Thursday, January 2, 2020

बाप

वाचक मित्रांना सांगू इच्छितो की,"बाप"या लेखात मी दर्शवलेला बाप हा ग्रामीण भागातील आहे.त्यामुळे वडलांपेक्षा ग्रामीण भागातील प्रचलित बाप हाच शब्द मला योग्य वाटला."बाप"या एकेरी नावात जो दबदबा आहे तो मी माझ्या अल्पशा बुद्धिनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

"बाप"                                               

        "बाप या शब्दातच एवढा धाक आहे"की,नुसता उच्चारला तरी,भल्याभल्यांना धडकी भरते.बापाएवढा दरारा बाप सोडता भूतलावर कुणाचाही नाही.आजतागायत आईबद्दल लिहिण्यासाठी भरपूर कवी,लेखक,साहित्यिक सरसावले,परंतू बाप मात्र या सर्वांच्या शब्दांना जवळ जवळ पोरकाच ठरल्यासारखा आहे."स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"हे वाक्य अगदी सान-थोरांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे,पण स्वामी तिन्ही जगाचा बापाविना....काय?आईला लेखक,कवींकडे पुरेपूर न्याय मिळाला व ति धन्य पावली,पण बापाच काय?बापाचा थोरपणा,मोठेपणा सांगण्यास का कुणास ठाऊक लेखक,कवींचे मन लवकर धजावत नाही.बाप सर्व ठिकाणी उपेक्षित घटकांसारखा का ठरावा?हा मोठा प्रश्न मनाला चिरत जातो.आई सावलीसारखी आहे पण बाप झाडासारखा आहे. ऊन,वारा,वादळ यांचा सर्व त्रास झाडालाच सहन करावा लागतो.वरवर पाहता बाप नारळासारखा कठीण वाटत असला तरी,आतून बापाचे हृदय नारळाप्रमाणेच मुलायम असते.छोट्या छोट्या संकटाच्या प्रसंगी आपण'अग आई' म्हणून आईची आठवण काढतो,परंतु मोठे संकट आल्यावर आपसूकच तोंडातून "बापरे"हा शब्द केव्हा बाहेर पडतो हे स्वतःलाही उमगत नाही.यावरून मोठ्या संकटात बापच आपल्याला तारू शकतो हे ध्यानी येते.प्रत्येकासाठी स्वतःचा बाप संकट मोचनासारखा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.
          बापासारखा उत्तम सल्लागार जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही.मुलांच्या भल्यासाठी बाप कठोरपणा अंगीकारतो.बाप हयात नसल्यावर मुलांची अवस्था दिशाहीन जहाजासारखी होते.वारा घेऊन जाईल तिकडे जहाजाप्रमाणे वाहत जातात.आई भावना व वात्सल्याची देवी आहे,पण बाप मात्र कर्तव्य व जबाबदारीचा देवता आहे.मुलांना काही कमी पडल्यावर समाज बापाच्याच गळ्याभोवती फास आवळतो.चंदनाप्रमाणे स्वतः झिजून आपल्या मुलांच्या भाळी आनंद निर्माण करण्याचे काम बापच करतो.स्वतःच्या सुखापेक्षा आपल्या कुटुंबाचे सुख हे बापासाठी एक पर्वणीच असते. दुःखाने कितीही विषाद मांडला तरी,त्याला कणखरपणे हसत मुखाने बापच सामोरे जातो.दुःखाच्या सागरात कितीही बुडाला तरी बाप धाय मोकलून रडू शकत नाही.समाज त्याला तशी स्वाधीनता देत नाही.दुःखाच्या प्रसंगी कधीतरी बापाची उशी रात्री चाचपून पहा नक्कीच ती अश्रूंनी ओली झालेली जाणवेल,कारण बाप आपल्या अश्रूंना अंधारात,एकांतात वाट मोकळी करून देत असतो.तो हताश किंवा हतबल नसतो तर,कर्तव्याने बांधलेला असतो.कर्तव्याच्या,जबाबदारीच्या व दुःखाच्या झळा बापाला अगदी मुकाटपणे सोसाव्या लागतात.
        देवाने आपल्या नशिबात काय लिहिले आहे,हे कोणी सांगू शकत नाही,पण आपला बाप स्वतःच्या घामाच्या शाईने आपले भविष्य लिहित असतो.मुलांच्या भविष्याचे मनोरे उभारताना बापाला होत असलेल्या यातनांचा कल्लोळ कोणाला दिसत नाही.झाडावर चढल्यावर फळे चाखण्याच्या आनंदात आपल्याला स्वतःच्या खांद्यावर बसून ज्याने झाडावर पावते केले,त्या बापालाच आपण विस्मरून जातो.माघारी परतताना पुन्हा बापाचीच आठवण येते. बापाची आठवण दुःखात होते,परंतु आनंद लहरीत होत नाही.परीक्षेत घवघवीत यश मिळविले,नौकरी लागली तर, पेढ्याचा पहिला घास आपण आईला भरवतो.पण पुस्तकांसाठी लागणारा खर्च,शाळेची फी,गणवेश हे सर्व मागताक्षणी देणारा दुःखी,कष्टी बाप आपल्याला आठवत नाही.बाप लढवय्यासाठी ढाल आहे,उन्हातल्यासाठी सावली आहे,वाहत जाणाऱ्यासाठी आधार आहे,तर भुकेलेल्यासाठी अन्नाचा घास आहे. बाप हा बाप असतो,त्याची सर जगात कुणाला येणार नाही.बापाच्या वस्तूवर मुलं जेवढा हक्क गाजवतात तेवढा हक्क कुठेच गाजवू शकत नाहीत.मग ती बापाची"मांडी असो अथवा भांडी".
    मुले लहान असताना बापाने खाऊ आणावा आणि स्वतःला भूक नाही असे सांगून सर्व मुलांच्या मुखी घालावा,हे फक्त बापाचच काळीज करू शकते.मुलांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर सरून सुखाची वहिवाट,यावी त्याकरिता फाटका सदरा व तुटकी चप्पल वापरून बाप एक एक दिवस मावळतीला नेत असतो.दिवाळीच्या सणाला घरातील सर्वांना नवे कपडे खरेदी करून आणणारा बाप स्वतः मात्र जुनेच कपडे परिधान करतो.स्वतःचा जीव गहाण ठेवीन,पण मुलांना काही उणीव भासू देणार नाही,तो बापच असतो.मुलीच्या लग्नात आईला भरगच्च मानपान;बाप मात्र दवाखान्यातील पेशंट सारखा उसने हासू चेहर्‍यावर दाखवत,मंडपदारी केविलवाणी उभा असतो.मनात सल असतो की,माझा काळजाचा तुकडा सुखात तर राहील ना?अशा असंख्य विचारांचे काहूर मनी दडपून ठेवतो अन मुलीला जड अंतःकरणाने सासरी पाठवतो.
        समईतील वातीप्रमाणे स्वतः झिजून मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा बाप,मुलांच्या आठवणीत राहील की नाही,हा मात्र यक्ष प्रश्न आहे.ज्याने मुलांसाठी आपल्या आयुष्याचा होम करून त्यामध्ये स्वतःच्या इच्छा,आकांक्षाची समिधा म्हणून आहुती दिली,त्या बापाला मुलं मोठी झाल्यावर किती सन्मानाची,आदराची वागणूक देतात,का त्याची कुचेष्टा करतात हाही प्रश्न काळजात घर करतो.
        "बाप म्हणजे नुसता डोक्याला ताप"असे काही कुपुत्र मोठी झाल्यावर बापाची समाजात अवहेलना करतात.बापाचा विच्छाद मांडतात.उपकाराची जाणीव न ठेवता कृतघ्नतेचा पाढा वाचतात.मुलांच्या आजारपणात ज्या बापाने रात्र रात्र पापणीला पापणी भिडू दिली नाही,त्याच बापाच्या कृश काळात मुलांना त्यांच्या प्रकृतीकडे कटाक्ष टाकायलाही अवकाश नाही.बसने अथवा रिक्षाने दवाखान्यात जाऊन या,असा निर्भयपणे सल्ला देण्यासही त्यांचे मन कच खात नाही.ही आपल्याच फांदीला अगळीवेगळी कुसंस्काराची फळे कशी लगडली हे बापालाही समजत नाही.
        आई-बापावर नितांत प्रेम करा.ते गेले तर प्रेमाचा अथांग सागर आटला म्हणून समजा.त्यांच्या सेवेशिवाय प्रत्येकासाठी स्वर्गाची कल्पना बिलकुल धूसर.कितीही डगमगती परिस्थिती असुद्या,पण बापाची मान आपल्या कार्यामुळे कधीही झुकणार नाही हेच सदैव ध्यानी ठेवा.बापाच्या पैशावर कसला आलाय रूबाब,पैसा आपला अन रूबाब बापाने केला पाहिजे;तर कुठं आपलं नि"बापाच"नाव झाल म्हणून समजा........

        श्री.अजिनाथ सासवडे(सर)
        मु.पो.लोणी(स.)आष्टी
          ९४२१३३६०५९

3 comments:

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...