्याला पावलोपावली पटवून देतात. पण त्यांच्या पोटतिडकीने सांगण्याकडे आपण सदैव कानाडोळा करत राहतो. मात्र जेव्हा अनुभवासारख्या महागड्या गुरूनी आपल्या श्रीमुखात चांगली चपराक लावल्यावर आपण त्याला कायम दंडवत घालू लागतो. कारण प्रेमाच्या भाषेपेक्षा कडक शब्दांत केलेली कानउघाडणी भल्याभल्यांना सरळं करते. आपले आई-वडील, शिक्षक, मित्र, आपल्याला वारंवार वेळेचे महत्त्व पटवून देतात. एखादी गोष्ट वेळेवर न केल्याने कशाप्रकारे नुकसान होऊ शकते हे समजावतात. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात लागलेल्या अनुभव ठेचांच्या जखमा ते आपल्याला दाखवत असतात. परंतु त्यांच्यापेक्षा आपण अव्वल असल्याच्या भाबड्या समजुतीपाई अथवा आपल्याला कमीपणा वाटत असल्यामुळे म्हणा, इतर कुठल्या कारणाने आपण आपल्याच मदमस्त चालीत दंग असतो. जेव्हा अनुभव येतो तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. गुरुजी वर्षभर सांगतात, "अरे मुलांनो दहावी-बारावीचे वर्ष म्हणजे जीवनाला कलाटणी देणारे वर्ष आहे आणि त्या वर्षाअखेरचा मुख्यकाळ हा परीक्षेचा असतो. संपूर्ण वर्षभर अभ्यास करायचा, आयुष्याच्या शिदोरीची तुकड्या तुकड्यात बांधणी करायची आणि ऐन तीन तासाच्या पेपरमधले आपले कोलमडून गेलेले नियोजन आपल्या आयुष्याचं वैराण वाळवंट करणारे ठरू शकते." असे वेळोवेळी बजावून देखील परीक्षेच्या वेळी कुणीतरी परिक्षेला उशीरा येणे. पेपर वेळेत न सोडवणे. या गोष्टी घडतातच म्हणजे वर्षभर सांगितलेले सगळे मार्गदर्शन अगदी पालथ्या घड्यावर पाणी पडल्यासारखे वाटते.

         बहुतेक वेळा आपल्या कानावर येते की, "अरे तो खूप अभ्यासू होता. परंतू परीक्षेला येताना त्याच्याकडून थोडा उशीर झाला आणि त्याचा काही पेपर सोडवायचा बाकी राहिला. त्यामुळे तो मिरिटमध्ये येऊ शकला नाही. म्हणजे वर्षभर शाळेची वेळ सांभाळली, अभ्यासाचा वेळ सांभाळली. पण परीक्षेची वेळ मात्र सांभाळता आली नाही. म्हणजे आयुष्यात कधी कधी काही तास, काही मिनिटे हे आपले जीवनमान बदलणारे ठरतात. एखादा पैलवान वर्षानुवर्ष कसरत करून आपलं शरीर बनवत असतो. जेव्हा केव्हा कुस्त्यांच्या आखाड्यात उतरावे लागेल तेव्हा मात्र पूर्ण तयारीनिशी आपले शरीर कसलेले पाहिजे ही त्याची मनिषा असते. परंतु जेव्हा स्पर्धेचे दिवस सुरू होतात तेव्हा हे पहिलवान महाशय आजारी पडतात. म्हणजे अहोरात्र केलेली मेहनत मातीमोल ठरली की नाही? त्याकरिता वेळेला सदासर्वदा हातावरच्या फोडाप्रमाणे जपणे महत्त्वाचे असते. फक्त एकदाच नव्हे. दैनंदिन आयुष्यात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वेळेचे नियोजन असेल तरच सगळ्या गोष्टी अगदी सुकर होतात नाहीतर वेळेच्या गुंत्यात नको असलेली गोष्ट पदरी पाडून घ्यावी लागते.

      वेळेचे मूल्य सोन्या चांदीहूनही कैकपट अधिक असल्याने अनेक प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार दैनंदिन जीवनात वेळेच्या संदर्भात प्रचलित आहेत. जसे, वेळ गेली निघून आणि हसू आले मागून, वरातीमागून घोडे, तो पहा सूर्य आणि हा जयद्रथ, उशिरा निघाले आणि वेळेला पोहोचले, कल करे सो आज और आज करे सो अभी म्हणजे येन केन प्रकारे वेळेचे महत्त्व या सर्व म्हणी आपल्याला पटवून देतात. काही सेकंदावरून अपघात होण्यापासून बचावलेला एखादा जीव, परीक्षेला जाताना काही मिनिटांवरून सापडलेली गाडी, अंतिम काही तासांच्या घनघोर लढाईत मिळालेला विजय ह्या गोष्टींना वेळेचे महत्व किती? हे तेच लोक चांगल्याप्रकारे सांगू शकतात.

    कधीकधी वेळेच्या बाबतीत एकाकडून झालेली चूक अनेकांना दोष नसताना भोगावी लागते. रेल्वेच्या अमुक-अमुक प्लॅटफॉर्मवर यावेळी दुसरी गाडी उभी असते हे माहित असून देखील वेळ न सांभाळल्याने त्याच प्लॅटफॉर्मवर दुसरी गाडी घेऊन येणाऱ्या चालकाच्या चुकीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अशा बातम्या ऐकून मन सुन्न होते. अर्थात वेळेला सगळ्या गोष्टी सांभाळाव्याच लागतात. अन्यथा मुर्खपणाचा मुकुट चढवून आपली दिंड काढली जाते. सदैव ध्यानीमनी असुद्या जे वेळेला सांभाळतात वेळही त्यांनाच सांभाळून नेते. जवळपास सगळ्यांनासारखे आयुष्य मिळते तरीही काहीच माणसे यशस्वी होतात तर अनेकजण अयशस्वी होतात. याचे कारण वेळेचे नियोजन अस्तव्यस्त होणे हेच आहे. वेळच तारक आहे आणि वेळच मारकही आहे. वेळच घडवते आणि वेळच बिघडवते. वेळेचे गुलाम बनू नका. तर आपले आयुष्य जीवनरुपी भवसागरातून यशस्वीरीत्या पैलतीराला घेऊन जाण्यासाठी स्वतःच्या हातात वल्लव घेऊन नाव योग्य दिशेने आणि योग्य वेळी वल्लवित राहा. 



           लेखक

     अजिनाथ सासवडे

   मु.पो.लोणी(स), आष्टी

   दुरभाष:९४२१३३६०५९




Friday, March 27, 2020

ओढ लावणारं घर

                       "ओढ लावणारं घर"

         घर हा शब्दचं एवढा सुखद, आल्हाददायक आणि मनाला चेतना देणारा आहे, की तो सर्वांना तात्काळ प्रेम, वात्सल्य, या भावनांची जाणीव करून देतो. घर हा शब्दोच्चार कानावर पडला तरी, प्रत्येकाच्या दृष्टिपटलावर घरातील आठवणींची क्षणचित्रे उभी राहतात. मूलभूत गरजांपैकी निवारा ही गरज भागवते ते घर. दगडाच्या भिंतींनाही बोलके करते ते घर. निर्जीव असूनही सर्वांना प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवते ते घर. आपलेपणा, कर्तव्य, जबाबदारी यांची जाणीव करून देते ते घर. घर हे संपत्ती किंवा साधन नसून ते एक जीवनातील परमोच्च आनंदाचे साध्य आहे. मोठ-मोठे बंगले, गगनचुंबी इमारती आपण पाहतो. परंतु त्याठिकाणी प्रेमाचा, आपुलकीचा लवलेशही दिसून येत नाही, त्याला घर म्हणावे कसे? घर शब्दचंं मुळी प्रेमाचा प्रतीक आहे. घर या शब्दात आपलेपणा, सहानुभूती व प्रेमाची भावना दडलेली आहे. प्रेमाचा निवास म्हणजे घर. ज्या ठिकाणी पैसा, संपत्ती मुबलक आहे, परंतु सुख, समाधान नाही, एकमेकांविषयी सहृदयता नाही, ते घर नसून दुःखाचे उगमस्थान मानले जाते.
           कितीही धनाढ्य व्यक्ती असू द्या, भक्कळ पैसा कमवू द्या, परंतु त्याच्या चेहऱ्यावर घरी आल्यावर जो आनंद ओसंडून वाहत असतो ना, तो इतर कुठल्याही ठिकाणी गेल्यावर दिसून येत नाही. घर म्हणजे प्रेम, आपुलकीचे माहेर. घरी आल्यावर आई-वडील, बायको, मुलांना पाहून जे समाधान मिळतं, ते स्वर्गसुखालाही लाजवेल अशा प्रकारचं असतं. पृथ्वीवर असा एकही मनुष्य नसेल की, ज्याला स्वतःचं घर असावं असं वाटत नाही. कित्येकांची तर उभी हयात जाते, परंतु स्वतःच घर मात्र त्यांच्याकडून बांधणं होत नाही. संपूर्ण आयुष्य एखाद्या झोपडीत किंवा बांबूच्या तंबूमध्ये व्यतीत करताना मनातला विचार मनातचं दाबून काही समाज बांधव अखेरचा श्वास घेतात. काहींना नशिबाने जन्मताचं अगदी चांगल्या प्रकारच्या घरामध्ये निवास मिळतो. परंतु काहींना मात्र आश्रितासारखं एखाद्या ठिकाणी इच्छेविरुद्ध जगून, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून संपूर्ण जीवन व्यतीत करावं लागतं. काहीजणांचं पहिलं आणि शेवटचं स्वप्न घर हेच असतं. घर झालं म्हणजे जीवनात सर्व काही झालं, ही इच्छा उरी बाळगून ते सदैव घर या स्वप्नाचा पाठलाग करत असतात. ते तडीस गेलं म्हणजे जीवाची घोर संपली.
       दोन दिवस कुठे गावाला, तीर्थयात्रेला किंवा विरंगुळा म्हणून फिरायला गेलेल्या व्यक्तीला घराची आठवण मात्र क्षणोक्षणी सतावत असते. "भेटी लागे जीवा लागलीसे आस" या उक्तीप्रमाणे कधी एकदा घरी जातोय आणि घरदार पाहून जीव समाधानी पावतोय असे त्यांच्या जीवाला झालेलं असतं. घर हे प्रेम आणि वात्सल्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. घरापासून दूर बाहेरगावी राहणाऱ्याला घराची आठवण येऊन डोळ्यातून आसवे घाळताना कैकवेळा आपण पाहत आलो आहोत. बालपणात घरामध्ये जी दंगामस्ती केली. छोटसं घर असेल तर भावंडांमध्ये बसण्याच्या, झोपण्याच्या जागेवरून झालेले वाद-विवाद, भांडण-तंटे यांची मोठे झाल्यावर आठवण येऊन त्यांचे मन गहिवरून येतं. कारण तेथे प्रेमाची नाळ जोडलेली असते. जोपर्यंत घरातून झऱ्याप्रमाणे प्रेम झिरपत असते, तोपर्यंत आपली प्रेमाची तहान भागवण्यासाठी सगळ्यांनाच घराची ओढ सतावत असते. दिवसभर मनमुरादपणे भ्रमंती करणाऱ्यांचे पाय तिन्हीसांज झाल्यावर आपसूकच घराकडे ओढले जातात.
        आपल्या घरापासून इतरत्र बाहेर शहरात, जिल्ह्यात अथवा राज्यात तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्य करण्यासाठी किंवा नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेल्या, भाडेकरूच्या रुपानं राहणाऱ्या लोकांना सुट्टीच्या काळात गावी येऊन घर आणि घरातील सगळ्या माणसांना भेटण्याची जी ओढ असते, ती अगदी शब्दात वर्णन न करण्यासारखी. त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. कधी एकदा घरी येतो आणि घरातील सगळ्यांना डोळे भरून पाहतोय असे त्यांना होऊन जाते. वाळलेल्या झाडाला वसंत ऋतूत पालवी फुटावी तसं त्यांच्या मनाला आनंदाची पालवी फुटत असते. आपले घर, शेत-शिवार याची प्रत्येकाला जी आस असते, ती जीवाला कासावीस करणारी असते.
         अहो घरून शाळेत गेलेलं पोरगंसुद्धा सहा तास शाळेत थांबताना त्याला अनेकदा घराची आठवण होत असते. कधी घरी जातोय आणि घराच्या अंगणात खेळाचा डाव मांडतोय हे त्याच्या मनात सदोदित घोळत असते. शाळेत असताना घराची आठवण आली, मन बेचैन झाले, तर पोरांचं ठरलेलं वाक्य, सर माझ्या पोटात खूप दुखतयं, मी घरी जाऊ का? म्हणजे घरी जाण्यासाठी नाना प्रकारचे बहाणे लहान मुलेच नव्हेतर अगदी मोठी माणसेही करताना आपण पाहिलेली आहेत. घरी आल्यावर पोटचं काय पण सगळे विकार क्षणात होत्याचे नव्हते होतात, एवढी घराच्या प्रेमात, भेटीत शक्ती आहे.
        खेड्यातल्या घराची तर संकल्पना फारचं छान असते. गोठ्यातील गाई अन् घरातील बाईशिवाय घराला घरपण नाही, असं आवर्जून खेड्यात म्हटलं जातं. घर हा शब्दच मुळी व्यापक अर्थाने वापरला जातो. घर म्हणजे फक्त मुक्कामाचे ठिकाण किंवा चार भिंती नव्हेतर, त्या भिंतीमध्ये जिवंतपणा असणं हे घराचे लक्षण आहे. बंगला, हवेली हे फक्त आकाराने मोठे, मात्र प्रेम, आपुलकीनं मोठं, ते घर. पैसा किंवा मोठमोठ्या वस्तू हे घराचे अलंकार नसून घराला घरपण येतं ते आपल्या माणसाच्या वास्तव्यानं. अवाढव्य परंतु माणूसपण हरवलेल्या चार भिंतींच्या इमारतीला घर म्हणता येणार नाही. सर्व गोष्टी विपुल प्रमाणात असूनही जिथं माणसं येण्यासही कच खातात. जिथं माणसं सोडून निर्जीव वस्तुंचेचं जास्त वास्तव्य, ते घर नव्हेतर चार भिंतींची इमारत म्हणता येईल.
       एकत्र कुटुंब विभक्त झाल्यानंतर एकत्रपणातील घराच्या आठवणी मात्र त्यांच्या डोळ्यांतून टीपं घाळताना दिसतात. आता घरांचा आकार वाढला, मात्र प्रेम कमी झाले. भिंती उंचावल्या, परंतु माणुसकीचा पाया मात्र खचला आहे. पूर्वी घरी आल्यावर सगळ्यांच्या प्रेमाचं मोरपीस सर्वांगावरुन फिरल्यावर हायसं वाटायचं, तेच आता पैशाच्या लोभापायी वेगळे झालेले घर एकत्र पणाच्या आठवणींना स्मरून गळ्यात गळा घालून रडत आहे. पूर्वीचे घर छोटे, विचार मात्र मोठे. आज घराचा आकार वाढला, मात्र विचार तेवढेच तोकडे झाले. पूर्वीच्या काळी घर कितीही छोटे असले तरी जेवण करताना दाटीवाटीने, रेटारेटी करून एकत्रितपणे जेवण करत, त्यातच आपलेपणा होता. घर लहान असले तरी आई - बापाचा दबदबा मात्र मोठा होता. त्या छोट्या घरात पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले, पण ते पाहण्यास मात्र आता घर विखुरले. आज धनधान्य तर भरपूर आहे, मात्र आनंद व समाधान गमावले आहे. घराचा एकोपा विस्कटला आहे. बापाचा धाक, आईची माया, भावाची साथ आणि बहिणीचे प्रेम ह्या सर्वांची ओढ लावणारं घर आता क्वचितचं उरलं आहे.
         

               लेखक,
         अजिनाथ सासवडे सर
            लोणी (स), आष्टी
           मो.९४२१३३६०५९


Wednesday, February 12, 2020

शुभमंगल सावधान

मराठी "लेख"संग्रह-👈 येथे टच करून हे उघडू शकता.

"शुभमंगल सावधान"

          एकनाथने वयाची तीसी पार केली,तरी लगीन नाही अजून पोराचं,या विचारातच रामराव जनावरांना हाकलत जांभळीच्या मळ्याकडे केविलवाण्या चेहऱ्याने झपाझप चालला होता,समोरून पिळदार मिशाचा गणपत सावकार येतोय हे पाहून दचकूनच राम राम सावकार,म्हणत हात हृदयाला भिडवले.सावकाराने आपली गाडी काही अंतरावर झाडाखाली उभी केली व काय रामराव बरं हाय नव्हं? असं विचारताच रामराव आपलं मोठं दुःख ओकू लागला.सावकार लय दिवसापासून मुलाला सोयरीक पाहतोय पण कुठं काय मेळ बसंना,असं कष्टी आवाजात सांगू लागला.शेतकऱ्यांचे दुःख लय मोठे हाय सावकार,कुठबी गेला तरी तो तिरस्काराचा धनीच ठरतो.हूकून चुकून एखादं स्थळ आलं तर ते नोकरीच्या शोधात,आल्या पावली मागं जातया.आता मुलाला एवढं शिकवलं पण नोकरी कुठे लागते आपल्या पोरास्नी.माझं पोर शेती बी अगदी जिवाच्या आकांताने करतया सावकार,पण काय करावं,असं म्हणत रामरावचा कंठ दाटून आला.
        रामराव शेजारील गावात एक स्थळ हाय बघ,पण...,पण काय सावकार,बोला,मी माझ्या लेकरासाठी जीव गहाण ठेवायला तयार हाय.तसं नव्हे रे,पण तो मुलीचा बाप खूपच पैशाचा लोभी हाय बघ,म्हणतो कसा,मला दोन लाख रुपये देऊन जो लगीन करून नेईल,त्यालाच पोरगी देईन.असं कुठं असतं का? पण आता काळही तसाच हाय बाबा.तुझा मेळ बसत असेल तर येऊ जाऊन,असं म्हणून गणपत सावकारांनी गाडी चालू केली नि रामरावच्या अंगावर धूर फेकत निघून गेला.रामरावही जड पावलांनी गुरांमागे धावला.
      रामरावची बायको यशोदाही मागोमाग जांभळीच्या मळ्यात पोहोचली. दोघेही कामाला लागली.सावकाराने सांगितलेले स्थळ यशोदाच्या कानावर कसे घालावे ह्या विचारानेच तो धास्तावला होता.जडशिळ जिभेने न राहून त्याने यशोदाला सर्व हकीकत सांगितली.दोघेही लग्नाच्या चिंतेत पुरे बुडाले होते. मुलाचे लग्न तर करावेच लागेल, पण कसे करावे;जवळ पैसा नाही आणि पैसा देऊन लग्न करावयाचे म्हटल्यावर कुठून आणावा पैसा, या विचाराने त्यांच्या हृदयात कपार पडल्यासारखं झालं.यशोदाच्या ओठावर आलेले कडवट शब्द तिथल्या तिथेच विरघळून गेले.काय म्हणावे या लोकांना पैसे घेऊन मुलीचे लग्न करतात;म्हणजे हे का बाप म्हणावे;असे रामरावच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले.
        दिवस मावळतीला गेला होता.रामराव व यशोदा काम आटपून घराकडे निघाली पण मुलगा,लग्न,हाच विचार दोघांच्याही मनात गिरक्या घेत होता.घरी आल्यावर रामराव बाहेरून येतो असे सांगून सावकाराकडे गेला आणि म्हणाला आपण मुलगी पाहून येऊ,पाहू पुढे काय होईल ते. रात्रीला रामरावला सुखाची झोप लागली नाही.सकाळ होताच सावकाराच्या दारात उभा ठाकला.चला सावकार असे म्हणून एकनाथ व त्याच्या मित्राला सोबतीला घेऊन सर्वजण शेजारच्या गावी पोहोचले.मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. मुलगी पसंत झाली.त्यांनाही मुलगा आवडला.मुलीच्या बापाने सपसेल पैशाची मागणी केली नि रामरावला बसल्याजागी दरदरून घाम फुटला.सर्व आटोपल्यावर सावकारासह सर्वजण गावी परतले.यशोदाला घायाळ अंतःकरणाने घडला प्रसंग रामरावाने सांगितला,काहीतरी मेळ जमवावा लागेल यशोदा; आणि पोराला उजऊन काढावे लागेल.हे सर्व ऐकून यशोदालाही कापरं भरलं.यशोदेच्या कृष्णाला एवढ्या बायका मिळाल्या अन इथ माझ्या पोराला एक मिळाना,"नाव सोनाबाई अन हाती कथलाचा वाळा"अशी आपली अवस्था झाली या विचाराने तीही खजील झाली.
        सावकाराकडून व्याजाने पैसा घ्यावा तर परत कसा करायचा,पाऊस पाण्याचा भरोसा नाही आणि शाश्वत उत्पन्न नाही. रात्रीचे जेवण झाल्यावर सावकारच रामरावच्या घरी लग्नाबद्दल काही मसलत झाली की नाही,हे चाचपून पाहण्यासाठी आले.सावकाराने दारातूनच साद घातली,रामराव हाय का घरात... "या सावकार,बसा."पाणी पिऊन सावकार भिंतीला पाठ देत अंग सैल सोडून बसले.यशोदाबाई मुलगी लई चांदणीसारखी हाय, असं म्हणत सावकारानी विषयाला वाचा फोडली.लटकचं हसून यशोदा म्हणाली,हो सावकार ते सगळं खरे आहे,पण आपण पडलो गरीब माणसं, एवढा मोठा पैसा आणायचा कोठून?व्याजाने घ्यावा तर तो परत करायचा कसा?शेतीच्या उत्पन्नाचा काय भरोसा?असे म्हणत यशोदेने पाटलांना दुजोरा दिला.रामराव बघ तुला चांगली आठ बिघा जमीन हाय,होईल उत्पन्न,हळूहळू करायचे चुकते आणि ते दोन बैल आहेत ना तुझे, ते टाक विकून,चांगला पैसा येईल त्यांचा बाजारात.काय लाल्या-छबिल्या नाय नाय अहो सावकार ते बैलं नाही,ती माझी लेकरं आहेत बघा.घरच्या हरण्या गाईला ती दोन खोंड झाली होती,त्यांना खूप कष्टाने मोठे केले आहे.दुसरं तरी आपल्या जवळ काय आहे धनी,त्यांचे चांगले पैसे येतील टाकू विकून,असं म्हणत यशोदाने आवंढा गिळला.रामरावचे मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.काळ किती क्रूर असतो ना;ज्या लाल्या-छबिल्याने आयुष्यभर आपली साथ दिली, शेतात अहोरात्र काम केले,त्यांनाच विकून एकनाथ चा संसार कसा उभा करू?आणि नाही विकू तर काय करू?अशा दुधारी विचाराने त्याचे काळीज करपू लागले."लाल्या छबिल्या" म्हटलं की बैलांनी रामरावकडे प्रेमाने बघावं, त्यांचे पाणीदार डोळे,फुरफुरनारे नाक,उभी डौलदार शिंगे,सर्व एकदम रामरावच्या नजरेसमोर चित्र उभे राहिले."नाही नाही"असे रामराव मनाशीच पुटपुटला.
          सावकार केव्हाच निघून गेले होते.रात्रभर यशोदाने धन्याची समजूत घातली.बैलं परत घेऊ पण मुलाला मुलगी परत मिळणे शक्य नाही.कारण अगोदरच आठ-दहा स्थळांनी नकार दिला होता.
        दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच रामरावने लाल्या-छबिल्याला चारा पाणी भरपूर खाऊ घातले आणि जड अंतःकरणाने बाजारला जाऊन बैल विकून आला.सावकाराकडून काही पैसे,बैलाचे काही आणि इकडून तिकडून दहा-वीस असा मेळ बसवला.पाहुण्यांना सावकाराहाती पैसा व निरोप धाडला.लाल्या-छबिल्या विकल्यापासून रामराव पूरा खचून गेला होता.
        शेतकर्‍यांच्या जीवनाचा खरा सोबती कुणी असेल तर तो म्हणजे त्याची बैलं आणि ते गेल्यावर खानदानी शेतकऱ्याला किती दुःख होते, हे शब्दात सांगता येणार नाही.शेतकऱ्याजवळ बैल नसतील तर त्याचा चौरंग झाल्यासारखे होते.कुणबीक करता येत नाही.ह्या धास्तीनेच रामरावने हाय खाल्ली,नि आपले आता सर्व संपले,असे त्याचे मन त्याला छळू लागले.जणू तो अपमानाच्या अथांग सागरात बुडालाय आणि बुडतचं चाललाय.
          एका रात्री जेवण झाल्यावर रामरावने बाहेरून येतो असे सांगून जांभळीच्या मळ्याचा रस्ता धरला.लाल्या-छबिल्याच्या आठवणीच्या विचार सागरात तो पुरता न्हाऊन निघाला होता.ज्या जागेवर जांभळीच्या झाडाखाली रोज तो लाल्या-छबिल्याला बांधायचा तेथे जाऊन विसावला.
      सकाळी धनी कुठं दिसना म्हणून यशोदाने एकनाथला रानात गेले की काय पाहून ये,असे सांगितले.पोराचं लगीन ठरलयं अनं धनी काय वेड्यागत हिंडतया असे म्हणत यशोदा कामाला लागली.एकनाथ जांभळीच्या मळ्यात पोहोचला अन पाहतो तर जांभळीच्या झाडाखाली बापाचा निष्प्राण देह पडलेला,तोंडाला फेस आलेला.रामरावने आपली जीवन यात्रा केव्हाच संपवली होती.एकनाथने जीवाच्या आकांताने टाहो फोडला. सर्व गाव जमा झाले.धन्याचा गतप्राण झालेला देह यशोदाने पाहिला आणि जोराचा हंबरडा फोडला;धनी...मात्र आता ही आर्त हाक ऐकू न येण्यासाठी रामरावने आपले कान केव्हाच बंद केले होते.अग्नीडाग देऊन सर्वजण घरी परतले.दहावा तेरावा होऊन सव्वा महिना पालटला,आता नवरा तर गेलाच आहे,पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या विचाराने शेवटचा आधार एकनाथ,त्याचे हात पिवळे करावे आणि कर्तव्यातून मुक्त व्हावे;असे यशोदाने ठरवले.
          लग्नाची तयारी जोरात सुरू झाली.लग्नाचा दिवस उजाडला,वऱ्हाडी मंडळी शेजारच्या गावात पोहचली.सूर्य आग ओकू लागला.लग्नघटिका जवळ येऊ लागली.सनई-चौघडे गुमू लागली.तितक्यात मुलीच्या बापाने लग्नखर्चाची यादी पुढे केली.हा पैसा दिल्यावर लग्न लावून देऊ असे लालची बोल बोलू लागला.पैसा गेला व बापही गेला या विचाराने एकनाथ सुन्न झाला.गावातील समजदार मंडळींनी पुढाकार घेतला व वधूपित्याची समजूत घातली.अहो बाप गेलाय मुलाचा,असा अचानक कोठून पैसा आणणार तूम्हाला देण्यासाठी,अगोदरच दोन लाखासाठी जीव खर्ची घातला त्याच्या बापानं,ह्याची थोडी जाण ठेवा आणि भटजी बुवांना द्या परवानगी,होऊ द्या आता,शुभमंगल सावधान.........
                  लेखक,
        श्री.अजिनाथ सासवडे(सर)
          मु.पो.लोणी(स.)आष्टी
            मो.९४२१३३६०५९

कथा - मेटे मामा

    *कथा*                *मेटे मामा* *लेखक- अजिनाथ सासवडे*                      मेटे मामा खरंतर आमच्या वडिलांचा मामा. पण आम्ही लहान-मोठे सगळ...