Wednesday, February 12, 2020

शुभमंगल सावधान

मराठी "लेख"संग्रह-👈 येथे टच करून हे उघडू शकता.

"शुभमंगल सावधान"

          एकनाथने वयाची तीसी पार केली,तरी लगीन नाही अजून पोराचं,या विचारातच रामराव जनावरांना हाकलत जांभळीच्या मळ्याकडे केविलवाण्या चेहऱ्याने झपाझप चालला होता,समोरून पिळदार मिशाचा गणपत सावकार येतोय हे पाहून दचकूनच राम राम सावकार,म्हणत हात हृदयाला भिडवले.सावकाराने आपली गाडी काही अंतरावर झाडाखाली उभी केली व काय रामराव बरं हाय नव्हं? असं विचारताच रामराव आपलं मोठं दुःख ओकू लागला.सावकार लय दिवसापासून मुलाला सोयरीक पाहतोय पण कुठं काय मेळ बसंना,असं कष्टी आवाजात सांगू लागला.शेतकऱ्यांचे दुःख लय मोठे हाय सावकार,कुठबी गेला तरी तो तिरस्काराचा धनीच ठरतो.हूकून चुकून एखादं स्थळ आलं तर ते नोकरीच्या शोधात,आल्या पावली मागं जातया.आता मुलाला एवढं शिकवलं पण नोकरी कुठे लागते आपल्या पोरास्नी.माझं पोर शेती बी अगदी जिवाच्या आकांताने करतया सावकार,पण काय करावं,असं म्हणत रामरावचा कंठ दाटून आला.
        रामराव शेजारील गावात एक स्थळ हाय बघ,पण...,पण काय सावकार,बोला,मी माझ्या लेकरासाठी जीव गहाण ठेवायला तयार हाय.तसं नव्हे रे,पण तो मुलीचा बाप खूपच पैशाचा लोभी हाय बघ,म्हणतो कसा,मला दोन लाख रुपये देऊन जो लगीन करून नेईल,त्यालाच पोरगी देईन.असं कुठं असतं का? पण आता काळही तसाच हाय बाबा.तुझा मेळ बसत असेल तर येऊ जाऊन,असं म्हणून गणपत सावकारांनी गाडी चालू केली नि रामरावच्या अंगावर धूर फेकत निघून गेला.रामरावही जड पावलांनी गुरांमागे धावला.
      रामरावची बायको यशोदाही मागोमाग जांभळीच्या मळ्यात पोहोचली. दोघेही कामाला लागली.सावकाराने सांगितलेले स्थळ यशोदाच्या कानावर कसे घालावे ह्या विचारानेच तो धास्तावला होता.जडशिळ जिभेने न राहून त्याने यशोदाला सर्व हकीकत सांगितली.दोघेही लग्नाच्या चिंतेत पुरे बुडाले होते. मुलाचे लग्न तर करावेच लागेल, पण कसे करावे;जवळ पैसा नाही आणि पैसा देऊन लग्न करावयाचे म्हटल्यावर कुठून आणावा पैसा, या विचाराने त्यांच्या हृदयात कपार पडल्यासारखं झालं.यशोदाच्या ओठावर आलेले कडवट शब्द तिथल्या तिथेच विरघळून गेले.काय म्हणावे या लोकांना पैसे घेऊन मुलीचे लग्न करतात;म्हणजे हे का बाप म्हणावे;असे रामरावच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले.
        दिवस मावळतीला गेला होता.रामराव व यशोदा काम आटपून घराकडे निघाली पण मुलगा,लग्न,हाच विचार दोघांच्याही मनात गिरक्या घेत होता.घरी आल्यावर रामराव बाहेरून येतो असे सांगून सावकाराकडे गेला आणि म्हणाला आपण मुलगी पाहून येऊ,पाहू पुढे काय होईल ते. रात्रीला रामरावला सुखाची झोप लागली नाही.सकाळ होताच सावकाराच्या दारात उभा ठाकला.चला सावकार असे म्हणून एकनाथ व त्याच्या मित्राला सोबतीला घेऊन सर्वजण शेजारच्या गावी पोहोचले.मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. मुलगी पसंत झाली.त्यांनाही मुलगा आवडला.मुलीच्या बापाने सपसेल पैशाची मागणी केली नि रामरावला बसल्याजागी दरदरून घाम फुटला.सर्व आटोपल्यावर सावकारासह सर्वजण गावी परतले.यशोदाला घायाळ अंतःकरणाने घडला प्रसंग रामरावाने सांगितला,काहीतरी मेळ जमवावा लागेल यशोदा; आणि पोराला उजऊन काढावे लागेल.हे सर्व ऐकून यशोदालाही कापरं भरलं.यशोदेच्या कृष्णाला एवढ्या बायका मिळाल्या अन इथ माझ्या पोराला एक मिळाना,"नाव सोनाबाई अन हाती कथलाचा वाळा"अशी आपली अवस्था झाली या विचाराने तीही खजील झाली.
        सावकाराकडून व्याजाने पैसा घ्यावा तर परत कसा करायचा,पाऊस पाण्याचा भरोसा नाही आणि शाश्वत उत्पन्न नाही. रात्रीचे जेवण झाल्यावर सावकारच रामरावच्या घरी लग्नाबद्दल काही मसलत झाली की नाही,हे चाचपून पाहण्यासाठी आले.सावकाराने दारातूनच साद घातली,रामराव हाय का घरात... "या सावकार,बसा."पाणी पिऊन सावकार भिंतीला पाठ देत अंग सैल सोडून बसले.यशोदाबाई मुलगी लई चांदणीसारखी हाय, असं म्हणत सावकारानी विषयाला वाचा फोडली.लटकचं हसून यशोदा म्हणाली,हो सावकार ते सगळं खरे आहे,पण आपण पडलो गरीब माणसं, एवढा मोठा पैसा आणायचा कोठून?व्याजाने घ्यावा तर तो परत करायचा कसा?शेतीच्या उत्पन्नाचा काय भरोसा?असे म्हणत यशोदेने पाटलांना दुजोरा दिला.रामराव बघ तुला चांगली आठ बिघा जमीन हाय,होईल उत्पन्न,हळूहळू करायचे चुकते आणि ते दोन बैल आहेत ना तुझे, ते टाक विकून,चांगला पैसा येईल त्यांचा बाजारात.काय लाल्या-छबिल्या नाय नाय अहो सावकार ते बैलं नाही,ती माझी लेकरं आहेत बघा.घरच्या हरण्या गाईला ती दोन खोंड झाली होती,त्यांना खूप कष्टाने मोठे केले आहे.दुसरं तरी आपल्या जवळ काय आहे धनी,त्यांचे चांगले पैसे येतील टाकू विकून,असं म्हणत यशोदाने आवंढा गिळला.रामरावचे मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.काळ किती क्रूर असतो ना;ज्या लाल्या-छबिल्याने आयुष्यभर आपली साथ दिली, शेतात अहोरात्र काम केले,त्यांनाच विकून एकनाथ चा संसार कसा उभा करू?आणि नाही विकू तर काय करू?अशा दुधारी विचाराने त्याचे काळीज करपू लागले."लाल्या छबिल्या" म्हटलं की बैलांनी रामरावकडे प्रेमाने बघावं, त्यांचे पाणीदार डोळे,फुरफुरनारे नाक,उभी डौलदार शिंगे,सर्व एकदम रामरावच्या नजरेसमोर चित्र उभे राहिले."नाही नाही"असे रामराव मनाशीच पुटपुटला.
          सावकार केव्हाच निघून गेले होते.रात्रभर यशोदाने धन्याची समजूत घातली.बैलं परत घेऊ पण मुलाला मुलगी परत मिळणे शक्य नाही.कारण अगोदरच आठ-दहा स्थळांनी नकार दिला होता.
        दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच रामरावने लाल्या-छबिल्याला चारा पाणी भरपूर खाऊ घातले आणि जड अंतःकरणाने बाजारला जाऊन बैल विकून आला.सावकाराकडून काही पैसे,बैलाचे काही आणि इकडून तिकडून दहा-वीस असा मेळ बसवला.पाहुण्यांना सावकाराहाती पैसा व निरोप धाडला.लाल्या-छबिल्या विकल्यापासून रामराव पूरा खचून गेला होता.
        शेतकर्‍यांच्या जीवनाचा खरा सोबती कुणी असेल तर तो म्हणजे त्याची बैलं आणि ते गेल्यावर खानदानी शेतकऱ्याला किती दुःख होते, हे शब्दात सांगता येणार नाही.शेतकऱ्याजवळ बैल नसतील तर त्याचा चौरंग झाल्यासारखे होते.कुणबीक करता येत नाही.ह्या धास्तीनेच रामरावने हाय खाल्ली,नि आपले आता सर्व संपले,असे त्याचे मन त्याला छळू लागले.जणू तो अपमानाच्या अथांग सागरात बुडालाय आणि बुडतचं चाललाय.
          एका रात्री जेवण झाल्यावर रामरावने बाहेरून येतो असे सांगून जांभळीच्या मळ्याचा रस्ता धरला.लाल्या-छबिल्याच्या आठवणीच्या विचार सागरात तो पुरता न्हाऊन निघाला होता.ज्या जागेवर जांभळीच्या झाडाखाली रोज तो लाल्या-छबिल्याला बांधायचा तेथे जाऊन विसावला.
      सकाळी धनी कुठं दिसना म्हणून यशोदाने एकनाथला रानात गेले की काय पाहून ये,असे सांगितले.पोराचं लगीन ठरलयं अनं धनी काय वेड्यागत हिंडतया असे म्हणत यशोदा कामाला लागली.एकनाथ जांभळीच्या मळ्यात पोहोचला अन पाहतो तर जांभळीच्या झाडाखाली बापाचा निष्प्राण देह पडलेला,तोंडाला फेस आलेला.रामरावने आपली जीवन यात्रा केव्हाच संपवली होती.एकनाथने जीवाच्या आकांताने टाहो फोडला. सर्व गाव जमा झाले.धन्याचा गतप्राण झालेला देह यशोदाने पाहिला आणि जोराचा हंबरडा फोडला;धनी...मात्र आता ही आर्त हाक ऐकू न येण्यासाठी रामरावने आपले कान केव्हाच बंद केले होते.अग्नीडाग देऊन सर्वजण घरी परतले.दहावा तेरावा होऊन सव्वा महिना पालटला,आता नवरा तर गेलाच आहे,पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या विचाराने शेवटचा आधार एकनाथ,त्याचे हात पिवळे करावे आणि कर्तव्यातून मुक्त व्हावे;असे यशोदाने ठरवले.
          लग्नाची तयारी जोरात सुरू झाली.लग्नाचा दिवस उजाडला,वऱ्हाडी मंडळी शेजारच्या गावात पोहचली.सूर्य आग ओकू लागला.लग्नघटिका जवळ येऊ लागली.सनई-चौघडे गुमू लागली.तितक्यात मुलीच्या बापाने लग्नखर्चाची यादी पुढे केली.हा पैसा दिल्यावर लग्न लावून देऊ असे लालची बोल बोलू लागला.पैसा गेला व बापही गेला या विचाराने एकनाथ सुन्न झाला.गावातील समजदार मंडळींनी पुढाकार घेतला व वधूपित्याची समजूत घातली.अहो बाप गेलाय मुलाचा,असा अचानक कोठून पैसा आणणार तूम्हाला देण्यासाठी,अगोदरच दोन लाखासाठी जीव खर्ची घातला त्याच्या बापानं,ह्याची थोडी जाण ठेवा आणि भटजी बुवांना द्या परवानगी,होऊ द्या आता,शुभमंगल सावधान.........
                  लेखक,
        श्री.अजिनाथ सासवडे(सर)
          मु.पो.लोणी(स.)आष्टी
            मो.९४२१३३६०५९

Tuesday, February 11, 2020

फारकत

         "फारकत"

(🖕 येथे टच करुन,वाचनाचा छंद जोपासा.)

           संसार म्हटलं की,त्यात सर्वकाही.सुख दुःखाच्या लाटा संसार रुपी समुद्रात नित्याने येत असतात आणि त्यांना पती-पत्नीने धैर्याने सामोरे जायचं असतं,ज्यांना हे जमलं त्यांचे संसार पैलतीरास गेले,ज्यांना नाही जमलं,त्यांनी फारकतीसारखा मार्ग पत्करून आपला संसार धुळीस मिळवला.अशाच एका जोडप्याची ही करून कहाणी"फारकत"या नाटीकामय लेखात उतरवली आहे.ती मांडताना सुखापेक्षा दुःखच जास्त होत आहे,कारण आधुनिक समाजात फारकत घेणे म्हणजे अगदी पोरखेळ झाला आहे.अगदी शुल्लक कारणावरूनही नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन फारकती सारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत.परंतु त्याचा परिणाम दोन व्यक्तीवर किंवा दोन कुटुंबावरच नव्हे,तर सर्व समाजावर होत आहे.याचा आधुनिक पिढीने अनेकदा विचार करून पुढचे पाऊल उचलावे.पती-पत्नी दोघांच्या ताटातुटीने मुलाबाळांची होत असलेली हेळसांड नक्कीच हृदयाला पीळ पाडणारी आहे.

              जोशी गुरुजी व जोशी बाई यांची लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी वनिता हीचा विवाह एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कंपनी कामगार मोहन या युवकाशी होतो.सासरी गेल्यावर लाडाने वाढलेल्या वनिताच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट होईलच,ही माहेरच्यांची अपेक्षा फोल ठरताना दिसत होती.त्याचवेळी जवळ असलेली पैशाची ऊब,जोशी सर व बाई यांना शांत बसू देत नव्हती.

(मोहन-वनिताचा संसार अगदी सुरळीत चाललेला.सुखदुःखाच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी संसार रुपी चादर चांगलीच विणली जात होती.मोहन नियमित कंपनीत जात असे आणि कंपनीतून थकून आल्यानंतर वनिताही आस्थेने चौकशी करत.असा त्यांचा संसार गोडीगुलाबीने चालू होता.परंतु जोशी बाईच्या नाक खुपसण्याने मोहन व वनिताच्या संसारात मिठाचा खडा पडला.)

मोहन: वनिता...अग माझे बूट कुठे ठेवलेत कंपनीत जायला उशीर होतोय,आन पटकन,तुला कितीवेळा सांगितलं,की सकाळी सकाळी घाई असते,बूट,कपडे जिथल्या तिथे ठेवत जा,पण तुझ्यात मात्र काही बदल नाही.

वनिता: हे घ्या...कशाला आरडाओरड करताय,तुम्हाला पाहता येत नाही का?चांगले डोळे आहेत की मोठ मोठे.

मोहन: सकाळी-सकाळी दिवसाची सुरुवात खराब करू नकोस.

वनिता: बरं बरं…..(असे म्हणून नाक तोंड मुरडत स्वयंपाक घरात निघून जाते.)

(मोहन घाईगडबडीने बूट घालून आपल्या कामाला जातो.पण मनात विचार करत होता,दिवसभर राब राब कंपनीत राबायचं आणि सकाळी संध्याकाळी घरी सुख मिळल,या आशेवर राहायचं तर ईथही कटकट.घरात वनिताच्या डोक्यातही विचारांचं काहूर,काय नुसती रोज बडबड,हे नाही केलं?ते नाही दिलं?मी काय मोलकरिन आहे का?फक्त यांची सेवा करायला.दिवसभर पोराचं काम,अन सकाळ संध्याकाळ यांची बडबड,मला पण स्वतःच काही जीवन आहे की नाही?दोघेही दिवसभर मनोमन एकमेकांचे उणेदुणे काढत असतात.तोच विचार त्यांच्या मनात दिवसभर गिरक्या घेत राहतो.सायंकाळी कंपनी सुटल्यावर मोहन घरी येतो,अन् पाहतो तर घरात सर्वत्र अस्तव्यस्त पडलेले कपडे,सगळीकडे अस्वच्छता.निमूटपणे संध्याकाळचे जेवण करतो आणि झोपी जातो.असे रोजच चालू राहते.दोघेही एकमेकांशी धड नीट बोलत नाहीत.की प्रेमाने विचारपूस करत नाहीत.)

मोहन: वनिता आज रविवारची सुट्टी आहे.कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आपण.तेवढाच थोडासा विरंगुळा.

वनिता: नको,माझ्यामागे भरपूर कामं आहेत,तुम्ही जा आपले एकटे.

मोहन: बऱ्याच दिवसापासून पाहतोय मी,तुझं चित्त काही थाऱ्यावर नाही.ही भाजी नको करू म्हटलं तर तीच करणार.काही सांगितलं तर फक्त ऐकून घेणार,करणार मात्र काहीच नाही.काय चाललय तुझ्या मनात,ते तरी सांग.आपण दोघे इथं बाहेर शहरात राहतोय.एकमेकांची काळजी घेतली पाहिजे.ते तर बाजूलाच,तू साधी बोलायलाही तयार नाही.

वनिता: काय बोलायचं,तुम्हाला बायको नको फक्त काम करणारी कामवाली पाहिजे होती,तर लग्नच कशाला केलं?मी सगळं काम निपटायचं,कधी प्रेमाचं बोलणं नाही,की कुठे बाहेर फिरायला नाही.फक्त आणि फक्त ह्या घरात गाडून घ्यायचं.आपलंच मेलीचं नशीब फुटकं,काय कुणाला बोलण्यात अर्थ आहे.

मोहन: म्हणजे तुला काय म्हणायचं,मी तुझ्यासाठी काय करत नाही? हे सगळं कुणासाठी चाललंय?आपला पृथ्वी आणि तू,तुम्हा दोघांसाठी तर सर्व काही करतो आहे.



वनिता: हो कळलं,तुम्ही किती करता आमच्यासाठी.

(असेच बरेच दिवस दोघांचेही मनं धूसपुसत राहतात.कुणी कुणाशी नीटपणे बोलत नाही.घराला घरपण राहत नाही. दोघांनाही एकमेकाबद्दल प्रेमाऐवजी तिरस्कार वाटू लागतो.एके दिवशी वनिता आपल्या आईला फोन लावून सर्व हकीकत सांगू लागते.)


वनिता:(आईला फोन लावते) हॅलो,आई मी वनिता बोलते.

जोशी बाई: वनिता बोल काय म्हणतेस? मोहनची कंपनी काय म्हणते?पृथ्वी कसा आहे?

वनिता: अग काय सांगू तुला, लग्नाच्या वेळी तू तर म्हटली मोहन फार चांगला मुलगा आहे.तुझं नशीब उघडलं वनिता.कसलं आलंय नशीब.मोहन रोज नुसता बडबड करत असतो,बांबूतल्या भुंग्यासारखा आवाज चालूच.लग्नापासून काय काय आणि किती सहन केले ते माझ्या जीवाला माहित.घरी आला की कधी शांत बसत नाही.ते नाही केलं,हे नाही केलं?असं केलं?तसं का केलं?आई मी फार वैतागून गेले बघ,यांच्या कटकटीला.एक दिवस मी माझ्या जीवाचं काही तरी करीन,तेव्हाच मला शांती मिळेल असं वाटतंय.

जोशी बाई: हे बघ वनिता लई टेन्शन घेऊ नको,आम्ही आहोत तोपर्यंत तू बिंदास राहा.तुला जे काही कमी पडेल ते आम्हाला मागत जा,आमच्या दोघांचा लाखभर पगार येतो घरात.सुट्टीच्या दिवशी आम्ही येतो तुझ्याकडे,मग चांगलीच मोहनची कानउघडणी करू.समजतो काय स्वतःला.बरं आता मी शाळेत निघाली आहे,आपण नंतर बोलु,ओके बाय.

(एके दिवशी रविवार गाठून जोशी सर व बाई दोघेही वनिताकडे येतात.मोहन व वनिता दोघांनाही सर्व हकीकत विचारतात.)

वनिता: अग आई,हे माझ्याकडून फक्त काम करून घेतात.जसे यांनी पत्नी नाहीतर कामवाली म्हणून आनलय या घरात.

मोहन:(चांगलेच खडे बोल सुनावतो)अहो हिला पत्नीचे कर्तव्य सुद्धा समजत नाहीत,नवऱ्यासाठी काय केलं पाहिजे,काय करू नये.कसंही वागायचं.मान,मर्यादा सर्व वेशीला टांगायचं,हे असं चालतं का तुमच्याकडे,सासुबाई.

जोशी सर: हे पहा नवरा-बायको म्हटल्यानंतर किरकोळ वाद-विवाद चालूच असतात.जखम झाल्यावर तिला वाढू न देता त्यावर वेळीच फुंकर घातली तर ती लवकर बरी होते.त्या जखमेवर तुम्ही सारखे घाव घालत राहिलात,तर जखम मोठी होऊन कधीकधी जखम झालेला अवयव काढून टाकावा लागतो. त्यासाठी प्रत्येक गोष्टीत खबरदारी घेणे गरजेचे आहे.कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त झाली तर नक्कीच त्याचा वेगळा परिणाम जाणवतो.

जोशी बाई: अहो बास करा,मोहनरावांना ती गोष्ट कळायला नको का?

मोहन: म्हणजे मीच सगळं समजून घ्यायचं, वा धन्य आहात आपण व आपली मुलगी.

जोशी बाई: ते काहीही सांगू नका,घरकाम करण्यासाठी एखादी कामवाली लावा,तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही पाठवून देऊ,पण हे असलं खपवून घेतलं जाणार नाही.

मोहन: तुमच्या असल्या वागण्या-बोलण्याने,तर तिला चांगलीच फुस मिळते.बोला बोला म्हणजे चांगली माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटील रोज.

वनिता: पाहिलं ना आई-बाबा, हे असं यांच रोजच चालू असतं. एवढ्या दिवस मी सहन केलं,पण आता मला सहन होत नाही.

जोशी बाई: जाऊदे सगळं चुलीत,चल तुझी बॅग भर,आमच्याकडेच राहा,यांना खाऊदे हाताने तुकडे करून,त्याशिवाय काही वठणीवर येणार नाहीत.

मोहन: (रागात)हो जा जा.

(वाद अगदीच विकोपाला जातो,वनिता आई-बाबांबरोबर माहेरी येते.दिवसांमागून दिवस लोटले जातात,पण दोघांचाही एकमेकांना कुठला फोन नाही,की काही बोलणे नाही.जोशी बाई व सर हे फार रागातच असतात.दोन-तीन महिने लोटल्यानंतर जोशी बाई म्हणतात पाहिलं का त्याला तुझी गरज नाही राहिली.नाहीतर आला असता नाक घासत आपल्याकडे.जोशी बाई एका वकिलामार्फत मोहनला नोटीस पाठवतात,आमच्या मुलीला तुमच्या बरोबर संसार करताना खूप अत्याचार सहन करावा लागतो.तिची खूप पिळवणूक केली जाते.आणि तसे पाहता तुम्हाला तिची आता गरजही राहिलेली दिसत नाही.आपल्या असल्या वागण्याला कंटाळून तिने तुमच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे,त्याकरिता हा अर्ज पाठवला आहे.त्यावर सही करून तिला आपली परवानगी द्या.मोहन त्याचे आई-वडील सर्वजण त्यांची समजूत घालायला येतात,विनवणी करतात,पण सर्व गोष्टी अपयशी ठरतात.भांडण न्यायालयात जाते.न्यायालयही प्रथम दर्शनी त्यांना एकत्र राहावे,अशी विनंती करते.मात्र वनिताच्या आई-वडिलांचा पैसा त्यांना शांत बसू देत नाही.त्यांना वाटतं आमच्याकडे काय कमी आहे,आम्ही आमच्या लेकीचा व नातवाचा सांभाळ चांगल्याप्रकारे करू शकतो.शेवटी न्यायालयाकडून त्यांच्या जिद्दीपाई दोघांना वेगळे केले जाते,त्यांची फारकत होते.पृथ्वी लहान असल्यामुळे त्याला त्याच्या आईकडेच ठेवण्यात येते.लग्नामध्ये ज्या वस्तू दिल्या होत्या,त्या सर्व वनिताने माहेरी आणल्या तरी चालतील,हे स्पष्टपणे सांगितले जातो.वनिता व तिची आई टेम्पो घेऊन पसारा आणण्यासाठी जातात.टेम्पो दारापुढे उभा करतात.सोबत हमालही आणलेला असतो.)

जोशी बाई: (दारापुढे उभ्या राहून दरवाजा वाजवतात.) कोण आहे का घरात?

मोहन: हा कोण? सासुबाई.

जोशी बाई:(मोहनकडे रागाने पाहत)सासुबाई म्हणण्याचा अधिकार तुम्ही केव्हाच गमावून बसलात.आम्ही सामान नेण्यासाठी आलो आहोत.लग्नामध्ये दिलेले आणि वनिताचे जे काही असेल ते आम्ही घेऊन जाणार आहोत.

मोहन: घर उघडेच आहे,जे न्यायचं असेल ते घेऊन जा.

(जोशी बाई एकेक वस्तू घेऊ लागतात.वनिताचा मात्र हात धजावेना,जे दोघांनी एकत्र उभं केलंय,ते आता एकटीने घेऊन जायचं,या विचारानं ती कासावीस झाली.घरात आल्याबरोबर सहा महिन्यांपूर्वीच्या तिच्या सर्व जिवंत आठवणींना उधान आलं.मन गहिवरलं,गेल्या तीन-चार वर्षात दोघांनी मिळून संसारात जे काही जमवलं होतं,आता त्या सगळ्या एकत्र गोष्टी वेगळ्या होणार,या विचारानं तिच्या नयनांना प्रेमधारा लागल्या होत्या.तिघांचा एकत्र काढलेला फोटो टीव्ही वर ठेवलेला पाहिल्यावर तिला कळाले,की बाकी सगळ्या घरात जळमटं झालीत,पण फोटो मात्र स्वच्छ पूसून ठेवलेला दिसत होता.वनिता हे सर्व पहात होती.किती पहावे आणि किती डोळ्यात साठवावे,याचा मोह तिला आवरता येईना.तितक्यात जोशी बाई वनिताला आवाज देतात.)


जोशी बाई: अगं काय करतेस,मी तीन-चार वस्तू खाली नेऊन दिल्या आणि तू आणखी तिकडेच उभी आहेस.

वनिता: हो आले,सामान काढत होते.

(पुन्हा ती आपल्या विचारात मग्न झाली.का कुणास ठाऊक पण तिचे मन तिला आता सांगत होते.वनिता तू फार मोठी चूक केली आहेस.आयुष्यात प्रेमाच्या माणसाचा सहवास गमावला आहेस.अगं जीवन हे कष्टमयच असतं.पण त्याच्यात रंग भरायला प्रेमाची माणसं नसतील,तर त्या निरंक जीवनाला तरी काय अर्थ आहे.अचानक तिची नजर मोहनकडे गेली,सहा महिन्यापूर्वीचा सशक्त मोहन आज अशक्त झालेला तिला जाणवला.मागच्या दिवाळीला माझ्या हट्टाखातर मोहन व मी नवीन एलसीडी टीव्ही घेऊन आलो होतो.पैसे कमी होते,तर मोहनने स्वतःची अंगठी बँकेत तारण म्हणून ठेवली होती.दोघं सोबत गेलो आणि माझ्या पसंतीचाच टीव्ही खरेदी केला होता.टीव्हीचा रिमोट सदैव माझ्याजवळ असायचा.पण आज टीव्ही आणि रिमोट दोघेही धूळखात पडले आहेत.माझ्याकडे रागाने पाहत जणू मला बोलतच होते.अग किती दिवस साथ दिली आम्ही तुम्हाला,दोघांनी मिळून आम्हाला घरात आणलं आणि आज मोहनपाशी आम्हाला एकटं सोडून चाललीस.किती स्वार्थी आहेस,काय तर फक्त कष्टापाई.अगं आम्ही निर्जीव वस्तूसुद्धा कधी कुणाला सोडून देत नाहीत.म्हणे माणसं भावनिक, संवेदनशील असतात,मग मानव आसूनसुद्धा तू अशी भावनाशून्य कशी झालीस,हेही आम्हाला कळेना.एवढा चांगला घरसंसार बसलेला क्षणात तू होत्याचं नव्हतं केलं,काय मिळवलं आयुष्यात हे सर्व करून'सुख'..!अगं सुख हे,स्वतः कमावून दुसर्‍याला घास भरवण्यात आहे.दुसऱ्यासाठी खूप काही करणं यातच फार मोठा आनंद असतो आणि तो आनंद,समाधान यापासून तू खऱ्या अर्थाने आज पोरकी झालीस‌.कुठल्याही समारंभाला एकत्रितपणे गेले तर त्यातच खरा मोठेपणा आणि समाधान आहे.तेथे अंगावर भरमसाठ अलंकार जरी घालून गेलीस,तरी शेवटी एकटेपणाचे दुःख सोबत असणार.जीवनात जोडीदार नसण्याची किंमत त्यावेळेस कळेल.स्त्रीच्या आयुष्यातला खरा अलंकार तर तिचा पती असतो.तो आज तू गमावला आहेस.
       अचानक मोहनची नजर वनिताकडे गेली.दोघांनी एकमेकांकडे पाहिले.क्षणात त्यांचे डोळे प्रेमाची भाषा बोलू लागले.डोळ्यांनी एकमेकांना हळुवारपणे आलिंगन दिले होते. त्यांच्या जीवनातील पूर्वीच्या आठवणींना डोळे उजाळा देऊ लागले.तीन-चार वर्षाच्या प्रवासातल्या किती किती नव्हे त्या आठवणी आज जिवंत झाल्या होत्या.डोळ्याद्वारे वनिताचे मन केव्हाच मोहनच्या मिठीत गेले होते.कित्येक वेळा एकमेकांचा हात प्रेमाने हातात घेऊन सुखदुःखाच्या गुजगोष्टी केल्या होत्या.एकमेकांच्या साथीने कैक संकटांना निधड्या छातीने सामोरे जाण्याचे बळ मिळत होते. 
           जीवनरुपी समुद्रात वाहत जाणाऱ्या दोन ओंडक्यांनी काही काळासाठी एकमेकांना साथ दिली,पण आज अचानक फारकत नावाच्या तुंबळ लाटेनं जेव्हा ते वेगळे होत होते,तेव्हा एकमेकांकडे आसुसल्या नजरेनं व्याकूळ होऊन पाहत होती.की आता आपली भेट पुन्हा कधी?हे आता कुणाला माहीत?लग्नाच्या सात जन्माच्या फेऱ्यांनी एकत्र बांधलेल्या दोन जीवांना काही वर्षातच वेगळं केलं होतं.मोहनचे डोळे वनिताच्या डोळ्याशी अधीरतेने बोलत होते,नको जाऊ सोडून हा सर्व संसार,नको करू हेळसांड त्या चिमुकल्या जीवाची.

जोशी बाई: अगं वनिता, चल खुप उशीर झालाय…

वनिता:(डोळे पुसत) हो…..

(वनिताचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.आपण फार मोठी चूक केल्याचे दुःख तिला जाणवत होते.जड अंतःकरणाने दरवाजातून बाहेर निघत असताना,बाजूलाच बसलेल्या मोहनच्या खुर्चीला वनिताचा पदर अडकला.कदाचित तो सांगत होता,की माझी गाठ याच्याशीच बांधलेली आहे,नको ती जबरदस्तीने तोडायचा प्रयत्न करू.फारकत नावाच्या लाटेनं जरी आज त्यांना वेगळं केलं असलं,तरी मनाने मात्र ते वेगळे होऊच शकले नाहीत,कायमचे एकच राहिले....)


              लेखक,
       श्री.अजिनाथ सासवडे (सर)
        मु.पो.लोणी(स),आष्टी
        मो.९४२१३३६०५९
        

Wednesday, February 5, 2020

माझा महाराष्ट्र महान

"माझा महाराष्ट्र महान"


       मराठी मायबोली असलेला शूरवीर मावळ्यांचा प्रांत म्हणजेच आपला महाराष्ट्र.महाराष्ट्राची अगदी प्राचीन काळापासून पराक्रमी लोकांचा वारसा लाभलेला प्रदेश म्हणून ख्याती आहेत.दऱ्याखोऱ्यातील मावळ मातीतील उमद्या मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक या मातीवर झाला,तेव्हा कुठे ही भूमी गुलामीतून मुक्त झालेली आहे.महाराष्ट्राची भूमी संतांचे थोर कार्य आणि विवेकी विचाराने पवित्र झालेली भूमी आहे.संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत गाडगे महाराज,संत एकनाथ महाराज,संत जनाबाई ह्या थोर संतांच्या विचार व वाणीने महाराष्ट्राला पवित्र आणि मंगल केले आहे.हिंदू,मुस्लिम,सिख,इसाई अशा विविध धर्माचे आणि अठरापगड जातीचे लोक आज या ठिकाणी गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.अशा प्रकारे विविधतेतील एकता या ठिकाणी पहावयास मिळते.
            छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांसारखे महापुरुष या महाराष्ट्र देशांमध्ये धर्म रक्षणार्थ तथा धरणी मातेच्या उद्धारासाठी जन्मास आले.जगावे कसे हे शिवरायांनी जगाला आपल्या आचरणातून दाखवून दिले,तर मरावे कसे हे संभाजीराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.कैक परकीय सत्तांनी या महाराष्ट्रावर अत्याचार केला,पण त्याचा बीमोड करण्यासाठी येथे थोर महापुरुषांनी जन्म घेतला.इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच,डच तसेच मोगल,कुतुबशाही,आदिलशाही या सर्वच सत्तांनी महाराष्ट्राला अजगरासमान गिळंकृत करू पाहिले.पण गरुडाप्रमाणे उत्तुंग भरारी घेणारा हा महाराष्ट्र,कधी कुण्या परकीय आजगररूपी सत्तेपुढे नमला नाही,उलट त्यालाच आपल्या पंजात पकडून त्याचे नामोनिशान मिटवणारे शूरवीर या मातीत निपजले.महाराष्ट्र हा कणखर मनाच्या आणि निधड्या छातीच्या शूरवीर मावळ्यांचा.सुवर्ण अक्षरात ज्यांचा इतिहास लिहून ठेवावा अशी माणसे या मातीत जन्माला आली आणि मातीसाठी लढता लढता त्यांनी वीरमरण पत्करले.कितीही अन्याय,अत्याचार झाले तरी सर्व अत्याचारांना मोडीत काढणारा महाराष्ट्र नक्कीच अभिमानाने आज उभा आहे.
            शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचे या मातीत बीजारोपण झालेले आहे आणि आज त्याच विचारांचा वटवृक्ष अभिमानाने ताठ उभा आहे.मराठी मातीतल्या प्रत्येक माणसाच्या मनात शिवविचारांचा जागर रोजच होत असतो. महाराष्ट्रातील प्रगल्भ विचारांचा वसा लाभलेला माणूस अन्यायापुढे कधी झुकला नाही,की कुणापुढे नमला नाही.तो वंदन करतो फक्त धरणीमातेला आणि भगव्याला.
         महाराष्ट्राला विविध थोर कवी,लेखक,साहित्यिक यांचा वारसा पूर्वापार लाभलेला आहे आणि त्यांच्या सडेतोड लेखनीने दीनदुबळ्या,तळागाळात खितपत पडलेल्या समाजाचा उद्धार होऊन तो आज विकासाच्या मार्गावर रूढ झाला आहे.समाजाच्या विकास प्रक्रियेत या लोकांनी मोलाची पायाभरणी केली आहे.
       स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच मातीत जन्म घेतला आणि अखंड देशातील स्त्रीयांना शिक्षणाची गंगा खुली केली.शिक्षणाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्त कधी कुणापुढे नतमस्तक होत नाही,हे महात्मा फुले यांनी ठणकावून सांगितले.आज याच महाराष्ट्राची संपूर्ण देशातच नव्हे नव्हे तर विश्वात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख आहे.संपूर्ण जगातून आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात.संगणक क्षेत्रात घडून आलेली क्रांती याच महाराष्ट्रातील विजय भटकर नावाच्या युवकानी घडवून आणली.
       संपूर्ण देशात सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,औद्योगिक सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर पाऊल टाकत आले आहे.उद्योगधंदे,व्यवसाय,शेती,शिक्षण,माहिती तंत्रज्ञान,विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध तज्ञांनी देशासाठी मोलाची कामगिरी केली आहे.पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र नक्कीच आज देशाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो.मुंबईसारखे जागतिक उंचीचे शहर महाराष्ट्रात खुमासदारपणे उभे आहे.भारत देशाचे प्रवेशद्वार'गेटवे ऑफ इंडिया'महाराष्ट्रातच आहे.भारताची आर्थिक राजधानी अर्थातच मुंबई महाराष्ट्रात आहे.देशातले जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून दिल्लीनंतर आज मुंबईच नावारूपाला येऊ पाहत आहे.
          महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरडोई अन्नधान्य उत्पादन निश्चितच जास्त आहे.शेती क्षेत्रातही हरितक्रांतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून मराठी माणसाने भरपूर प्रगती केली आहे.जगातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अन्नधान्य,फळे,भाजीपाला इत्यादी उत्पन्न निर्यात होत आहे.फुलशेती,फळशेती ही तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नगदी रक्कम तयार करून देणारी आहे.दुग्धव्यवसायात धवलक्रांती होऊन दूध उत्पादनात भरमसाट वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.
          शिक्षण क्षेत्रातही महाराष्ट्र वरच्या स्थानावर आहे.आज सक्तीच्या शिक्षणामुळे तळागाळातील दीनदुबळ्या लोकांनाही शिक्षण मिळू लागले आहे आणि या सर्व शिक्षणाच्या चमत्कारामुळे महाराष्ट्र प्रगतीच्या द्रुतगती मार्गावर विराजमान आहे.आज शिक्षण घेऊन आपलीच महाराष्ट्रातील मुलं बाहेरच्या देशात चांगल्या प्रकारचे काम करून नावलौकिक मिळवत आहेत.
       महाराष्ट्रातील देहू,आळंदी हे आज अध्यात्माचे विद्यापीठ म्हणून ओळखले जातात.महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून अध्यात्माचे धडे गिरवण्यासाठी अध्यात्मप्रेमींची आज देहू,आळंदीमध्ये रेलचेल दिसून येते.तुळजापूर,पंढरपूर,कोल्हापूर,त्र्यंबकेश्वर,पैठण,देहू,आळंदी,माहुरगड,सप्तशृंगी अशी सगळी मराठी माणसांची कुलदैवतं येथे एकवटलेली आहेत.लोकनाट्य,तमाशा,कोळीगीत,पोवाडे,भजन,कीर्तन अशा विविध पारंपारिक लोककला महाराष्ट्रात आजही जीवंत आहेत.महाराष्ट्रातील जनतेचा पेहराव हा अतिशय रुबाबदारपणाचा आहे.महाराष्ट्रातील माणसं ही डोंगरदऱ्यात,कडेकपाऱ्यात राहणारी अगदी दगडासारखी कणखर आहेत.एकमेकांबरोबर रोज भांडतील पण संकट आल्यावर मात्र एकमेकांना मदतीचा हात द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत,हीच खरी मराठी माणसं आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हटलं,म्हणजे विश्वासाचे प्रतीक.मराठी माणूस म्हटलं की शौर्याची निशानकाठी हाती घेतलेला.कुठल्याही क्षेत्रात पराक्रम गाजवावा तो याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनं.संरक्षण दलामध्ये तर महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी मराठाबटालियन सुद्धा उभी केलेली आहे.याचा अर्थ महाराष्ट्रातील माणूस शूरवीर,पराक्रमी,निडर अशीच त्याची ख्याती संरक्षण क्षेत्रांमध्येही आहे.हसत हसत मरण पत्करीन पण शत्रूला शरण जाणार नाही,की कोणाची लाचारी पत्करणार नाही,हा खरा मराठी माणूस.
        शेती,उद्योगधंदे सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने भरपूर प्रमाणात प्रगती केली आहे.कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे मोठंमोठे उद्योगधंदे आज महाराष्ट्रामध्ये उभारले आहेत.त्याद्वारे कित्येक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाचे स्थिरीकरण झाले आहे.मोठंमोठ्या नद्यांवर बांधलेल्या धरणामुळे शेतीसाठी तसेच कारखान्यासाठी पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.पाण्यावरच विद्युत निर्मितीमुळे विजेचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.
           आज महाराष्ट्रातील महिलाही सर्वच क्षेत्रात पुढे सरसावल्या आहेत.विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला दिसत आहे.विविध प्रकारचे उद्योगधंदे असतील,संरक्षण दल असेल,किंवा परिवहन मंडळ असो सर्व क्षेत्रात महिला आज आपले कार्य नेटाने पुढे चालवत आहेत.खाजगी क्षेत्र असो वा सरकारी,महिला आज आपलं अमूल्य असे योगदान देताना दिसत आहेत.राजमाता जिजाऊ भोसले,अहिल्यादेवी होळकर,सावित्रीबाई फुले,सिंधुताई सपकाळ,प्रतिभाताई पाटील अशा थोर स्त्रिया याच महाराष्ट्रात जन्मास आल्या.महाराष्ट्राचे नाव त्या आकाशाच्या उंचीला भिडावे इथपर्यंत घेऊन गेल्या.अशा सर्व गोष्टीत सुजलाम-सुफलाम,प्रगती पथावर रूढ असलेल्या महाराष्ट्राने,देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपले नावलौकिक मिळवले आहे.म्हणूनच अभिमानाने महाराष्ट्र भूमीला म्हणावेसे वाटते,"वंदे मातरम्,वंदे मातरम्"..!


                लेखक,
         श्री.अजिनाथ सासवडे (सर)
          मु.पो.लोणी(स),आष्टी
          मो.९४२१३३६०५९.

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...