Sunday, January 12, 2020

दुष्काळाच्या झळा

मराठी "लेख"संग्रह 👈 येथे टच करू नका.

शेतकऱ्याचा मुलगा म्हणून स्वत्वाच्या आंतरिक शक्तीचे आणि ज्ञानाचे उपयोजन करून "दुष्काळाच्या झळा"या लेखाचा उदय नि छावणी चालकांस झणझणीत अंजन....

"दुष्काळाच्या झळा"

मातीचा टिळा माथ्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या माझ्या शेतकरी राजाला "दुष्काळ" हा शब्द उच्चारला की काळीज पिळवटून टाकल्यासारखं होतं.घोटभर पाण्यासाठी वणवण फिरणारे बायका,माणसं,पोरं अन मुठभर चार्‍यासाठी सारा शिवार पालथा घालणारा कष्टकरी,शेतकरी हे विदारक चित्र दुष्काळ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
        समाजव्यवस्थेच्या आणि देशाच्याही अर्थव्यवस्थेचा मुळ आधार असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनाची ससेहोलपट कुठवर चालणार हे न उलगडलेले कोडेच आहे.दुष्काळात शेतकरी किती घायकुतीला येतो हे सांगताना शब्दांनाही सुकेपणा जाणवतो.गावात लोकांना एक हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल वणवण भटकत राहावे लागते.झोपेतून उठल्यानंतर कुठे पाणी मिळेल हा पहिला प्रश्न तोंडापुढे आ वासून उभा राहतो.सर्वांच्या ध्यानीमनी एकच विचार कुणाच्या विहीरीवर पाणी मिळेल,कुणाच्या बोअरवेलला पाणी आहे.हीच चर्चा रंग धरून असते.अष्टोप्रहर पाणी आणने हाच मोठा उद्योग.काल अंघोळ केली आज करावी की नाही,हाच विचार मनात घोळसा करू लागतो,की नुसतेच ओल्या फडक्याने अंग पुसून घ्यावे या विचाराने मन बेचैन होते.गावात कुठे हातपंप असेल तर तिथे भांड्याच्या लांबच लांब रांगा दिसतात.तेथेही दहा-वीस वेळा हापसल्यावर कुठं चुळकाभर पाणी येतयं.त्यातही पाणी कमी आणि भांडणाला जास्त उभारी हेच चित्र पहावयास मिळते.
      कुणी सायकलवरून,कुणी गाडीवर तर कुणी डोईवर दुरदुर जाऊन पाण्याची आपली तहान भागविण्यासाठी वणवण भटकतात आणि मिळेल ते गढूळ,काळे-निळे जशा रंगाचे मिळेल तसे पाणी घेऊन येतात.व आपला सुकलेला घसा ओला करतात.जनावरांही पचनी पडणार नाही ते पाणी माणसं घटाघटा पितात.काय करणार बिचारी निसर्ग कोपला आणि सरकारही.गटारीतील पाणी प्या नाहीतर नालीतील प्या सरकारला काही सोयरसुतक नाही.ते आपले गडगंज होऊन राहिले.ज्याच्या विहीरीला बोअरवेलला थोडेफार पाणी तोही त्याचे दोन रूपये करून स्वतःच्या खिशात कसे घालता येतील याच विचारात.शंभर रूपयाला एक दोनशे लिटरचे पिंप विकले जाते.ज्याला भाकरीचीच चिंता तो  पाणी विकत घेऊन कसे पिणार हा मोठा प्रश्न आहे.
    पाणी दुरून कुठून तरी आणता येईल पण ज्याच्या जिवावर माझ्या शेतकरी राजाचं पोट भरतं त्या जनावरांच्या काय व्यथा आहे.न पोटाला पोटभर चारा न पियाला पाणी.अशातच शेतकरी संघटना,राजकीय नेते,पुढारी झोपलेल्या सरकारला उठवतात नि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था म्हणून चाराडेपो,छावणी किंवा अन्य काहीतरी सोय करा मायबाप ही चर्चा जोर धरू लागते.अशातच छावण्यांना परवानगी मिळाली ही बातमी ऐकून शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहीला नाही.जणू भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकत राहावे आणि तितक्यात थंडगार पाण्याने भरलेली घागर दिसावी.
    छावणी सुरू होणार,चारा छावणी सुरू होणार ह्या बातमीने चैत्राच्या उन्हात अनवाणी चालणाऱ्या वाटसरूला एखाद्या गाडीवाणाने गाडीवर बसून न्यावे अशाप्रकारचे सुख होते.शेतकऱ्यांची लगबग सुरू होते.कुणी बांबू आणतात तर कुणी लाकडाच्या मोठमोठ्या मेखा तयार करतो,कुणी मेडी तोडू लागतो.प्रत्येकाला घाई की चांगली चारा डेपो जवळची जागा मिळावी.त्यामुळे जास्त लांब चारा वाहून नेण्याचा त्रास होणार नाही.तर काहींच्या मनात रात्रीचा गुपचूप चारा आणता येईल.सर्वांच्या छावण्या ऐटीत उभ्या राहू लागतात.कोण स्वतः ला झोपण्यासाठी कोपी तयार करतयं तर कोण जनावरांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी कापड कागद बांधतयं.कोणी जमीनीवर पालापाचोळा ठेवून त्यावर टाकी मांडतोय तर कुणी दोन लाकडे आडवे टाकून दावण तयार करतोय,सर्व सर्व लगीन घाई जणू छावणी चालकाचे लगीन हाय अन ही सर्व वऱ्हाडी मंडळी.सूर्य कुठं आहे हे सूर्यफुलाला कुणी सांगतं काय?त्याप्रमाणे छावणी कुठे आहे हे कुण्या शेतकऱ्याला सांगायची गरज पडत नाही.
    नारळ फोडून छावणीचे उदघाटन होते.सर्व शेतकऱ्यांना उद्देशून छावणी चालक भाषण सुरू करतात.सर्वांगाचा कान करून खजीलपणे शेतकरी ऐकू लागतात.भाषणात सर्व आश्वासनांचा पाडा वाचून झाल्यावर चालक महाशय आपल्या अलिशान गाडीत बसून संपूर्ण छावणीतून एक चक्कर मारतात नी सगळीकडे धूरळा उडवत निघून जातात.छावणी सुरू होते.सर्व शेतकरी आनंदात गप्पागोष्टी करू लागतात.जेमतेम आठ-दहा दिवस दिल्या भाषणाला चालक महाशय जागतात आणि कलियुगात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे हे दाखवण्यास सुरुवात करतात.कधी अर्धा चारा तर कधी एक दिवसाआड हे सत्र सुरू होते.शेतकऱ्यांनीही"पदरी पडले धोंड अन हसून केले गोड"याप्रमाणे जे मिळेल त्यात समाधान मानले.जनावरांना वेळीअवेळी चारा मिळू लागला.आज चारा मिळाला नाही,तर आज कमीच मिळाला हेच चालकाचे षडयंत्र सुरू झाले.जनावरांना कधी मिनरल मिक्स पावडर नाही.कधी संतुलित आहार नाही.फक्त आणि फक्त ऊस त्यामुळे लदलद जनावरेही अगदी रोडकी होऊन जोराच्या वार्‍यात जमीनीवर पडतील की काय या काळजीने शेतकऱ्यांना भिनभिनल्या सारखे व्हायचे.कितीतरी शेतकऱ्यांचे रोज एक ना अनेक डोरं पुरेशा चार्‍याअभावी घायाळ होऊन गतप्राण होत असे.लाळखुरकत,बुळकुंड्या होऊन जनावरे थकून जागीच बसत.जनावरांना मोकळे सोडले तरीसुद्धा ती पळत नसे,त्यांच्या पायाला मोठमोठे दगड बांधल्यागत ती जडपावलांनी चालत असे.शेतकरी बिचारा हवालदिल होऊन शून्य नजरेतून आपल्या जनावरांकडे पाहत असे.चारा कधी येतोय अन कधी मिळतोय हाच प्रत्येकाच्या जीवाला घोर लागून राहायचा.कधी एखादी गाडी वाजली तर तडफडून उठून बिटीबिटी डोळ्याने चार्‍याची गाडी हाय का ते पाहू लागे.जनावरांना वेळेवर चारा पाणी नाय मिळाला तर ते कसे काय जगायचे,या विचाराच्या डोहात शेतकरी बुडून जात.जनावरांच्या शिवाय कशी कुणबीक करणार नी कसा संसाराचा गाडा चालवणार या विचाराने शेतकऱ्यांच्या काळजाला कपार पडल्यासारखं व्हायचं.जनावरे हेच शेतकऱ्यांच्या संसाराचे खांब असतात.हे शेतकरी स्वतःच्याच मनाला सांगत असे.
         छावणीत बसल्या बसल्या दुपारी लोकांच्या गप्पांना फार उधाण येत असे.पूर्वीच्या काळी पाऊस पाणी भरपूर व्हायचे,भर उन्हाळ्यात सगळीकडे पाणी असायचे.आता दुनियाच बिघडली आहे.झाडांची बेसुमार कत्तल,यांत्रिकीकरण,वेगवेगळे उद्योगधंदे यामुळे पाण्याचा जास्त अपव्यय होतो.त्यामुळे आपल्यावर वाईट दिवस येत आहेत.असे काही मंडळी आपले मत व्यक्त करत.अगदी डोंगर माथ्यावर पाईपलाईनद्वारे पाणी उपसा करून पाण्याचा साठा संपविण्यासाठी जशी काही स्पर्धा लावली आहे असेच प्रत्येक जण वागतो आहे.हेही गप्पामध्ये मुद्दे येतात.कळतं पण वळत नाही,त्यातलेच हे सर्व महाभाग कारण पाण्याचा टँकर दिसला की आर्धीटाकी हेच खाली रिचवतात.अन पुन्हा टँकरपुढे हात पसरून उभे.विहीरी,बोअरवेलमुळे पाण्याची पातळी खोल जाते,हे सांगणारेच बोर घेण्यासाठी उतावळे झालेले.काहींना पाण्याचे महत्त्व समजते.आपण पाण्याचा आदर करावा.थेंबानथेंबाचा योग्य वापर करावा.असे केले तरच आपण जगू शकतो.तांब्याभर पाणी पिण्यासाठी घेऊन अर्धा टाकून देण्याचे दिवस आज नाहीत.'जल है तो कल है'असेच आपल्याला म्हणावे लागेल.ह्या सर्व चर्चा रंगलेल्या असतानाच ट्रकचा हाॅर्न कानावर पडतो न पडतो तोच सर्वांची पळापळ सुरू होई.ऊसाच्या गाड्या आल्या आता चारा मिळेल हे समाधान सर्वांच्या डोळ्यात तरळू लागे.
         सायंकाळ झाली की घरी जावे की इथेच छावणीत झोपावे हाच विचार प्रत्येकाच्या मनात घर करु लागतो.घरी जावे तर रात्रीला मोकाट कुत्र्यांचा त्रास.कधी येतील अन जनावरांना तोडतील भरवसा नाय.त्यांच्या तोंडाला मांस लागलय त्यामुळे ते जिवंत जनावरांना खायला बी मागेपुढे पाहणार नाहीत.छावणीत रोडकी जनावरे,वासरे मेली की जवळच टाकतात.ती खाऊन कुत्रे गलेलठ्ठ होतात.जनावरांच्या मरणात कुत्र्यांचे जगणे आहे हे बाकी खरे!रात्रभर कुत्रे आजूबाजूला विव्हळत बसतात.मेलेल्या जनावरांचा उग्रवास छावणीत नीटशी झोप लागू देत नाही.इथेच झोपावे तर बायको,पोरं रस्त्याकडे टक लावून अधीरतेने वाट पाहतात.जेष्ठातील शेतकरी जशी आपली नजर आभाळाला खिळून ठेवतो तसे.घरी गेल्यावर गरमागरम खायला मिळेल.तसं इथं जे शिळंपाकं हाय तेच गोड मानून घशाआड करावं लागल.सायंकाळी घरी गेल्यावर दिवसभराच्या सार्‍या शल्यांचा एका क्षणात विसर पडतो.आपल्या मुलांचा स्पर्श जणू त्या दुष्काळात शेतकऱ्यांना संजीवनी सारखा वाटू लागतो.
           पैशाची ऊब नसली,की शेतकऱ्यांच्या जीवनावर एक प्रकारची प्रेतकळा येते.हेच चित्र दुष्काळ आणि छावणीच्या काळात शेतकऱ्यांच्या जीवनात पाहावयास मिळते.शेतकऱ्यांच्या जवळ कायमचा पाण्याचा एकमेव साठा म्हणजे त्याचे अश्रू,हेच अश्रूरूपी पाणी त्याचे दुःख धुवून टाकण्याचा प्रयत्न करते.परमेश्वराने हे पाणी तरी त्याच्याजवळ ठेवले आहे हे त्याचे उपकारच म्हणा.दुष्काळात व छावणीच्या काळात हेच अश्रू शेतकऱ्यांच्या जीवनरूपी अंगावर कायम अभिषेक करत राहतात.....!

                    लेखक,
            श्री.अजिनाथ सासवडे(सर)
             मु.पो.लोणी(स.),आष्टी
             मो.९४२१३३६०५९

1 comment:

  1. आपण या लेखात ग्रामीण भागातील रास्त व वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. खुप छान...!!

    ReplyDelete

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...