"जीवन"
🖕येथे टच करू नका.)
जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचा कालखंड ढोबळमानाने आपण जीवन म्हणून ओळखतो.प्रत्येकाची जीवनाची परिभाषा वेगवेगळी असते.सौख्य प्राप्तीसाठी प्रत्येकजण कसोशीने प्रयत्न करत असतो.जीवन प्रवासात प्रत्येकाला चढउताराचा अनुभव येत असतो.कधी कुणाला सुरुवातीच्या काळात काही गोष्टी सहजच प्राप्त होतात,तर कुणाला उतरत्या काळात जीवन सुखासाठी नियतीशी झगडावे लागते.जेवताना सुरुवातीच्या घासाला खडा लागावा आणि मग इतर घासही भीत भीत घ्यावे अशीच काही अवस्था जीवनामध्ये होते.काळ वाईट असो अगर चांगला,पण प्रत्येक परिस्थितीत कणखरपणा अंगी बाळगणे निश्चितच हितकारक ठरते.कामापुरते मामा भरपूर असतात परंतु,प्रत्येकालाच आपल्या जीवन प्रवासात नातलग,मित्र तथा स्वकीयांची साथ मिळेलच याविषयी खात्री देता येत नाही. किंबहुना स्वत:च्या जीवनाची साथ आपल्याला किती काळासाठी आहे,हे ही कुणी निश्चितपणे सांगू शकत नाही.जीवन फुलपाखरासारखे हाती आलेलं क्षणात हुलकावणी देऊन जाते.
प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचा अंश आहे,त्यामुळे आपला काय नि परका काय यामध्ये भेदाभेद मुळीच नसावा.सर्वांमध्येच चांगल्या वाईट गुणांचे मिश्रण असते.आपण बोलताना सहजच कधीकधी बोलतो की,"कातडं एक असून चालत नाही,तर आतडंही एक असावं लागतं",पण या गोष्टी आज दुरापास्थ झालेल्या दिसून येत आहेत,कारण रक्ताच्या नात्यातील कधी परके होतात,तर कधी परकेही मनात घर करून जातात.हा सर्व निसर्गनिर्मित नव्हेतर मानवनिर्मित खेळ अनेकांच्या आयुष्यात चालूच असतो.जीवनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा होऊन गेला आहे.जीवन म्हणजे कुणासाठी आनंदाचे डोही आनंद तरंग,तर कुणासाठी जीवन म्हणजे दुःखाची सरिता,तहान भागवायला जातो आणि आजार पदरी येतो.परमेश्वराने दिलेल्या जीवनाचा सदसदविवेक बुद्धीने आपण किती सुयोग्य वापर करायचा किंवा ते धुळीस मिळवायचे,हे प्रत्येकाला जीवनात लाभलेली संगत,त्यानी वाचलेली पुस्तके,त्याचे विचार,आचार व संस्कार या सर्वांची सांगड तो किती यथायोग्य घालतो यावरूनच ठरत असते.
परमेश्वराने दिलेल्या आयुष्यात सत्संगत,सद्विचार आणि समाजव्यवस्थेचा कणा असलेली माणुसकी,तसेच परस्परांबद्दल असलेला स्नेहभाव,आपुलकी यामध्ये वृद्धी करणे,हाच जीवनाचा प्राधान्य विचार असावा.जीवनात सदाचार आणि सदविचारांना खूप महत्त्व आहे,त्यांचा अंगीकार होणे महत्त्वाचे,नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला,अशी फसगत होऊन जाते.त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.विवेकाची कास धरून सन्मार्गाने चालणाऱ्यास सुरुवातीच्या काळात जरी जीवन त्रासदायक वाटत असले,तरी अंतिमतः ते नक्कीच सुखावह ठरते.उलटपर्ती दुष्ट,छल,कपट हे मार्ग सुरुवातीच्या काळात जरी मोहक दिसत असले,तरी ते अंतिम काळात मृगजळासारखे ठरतात.आपल्या हाती कधीच येत नाहीत.
जीवनात नाव असे कमवा की,घेताक्षणी काम झाले पाहिजे किंवा काम तरी असे करा,की कुणाच्या ओळखीची गरजच पडली नाही पाहिजे.मनुष्याला जीवनात काय हवं आहे,ह्याचंच कोड ज्याला त्याला उलगडलेलं नाही.पैसा मिळवायला जातो,तर प्रेमाला पोरका होतो,अन् प्रेम मिळवतो तर पैसा दुरावतो.कधीकधी दोन्ही मिळवतो अन् मानसन्मान,प्रतिष्ठेसाठी झटू लागतो व समाधान गमावून बसतो.पैशाने ज्ञान कुणी वाढवू शकत नाही,पण निश्चितच ज्ञानाने पैसा वाढवू शकतो किंवा कमावलेल्या पैशाचा सदुपयोग करू शकतो.जीवनात तुम्ही किती पैसा कमावता, यापेक्षा त्याचा वापर कशा पद्धतीने करता,हे जास्त महत्त्वाचे आहे.
नियोजन जीवनाचा मुख्य पैलू आहे,कारण त्याशिवाय जीवनाला दिशा प्राप्त होत नाही,नियोजनाशिवाय कार्य योग्यरीत्या पार पडणे फार कठीण आणि पडलेच तर पैसा,वेळ किंवा इतर काही गोष्टींचे त्याठिकाणी वाताहत झालेली दिसून येते.समुद्रात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे जीवनाला कुठे पोहोचायचे आहे, हेच कळू शकत नाही किंवा मार्ग सापडत नाही. मग ते एखाद्या वादळाच्या भयंकर तडाख्यात सापडून नेस्तनाबूत होते.जवळजवळ जीवन हे कापरासारखे आहे,असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,कारण जसा कापूर उघडा ठेवल्यानंतर काही वेळानंतर संपून जातो,तसेच जीवनात कर्तुत्व केले,किंवा नाही केले,तरीही जीवन हे संपणारच आहे,मग आपण कुटुंब,समाज आणि देश हितासाठी त्याचा वापर का करू नये?सत्कृत्य करून इतरांबरोबर स्वतःचा उद्धार करून घ्यावा.जीवन हे आईस्क्रीमप्रमाणे आहे,टेस्ट करा किंवा नका करू ते वितळून वेस्ट होणारच आहे.
जीवनात स्वहित साधून आपण किती मोठे झालो हे जास्त महत्त्वाचे नसून,आपल्यासोबत किती जणांना घेऊन चाललो आहोत हे महत्त्वाचे.आपल्यामुळे किती जणांचे आयुष्य सन्मार्गी लागले हे महत्त्वाचे.स्वतः चालता चालता इतरांनाही सोबत घेऊन चालणे हा खरा निसर्गनियम अथवा मानवधर्म.निस्वार्थ भाव शिकावा तो प्राण्यांकडूनच,एखाद्या ठिकाणी खाण्यासाठी अन्नपाण्याचा थोडाजरी मागमूस लागला,तरी त्याठिकाणी प्राणी आपल्या सहकाऱ्यांनाही संकेत अथवा आवाजाद्वारे बोलावतात.अपवाद मात्र मनुष्यप्राणी आहे.परमेश्वराची पृथ्वीवरील सर्वोत्तम निर्मिती कुठली असेल तर ती म्हणजे मानव,परंतु मानवाने आज इतर प्राण्यांपेक्षाही स्वार्थ व धूर्तपणामध्ये उच्चांकी पातळी गाठली आहे.जीवनाचा खरा अर्थ स्वार्थात नसून दातृत्वात आहे,या विचाराची आज मानवाला भुरळ पडली आहे.
जीवनात पैसा,संपत्ती सर्वकाही एकटेपणाच्या मोबदल्यात दिलं तर कितीजण होकार देतील आणि किती नकार देतील हे सांगणं फार कठीण.ऐश्वर्या धन-दौलत सर्व काही मुबलक असले तरी जीवनात एकटेपणा फार कठीण,त्यासारखे दुःख दुसरे कुठलेच असू शकत नाही.आधुनिक पण बुरसटलेल्या विचाराने ग्रासलेला समाज जो की पैसा हे सर्वस्व मानून बसला आहे,ते मित्र,दोस्त,नातलगांशिवाय काही दिवस राहीले,तर ते काही दिवसातच सर्वकाही देऊन फक्त आपल्या माणसांच्या सहवासाचीच अपेक्षा करतील.प्रेमाची भूक निर्जीव वस्तूंपेक्षा सजीवच पूर्ण करतात.निर्जीव वस्तूने तात्पुरतं समाधान मिळतं.परंतु जीवनभर समाधान सजीव वस्तूच्या सहवासातच आहे,हे विसरून चालणार नाही."पैसा है तो सब पूछते है कैसा है"ही म्हण समाजाने पुरेपूर आपलीशी केली असली तरी मनःशांती त्यामध्ये नाही.
जीवनात आपल्या आवडीनुसार काम मिळणे खूप महत्त्वाचे,कारण त्यामुळे कामाची गतीच नव्हे,तर जीवनाची दिशाही बदलत जाते.नको असलेल्या कामाने नैराश्याचा पीळ सदैव मनाला रूतत राहतो.जीवन चाकोरीबद्ध नव्हे तर आकारबद्ध असावे.
कलियुगात प्रत्येकजण भुकेलेला आहे तो प्रेमासाठी.पद,पैसा,प्रतिष्ठा ह्या गोष्टी कितीही मिळवल्या तरी शेवटी समाधान नाही,प्रेमाची भूक ही अतृप्तच राहते.प्रेमाने एखाद्याची चौकशी केली,पाठीवरून हात फिरवला,आपलेपणा दाखवला तर,यापेक्षा आणखी समाजाला तरी काय अपेक्षित आहे.पैसा कमवाच,इतरांना फक्त प्रेम द्या,तेच पुष्कळ आहे,आपलेपणा निर्माण करण्यासाठी.पैशाने माणसंजवळ येतील मात्र प्रेमाची असतीलच असे नाही.स्वार्थापोटी जवळ आलेल्या माणसांचे काम झाल्यावर ती नक्कीच आपल्यापासून दुरावतात,परंतु प्रेमाने जवळ आलेल्या माणसांची नाळ सदैव आपल्या हृदयाशी जोडली जाते.निस्वार्थ भावनेतून जोडलेल्या दोन मनांना फक्त एकमेकांचे प्रेम, आधार आणि सहवासाची उभ हवी असते,हेच तर खरे जीवन.
लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे (सर),
मु.पो.लोणी(स),ता.आष्टी,
मो.९४२१३३६०५९
Nice
ReplyDeleteNice
ReplyDelete