Monday, December 30, 2019

बाकी दहा रुपये?

"बाकी दहा रुपये?"

             भगवान तसा खूप प्रामाणिक मुलगा.आठव्या इयत्तेत शिकत होता.जास्त हुशार नसला तरी प्रामाणिकता आणि नम्रता हे त्याचे गुणवैशिष्ट्य.सांगितलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करणारा.वर्गात कधी कुणाची खोडी नाही की चहाडी नाही.आपलं काम भलं आणि आपण भलं असा त्याचा स्वभाव.कुलकर्णी गुरुजींचा त्याच्यावर खूप विश्वास.गुरुजींना जेव्हा जेव्हा मदतीची आवश्यकता पडेल,तेव्हा तेव्हा भगवान देवदूतासारखा हजर होत असे.कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडली की,ते सरळ भगवानला सांगायचे.अगदी खडू असू द्या किंवा गुरुजींच्या घरचा किराणामाल,भाजीपाला सर्वकाही भगवान व्यवस्थितरीत्या घेऊन यायचा.त्यामध्ये त्यानी कधीही कसली कुचराई किंवा दिरंगाई केली नाही.एव्हाना गुरुजींचा कसा फायदा करता येईल,याची तो प्रत्येकवेळी काळजी घेत असे.गुरुजींनाही अभिमान वाटावा असेच त्याचे काम होते.गुरुजींच्या मुखातून शब्द बाहेर पडावा आणि भगवानने तो अलगदपणे झेलावा,हे अगदी ठरलेलंच.भगवानच्या नजरेत गुरुजींचे स्थान देवापेक्षा तसूभरही कमी नव्हते.एकवेळ देव प्रसन्न होऊन काही सांगितले तर भगवान टाळाटाळ करू शकतो,परंतु गुरुजींचे मात्र ऐकल्याशिवाय राहणार नाही.सर्व हिशोब अगदी चोख द्यायचा.गुरुजींचा तो अगदीच लाडका झालेला.
             एकदा बाजारच्या दिवशी गुरुजींनी शंभर रुपयाची नोट व यादी भगवानच्या हातावर टेकवून म्हणाले,भगवान ऑफिसमध्ये कोपऱ्यात एक पिशवी ठेवलेली आहे,ती घेऊन जा आणि बाजार घेऊन ये.गुरुजींनी काम सांगावं आणि विद्यार्थ्यांच्या अंगात उत्साह संचारावा,तसा भगवानही धावतच ऑफिसमध्ये गेला आणि पिशवी घेऊन गेटमधून बाहेर केव्हा पडला,हे गुरुजींना समजले सुद्धा नाही.संपूर्ण बाजारात फिरत राहिला.कुणाकडे भाजीपाला स्वस्त मिळतो,कुणाकडे महाग ह्या सर्व गोष्टींची भगवानला गुरुजींपेक्षाही जास्त माहिती होती.कारण प्रत्येकवेळी त्याचं हे ठरलेलेच काम असायचं.आज त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.उत्साहाने तो बाजार करू लागला.गुरुजी एखाद्या दिवशी जर बाजारात गेले तर ज्या माळ्याच्या मावशीकडे बाजार घेत तिच्याकडेच भगवानही शक्यतो जात असे.त्यादिवशी भगवानने बटाटे,वांगी,कोबी आणि गुरुजींना दुपारच्या जेवनात नेहमी आवडते,ती काकडीसह इतर काही भाजीपाला खरेदी केला.एका ठिकाणी सर्व भाजीपाला मिळत नाही,त्यामुळे त्याने माळ्याच्या मावशीकडे काही व इतर एक-दोन ठिकाणी भाजीपाला खरेदी करून शाळेकडे लढाई जिंकून आल्यासारखा तावातावातच चालू लागला.
        भगवानने वर्गाच्या एका कोपऱ्यात पिशवी ठेवून गुरुजींच्या हातात भाजीपाल्याची यादी दिली.आणि आपल्या जागेवर जाऊन बसला.गुरुजींनी सर्व यादी चेक करून पाहिली,सर्व सामानाच्या पैशांची बेरीज केली तर 90 रुपये झाली होती.गुरुजी भगवानला म्हणाले,अरे भगवान 90 रुपये झाले सगळे,बाकी दहा रुपये? भगवान आपल्या जागेवर जाऊन बसलेला उभा राहिला,आणि गुरुजींना म्हणाला,गुरुजी सगळं बरोबर आहे.पैसे काही उरले नाहीत,माझ्याकडे तर एक रूपयासुद्धा नाही.असे बोलल्यावर गुरुजींना भगवानच्या प्रामाणिकतेवर शंका वाटू लागली.भगवानला जवळ बोलावून घेतले आणि यादी दाखवली तर खरोखर दहा रुपये उरत होते.भगवानच्याही लक्षात आले नाही,की दहा रुपये गेले कुठे?तो गुरुजींना अगदी बेंबीच्या देठापासून सांगत होता,की माझ्याजवळ दहा रुपये नाहीत.पण गुरुजींना वाटले की,याने दहा रुपये कुठेतरी स्वतःसाठी चोरून खर्च केले आणि मला खोटे सांगत आहे.त्यामुळे ते जास्त चिडले.त्यांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी भगवानला चांगलच बेदम मारलं.सर्व विद्यार्थ्यांसमोर मारल्यामुळे भगवानलाही गुरुजींचा राग आला.जी चूक मी केलीच नाही,तिची शिक्षा तर देतायेत आणि तीही सर्वांसमोर,यामुळे भगवानचे मन खूप दुखावले गेले होते.तो मनामध्ये विचार करू लागला,की आपण एवढे गुरुजींचे काम केले,पण शेवटी काय फळ मिळाले,तर दहा रुपये चोरणारा चोर म्हणून शिक्षा.
         भगवानला मारल्यानंतर गुरुजींनाही मनोमन वाईट वाटले होते,पण त्याचा आता काय उपयोग.म्हणतात ना बूँद से गई ओ हौदसे नही आती,तसं भगवानची सर्व वर्गासमोर जी इज्जत गेली ती गेलीच.खूप दिवस ना गुरुजी भगवानशी बोलले,ना भगवान गुरुजींशी.गुरुजींना वाटायचे मी एवढा विश्वास टाकला आणि शेवटी ज्या गोष्टीची मी कल्पनाही करू शकत नव्हतो ती गोष्ट आज भगवानने केली.जे नाही ते करू लागला.काय उपयोग आपल्या संस्कारांचा.मला म्हणाला असता तर मी दहा सोडून त्याला वीस रुपये दिले असते.पण त्याने अशी चोरी करायला नको होती.भगवानला वाटायचे मी एवढे दिवस गुरुजींची सेवा केली,पण सर्व निष्फळ ठरली.कधी एक रुपयासुद्धा त्यांच्या पैशांतून मी माझ्याकडे ठेवला नाही.की स्वतःच्या जीवनासाठी खर्च केला नाही आणि आज आपल्यावरच चोरीचा आळ आला.वर्गातील सर्व विद्यार्थी भगवानकडे चोरटा या नजरेतूनच पाहू लागले.गुरुजींच्या मारण्यापेक्षा सर्व वर्गासमोर गेलेली इज्जत त्यामुळे भगवान खूप कष्टी झाला होता.
                पुढच्या बाजारच्या वेळी गुरुजी स्वतःच बाजारला गेले.त्यांना आता कोणाचाही भरोसा वाटत नव्हता.नेहमीप्रमाणे इकडे-तिकडे थोडाफार भाजीपाला घेतला आणि शेवटी माळ्याच्या मावशीकडे गेले.तिच्याकडे पाहिजे तो सर्व भाजीपाला खरेदी केला.माळ्याची मावशी विचारू लागली,गुरुजी आज तुम्ही आले व्हय,त्या भगवानला नाही पाठवलं बाजार करायला.अहो आजी काय खरं नाही या दुनियाच,मागच्या वेळेला मी त्याच्याकडे शंभर रुपये दिले आणि 90 रुपयांचा बाजार घेऊन आला आणि म्हणतो पैसे उरले नाहीत.पैसे तर चोरले आणि वरून खोटं बोलतोय.अहो गुरुजी,मीच त्याच्याकडून तुमचे पहिले मेथीच्या जुडीचे राहिलेले दहा रुपये मागच्यावेळी घेतले.पण त्याला तुम्हाला घाईगडबडीत सांगायचं आठवलं नसलं.तसा तो पोरगा चांगला हाय बघा.हे ऐकल्यावर गुरुजींचा ऊर भरून आला आणि मनातली मनात विचार करू लागले.अरेरे मी किती मोठी चूक केली,त्याच्याशी खूप कठोर वागलो.सर्व गोष्टीचा विचार न करताच त्याला खूप मारले.मलाही कळाले नाही,की त्यानी आत्तापर्यंत कधीही अशी चूक केली नाही,मग एक वेळेस चूक झाली तर आपण त्याला माफ करावे.भावनेच्या भरात आपण खूपच वाईट केलं.गुरुजींच्या काळजावर पश्चातापाचा भलामोठा दगडच पडला होता.
      धावतच गुरुजी शाळेमध्ये गेले आणि इकडे तिकडे भगवानला शोधू लागले.मधली मोठी सुट्टी झाली होती,मुलं मैदानावर खेळत होती.पण भगवान मात्र एकटाच एका कोपऱ्यामध्ये अपराध्यासारखा इतरांकडे पाहत खजीलपणे बसलेला होता.इतक्यात गुरुजी त्याच्याकडे येताना दिसले,तसे त्यानी आपले तोंड धडवले आणि तिथून पळ काढला,तो कायमचाच.गुरुजी भगवान भगवान म्हणून हाक मारू लागले,तोपर्यंत भगवानने आपले दप्तर उचलून शाळेचे गेटही पार केले होते.गुरुजी मात्र आता खूप बेचैन झाले होते,कारण न केलेल्या चुकीची शिक्षा भगवानला त्यांनी दिली होती.
     आता भगवान गेला तो कायमचाच,परत त्यानी कधी शाळेकडे तोंड फिरवले नाही.कारण दप्तराचे ओझे तो सहन करू शकत होता,पण अपराधीपणाचे ओझे डोक्यावर घेऊन त्याला शाळेकडे चालवत नव्हते.भगवानच्या मनाला झालेल्या जखमा यथावकाश भरून तर आल्या,पण त्याचे व्रण मात्र आयुष्यभर राहिले…



                    लेखक,
              श्री.अजिनाथ सासवडे (सर)
               मु.पो.लोणी(स),आष्टी
               मो.९४२१३३६०५९

2 comments:

  1. कथा वाचली आणि डोळे ओले चिंब झाले . सर

    ReplyDelete
  2. खूपच छान लेख

    ReplyDelete

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...