"फारकत"
(🖕 येथे टच करुन,वाचनाचा छंद जोपासा.)
संसार म्हटलं की,त्यात सर्वकाही.सुख दुःखाच्या लाटा संसार रुपी समुद्रात नित्याने येत असतात आणि त्यांना पती-पत्नीने धैर्याने सामोरे जायचं असतं,ज्यांना हे जमलं त्यांचे संसार पैलतीरास गेले,ज्यांना नाही जमलं,त्यांनी फारकतीसारखा मार्ग पत्करून आपला संसार धुळीस मिळवला.अशाच एका जोडप्याची ही करून कहाणी"फारकत"या नाटीकामय लेखात उतरवली आहे.ती मांडताना सुखापेक्षा दुःखच जास्त होत आहे,कारण आधुनिक समाजात फारकत घेणे म्हणजे अगदी पोरखेळ झाला आहे.अगदी शुल्लक कारणावरूनही नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन फारकती सारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत.परंतु त्याचा परिणाम दोन व्यक्तीवर किंवा दोन कुटुंबावरच नव्हे,तर सर्व समाजावर होत आहे.याचा आधुनिक पिढीने अनेकदा विचार करून पुढचे पाऊल उचलावे.पती-पत्नी दोघांच्या ताटातुटीने मुलाबाळांची होत असलेली हेळसांड नक्कीच हृदयाला पीळ पाडणारी आहे.
जोशी गुरुजी व जोशी बाई यांची लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी वनिता हीचा विवाह एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कंपनी कामगार मोहन या युवकाशी होतो.सासरी गेल्यावर लाडाने वाढलेल्या वनिताच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट होईलच,ही माहेरच्यांची अपेक्षा फोल ठरताना दिसत होती.त्याचवेळी जवळ असलेली पैशाची ऊब,जोशी सर व बाई यांना शांत बसू देत नव्हती.
(मोहन-वनिताचा संसार अगदी सुरळीत चाललेला.सुखदुःखाच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी संसार रुपी चादर चांगलीच विणली जात होती.मोहन नियमित कंपनीत जात असे आणि कंपनीतून थकून आल्यानंतर वनिताही आस्थेने चौकशी करत.असा त्यांचा संसार गोडीगुलाबीने चालू होता.परंतु जोशी बाईच्या नाक खुपसण्याने मोहन व वनिताच्या संसारात मिठाचा खडा पडला.)
मोहन: वनिता...अग माझे बूट कुठे ठेवलेत कंपनीत जायला उशीर होतोय,आन पटकन,तुला कितीवेळा सांगितलं,की सकाळी सकाळी घाई असते,बूट,कपडे जिथल्या तिथे ठेवत जा,पण तुझ्यात मात्र काही बदल नाही.
वनिता: हे घ्या...कशाला आरडाओरड करताय,तुम्हाला पाहता येत नाही का?चांगले डोळे आहेत की मोठ मोठे.
मोहन: सकाळी-सकाळी दिवसाची सुरुवात खराब करू नकोस.
वनिता: बरं बरं…..(असे म्हणून नाक तोंड मुरडत स्वयंपाक घरात निघून जाते.)
(मोहन घाईगडबडीने बूट घालून आपल्या कामाला जातो.पण मनात विचार करत होता,दिवसभर राब राब कंपनीत राबायचं आणि सकाळी संध्याकाळी घरी सुख मिळल,या आशेवर राहायचं तर ईथही कटकट.घरात वनिताच्या डोक्यातही विचारांचं काहूर,काय नुसती रोज बडबड,हे नाही केलं?ते नाही दिलं?मी काय मोलकरिन आहे का?फक्त यांची सेवा करायला.दिवसभर पोराचं काम,अन सकाळ संध्याकाळ यांची बडबड,मला पण स्वतःच काही जीवन आहे की नाही?दोघेही दिवसभर मनोमन एकमेकांचे उणेदुणे काढत असतात.तोच विचार त्यांच्या मनात दिवसभर गिरक्या घेत राहतो.सायंकाळी कंपनी सुटल्यावर मोहन घरी येतो,अन् पाहतो तर घरात सर्वत्र अस्तव्यस्त पडलेले कपडे,सगळीकडे अस्वच्छता.निमूटपणे संध्याकाळचे जेवण करतो आणि झोपी जातो.असे रोजच चालू राहते.दोघेही एकमेकांशी धड नीट बोलत नाहीत.की प्रेमाने विचारपूस करत नाहीत.)
मोहन: वनिता आज रविवारची सुट्टी आहे.कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आपण.तेवढाच थोडासा विरंगुळा.
वनिता: नको,माझ्यामागे भरपूर कामं आहेत,तुम्ही जा आपले एकटे.
मोहन: बऱ्याच दिवसापासून पाहतोय मी,तुझं चित्त काही थाऱ्यावर नाही.ही भाजी नको करू म्हटलं तर तीच करणार.काही सांगितलं तर फक्त ऐकून घेणार,करणार मात्र काहीच नाही.काय चाललय तुझ्या मनात,ते तरी सांग.आपण दोघे इथं बाहेर शहरात राहतोय.एकमेकांची काळजी घेतली पाहिजे.ते तर बाजूलाच,तू साधी बोलायलाही तयार नाही.
वनिता: काय बोलायचं,तुम्हाला बायको नको फक्त काम करणारी कामवाली पाहिजे होती,तर लग्नच कशाला केलं?मी सगळं काम निपटायचं,कधी प्रेमाचं बोलणं नाही,की कुठे बाहेर फिरायला नाही.फक्त आणि फक्त ह्या घरात गाडून घ्यायचं.आपलंच मेलीचं नशीब फुटकं,काय कुणाला बोलण्यात अर्थ आहे.
मोहन: म्हणजे तुला काय म्हणायचं,मी तुझ्यासाठी काय करत नाही? हे सगळं कुणासाठी चाललंय?आपला पृथ्वी आणि तू,तुम्हा दोघांसाठी तर सर्व काही करतो आहे.
वनिता: हो कळलं,तुम्ही किती करता आमच्यासाठी.
(असेच बरेच दिवस दोघांचेही मनं धूसपुसत राहतात.कुणी कुणाशी नीटपणे बोलत नाही.घराला घरपण राहत नाही. दोघांनाही एकमेकाबद्दल प्रेमाऐवजी तिरस्कार वाटू लागतो.एके दिवशी वनिता आपल्या आईला फोन लावून सर्व हकीकत सांगू लागते.)
वनिता:(आईला फोन लावते) हॅलो,आई मी वनिता बोलते.
जोशी बाई: वनिता बोल काय म्हणतेस? मोहनची कंपनी काय म्हणते?पृथ्वी कसा आहे?
वनिता: अग काय सांगू तुला, लग्नाच्या वेळी तू तर म्हटली मोहन फार चांगला मुलगा आहे.तुझं नशीब उघडलं वनिता.कसलं आलंय नशीब.मोहन रोज नुसता बडबड करत असतो,बांबूतल्या भुंग्यासारखा आवाज चालूच.लग्नापासून काय काय आणि किती सहन केले ते माझ्या जीवाला माहित.घरी आला की कधी शांत बसत नाही.ते नाही केलं,हे नाही केलं?असं केलं?तसं का केलं?आई मी फार वैतागून गेले बघ,यांच्या कटकटीला.एक दिवस मी माझ्या जीवाचं काही तरी करीन,तेव्हाच मला शांती मिळेल असं वाटतंय.
जोशी बाई: हे बघ वनिता लई टेन्शन घेऊ नको,आम्ही आहोत तोपर्यंत तू बिंदास राहा.तुला जे काही कमी पडेल ते आम्हाला मागत जा,आमच्या दोघांचा लाखभर पगार येतो घरात.सुट्टीच्या दिवशी आम्ही येतो तुझ्याकडे,मग चांगलीच मोहनची कानउघडणी करू.समजतो काय स्वतःला.बरं आता मी शाळेत निघाली आहे,आपण नंतर बोलु,ओके बाय.
(एके दिवशी रविवार गाठून जोशी सर व बाई दोघेही वनिताकडे येतात.मोहन व वनिता दोघांनाही सर्व हकीकत विचारतात.)
वनिता: अग आई,हे माझ्याकडून फक्त काम करून घेतात.जसे यांनी पत्नी नाहीतर कामवाली म्हणून आनलय या घरात.
मोहन:(चांगलेच खडे बोल सुनावतो)अहो हिला पत्नीचे कर्तव्य सुद्धा समजत नाहीत,नवऱ्यासाठी काय केलं पाहिजे,काय करू नये.कसंही वागायचं.मान,मर्यादा सर्व वेशीला टांगायचं,हे असं चालतं का तुमच्याकडे,सासुबाई.
जोशी सर: हे पहा नवरा-बायको म्हटल्यानंतर किरकोळ वाद-विवाद चालूच असतात.जखम झाल्यावर तिला वाढू न देता त्यावर वेळीच फुंकर घातली तर ती लवकर बरी होते.त्या जखमेवर तुम्ही सारखे घाव घालत राहिलात,तर जखम मोठी होऊन कधीकधी जखम झालेला अवयव काढून टाकावा लागतो. त्यासाठी प्रत्येक गोष्टीत खबरदारी घेणे गरजेचे आहे.कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त झाली तर नक्कीच त्याचा वेगळा परिणाम जाणवतो.
जोशी बाई: अहो बास करा,मोहनरावांना ती गोष्ट कळायला नको का?
मोहन: म्हणजे मीच सगळं समजून घ्यायचं, वा धन्य आहात आपण व आपली मुलगी.
जोशी बाई: ते काहीही सांगू नका,घरकाम करण्यासाठी एखादी कामवाली लावा,तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही पाठवून देऊ,पण हे असलं खपवून घेतलं जाणार नाही.
मोहन: तुमच्या असल्या वागण्या-बोलण्याने,तर तिला चांगलीच फुस मिळते.बोला बोला म्हणजे चांगली माझ्या डोक्यावर मिर्या वाटील रोज.
वनिता: पाहिलं ना आई-बाबा, हे असं यांच रोजच चालू असतं. एवढ्या दिवस मी सहन केलं,पण आता मला सहन होत नाही.
जोशी बाई: जाऊदे सगळं चुलीत,चल तुझी बॅग भर,आमच्याकडेच राहा,यांना खाऊदे हाताने तुकडे करून,त्याशिवाय काही वठणीवर येणार नाहीत.
मोहन: (रागात)हो जा जा.
(वाद अगदीच विकोपाला जातो,वनिता आई-बाबांबरोबर माहेरी येते.दिवसांमागून दिवस लोटले जातात,पण दोघांचाही एकमेकांना कुठला फोन नाही,की काही बोलणे नाही.जोशी बाई व सर हे फार रागातच असतात.दोन-तीन महिने लोटल्यानंतर जोशी बाई म्हणतात पाहिलं का त्याला तुझी गरज नाही राहिली.नाहीतर आला असता नाक घासत आपल्याकडे.जोशी बाई एका वकिलामार्फत मोहनला नोटीस पाठवतात,आमच्या मुलीला तुमच्या बरोबर संसार करताना खूप अत्याचार सहन करावा लागतो.तिची खूप पिळवणूक केली जाते.आणि तसे पाहता तुम्हाला तिची आता गरजही राहिलेली दिसत नाही.आपल्या असल्या वागण्याला कंटाळून तिने तुमच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे,त्याकरिता हा अर्ज पाठवला आहे.त्यावर सही करून तिला आपली परवानगी द्या.मोहन त्याचे आई-वडील सर्वजण त्यांची समजूत घालायला येतात,विनवणी करतात,पण सर्व गोष्टी अपयशी ठरतात.भांडण न्यायालयात जाते.न्यायालयही प्रथम दर्शनी त्यांना एकत्र राहावे,अशी विनंती करते.मात्र वनिताच्या आई-वडिलांचा पैसा त्यांना शांत बसू देत नाही.त्यांना वाटतं आमच्याकडे काय कमी आहे,आम्ही आमच्या लेकीचा व नातवाचा सांभाळ चांगल्याप्रकारे करू शकतो.शेवटी न्यायालयाकडून त्यांच्या जिद्दीपाई दोघांना वेगळे केले जाते,त्यांची फारकत होते.पृथ्वी लहान असल्यामुळे त्याला त्याच्या आईकडेच ठेवण्यात येते.लग्नामध्ये ज्या वस्तू दिल्या होत्या,त्या सर्व वनिताने माहेरी आणल्या तरी चालतील,हे स्पष्टपणे सांगितले जातो.वनिता व तिची आई टेम्पो घेऊन पसारा आणण्यासाठी जातात.टेम्पो दारापुढे उभा करतात.सोबत हमालही आणलेला असतो.)
जोशी बाई: (दारापुढे उभ्या राहून दरवाजा वाजवतात.) कोण आहे का घरात?
मोहन: हा कोण? सासुबाई.
जोशी बाई:(मोहनकडे रागाने पाहत)सासुबाई म्हणण्याचा अधिकार तुम्ही केव्हाच गमावून बसलात.आम्ही सामान नेण्यासाठी आलो आहोत.लग्नामध्ये दिलेले आणि वनिताचे जे काही असेल ते आम्ही घेऊन जाणार आहोत.
मोहन: घर उघडेच आहे,जे न्यायचं असेल ते घेऊन जा.
(जोशी बाई एकेक वस्तू घेऊ लागतात.वनिताचा मात्र हात धजावेना,जे दोघांनी एकत्र उभं केलंय,ते आता एकटीने घेऊन जायचं,या विचारानं ती कासावीस झाली.घरात आल्याबरोबर सहा महिन्यांपूर्वीच्या तिच्या सर्व जिवंत आठवणींना उधान आलं.मन गहिवरलं,गेल्या तीन-चार वर्षात दोघांनी मिळून संसारात जे काही जमवलं होतं,आता त्या सगळ्या एकत्र गोष्टी वेगळ्या होणार,या विचारानं तिच्या नयनांना प्रेमधारा लागल्या होत्या.तिघांचा एकत्र काढलेला फोटो टीव्ही वर ठेवलेला पाहिल्यावर तिला कळाले,की बाकी सगळ्या घरात जळमटं झालीत,पण फोटो मात्र स्वच्छ पूसून ठेवलेला दिसत होता.वनिता हे सर्व पहात होती.किती पहावे आणि किती डोळ्यात साठवावे,याचा मोह तिला आवरता येईना.तितक्यात जोशी बाई वनिताला आवाज देतात.)
जोशी बाई: अगं काय करतेस,मी तीन-चार वस्तू खाली नेऊन दिल्या आणि तू आणखी तिकडेच उभी आहेस.
वनिता: हो आले,सामान काढत होते.
(पुन्हा ती आपल्या विचारात मग्न झाली.का कुणास ठाऊक पण तिचे मन तिला आता सांगत होते.वनिता तू फार मोठी चूक केली आहेस.आयुष्यात प्रेमाच्या माणसाचा सहवास गमावला आहेस.अगं जीवन हे कष्टमयच असतं.पण त्याच्यात रंग भरायला प्रेमाची माणसं नसतील,तर त्या निरंक जीवनाला तरी काय अर्थ आहे.अचानक तिची नजर मोहनकडे गेली,सहा महिन्यापूर्वीचा सशक्त मोहन आज अशक्त झालेला तिला जाणवला.मागच्या दिवाळीला माझ्या हट्टाखातर मोहन व मी नवीन एलसीडी टीव्ही घेऊन आलो होतो.पैसे कमी होते,तर मोहनने स्वतःची अंगठी बँकेत तारण म्हणून ठेवली होती.दोघं सोबत गेलो आणि माझ्या पसंतीचाच टीव्ही खरेदी केला होता.टीव्हीचा रिमोट सदैव माझ्याजवळ असायचा.पण आज टीव्ही आणि रिमोट दोघेही धूळखात पडले आहेत.माझ्याकडे रागाने पाहत जणू मला बोलतच होते.अग किती दिवस साथ दिली आम्ही तुम्हाला,दोघांनी मिळून आम्हाला घरात आणलं आणि आज मोहनपाशी आम्हाला एकटं सोडून चाललीस.किती स्वार्थी आहेस,काय तर फक्त कष्टापाई.अगं आम्ही निर्जीव वस्तूसुद्धा कधी कुणाला सोडून देत नाहीत.म्हणे माणसं भावनिक, संवेदनशील असतात,मग मानव आसूनसुद्धा तू अशी भावनाशून्य कशी झालीस,हेही आम्हाला कळेना.एवढा चांगला घरसंसार बसलेला क्षणात तू होत्याचं नव्हतं केलं,काय मिळवलं आयुष्यात हे सर्व करून'सुख'..!अगं सुख हे,स्वतः कमावून दुसर्याला घास भरवण्यात आहे.दुसऱ्यासाठी खूप काही करणं यातच फार मोठा आनंद असतो आणि तो आनंद,समाधान यापासून तू खऱ्या अर्थाने आज पोरकी झालीस.कुठल्याही समारंभाला एकत्रितपणे गेले तर त्यातच खरा मोठेपणा आणि समाधान आहे.तेथे अंगावर भरमसाठ अलंकार जरी घालून गेलीस,तरी शेवटी एकटेपणाचे दुःख सोबत असणार.जीवनात जोडीदार नसण्याची किंमत त्यावेळेस कळेल.स्त्रीच्या आयुष्यातला खरा अलंकार तर तिचा पती असतो.तो आज तू गमावला आहेस.
अचानक मोहनची नजर वनिताकडे गेली.दोघांनी एकमेकांकडे पाहिले.क्षणात त्यांचे डोळे प्रेमाची भाषा बोलू लागले.डोळ्यांनी एकमेकांना हळुवारपणे आलिंगन दिले होते. त्यांच्या जीवनातील पूर्वीच्या आठवणींना डोळे उजाळा देऊ लागले.तीन-चार वर्षाच्या प्रवासातल्या किती किती नव्हे त्या आठवणी आज जिवंत झाल्या होत्या.डोळ्याद्वारे वनिताचे मन केव्हाच मोहनच्या मिठीत गेले होते.कित्येक वेळा एकमेकांचा हात प्रेमाने हातात घेऊन सुखदुःखाच्या गुजगोष्टी केल्या होत्या.एकमेकांच्या साथीने कैक संकटांना निधड्या छातीने सामोरे जाण्याचे बळ मिळत होते.
जीवनरुपी समुद्रात वाहत जाणाऱ्या दोन ओंडक्यांनी काही काळासाठी एकमेकांना साथ दिली,पण आज अचानक फारकत नावाच्या तुंबळ लाटेनं जेव्हा ते वेगळे होत होते,तेव्हा एकमेकांकडे आसुसल्या नजरेनं व्याकूळ होऊन पाहत होती.की आता आपली भेट पुन्हा कधी?हे आता कुणाला माहीत?लग्नाच्या सात जन्माच्या फेऱ्यांनी एकत्र बांधलेल्या दोन जीवांना काही वर्षातच वेगळं केलं होतं.मोहनचे डोळे वनिताच्या डोळ्याशी अधीरतेने बोलत होते,नको जाऊ सोडून हा सर्व संसार,नको करू हेळसांड त्या चिमुकल्या जीवाची.
जोशी बाई: अगं वनिता, चल खुप उशीर झालाय…
वनिता:(डोळे पुसत) हो…..
(वनिताचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.आपण फार मोठी चूक केल्याचे दुःख तिला जाणवत होते.जड अंतःकरणाने दरवाजातून बाहेर निघत असताना,बाजूलाच बसलेल्या मोहनच्या खुर्चीला वनिताचा पदर अडकला.कदाचित तो सांगत होता,की माझी गाठ याच्याशीच बांधलेली आहे,नको ती जबरदस्तीने तोडायचा प्रयत्न करू.फारकत नावाच्या लाटेनं जरी आज त्यांना वेगळं केलं असलं,तरी मनाने मात्र ते वेगळे होऊच शकले नाहीत,कायमचे एकच राहिले....)
लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे (सर)
मु.पो.लोणी(स),आष्टी
मो.९४२१३३६०५९
No comments:
Post a Comment