"माझा महाराष्ट्र महान"
मराठी मायबोली असलेला शूरवीर मावळ्यांचा प्रांत म्हणजेच आपला महाराष्ट्र.महाराष्ट्राची अगदी प्राचीन काळापासून पराक्रमी लोकांचा वारसा लाभलेला प्रदेश म्हणून ख्याती आहेत.दऱ्याखोऱ्यातील मावळ मातीतील उमद्या मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक या मातीवर झाला,तेव्हा कुठे ही भूमी गुलामीतून मुक्त झालेली आहे.महाराष्ट्राची भूमी संतांचे थोर कार्य आणि विवेकी विचाराने पवित्र झालेली भूमी आहे.संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत गाडगे महाराज,संत एकनाथ महाराज,संत जनाबाई ह्या थोर संतांच्या विचार व वाणीने महाराष्ट्राला पवित्र आणि मंगल केले आहे.हिंदू,मुस्लिम,सिख,इसाई अशा विविध धर्माचे आणि अठरापगड जातीचे लोक आज या ठिकाणी गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.अशा प्रकारे विविधतेतील एकता या ठिकाणी पहावयास मिळते.
छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांसारखे महापुरुष या महाराष्ट्र देशांमध्ये धर्म रक्षणार्थ तथा धरणी मातेच्या उद्धारासाठी जन्मास आले.जगावे कसे हे शिवरायांनी जगाला आपल्या आचरणातून दाखवून दिले,तर मरावे कसे हे संभाजीराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.कैक परकीय सत्तांनी या महाराष्ट्रावर अत्याचार केला,पण त्याचा बीमोड करण्यासाठी येथे थोर महापुरुषांनी जन्म घेतला.इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच,डच तसेच मोगल,कुतुबशाही,आदिलशाही या सर्वच सत्तांनी महाराष्ट्राला अजगरासमान गिळंकृत करू पाहिले.पण गरुडाप्रमाणे उत्तुंग भरारी घेणारा हा महाराष्ट्र,कधी कुण्या परकीय आजगररूपी सत्तेपुढे नमला नाही,उलट त्यालाच आपल्या पंजात पकडून त्याचे नामोनिशान मिटवणारे शूरवीर या मातीत निपजले.महाराष्ट्र हा कणखर मनाच्या आणि निधड्या छातीच्या शूरवीर मावळ्यांचा.सुवर्ण अक्षरात ज्यांचा इतिहास लिहून ठेवावा अशी माणसे या मातीत जन्माला आली आणि मातीसाठी लढता लढता त्यांनी वीरमरण पत्करले.कितीही अन्याय,अत्याचार झाले तरी सर्व अत्याचारांना मोडीत काढणारा महाराष्ट्र नक्कीच अभिमानाने आज उभा आहे.
शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचे या मातीत बीजारोपण झालेले आहे आणि आज त्याच विचारांचा वटवृक्ष अभिमानाने ताठ उभा आहे.मराठी मातीतल्या प्रत्येक माणसाच्या मनात शिवविचारांचा जागर रोजच होत असतो. महाराष्ट्रातील प्रगल्भ विचारांचा वसा लाभलेला माणूस अन्यायापुढे कधी झुकला नाही,की कुणापुढे नमला नाही.तो वंदन करतो फक्त धरणीमातेला आणि भगव्याला.
महाराष्ट्राला विविध थोर कवी,लेखक,साहित्यिक यांचा वारसा पूर्वापार लाभलेला आहे आणि त्यांच्या सडेतोड लेखनीने दीनदुबळ्या,तळागाळात खितपत पडलेल्या समाजाचा उद्धार होऊन तो आज विकासाच्या मार्गावर रूढ झाला आहे.समाजाच्या विकास प्रक्रियेत या लोकांनी मोलाची पायाभरणी केली आहे.
स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच मातीत जन्म घेतला आणि अखंड देशातील स्त्रीयांना शिक्षणाची गंगा खुली केली.शिक्षणाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्त कधी कुणापुढे नतमस्तक होत नाही,हे महात्मा फुले यांनी ठणकावून सांगितले.आज याच महाराष्ट्राची संपूर्ण देशातच नव्हे नव्हे तर विश्वात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख आहे.संपूर्ण जगातून आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात.संगणक क्षेत्रात घडून आलेली क्रांती याच महाराष्ट्रातील विजय भटकर नावाच्या युवकानी घडवून आणली.
संपूर्ण देशात सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,औद्योगिक सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर पाऊल टाकत आले आहे.उद्योगधंदे,व्यवसाय,शेती,शिक्षण,माहिती तंत्रज्ञान,विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध तज्ञांनी देशासाठी मोलाची कामगिरी केली आहे.पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र नक्कीच आज देशाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो.मुंबईसारखे जागतिक उंचीचे शहर महाराष्ट्रात खुमासदारपणे उभे आहे.भारत देशाचे प्रवेशद्वार'गेटवे ऑफ इंडिया'महाराष्ट्रातच आहे.भारताची आर्थिक राजधानी अर्थातच मुंबई महाराष्ट्रात आहे.देशातले जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून दिल्लीनंतर आज मुंबईच नावारूपाला येऊ पाहत आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरडोई अन्नधान्य उत्पादन निश्चितच जास्त आहे.शेती क्षेत्रातही हरितक्रांतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून मराठी माणसाने भरपूर प्रगती केली आहे.जगातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अन्नधान्य,फळे,भाजीपाला इत्यादी उत्पन्न निर्यात होत आहे.फुलशेती,फळशेती ही तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नगदी रक्कम तयार करून देणारी आहे.दुग्धव्यवसायात धवलक्रांती होऊन दूध उत्पादनात भरमसाट वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.
शिक्षण क्षेत्रातही महाराष्ट्र वरच्या स्थानावर आहे.आज सक्तीच्या शिक्षणामुळे तळागाळातील दीनदुबळ्या लोकांनाही शिक्षण मिळू लागले आहे आणि या सर्व शिक्षणाच्या चमत्कारामुळे महाराष्ट्र प्रगतीच्या द्रुतगती मार्गावर विराजमान आहे.आज शिक्षण घेऊन आपलीच महाराष्ट्रातील मुलं बाहेरच्या देशात चांगल्या प्रकारचे काम करून नावलौकिक मिळवत आहेत.
महाराष्ट्रातील देहू,आळंदी हे आज अध्यात्माचे विद्यापीठ म्हणून ओळखले जातात.महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून अध्यात्माचे धडे गिरवण्यासाठी अध्यात्मप्रेमींची आज देहू,आळंदीमध्ये रेलचेल दिसून येते.तुळजापूर,पंढरपूर,कोल्हापूर,त्र्यंबकेश्वर,पैठण,देहू,आळंदी,माहुरगड,सप्तशृंगी अशी सगळी मराठी माणसांची कुलदैवतं येथे एकवटलेली आहेत.लोकनाट्य,तमाशा,कोळीगीत,पोवाडे,भजन,कीर्तन अशा विविध पारंपारिक लोककला महाराष्ट्रात आजही जीवंत आहेत.महाराष्ट्रातील जनतेचा पेहराव हा अतिशय रुबाबदारपणाचा आहे.महाराष्ट्रातील माणसं ही डोंगरदऱ्यात,कडेकपाऱ्यात राहणारी अगदी दगडासारखी कणखर आहेत.एकमेकांबरोबर रोज भांडतील पण संकट आल्यावर मात्र एकमेकांना मदतीचा हात द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत,हीच खरी मराठी माणसं आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हटलं,म्हणजे विश्वासाचे प्रतीक.मराठी माणूस म्हटलं की शौर्याची निशानकाठी हाती घेतलेला.कुठल्याही क्षेत्रात पराक्रम गाजवावा तो याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनं.संरक्षण दलामध्ये तर महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी मराठाबटालियन सुद्धा उभी केलेली आहे.याचा अर्थ महाराष्ट्रातील माणूस शूरवीर,पराक्रमी,निडर अशीच त्याची ख्याती संरक्षण क्षेत्रांमध्येही आहे.हसत हसत मरण पत्करीन पण शत्रूला शरण जाणार नाही,की कोणाची लाचारी पत्करणार नाही,हा खरा मराठी माणूस.
शेती,उद्योगधंदे सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने भरपूर प्रमाणात प्रगती केली आहे.कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे मोठंमोठे उद्योगधंदे आज महाराष्ट्रामध्ये उभारले आहेत.त्याद्वारे कित्येक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाचे स्थिरीकरण झाले आहे.मोठंमोठ्या नद्यांवर बांधलेल्या धरणामुळे शेतीसाठी तसेच कारखान्यासाठी पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.पाण्यावरच विद्युत निर्मितीमुळे विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
आज महाराष्ट्रातील महिलाही सर्वच क्षेत्रात पुढे सरसावल्या आहेत.विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला दिसत आहे.विविध प्रकारचे उद्योगधंदे असतील,संरक्षण दल असेल,किंवा परिवहन मंडळ असो सर्व क्षेत्रात महिला आज आपले कार्य नेटाने पुढे चालवत आहेत.खाजगी क्षेत्र असो वा सरकारी,महिला आज आपलं अमूल्य असे योगदान देताना दिसत आहेत.राजमाता जिजाऊ भोसले,अहिल्यादेवी होळकर,सावित्रीबाई फुले,सिंधुताई सपकाळ,प्रतिभाताई पाटील अशा थोर स्त्रिया याच महाराष्ट्रात जन्मास आल्या.महाराष्ट्राचे नाव त्या आकाशाच्या उंचीला भिडावे इथपर्यंत घेऊन गेल्या.अशा सर्व गोष्टीत सुजलाम-सुफलाम,प्रगती पथावर रूढ असलेल्या महाराष्ट्राने,देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपले नावलौकिक मिळवले आहे.म्हणूनच अभिमानाने महाराष्ट्र भूमीला म्हणावेसे वाटते,"वंदे मातरम्,वंदे मातरम्"..!
लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे (सर)
मु.पो.लोणी(स),आष्टी
मो.९४२१३३६०५९.
Very nice
ReplyDelete