Sunday, March 26, 2023

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..


              "तीन भावांची किमया"


      भाऊ-भाऊ म्हटलं का एकमेकांविषयी तू-तू, मी-मी, हेवेदावे हे अगदी वाऱ्यासारखे येतात नि जातात. एकाजवळ असलेली एखादी वस्तू दुसऱ्यांनाही हवीच हवी. मग ती छोटी असो अथवा मोठी. नमतं घेण्यास कुणीही तयार नसतो. फार फार तर आजचं उद्यावर ढकललं जाईल. पण एक दिवसाची उदारता पाण्याच्या बुडबुड्यासारखी अल्पावधीतच नष्ट होणारी. मला मिळो अथवा न मिळो, पण त्याला द्या म्हणणारे राम-लक्ष्मण क्वचितचं. प्रत्येकजण स्वार्थ, मीपणाच्या पाण्यात डुबक्या मारणारा. स्वत:चे लाड पुरवून घेण्यात जो तो सरसावलेला. हरेकजण स्वतःचा चांगुलपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन भाऊ देखील त्याला अपवाद कसे ठरतील? 

      प्रत्येक ऋतूची एकमेकांशी जणू चुरसच लागलेली, की कोण श्रेष्ठ? आपल्या एकट्यामुळेच सजीवसृष्टी सुरळीत चालत असल्याची सगळ्यांची मनोधारणा. माझ्याशिवाय सजीवांचे जगणे कठीण. मानवजातीसह सगळ्याच सजीवांसाठी आपण खूप महत्त्वाचे आहोत, या आंतरिक स्वाभिमानयुक्त भावनेचा प्रत्येकाला हेवा. थोरला कोण? अन् धाकटा कोण? या शंकायुक्त प्रश्नाविषयी सगळ्यांच्याच मनात अराजक. हे पाहुण्यांसारखे येतात न् जातात. यांचं येणं-जाणं हे सगळ्यांच्या मनाला हुरहूर लावणारं. न सांगता आश्चर्याचा धक्का देत दाखल होणार अन् पुन्हा सगळ्यांची नजर चुकवून कधी परागंदा होतील याचाही भरवसा नाही. एकदा रमल्यावर जास्तीचा काळ पाहुण्यांसारखेच त्यांचे महत्त्व कमी करणारा नि लोकांच्या नजरेत कमीपणाची भावना उत्पन्न करणारा. तिरस्कारयुक्त करड्या नजरा पडून नाराजीचे सूर उठू लागले, की आपण आपसुकच ओळखून घ्यायचं बहुदा आपली निघण्याची वेळ झाली. जास्त दिवसाच्या पाहुण्यांना जसे मान, मरातब राहत नाही. पाहुण्यांसमोर पती-पत्नी एकमेकांवर तोंड टाकू लागले, की पाहुण्याने समजून घ्यावे, बहुतेक हा आपल्याला निघण्याचा संकेत आहे. हे भांडण यांचे नसून आपल्यावरील रागाचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटत आहे. तसे जास्त दिवस स्थिरावल्यावर यांचे मोल कमी होऊन जाते. रोजच मिळणाऱ्या एखाद्या रूचकर पदार्थाला पाहूनही माणसं जसे दिवसागणिक नाक-तोंड वाकडं करतात, तसेच काहीसे यांच्याबाबतही होत असावे.

          वसंतातील नवलाई घेऊन येतो तो उन्हाळा. सगळ्यांनाच या नाविन्याची ओढ. थंडीने गारठलेल्या चराचरातील सगळ्याच चेताचेतांना उब देतो तो उन्हाळा. झाडा-फुलांची थंडीने एकमेकांना बिलगून असलेली पानं टवकारून पाहू लागतात. माणसांना हा जास्तीचे काम देत नाही, आरामच आराम. ह्याची जास्तीची आस लागलेली असते, ती लग्नाळू तरूणांना. शाळेतील पोरांसह गुरुजनांचा तर हा फारचं लाडका. हा दाखल होतोय कुठं नाही की यांना सुट्ट्या मंजूर. मग सगळेच आनंदाने फुलपाखराप्रमाणे बागडण्यासाठी मोकळे. वर्षभर कष्टाने शिणलेल्या बळीराजाचे मन याच्या आगमनाने झाडाच्या फांदीवर हेलकावे घेणाऱ्या पक्षागत आनंदाने डोलू लागते. कामातून उसंत मिळते, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतात, दिलजमाई होते. दूरदेशी गेलेले सरकारचे गुलाम (नोकरदार) गावाकडे येऊन सगळ्यांच्या गाठीभेटी घेतात, विचारपूस करतात. सगळ्यांवर प्रेमाचा वर्षाव करणारा उन्हाळा कितीही तापट असला तरी याच्या काळात सगळ्यांचेच खिसे मात्र थंडावलेले असतात. तरीही एक अनामिक समाधान काळजात घर करते, की याच्या निमित्तानं प्रेमाच्या माणसाची गळाभेट झाली. आपलेपणाची जाणीव करून देतो तो उन्हाळा. आपल्यांना आपलसं करून प्रेमाचा धागा घट्ट करतो. कितीही तापट असला तरी आपल्या भेटीला येताना थंडगार फळांची अमृतधारा घेऊनचं हजर होतो. आंबा, टरबूज, खरबूज, संत्रा, मोसंबी अशा नानाविध प्रकारच्या आंबटगोड फळांच्या मेजवानीने भरलेले ताट आपल्यासमोर मांडतो. सूर्यदेवाचं याच्यावर भलतचं प्रेम. उन्हाळा आणि सूर्यदेव एकमेकांच्या हातात हात घालूनचं चालतात. यांची मैत्री जगजाहीर. थकलेल्यांसाठी उन्हाळा हा एक सुवर्णकाळ. उन्हाळा सदैव तापटपणाचा सदरा घालून असला तरीही जास्त रममाण झालेला पाहून पावसाळ्याला पोटशूळ उठतो. तो अचानक मध्येच वळवाच्या रूपानं हजेरी लावतो अन् उन्हाळ्याला काढता पाय घेण्यास भाग पाडतो. आपण लवकरचं दाखल होत असून सर्वांनी आपापली कामं तातडीनं उरकून टाकावी, ही वार्ता देऊन जातो. 

          उन्हाळा जडपावलांनी जातोय कुठं नाहीतर अगदी धूमधडाक्यात वाजत-गाजत नवरदेवासारखा येतो, तो पावसाळा. मंडपाच्या दारात नवरदेव यावा अन् त्याचे रूप पाहण्याकरिता जमलेल्या आसनस्थ मंडळींनी गरागर माना वळवाव्यात, त्याप्रमाणे याचे सर्वांनाच विलक्षण आकर्षण. उन्हाळ्यात घामाघूम झालेला पावसाळ्याच्या थंडगार शीतल सरींची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. पावसाळा शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता पाहुणा. हा आला म्हणजे याचे स्वागत कशाने करू न् कशाने नाही असे शेतकऱ्याला होऊन जाते. घरात, आडोशाला बसलेल्या सगळ्यांना याच्या येण्याची थंडगार वार्‍याच्या रूपानं चाहूल लागली, की रस्त्यावर, अंगणात येऊन सगळेजण अगदी आनंदाने त्याचे नाचून, गाऊन स्वागत करतात. काहीजण त्याच्या प्रेमसरीत मनसोक्त चिंबचिंब होईपर्यंत न्हाऊन घेतात. ढगांचे अक्राळ-विक्राळ रूप हलक्या काळजाच्या माणसाला धडकी भरवणारे. ढगांमध्ये धुमश्चक्री सुरू झाल्यावर वीज भीतीपोटी धरणीचा आश्रय करत होत्याची नव्हती होऊन जाते. ढगांच्या संघर्षातून त्यांचे अश्रू धाराच्या रूपानं वाहू लागतात. याचा डांगोरा जास्त, काम कमी. आसमंतात बेछूट गोळीबार करणारा हा. याचा नेम क्वचितच लागतो, नाहीतर एरव्ही विनाकारणचं बोंब उठवून आपली शक्ती खर्ची घालतो. पण याने जर एखाद्या वाटसरूला अरण्यात, रस्त्यात मधेच गाठले, तर त्याला मात्र पुरता सळो की पळो करून बेफाम झोडपून काढतो. गवळणींची वाट कृष्णानं अडवावी न् डोक्यावरचे मटके फोडून त्यांना दह्या-दुधानं अंघोळ घालावी तसे वाटसरूंना ढगांचे माठ फोडून पावसाळा अंघोळ घालतो. वाटा अडवण्यात हा फारच निष्णात. 'कहीपे निगाहे कहीपे निशाना' असा हा आगळावेगळ्या गुणावगुणांचा. दिसतो दुसरीकडे आणि अचानक प्रकट होतो तिसरीकडेच. भलतीकडेच जाऊन नदी, ओढ्याच्या मार्गाने पाण्याच्या रूपात अचानक कधी वाट अडविल याचाही नेम नाही.

        हा शेतकऱ्यांना कधी शांत बसू देत नाही. एक पाय रोवत एक उपसत हा शेतकऱ्यांना घामेघूम करून टाकतो. नोकरदारांना कधीकधी उसंत देतो. याचे निमित्त करून शाळेतील मुलं घरी खेळण्याचा भरपूर आनंद घेतात. याच्या आगमनाचे कारण शाळेला दांडी मारण्यापूरतं पुरेसं ठरतं. झाडाझुडपांचं वर्षभराचं कळकटलेलं अंग धूवून त्यांना स्वच्छ आंघोळ घालण्याचं काम याच्याकडे ठरलेलं. याचाही अतिरेक झाला की, रुंदावलेले चेहरे हळूहळू बारीक होऊ लागतात. कधी एकदाचा जातो म्हणून मनोमन खडे फोडतात. कित्येकांना तर मोकळा श्वासही घेता येत नाही, गुदमरल्यासारखे वाटू लागते. इकडे-तिकडे कामानिमित्त घराबाहेर पडायचं म्हटल्यावर अगदी जीवावर बेतल्यासारखं होतं. छत्री, रेनकोटांनाही सोन्याचे दिवस येतात. ढाल म्हणून छत्री, रेनकोट यांचा याच्यापासून बचाव करण्यासाठी उपयोग करावा लागतो. एकदा गेल्यावर मात्र मनाला फार चटका लावून जातो, की आता परत कधी येणार? झाडंझुडपं, वेली याच्या येण्यानं जेवढे आनंदी झालेले असतात, त्यापेक्षा कैकपटीनं हा जाताना पाहून दुःखी होतात.

              हिवाळा हा फुलासारखा नाजूकच. अलवार पावलांनी कधी येतो न् घरात शिरतो याचा पत्ताही लागू देत नाही. पावसाळ्याच्या परतीची न् याच्या आगमनाची वाट एकच. कधी कधी हा पावसाळ्यालाही माघारी चालण्याचा आग्रह करतो. नव्हे-नव्हेतर घेऊनही येतो. पावसाळ्याची परतीची चाल अगदी संथ. त्याला घाटात विसावा घेईपर्यंत हिवाळा त्याच्या अगोदर येऊन धडकतो नि नंतर कधी कधी एखादी वारी पावसाळ्याचीही होऊन जाते. गाठोड्यात मागील वर्षी बांधून ठेवलेल्या स्वेटरचा शोधाशोध केव्हा सुरू होतो, याचा पत्ताही लागत नाही. अंगावर स्वेटर चढल्यावर कळते, की हिवाळा नामक पाहूना घरात येऊन थबकला आहे. त्याच्यापासून आपला बचाव करायचा असेल तर अंगावर स्वेटर, हातापायात मोजे, नाका-कानाभोवती मफलर हा सगळा साज त्याच्याशी दोन हात करण्यासाठी. पण कितीही सावध राहण्याचा प्रयत्न केला, तरी तो तुमच्या गालांना, ओठांना आपल्या हाताने ओरबाडल्याशिवाय सोडत नाही.

         हिवाळ्याची अनामिक ओढ लागलेली असते ती गरम कपडे विकणाऱ्या दुकानदारांना. वर्षभर दुकानात आराम केल्यामुळे वर्षभराच्या कामाची भरपाई या दिवसात करण्याचा त्यांनी जणू पणचं केलेला असतो. एरव्ही शे-दोनशे रुपयांचा माल ह्या दिवसात दामदुपटीने व्याजासह वसूल केला जातो. हा पाहुणा स्वतःच्या अंगावर उन्हाची लकेर सुद्धा पडू देत नाही. तिमिरातच याच्या सर्व गोष्टी घडत असतात. याच्यापुढे सूर्यदेवाची प्रखरताही थरथरू लागते. हिवाळा घरात शिरला की तो घरच्या लोकांनाही नादी लावून बाहेर निघू देत नाही. घरातच गरमागरम चहा, भजी असे पदार्थ आपल्या सेवेसाठी करायला भाग पाडतो. नाक्यावर, रस्त्याच्या कडेच्या ठेल्यावर गरमागरम भाजलेली कणसं, शेंगा, भजी, समोसे, वडापाव, चहा या पदार्थांना बेसुमार मानमरातब मिळू लागतो. काम कमी नि उचापती जास्त हेचं याचं वैशिष्ट्य. चहा तर त्याचा जीव की प्राण. पाणी आणि हिवाळा यांचं विळ्या-भोपळ्याचे वैर. त्यांची गाठभेट अगदीच दुर्मिळ. गरमागरम पदार्थांना सोन्याचा भाव येतो.

     उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वाटणी पुरते भाऊ, बाकी गुणावगुण एकमेकांच्या विरुद्ध. भाऊ-भाऊ अन् वाटणी असमान अशक्य. जेवढे एकाला तेवढे दुसऱ्यांनाही. त्यामुळे तर कदाचित भावाला वाटेकरी हा समानार्थी शब्द मिळाला असावा. असे हे तीन भाऊ वर्षातले दिवस सुद्धा समसमान वाटून घेतात. कुणाला कमी नाही, कुणाला ज्यादा नाही. या तिघांची गाठभेट एकावेळी तशी दूर्लभच. नावाला भाऊ असून काय कामाचे? कर्मतर परस्परविरुद्ध. या तीनही भावांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपली एक वेगळीच छबी जनमाणसांच्या मनामध्ये निर्माण केली आहे. त्याचे दर्शन लोकांना ते वेळोवेळी घढवतात. कुणाला कमी तर कुणाला जास्त मान त्यादैनिकातसोलार्यामुळे प्राप्त झालेला. पण ते मात्र आपले गुणावगुण कधी सोडत नाहीत.


        लेखक

   अजिनाथ सासवडे

मो.९४२१३३६०५९

Wednesday, October 12, 2022

व्यक्ती तितक्या प्रकृती

          "व्यक्ती तितक्या प्रकृती"


       

       संपूर्ण विश्वभ्रमण केले तरीही रंगरूपाने तंतोतंत जुळणाऱ्या दोन एकसमान व्यक्ती भेटणे निश्चितच दुर्धर आहे. कदाचित दिसण्यात एकसारखेपणा असेलही परंतु असण्यात वेगळेपण हमखास सिद्ध होईल. अगदी हुबेहुब दिसणाऱ्या जुळ्या भावंडात देखील बाह्यांगाखेरीज अंतरंगात तफावत असल्याबिगर राहत नाही. स्वार्थी-निस्वार्थी, प्रेमळ-कठोर, अबोल-बोलका, भित्रा-धाडशी या अन् अशा अनेक गुणावगुणांमध्ये त्यांच्यात भेदाभेद नक्कीच जाणवेल. काही व्यक्ती अगदी वामनमूर्ती तर काही खूपच उंच. काही प्रसन्न मुद्रेच्या तर काही अवघ्या जगाचं संकट त्यांच्यावरचं कोसळल्यावाणी उदास चेहरा मिरवत असतात.

          व्यक्ती-व्यक्तींमध्ये नाना प्रकारचे अंतर स्थळ-कालपरत्वे आपल्याला जाणवते. ऑफिसात काम करणाऱ्या व्यक्तींपेक्षा शेतात काम करणाऱ्या व्यक्ती हसत मुखाने नजिक आलेल्या व्यक्तीचे स्वागत करतात. ऑफिसात काम करणाऱ्या व्यक्ती नेहमीच तुसडेपणाने वागताना दिसतात. एकांतवासात त्यांच्या चेहऱ्यावरची कळी खुललेली असते, परंतु त्यांच्याकडे कुणी माणूस येताना दिसला, की त्यांचा चेहरा आकाशातील ढगासारखा हळूहळू काळवंडू लागतो. सात जन्माचे वैर असल्यागत ते त्याच्याकडे तिरस्कारयुक्त नजरेने पाहत राहतात. स्वतःचे काम इमानेइतबारे करण्याऐवजी वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यात नि इतरांच्या कागाळ्या करण्यातचं कित्येकांचा वेळ निघून जातो. हरेकाला वाटते की या जगात सगळ्यात जास्त कामाचा उपद्व्याप आपल्याच नशिबी आला आहे. आपल्याशिवाय कुठलेच काम होणे शक्य नाही, हा त्यांचा गोड गैरसमज कुणी दूर करू शकला तर नवलचं. बहुदा वाणाने नव्हेतर गुणाने समान असणाऱ्या व्यक्तींची रास लवकर जुळते. गुणाने सारख्या असणार्‍या व्यक्तींची मैत्री सदोदित टिकून राहते. एकमेकांचे उणेदुणे काढणे त्यांना न परवडण्यासारखे असते, कारण दोघेही एकाच माळेत गुंफलेले असतात. सडपातळ बांधा असलेल्या व्यक्तीला शरीराने धष्टपुष्ट व्यक्तींविषयी आकर्षण राहते. आपण त्याच्यासारखे ऐटबाज असतो तर किती बरे झाले असते, ही बोचणी लावणारी गोष्ट त्यांच्या मनाला क्षणात स्पर्शून जाते. शरीराने चौरसाकार धारण केलेल्या व्यक्तींना बहुदा पिळदार शरीरयष्टीच्या व्यक्तींविषयी अनामिक ओढ लागून राहते.

         काही व्यक्तींचे जीवन एवढे निरंक असते, की त्यांना जीवनात सुख अन् दुःख, आपला अन् परका या गोष्टींनी काही फरक पडत नाही तथा हे भावचं जणू त्यांच्या आयुष्यातून परागंदा झाल्यासारखे असतात. कुठल्या प्रसंगात कोणती प्रतिक्रिया द्यावी याचे त्यांना भानही उरलेले नसते. फक्त शून्य नजरेतून ते पाहत राहतात. 'जन्माला आला हेला नि पाणी वाहून मेला' अशी यांची गत. जीवन मिळाले म्हणून ते ढकलत राहायचे. दुसऱ्यांसाठी तर सोडा, पण स्वतःसाठी काही करण्याचीही यांच्याकडे उदारता नसते. फक्त नि फक्त काम भले अन् हे. सामाजिक, नैतिक जबाबदारी राहूद्या कौटुंबिक जबाबदारीही यांनी पूर्णपणे झिडकारून टाकलेली निदर्शनास येते. जीवनात त्याग करण्याजोगी कुठली बाब नि भोगण्याजोगी कुठली? यांमधील अंतर न कळण्याइतपत यांचे आपल्या बुद्धीशी हाडवैर. सर्वांगाने परिपूर्ण असून देखील केवळ समाजाच्या विचारापोटी हे आपले आयुष्य रडतरावासारखे जगतात. जीवन जगताना कुठे हात सैल सोडावा अन् कुठे खमता घ्यावा याचा ताळेबंद यांना कधीच जमत नाही.

     काही व्यक्ती तर एवढ्या प्रचंड पैशाच्या लोभी की त्यांना पैसा हेच जीवन वाटते. पैशाअभावी ते क्षणभरही तग धरू शकत. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडू लागतो त्याहून अधिक बेचैनी यांना बकोटीला पैसा नसल्यावर सुटते. त्यांच्या जीवाची नुसती घालमेल होत राहते. पैशाची उभ असली तरच त्यांना हायसं वाटतं नाहीतर जीवन निरर्थक वाटते. आई-वडील, पत्नी, मुलं या सर्वांहून अधिक पैशावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कितीतरी आकृत्या पावलोपावली भेटतात. प्रेम, ममत्त्व, आपलेपणा, दया या शब्दांना त्यांनी स्वत:च्या शब्दकोशातून केव्हाच हद्दपार केलेले असते. फक्त स्वतःच्या नावे पैसा असला म्हणजे झालं. परगावी गेल्यावर दिवसभर वणवण अन्नपाण्याबिगर भटकतील पण चार पैशाचं काही विकत घेऊन स्वतःच्या पोटाला खातील तर शपथ.

     काही महाशयांनी एवढा एकलकोंडेपणा अंगिकारलेला, की इतरांबरोबर चौकशीवजा हिताफाराचे दोन बरे-वाईट शब्द बोलतील तर यांना महापाप लागण्याची शक्यता. फक्त मी न् माझे यापलीकडे यांना काहीही सुचत नाही. दुसऱ्याची उन्नती होत असेल तर काहींना असा पोटसूळ सूटतो, की त्यांचं चित्त थाऱ्यावर राहत नाही. श्रीमंत झाला तर दोन नंबरची कमाई आहे त्याला नि गरीब राहिला तर दळबद्री, बेअक्कल आहे, अशा ठेवणीतल्या मोठमोठ्या विशेषणांची पोटतिडकीने फैर झाडतात.

      मी तर काही अशी माणसं पाहिली, की ज्यांनी आयुष्यात इतरांना नावं ठेवण्याखेरीज काही केलं नाही. सगळ्यांना उठता-बसता नावं ठेवणं जणू यांच्या हक्काचा मामला आहे. काही व्यक्तींशी आंबट-गोड कसेही बोला पण कुत्र्याच्या शेपटागत यांचं बोलणं कायमचं वाकडं ते वाकडंच. सरळ बोलतील तर ते महा पातकाचे धनी होतील, अशी जणू त्यांना भिती असते. दुसऱ्याच्या पोळीवरचं तूप आपल्या पोळीवर कसं ओढता येईल यामागे बरेचसे महाशय उद्युक्त असतात. दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ, अडचणी निर्माण करण्यात काहींना मोठा रस वाटतो नि त्याचाच बडेजाव चारचौघात करण्यात ते मोठी धन्यता मानतात. एखाद्याच्या पेटत्या घरावर आपली पोळी भाजणारेही कैक असतात. पण 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' या उक्तीचा त्यांना विसर पडलेला दिसतो. आपण जे करतो ते सर्व योग्यचं आहे, हा यांचा गैरसमज दूर होईल तर नवल. 

       काहीजणांच्या बुद्धीवर सर्व नियंत्रण दुसर्‍याचे. स्वतःची बुद्धी गहाण ठेवून कळसूत्री बाहुलीप्रमाणे इतरांच्या तालावर नाचणारे समाज बांधव खूप आहेत. कुणाकुणाला फुशारकी मारण्यात भारी शान वाटते. घडलेला प्रसंग तेलमीठ लावून सांगण्यात काही लोकांचा फारचं हातखंडा असतो. हातभर लाकडाला सव्वाहात छिलपी निघाल्याचे ते मोठ्या हिरीरीने सांगतात. काही महान विभूती लाखो हृदयांवर आपलं नाव कोरून जातात, तर काहींना आपल्या संपूर्ण हयातीत बायको-मुलांच्या हृदयात तसूभरही जागा मिळवता येत नाही. काही व्यक्तींच्या अंगी एवढा भाबडेपणा की आपण एखादे कार्य कुणासाठी करत आहोत याचेही त्यांना भान राहत नाही. काहींना वेड पांघरून पेडगावला जाण्यात थोर आनंद. विचार अन् आचारामध्ये जमीन-आसमानाचे अंतर असणारे बहुसंख्य, पण विचारानुसार कृती करणारे अगदीच नगण्य. जमदग्नीचा अवतार असलेले काही गृहस्थ सर्वांगाने आग ओकत असतात. निखारा हाती धरावा, परंतु यांच्याशी वाद घालून स्वत:चा बुद्धीभेद करून घेऊ नये. अशा लोकांना सुधारण्याकरीता कुठलीही मात्रा कामी येत नाही. 

      सर्वांगाने पुरुषोत्तम होणे कठीण असले तरी माणूस म्हणून सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून सर्वसमावेशक स्वहितासह समाजहित जोपासने आणि अति स्वार्थार्त वृत्ती त्यागून अल्पशी परोपकारी वृत्ती धारण केल्यास काय गैर? जीवनामध्ये कमावलेली जी काही धनदौलत, संपत्ती आहे, ती शेवटी परस्वाधीनचं होणार आहे. इतरांच्या उपयोगी पडण्यातचं मोठे पुण्य आहे. आपल्या अंतरंगाला चिकटलेल्या षड्रिपूंचे दहन करून आपले जीवन कृतार्थ करावे. साधूसंतांनी आपल्या परोपकाररूपी सद्कार्याने मातृभूमीचे पांग फेडले. आपल्याकडून त्यांच्यासारखे काम भलेही न होवो, पण मातृभूमीच्या ॠणार्थ देश, धर्म, समाज कार्यासाठी थोडेसे तरी झटावे. रंजल्या, गांजलेल्या दिशाभूल झालेल्या वाटसरूंना मार्गस्थ करावे, हेच मोठे महतभाग्य.



            लेखक

       अजिनाथ सासवडे सर

        लोणी (स), आष्टी

        मो.९४२१३३६०५९

Wednesday, February 16, 2022

वेळ

               वेळ



   वेळ हा फक्त दोन अक्षरी शब्द, परंतु याचं थोडही मागं-पुढं होणं खूप काही बदलून टाकतं. प्रत्येकाच्या आयुष्याचं गणित बरोबर किंवा चूक हे वेळच ठरवते. अमुक-अमुक वेळी तमुक-तमुक गोष्ट करायलाच हवी हा निसर्ग नियम. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात कुठलाही शहाणपणा नाही. प्रत्येकाच्या आयुष्यातील इयत्ता दहावीचे वर्ष हे महत्वाचे आहे असे सगळ्यांनी सांगून देखील आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याने अपयशाचे धनी झालो तर ती गोष्ट पुन्हा कधीही न भरून येण्यासारखी आहे. वेळ निघून गेल्यानंतर आपण कितीही हळहळ व्यक्त केली तरी झालेल्या गोष्टीमध्ये आपण बदल करू शकत नाहीत हे तितकेच खरे. त्याकरिता गोष्ट घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्याखेरीज पुर्वनियोजन हवे. सर्वकाही वेळेला आणि वेळेनुसार ठरत असते. वेळेच्या बाबतीत जराशी कुचराई देखील फार महागात पडते, परंतु तरीसुद्धा हरेककजण वेळेच्या बाबतीत गाफील का राहतो? हा प्रश्न न उमजणाराच वाटतो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर ह्या-ह्या वेळी गाडी येऊ शकते किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे कुणाचातरी जीव जाऊ शकतो हे माहीत असूनही अनेक कर्मचारी वेळेला लापरवाही करतात. म्हणजे यांना उंटावरचे शहाणे म्हणावे? की आणखी काही हेही उमजत नाही.

     वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ संपली की सर्व संपले. हाजिर तो वजीर. अशा प्रकारचे अनेक वाक्य आपल्या कानावर वेळोवेळी घणाघात करूनही आपण मात्र त्याकडे नजरांदाज करत राहतो. एखादी गोष्ट वेळेत न घडल्याने अवघ्या जीवनाची वाताहत झालेली अनेक उदाहरणे आपण पाहतो. युद्धकाळात काही मिनिटे किंवा सेकंदांचा झालेला उशीर कित्येकांच्या जीवावर बेतला जातो. एखाद्याविषयी बोलताना आपण सहजपणे बोलून जातो, "तो खूप मोठा माणूस आहे" तर अनेकदा असेही म्हणतो, "पैसा खूप मौल्यवान आहे." पण सारासार विचाराने शेवटी या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो, की ना पैसा मोठा, ना माणूस मोठा, मोठी असते ती वेळ. पैशाने दुरावलेला माणूस उद्या जवळ येऊ शकतो तर आपल्या अपरंपार कष्टाने पैसाही मिळू शकतो, परंतु माणूस आणि पैशाची सर्व शक्ती पणाला लावूनही गेलेली वेळ मात्र परत आणू शकत नाही. एवढी वेळेत ताकत आहे. वेळेचे गणित वेळच सोडवू शकते. अन्य कोणीही नाही. काही गोष्टीसाठी वेळ येण्याची वाट पाहावी लागते तर काहींसाठी वेळ जाऊ द्यावी लागते. ठराविक वेळेलाच येणाऱ्या गाडीची वाट पाहत बसावे लागते तर परीक्षेच्या काळात भरभर वेळ जाऊ नये असे सारखे वाटत राहते. माणूस कितीही पुढारला असला तरी वेळेला सलाम करून तिच्यापुढे गुढेगे टेकवतोच. 

       आयुष्यभर आपल्याला सगळेच गुरु मार्गदर्शन करत राहतात. पुरातन काळातील तसेच सद्यस्थितीतील अनेक उदाहरण दाखले देऊन वेळेचे महत्त्व आपल्याला पावलोपावली पटवून देतात. पण त्यांच्या पोटतिडकीने सांगण्याकडे आपण सदैव कानाडोळा करत राहतो. मात्र जेव्हा अनुभवासारख्या महागड्या गुरूनी आपल्या श्रीमुखात चांगली चपराक लावल्यावर आपण त्याला कायम दंडवत घालू लागतो. कारण प्रेमाच्या भाषेपेक्षा कडक शब्दांत केलेली कानउघाडणी भल्याभल्यांना सरळं करते. आपले आई-वडील, शिक्षक, मित्र, आपल्याला वारंवार वेळेचे महत्त्व पटवून देतात. एखादी गोष्ट वेळेवर न केल्याने कशाप्रकारे नुकसान होऊ शकते हे समजावतात. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात लागलेल्या अनुभव ठेचांच्या जखमा ते आपल्याला दाखवत असतात. परंतु त्यांच्यापेक्षा आपण अव्वल असल्याच्या भाबड्या समजुतीपाई अथवा आपल्याला कमीपणा वाटत असल्यामुळे म्हणा, इतर कुठल्या कारणाने आपण आपल्याच मदमस्त चालीत दंग असतो. जेव्हा अनुभव येतो तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. गुरुजी वर्षभर सांगतात, "अरे मुलांनो दहावी-बारावीचे वर्ष म्हणजे जीवनाला कलाटणी देणारे वर्ष आहे आणि त्या वर्षाअखेरचा मुख्यकाळ हा परीक्षेचा असतो. संपूर्ण वर्षभर अभ्यास करायचा, आयुष्याच्या शिदोरीची तुकड्या तुकड्यात बांधणी करायची आणि ऐन तीन तासाच्या पेपरमधले आपले कोलमडून गेलेले नियोजन आपल्या आयुष्याचं वैराण वाळवंट करणारे ठरू शकते." असे वेळोवेळी बजावून देखील परीक्षेच्या वेळी कुणीतरी परिक्षेला उशीरा येणे. पेपर वेळेत न सोडवणे. या गोष्टी घडतातच म्हणजे वर्षभर सांगितलेले सगळे मार्गदर्शन अगदी पालथ्या घड्यावर पाणी पडल्यासारखे वाटते.

         बहुतेक वेळा आपल्या कानावर येते की, "अरे तो खूप अभ्यासू होता. परंतू परीक्षेला येताना त्याच्याकडून थोडा उशीर झाला आणि त्याचा काही पेपर सोडवायचा बाकी राहिला. त्यामुळे तो मिरिटमध्ये येऊ शकला नाही. म्हणजे वर्षभर शाळेची वेळ सांभाळली, अभ्यासाचा वेळ सांभाळली. पण परीक्षेची वेळ मात्र सांभाळता आली नाही. म्हणजे आयुष्यात कधी कधी काही तास, काही मिनिटे हे आपले जीवनमान बदलणारे ठरतात. एखादा पैलवान वर्षानुवर्ष कसरत करून आपलं शरीर बनवत असतो. जेव्हा केव्हा कुस्त्यांच्या आखाड्यात उतरावे लागेल तेव्हा मात्र पूर्ण तयारीनिशी आपले शरीर कसलेले पाहिजे ही त्याची मनिषा असते. परंतु जेव्हा स्पर्धेचे दिवस सुरू होतात तेव्हा हे पहिलवान महाशय आजारी पडतात. म्हणजे अहोरात्र केलेली मेहनत मातीमोल ठरली की नाही? त्याकरिता वेळेला सदासर्वदा हातावरच्या फोडाप्रमाणे जपणे महत्त्वाचे असते. फक्त एकदाच नव्हे. दैनंदिन आयुष्यात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वेळेचे नियोजन असेल तरच सगळ्या गोष्टी अगदी सुकर होतात नाहीतर वेळेच्या गुंत्यात नको असलेली गोष्ट पदरी पाडून घ्यावी लागते.

      वेळेचे मूल्य सोन्या चांदीहूनही कैकपट अधिक असल्याने अनेक प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार दैनंदिन जीवनात वेळेच्या संदर्भात प्रचलित आहेत. जसे, वेळ गेली निघून आणि हसू आले मागून, वरातीमागून घोडे, तो पहा सूर्य आणि हा जयद्रथ, उशिरा निघाले आणि वेळेला पोहोचले, कल करे सो आज और आज करे सो अभी म्हणजे येन केन प्रकारे वेळेचे महत्त्व या सर्व म्हणी आपल्याला पटवून देतात. काही सेकंदावरून अपघात होण्यापासून बचावलेला एखादा जीव, परीक्षेला जाताना काही मिनिटांवरून सापडलेली गाडी, अंतिम काही तासांच्या घनघोर लढाईत मिळालेला विजय ह्या गोष्टींना वेळेचे महत्व किती? हे तेच लोक चांगल्याप्रकारे सांगू शकतात.

    कधीकधी वेळेच्या बाबतीत एकाकडून झालेली चूक अनेकांना दोष नसताना भोगावी लागते. रेल्वेच्या अमुक-अमुक प्लॅटफॉर्मवर यावेळी दुसरी गाडी उभी असते हे माहित असून देखील वेळ न सांभाळल्याने त्याच प्लॅटफॉर्मवर दुसरी गाडी घेऊन येणाऱ्या चालकाच्या चुकीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अशा बातम्या ऐकून मन सुन्न होते. अर्थात वेळेला सगळ्या गोष्टी सांभाळाव्याच लागतात. अन्यथा मुर्खपणाचा मुकुट चढवून आपली दिंड काढली जाते. सदैव ध्यानीमनी असुद्या जे वेळेला सांभाळतात वेळही त्यांनाच सांभाळून नेते. जवळपास सगळ्यांनासारखे आयुष्य मिळते तरीही काहीच माणसे यशस्वी होतात तर अनेकजण अयशस्वी होतात. याचे कारण वेळेचे नियोजन अस्तव्यस्त होणे हेच आहे. वेळच तारक आहे आणि वेळच मारकही आहे. वेळच घडवते आणि वेळच बिघडवते. वेळेचे गुलाम बनू नका. तर आपले आयुष्य जीवनरुपी भवसागरातून यशस्वीरीत्या पैलतीराला घेऊन जाण्यासाठी स्वतःच्या हातात वल्लव घेऊन नाव योग्य दिशेने आणि योग्य वेळी वल्लवित राहा. 



           लेखक

     अजिनाथ सासवडे

   मु.पो.लोणी(स), आष्टी

   दुरभाष:९४२१३३६०५९




Friday, March 27, 2020

ओढ लावणारं घर

                       "ओढ लावणारं घर"

         घर हा शब्दचं एवढा सुखद, आल्हाददायक आणि मनाला चेतना देणारा आहे, की तो सर्वांना तात्काळ प्रेम, वात्सल्य, या भावनांची जाणीव करून देतो. घर हा शब्दोच्चार कानावर पडला तरी, प्रत्येकाच्या दृष्टिपटलावर घरातील आठवणींची क्षणचित्रे उभी राहतात. मूलभूत गरजांपैकी निवारा ही गरज भागवते ते घर. दगडाच्या भिंतींनाही बोलके करते ते घर. निर्जीव असूनही सर्वांना प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवते ते घर. आपलेपणा, कर्तव्य, जबाबदारी यांची जाणीव करून देते ते घर. घर हे संपत्ती किंवा साधन नसून ते एक जीवनातील परमोच्च आनंदाचे साध्य आहे. मोठ-मोठे बंगले, गगनचुंबी इमारती आपण पाहतो. परंतु त्याठिकाणी प्रेमाचा, आपुलकीचा लवलेशही दिसून येत नाही, त्याला घर म्हणावे कसे? घर शब्दचंं मुळी प्रेमाचा प्रतीक आहे. घर या शब्दात आपलेपणा, सहानुभूती व प्रेमाची भावना दडलेली आहे. प्रेमाचा निवास म्हणजे घर. ज्या ठिकाणी पैसा, संपत्ती मुबलक आहे, परंतु सुख, समाधान नाही, एकमेकांविषयी सहृदयता नाही, ते घर नसून दुःखाचे उगमस्थान मानले जाते.
           कितीही धनाढ्य व्यक्ती असू द्या, भक्कळ पैसा कमवू द्या, परंतु त्याच्या चेहऱ्यावर घरी आल्यावर जो आनंद ओसंडून वाहत असतो ना, तो इतर कुठल्याही ठिकाणी गेल्यावर दिसून येत नाही. घर म्हणजे प्रेम, आपुलकीचे माहेर. घरी आल्यावर आई-वडील, बायको, मुलांना पाहून जे समाधान मिळतं, ते स्वर्गसुखालाही लाजवेल अशा प्रकारचं असतं. पृथ्वीवर असा एकही मनुष्य नसेल की, ज्याला स्वतःचं घर असावं असं वाटत नाही. कित्येकांची तर उभी हयात जाते, परंतु स्वतःच घर मात्र त्यांच्याकडून बांधणं होत नाही. संपूर्ण आयुष्य एखाद्या झोपडीत किंवा बांबूच्या तंबूमध्ये व्यतीत करताना मनातला विचार मनातचं दाबून काही समाज बांधव अखेरचा श्वास घेतात. काहींना नशिबाने जन्मताचं अगदी चांगल्या प्रकारच्या घरामध्ये निवास मिळतो. परंतु काहींना मात्र आश्रितासारखं एखाद्या ठिकाणी इच्छेविरुद्ध जगून, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून संपूर्ण जीवन व्यतीत करावं लागतं. काहीजणांचं पहिलं आणि शेवटचं स्वप्न घर हेच असतं. घर झालं म्हणजे जीवनात सर्व काही झालं, ही इच्छा उरी बाळगून ते सदैव घर या स्वप्नाचा पाठलाग करत असतात. ते तडीस गेलं म्हणजे जीवाची घोर संपली.
       दोन दिवस कुठे गावाला, तीर्थयात्रेला किंवा विरंगुळा म्हणून फिरायला गेलेल्या व्यक्तीला घराची आठवण मात्र क्षणोक्षणी सतावत असते. "भेटी लागे जीवा लागलीसे आस" या उक्तीप्रमाणे कधी एकदा घरी जातोय आणि घरदार पाहून जीव समाधानी पावतोय असे त्यांच्या जीवाला झालेलं असतं. घर हे प्रेम आणि वात्सल्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. घरापासून दूर बाहेरगावी राहणाऱ्याला घराची आठवण येऊन डोळ्यातून आसवे घाळताना कैकवेळा आपण पाहत आलो आहोत. बालपणात घरामध्ये जी दंगामस्ती केली. छोटसं घर असेल तर भावंडांमध्ये बसण्याच्या, झोपण्याच्या जागेवरून झालेले वाद-विवाद, भांडण-तंटे यांची मोठे झाल्यावर आठवण येऊन त्यांचे मन गहिवरून येतं. कारण तेथे प्रेमाची नाळ जोडलेली असते. जोपर्यंत घरातून झऱ्याप्रमाणे प्रेम झिरपत असते, तोपर्यंत आपली प्रेमाची तहान भागवण्यासाठी सगळ्यांनाच घराची ओढ सतावत असते. दिवसभर मनमुरादपणे भ्रमंती करणाऱ्यांचे पाय तिन्हीसांज झाल्यावर आपसूकच घराकडे ओढले जातात.
        आपल्या घरापासून इतरत्र बाहेर शहरात, जिल्ह्यात अथवा राज्यात तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्य करण्यासाठी किंवा नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेल्या, भाडेकरूच्या रुपानं राहणाऱ्या लोकांना सुट्टीच्या काळात गावी येऊन घर आणि घरातील सगळ्या माणसांना भेटण्याची जी ओढ असते, ती अगदी शब्दात वर्णन न करण्यासारखी. त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. कधी एकदा घरी येतो आणि घरातील सगळ्यांना डोळे भरून पाहतोय असे त्यांना होऊन जाते. वाळलेल्या झाडाला वसंत ऋतूत पालवी फुटावी तसं त्यांच्या मनाला आनंदाची पालवी फुटत असते. आपले घर, शेत-शिवार याची प्रत्येकाला जी आस असते, ती जीवाला कासावीस करणारी असते.
         अहो घरून शाळेत गेलेलं पोरगंसुद्धा सहा तास शाळेत थांबताना त्याला अनेकदा घराची आठवण होत असते. कधी घरी जातोय आणि घराच्या अंगणात खेळाचा डाव मांडतोय हे त्याच्या मनात सदोदित घोळत असते. शाळेत असताना घराची आठवण आली, मन बेचैन झाले, तर पोरांचं ठरलेलं वाक्य, सर माझ्या पोटात खूप दुखतयं, मी घरी जाऊ का? म्हणजे घरी जाण्यासाठी नाना प्रकारचे बहाणे लहान मुलेच नव्हेतर अगदी मोठी माणसेही करताना आपण पाहिलेली आहेत. घरी आल्यावर पोटचं काय पण सगळे विकार क्षणात होत्याचे नव्हते होतात, एवढी घराच्या प्रेमात, भेटीत शक्ती आहे.
        खेड्यातल्या घराची तर संकल्पना फारचं छान असते. गोठ्यातील गाई अन् घरातील बाईशिवाय घराला घरपण नाही, असं आवर्जून खेड्यात म्हटलं जातं. घर हा शब्दच मुळी व्यापक अर्थाने वापरला जातो. घर म्हणजे फक्त मुक्कामाचे ठिकाण किंवा चार भिंती नव्हेतर, त्या भिंतीमध्ये जिवंतपणा असणं हे घराचे लक्षण आहे. बंगला, हवेली हे फक्त आकाराने मोठे, मात्र प्रेम, आपुलकीनं मोठं, ते घर. पैसा किंवा मोठमोठ्या वस्तू हे घराचे अलंकार नसून घराला घरपण येतं ते आपल्या माणसाच्या वास्तव्यानं. अवाढव्य परंतु माणूसपण हरवलेल्या चार भिंतींच्या इमारतीला घर म्हणता येणार नाही. सर्व गोष्टी विपुल प्रमाणात असूनही जिथं माणसं येण्यासही कच खातात. जिथं माणसं सोडून निर्जीव वस्तुंचेचं जास्त वास्तव्य, ते घर नव्हेतर चार भिंतींची इमारत म्हणता येईल.
       एकत्र कुटुंब विभक्त झाल्यानंतर एकत्रपणातील घराच्या आठवणी मात्र त्यांच्या डोळ्यांतून टीपं घाळताना दिसतात. आता घरांचा आकार वाढला, मात्र प्रेम कमी झाले. भिंती उंचावल्या, परंतु माणुसकीचा पाया मात्र खचला आहे. पूर्वी घरी आल्यावर सगळ्यांच्या प्रेमाचं मोरपीस सर्वांगावरुन फिरल्यावर हायसं वाटायचं, तेच आता पैशाच्या लोभापायी वेगळे झालेले घर एकत्र पणाच्या आठवणींना स्मरून गळ्यात गळा घालून रडत आहे. पूर्वीचे घर छोटे, विचार मात्र मोठे. आज घराचा आकार वाढला, मात्र विचार तेवढेच तोकडे झाले. पूर्वीच्या काळी घर कितीही छोटे असले तरी जेवण करताना दाटीवाटीने, रेटारेटी करून एकत्रितपणे जेवण करत, त्यातच आपलेपणा होता. घर लहान असले तरी आई - बापाचा दबदबा मात्र मोठा होता. त्या छोट्या घरात पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले, पण ते पाहण्यास मात्र आता घर विखुरले. आज धनधान्य तर भरपूर आहे, मात्र आनंद व समाधान गमावले आहे. घराचा एकोपा विस्कटला आहे. बापाचा धाक, आईची माया, भावाची साथ आणि बहिणीचे प्रेम ह्या सर्वांची ओढ लावणारं घर आता क्वचितचं उरलं आहे.
         

               लेखक,
         अजिनाथ सासवडे सर
            लोणी (स), आष्टी
           मो.९४२१३३६०५९


Wednesday, February 12, 2020

शुभमंगल सावधान

मराठी "लेख"संग्रह-👈 येथे टच करून हे उघडू शकता.

"शुभमंगल सावधान"

          एकनाथने वयाची तीसी पार केली,तरी लगीन नाही अजून पोराचं,या विचारातच रामराव जनावरांना हाकलत जांभळीच्या मळ्याकडे केविलवाण्या चेहऱ्याने झपाझप चालला होता,समोरून पिळदार मिशाचा गणपत सावकार येतोय हे पाहून दचकूनच राम राम सावकार,म्हणत हात हृदयाला भिडवले.सावकाराने आपली गाडी काही अंतरावर झाडाखाली उभी केली व काय रामराव बरं हाय नव्हं? असं विचारताच रामराव आपलं मोठं दुःख ओकू लागला.सावकार लय दिवसापासून मुलाला सोयरीक पाहतोय पण कुठं काय मेळ बसंना,असं कष्टी आवाजात सांगू लागला.शेतकऱ्यांचे दुःख लय मोठे हाय सावकार,कुठबी गेला तरी तो तिरस्काराचा धनीच ठरतो.हूकून चुकून एखादं स्थळ आलं तर ते नोकरीच्या शोधात,आल्या पावली मागं जातया.आता मुलाला एवढं शिकवलं पण नोकरी कुठे लागते आपल्या पोरास्नी.माझं पोर शेती बी अगदी जिवाच्या आकांताने करतया सावकार,पण काय करावं,असं म्हणत रामरावचा कंठ दाटून आला.
        रामराव शेजारील गावात एक स्थळ हाय बघ,पण...,पण काय सावकार,बोला,मी माझ्या लेकरासाठी जीव गहाण ठेवायला तयार हाय.तसं नव्हे रे,पण तो मुलीचा बाप खूपच पैशाचा लोभी हाय बघ,म्हणतो कसा,मला दोन लाख रुपये देऊन जो लगीन करून नेईल,त्यालाच पोरगी देईन.असं कुठं असतं का? पण आता काळही तसाच हाय बाबा.तुझा मेळ बसत असेल तर येऊ जाऊन,असं म्हणून गणपत सावकारांनी गाडी चालू केली नि रामरावच्या अंगावर धूर फेकत निघून गेला.रामरावही जड पावलांनी गुरांमागे धावला.
      रामरावची बायको यशोदाही मागोमाग जांभळीच्या मळ्यात पोहोचली. दोघेही कामाला लागली.सावकाराने सांगितलेले स्थळ यशोदाच्या कानावर कसे घालावे ह्या विचारानेच तो धास्तावला होता.जडशिळ जिभेने न राहून त्याने यशोदाला सर्व हकीकत सांगितली.दोघेही लग्नाच्या चिंतेत पुरे बुडाले होते. मुलाचे लग्न तर करावेच लागेल, पण कसे करावे;जवळ पैसा नाही आणि पैसा देऊन लग्न करावयाचे म्हटल्यावर कुठून आणावा पैसा, या विचाराने त्यांच्या हृदयात कपार पडल्यासारखं झालं.यशोदाच्या ओठावर आलेले कडवट शब्द तिथल्या तिथेच विरघळून गेले.काय म्हणावे या लोकांना पैसे घेऊन मुलीचे लग्न करतात;म्हणजे हे का बाप म्हणावे;असे रामरावच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले.
        दिवस मावळतीला गेला होता.रामराव व यशोदा काम आटपून घराकडे निघाली पण मुलगा,लग्न,हाच विचार दोघांच्याही मनात गिरक्या घेत होता.घरी आल्यावर रामराव बाहेरून येतो असे सांगून सावकाराकडे गेला आणि म्हणाला आपण मुलगी पाहून येऊ,पाहू पुढे काय होईल ते. रात्रीला रामरावला सुखाची झोप लागली नाही.सकाळ होताच सावकाराच्या दारात उभा ठाकला.चला सावकार असे म्हणून एकनाथ व त्याच्या मित्राला सोबतीला घेऊन सर्वजण शेजारच्या गावी पोहोचले.मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. मुलगी पसंत झाली.त्यांनाही मुलगा आवडला.मुलीच्या बापाने सपसेल पैशाची मागणी केली नि रामरावला बसल्याजागी दरदरून घाम फुटला.सर्व आटोपल्यावर सावकारासह सर्वजण गावी परतले.यशोदाला घायाळ अंतःकरणाने घडला प्रसंग रामरावाने सांगितला,काहीतरी मेळ जमवावा लागेल यशोदा; आणि पोराला उजऊन काढावे लागेल.हे सर्व ऐकून यशोदालाही कापरं भरलं.यशोदेच्या कृष्णाला एवढ्या बायका मिळाल्या अन इथ माझ्या पोराला एक मिळाना,"नाव सोनाबाई अन हाती कथलाचा वाळा"अशी आपली अवस्था झाली या विचाराने तीही खजील झाली.
        सावकाराकडून व्याजाने पैसा घ्यावा तर परत कसा करायचा,पाऊस पाण्याचा भरोसा नाही आणि शाश्वत उत्पन्न नाही. रात्रीचे जेवण झाल्यावर सावकारच रामरावच्या घरी लग्नाबद्दल काही मसलत झाली की नाही,हे चाचपून पाहण्यासाठी आले.सावकाराने दारातूनच साद घातली,रामराव हाय का घरात... "या सावकार,बसा."पाणी पिऊन सावकार भिंतीला पाठ देत अंग सैल सोडून बसले.यशोदाबाई मुलगी लई चांदणीसारखी हाय, असं म्हणत सावकारानी विषयाला वाचा फोडली.लटकचं हसून यशोदा म्हणाली,हो सावकार ते सगळं खरे आहे,पण आपण पडलो गरीब माणसं, एवढा मोठा पैसा आणायचा कोठून?व्याजाने घ्यावा तर तो परत करायचा कसा?शेतीच्या उत्पन्नाचा काय भरोसा?असे म्हणत यशोदेने पाटलांना दुजोरा दिला.रामराव बघ तुला चांगली आठ बिघा जमीन हाय,होईल उत्पन्न,हळूहळू करायचे चुकते आणि ते दोन बैल आहेत ना तुझे, ते टाक विकून,चांगला पैसा येईल त्यांचा बाजारात.काय लाल्या-छबिल्या नाय नाय अहो सावकार ते बैलं नाही,ती माझी लेकरं आहेत बघा.घरच्या हरण्या गाईला ती दोन खोंड झाली होती,त्यांना खूप कष्टाने मोठे केले आहे.दुसरं तरी आपल्या जवळ काय आहे धनी,त्यांचे चांगले पैसे येतील टाकू विकून,असं म्हणत यशोदाने आवंढा गिळला.रामरावचे मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.काळ किती क्रूर असतो ना;ज्या लाल्या-छबिल्याने आयुष्यभर आपली साथ दिली, शेतात अहोरात्र काम केले,त्यांनाच विकून एकनाथ चा संसार कसा उभा करू?आणि नाही विकू तर काय करू?अशा दुधारी विचाराने त्याचे काळीज करपू लागले."लाल्या छबिल्या" म्हटलं की बैलांनी रामरावकडे प्रेमाने बघावं, त्यांचे पाणीदार डोळे,फुरफुरनारे नाक,उभी डौलदार शिंगे,सर्व एकदम रामरावच्या नजरेसमोर चित्र उभे राहिले."नाही नाही"असे रामराव मनाशीच पुटपुटला.
          सावकार केव्हाच निघून गेले होते.रात्रभर यशोदाने धन्याची समजूत घातली.बैलं परत घेऊ पण मुलाला मुलगी परत मिळणे शक्य नाही.कारण अगोदरच आठ-दहा स्थळांनी नकार दिला होता.
        दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच रामरावने लाल्या-छबिल्याला चारा पाणी भरपूर खाऊ घातले आणि जड अंतःकरणाने बाजारला जाऊन बैल विकून आला.सावकाराकडून काही पैसे,बैलाचे काही आणि इकडून तिकडून दहा-वीस असा मेळ बसवला.पाहुण्यांना सावकाराहाती पैसा व निरोप धाडला.लाल्या-छबिल्या विकल्यापासून रामराव पूरा खचून गेला होता.
        शेतकर्‍यांच्या जीवनाचा खरा सोबती कुणी असेल तर तो म्हणजे त्याची बैलं आणि ते गेल्यावर खानदानी शेतकऱ्याला किती दुःख होते, हे शब्दात सांगता येणार नाही.शेतकऱ्याजवळ बैल नसतील तर त्याचा चौरंग झाल्यासारखे होते.कुणबीक करता येत नाही.ह्या धास्तीनेच रामरावने हाय खाल्ली,नि आपले आता सर्व संपले,असे त्याचे मन त्याला छळू लागले.जणू तो अपमानाच्या अथांग सागरात बुडालाय आणि बुडतचं चाललाय.
          एका रात्री जेवण झाल्यावर रामरावने बाहेरून येतो असे सांगून जांभळीच्या मळ्याचा रस्ता धरला.लाल्या-छबिल्याच्या आठवणीच्या विचार सागरात तो पुरता न्हाऊन निघाला होता.ज्या जागेवर जांभळीच्या झाडाखाली रोज तो लाल्या-छबिल्याला बांधायचा तेथे जाऊन विसावला.
      सकाळी धनी कुठं दिसना म्हणून यशोदाने एकनाथला रानात गेले की काय पाहून ये,असे सांगितले.पोराचं लगीन ठरलयं अनं धनी काय वेड्यागत हिंडतया असे म्हणत यशोदा कामाला लागली.एकनाथ जांभळीच्या मळ्यात पोहोचला अन पाहतो तर जांभळीच्या झाडाखाली बापाचा निष्प्राण देह पडलेला,तोंडाला फेस आलेला.रामरावने आपली जीवन यात्रा केव्हाच संपवली होती.एकनाथने जीवाच्या आकांताने टाहो फोडला. सर्व गाव जमा झाले.धन्याचा गतप्राण झालेला देह यशोदाने पाहिला आणि जोराचा हंबरडा फोडला;धनी...मात्र आता ही आर्त हाक ऐकू न येण्यासाठी रामरावने आपले कान केव्हाच बंद केले होते.अग्नीडाग देऊन सर्वजण घरी परतले.दहावा तेरावा होऊन सव्वा महिना पालटला,आता नवरा तर गेलाच आहे,पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या विचाराने शेवटचा आधार एकनाथ,त्याचे हात पिवळे करावे आणि कर्तव्यातून मुक्त व्हावे;असे यशोदाने ठरवले.
          लग्नाची तयारी जोरात सुरू झाली.लग्नाचा दिवस उजाडला,वऱ्हाडी मंडळी शेजारच्या गावात पोहचली.सूर्य आग ओकू लागला.लग्नघटिका जवळ येऊ लागली.सनई-चौघडे गुमू लागली.तितक्यात मुलीच्या बापाने लग्नखर्चाची यादी पुढे केली.हा पैसा दिल्यावर लग्न लावून देऊ असे लालची बोल बोलू लागला.पैसा गेला व बापही गेला या विचाराने एकनाथ सुन्न झाला.गावातील समजदार मंडळींनी पुढाकार घेतला व वधूपित्याची समजूत घातली.अहो बाप गेलाय मुलाचा,असा अचानक कोठून पैसा आणणार तूम्हाला देण्यासाठी,अगोदरच दोन लाखासाठी जीव खर्ची घातला त्याच्या बापानं,ह्याची थोडी जाण ठेवा आणि भटजी बुवांना द्या परवानगी,होऊ द्या आता,शुभमंगल सावधान.........
                  लेखक,
        श्री.अजिनाथ सासवडे(सर)
          मु.पो.लोणी(स.)आष्टी
            मो.९४२१३३६०५९

Tuesday, February 11, 2020

फारकत

         "फारकत"

(🖕 येथे टच करुन,वाचनाचा छंद जोपासा.)

           संसार म्हटलं की,त्यात सर्वकाही.सुख दुःखाच्या लाटा संसार रुपी समुद्रात नित्याने येत असतात आणि त्यांना पती-पत्नीने धैर्याने सामोरे जायचं असतं,ज्यांना हे जमलं त्यांचे संसार पैलतीरास गेले,ज्यांना नाही जमलं,त्यांनी फारकतीसारखा मार्ग पत्करून आपला संसार धुळीस मिळवला.अशाच एका जोडप्याची ही करून कहाणी"फारकत"या नाटीकामय लेखात उतरवली आहे.ती मांडताना सुखापेक्षा दुःखच जास्त होत आहे,कारण आधुनिक समाजात फारकत घेणे म्हणजे अगदी पोरखेळ झाला आहे.अगदी शुल्लक कारणावरूनही नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन फारकती सारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत.परंतु त्याचा परिणाम दोन व्यक्तीवर किंवा दोन कुटुंबावरच नव्हे,तर सर्व समाजावर होत आहे.याचा आधुनिक पिढीने अनेकदा विचार करून पुढचे पाऊल उचलावे.पती-पत्नी दोघांच्या ताटातुटीने मुलाबाळांची होत असलेली हेळसांड नक्कीच हृदयाला पीळ पाडणारी आहे.

              जोशी गुरुजी व जोशी बाई यांची लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी वनिता हीचा विवाह एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कंपनी कामगार मोहन या युवकाशी होतो.सासरी गेल्यावर लाडाने वाढलेल्या वनिताच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट होईलच,ही माहेरच्यांची अपेक्षा फोल ठरताना दिसत होती.त्याचवेळी जवळ असलेली पैशाची ऊब,जोशी सर व बाई यांना शांत बसू देत नव्हती.

(मोहन-वनिताचा संसार अगदी सुरळीत चाललेला.सुखदुःखाच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी संसार रुपी चादर चांगलीच विणली जात होती.मोहन नियमित कंपनीत जात असे आणि कंपनीतून थकून आल्यानंतर वनिताही आस्थेने चौकशी करत.असा त्यांचा संसार गोडीगुलाबीने चालू होता.परंतु जोशी बाईच्या नाक खुपसण्याने मोहन व वनिताच्या संसारात मिठाचा खडा पडला.)

मोहन: वनिता...अग माझे बूट कुठे ठेवलेत कंपनीत जायला उशीर होतोय,आन पटकन,तुला कितीवेळा सांगितलं,की सकाळी सकाळी घाई असते,बूट,कपडे जिथल्या तिथे ठेवत जा,पण तुझ्यात मात्र काही बदल नाही.

वनिता: हे घ्या...कशाला आरडाओरड करताय,तुम्हाला पाहता येत नाही का?चांगले डोळे आहेत की मोठ मोठे.

मोहन: सकाळी-सकाळी दिवसाची सुरुवात खराब करू नकोस.

वनिता: बरं बरं…..(असे म्हणून नाक तोंड मुरडत स्वयंपाक घरात निघून जाते.)

(मोहन घाईगडबडीने बूट घालून आपल्या कामाला जातो.पण मनात विचार करत होता,दिवसभर राब राब कंपनीत राबायचं आणि सकाळी संध्याकाळी घरी सुख मिळल,या आशेवर राहायचं तर ईथही कटकट.घरात वनिताच्या डोक्यातही विचारांचं काहूर,काय नुसती रोज बडबड,हे नाही केलं?ते नाही दिलं?मी काय मोलकरिन आहे का?फक्त यांची सेवा करायला.दिवसभर पोराचं काम,अन सकाळ संध्याकाळ यांची बडबड,मला पण स्वतःच काही जीवन आहे की नाही?दोघेही दिवसभर मनोमन एकमेकांचे उणेदुणे काढत असतात.तोच विचार त्यांच्या मनात दिवसभर गिरक्या घेत राहतो.सायंकाळी कंपनी सुटल्यावर मोहन घरी येतो,अन् पाहतो तर घरात सर्वत्र अस्तव्यस्त पडलेले कपडे,सगळीकडे अस्वच्छता.निमूटपणे संध्याकाळचे जेवण करतो आणि झोपी जातो.असे रोजच चालू राहते.दोघेही एकमेकांशी धड नीट बोलत नाहीत.की प्रेमाने विचारपूस करत नाहीत.)

मोहन: वनिता आज रविवारची सुट्टी आहे.कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आपण.तेवढाच थोडासा विरंगुळा.

वनिता: नको,माझ्यामागे भरपूर कामं आहेत,तुम्ही जा आपले एकटे.

मोहन: बऱ्याच दिवसापासून पाहतोय मी,तुझं चित्त काही थाऱ्यावर नाही.ही भाजी नको करू म्हटलं तर तीच करणार.काही सांगितलं तर फक्त ऐकून घेणार,करणार मात्र काहीच नाही.काय चाललय तुझ्या मनात,ते तरी सांग.आपण दोघे इथं बाहेर शहरात राहतोय.एकमेकांची काळजी घेतली पाहिजे.ते तर बाजूलाच,तू साधी बोलायलाही तयार नाही.

वनिता: काय बोलायचं,तुम्हाला बायको नको फक्त काम करणारी कामवाली पाहिजे होती,तर लग्नच कशाला केलं?मी सगळं काम निपटायचं,कधी प्रेमाचं बोलणं नाही,की कुठे बाहेर फिरायला नाही.फक्त आणि फक्त ह्या घरात गाडून घ्यायचं.आपलंच मेलीचं नशीब फुटकं,काय कुणाला बोलण्यात अर्थ आहे.

मोहन: म्हणजे तुला काय म्हणायचं,मी तुझ्यासाठी काय करत नाही? हे सगळं कुणासाठी चाललंय?आपला पृथ्वी आणि तू,तुम्हा दोघांसाठी तर सर्व काही करतो आहे.



वनिता: हो कळलं,तुम्ही किती करता आमच्यासाठी.

(असेच बरेच दिवस दोघांचेही मनं धूसपुसत राहतात.कुणी कुणाशी नीटपणे बोलत नाही.घराला घरपण राहत नाही. दोघांनाही एकमेकाबद्दल प्रेमाऐवजी तिरस्कार वाटू लागतो.एके दिवशी वनिता आपल्या आईला फोन लावून सर्व हकीकत सांगू लागते.)


वनिता:(आईला फोन लावते) हॅलो,आई मी वनिता बोलते.

जोशी बाई: वनिता बोल काय म्हणतेस? मोहनची कंपनी काय म्हणते?पृथ्वी कसा आहे?

वनिता: अग काय सांगू तुला, लग्नाच्या वेळी तू तर म्हटली मोहन फार चांगला मुलगा आहे.तुझं नशीब उघडलं वनिता.कसलं आलंय नशीब.मोहन रोज नुसता बडबड करत असतो,बांबूतल्या भुंग्यासारखा आवाज चालूच.लग्नापासून काय काय आणि किती सहन केले ते माझ्या जीवाला माहित.घरी आला की कधी शांत बसत नाही.ते नाही केलं,हे नाही केलं?असं केलं?तसं का केलं?आई मी फार वैतागून गेले बघ,यांच्या कटकटीला.एक दिवस मी माझ्या जीवाचं काही तरी करीन,तेव्हाच मला शांती मिळेल असं वाटतंय.

जोशी बाई: हे बघ वनिता लई टेन्शन घेऊ नको,आम्ही आहोत तोपर्यंत तू बिंदास राहा.तुला जे काही कमी पडेल ते आम्हाला मागत जा,आमच्या दोघांचा लाखभर पगार येतो घरात.सुट्टीच्या दिवशी आम्ही येतो तुझ्याकडे,मग चांगलीच मोहनची कानउघडणी करू.समजतो काय स्वतःला.बरं आता मी शाळेत निघाली आहे,आपण नंतर बोलु,ओके बाय.

(एके दिवशी रविवार गाठून जोशी सर व बाई दोघेही वनिताकडे येतात.मोहन व वनिता दोघांनाही सर्व हकीकत विचारतात.)

वनिता: अग आई,हे माझ्याकडून फक्त काम करून घेतात.जसे यांनी पत्नी नाहीतर कामवाली म्हणून आनलय या घरात.

मोहन:(चांगलेच खडे बोल सुनावतो)अहो हिला पत्नीचे कर्तव्य सुद्धा समजत नाहीत,नवऱ्यासाठी काय केलं पाहिजे,काय करू नये.कसंही वागायचं.मान,मर्यादा सर्व वेशीला टांगायचं,हे असं चालतं का तुमच्याकडे,सासुबाई.

जोशी सर: हे पहा नवरा-बायको म्हटल्यानंतर किरकोळ वाद-विवाद चालूच असतात.जखम झाल्यावर तिला वाढू न देता त्यावर वेळीच फुंकर घातली तर ती लवकर बरी होते.त्या जखमेवर तुम्ही सारखे घाव घालत राहिलात,तर जखम मोठी होऊन कधीकधी जखम झालेला अवयव काढून टाकावा लागतो. त्यासाठी प्रत्येक गोष्टीत खबरदारी घेणे गरजेचे आहे.कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त झाली तर नक्कीच त्याचा वेगळा परिणाम जाणवतो.

जोशी बाई: अहो बास करा,मोहनरावांना ती गोष्ट कळायला नको का?

मोहन: म्हणजे मीच सगळं समजून घ्यायचं, वा धन्य आहात आपण व आपली मुलगी.

जोशी बाई: ते काहीही सांगू नका,घरकाम करण्यासाठी एखादी कामवाली लावा,तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही पाठवून देऊ,पण हे असलं खपवून घेतलं जाणार नाही.

मोहन: तुमच्या असल्या वागण्या-बोलण्याने,तर तिला चांगलीच फुस मिळते.बोला बोला म्हणजे चांगली माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटील रोज.

वनिता: पाहिलं ना आई-बाबा, हे असं यांच रोजच चालू असतं. एवढ्या दिवस मी सहन केलं,पण आता मला सहन होत नाही.

जोशी बाई: जाऊदे सगळं चुलीत,चल तुझी बॅग भर,आमच्याकडेच राहा,यांना खाऊदे हाताने तुकडे करून,त्याशिवाय काही वठणीवर येणार नाहीत.

मोहन: (रागात)हो जा जा.

(वाद अगदीच विकोपाला जातो,वनिता आई-बाबांबरोबर माहेरी येते.दिवसांमागून दिवस लोटले जातात,पण दोघांचाही एकमेकांना कुठला फोन नाही,की काही बोलणे नाही.जोशी बाई व सर हे फार रागातच असतात.दोन-तीन महिने लोटल्यानंतर जोशी बाई म्हणतात पाहिलं का त्याला तुझी गरज नाही राहिली.नाहीतर आला असता नाक घासत आपल्याकडे.जोशी बाई एका वकिलामार्फत मोहनला नोटीस पाठवतात,आमच्या मुलीला तुमच्या बरोबर संसार करताना खूप अत्याचार सहन करावा लागतो.तिची खूप पिळवणूक केली जाते.आणि तसे पाहता तुम्हाला तिची आता गरजही राहिलेली दिसत नाही.आपल्या असल्या वागण्याला कंटाळून तिने तुमच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे,त्याकरिता हा अर्ज पाठवला आहे.त्यावर सही करून तिला आपली परवानगी द्या.मोहन त्याचे आई-वडील सर्वजण त्यांची समजूत घालायला येतात,विनवणी करतात,पण सर्व गोष्टी अपयशी ठरतात.भांडण न्यायालयात जाते.न्यायालयही प्रथम दर्शनी त्यांना एकत्र राहावे,अशी विनंती करते.मात्र वनिताच्या आई-वडिलांचा पैसा त्यांना शांत बसू देत नाही.त्यांना वाटतं आमच्याकडे काय कमी आहे,आम्ही आमच्या लेकीचा व नातवाचा सांभाळ चांगल्याप्रकारे करू शकतो.शेवटी न्यायालयाकडून त्यांच्या जिद्दीपाई दोघांना वेगळे केले जाते,त्यांची फारकत होते.पृथ्वी लहान असल्यामुळे त्याला त्याच्या आईकडेच ठेवण्यात येते.लग्नामध्ये ज्या वस्तू दिल्या होत्या,त्या सर्व वनिताने माहेरी आणल्या तरी चालतील,हे स्पष्टपणे सांगितले जातो.वनिता व तिची आई टेम्पो घेऊन पसारा आणण्यासाठी जातात.टेम्पो दारापुढे उभा करतात.सोबत हमालही आणलेला असतो.)

जोशी बाई: (दारापुढे उभ्या राहून दरवाजा वाजवतात.) कोण आहे का घरात?

मोहन: हा कोण? सासुबाई.

जोशी बाई:(मोहनकडे रागाने पाहत)सासुबाई म्हणण्याचा अधिकार तुम्ही केव्हाच गमावून बसलात.आम्ही सामान नेण्यासाठी आलो आहोत.लग्नामध्ये दिलेले आणि वनिताचे जे काही असेल ते आम्ही घेऊन जाणार आहोत.

मोहन: घर उघडेच आहे,जे न्यायचं असेल ते घेऊन जा.

(जोशी बाई एकेक वस्तू घेऊ लागतात.वनिताचा मात्र हात धजावेना,जे दोघांनी एकत्र उभं केलंय,ते आता एकटीने घेऊन जायचं,या विचारानं ती कासावीस झाली.घरात आल्याबरोबर सहा महिन्यांपूर्वीच्या तिच्या सर्व जिवंत आठवणींना उधान आलं.मन गहिवरलं,गेल्या तीन-चार वर्षात दोघांनी मिळून संसारात जे काही जमवलं होतं,आता त्या सगळ्या एकत्र गोष्टी वेगळ्या होणार,या विचारानं तिच्या नयनांना प्रेमधारा लागल्या होत्या.तिघांचा एकत्र काढलेला फोटो टीव्ही वर ठेवलेला पाहिल्यावर तिला कळाले,की बाकी सगळ्या घरात जळमटं झालीत,पण फोटो मात्र स्वच्छ पूसून ठेवलेला दिसत होता.वनिता हे सर्व पहात होती.किती पहावे आणि किती डोळ्यात साठवावे,याचा मोह तिला आवरता येईना.तितक्यात जोशी बाई वनिताला आवाज देतात.)


जोशी बाई: अगं काय करतेस,मी तीन-चार वस्तू खाली नेऊन दिल्या आणि तू आणखी तिकडेच उभी आहेस.

वनिता: हो आले,सामान काढत होते.

(पुन्हा ती आपल्या विचारात मग्न झाली.का कुणास ठाऊक पण तिचे मन तिला आता सांगत होते.वनिता तू फार मोठी चूक केली आहेस.आयुष्यात प्रेमाच्या माणसाचा सहवास गमावला आहेस.अगं जीवन हे कष्टमयच असतं.पण त्याच्यात रंग भरायला प्रेमाची माणसं नसतील,तर त्या निरंक जीवनाला तरी काय अर्थ आहे.अचानक तिची नजर मोहनकडे गेली,सहा महिन्यापूर्वीचा सशक्त मोहन आज अशक्त झालेला तिला जाणवला.मागच्या दिवाळीला माझ्या हट्टाखातर मोहन व मी नवीन एलसीडी टीव्ही घेऊन आलो होतो.पैसे कमी होते,तर मोहनने स्वतःची अंगठी बँकेत तारण म्हणून ठेवली होती.दोघं सोबत गेलो आणि माझ्या पसंतीचाच टीव्ही खरेदी केला होता.टीव्हीचा रिमोट सदैव माझ्याजवळ असायचा.पण आज टीव्ही आणि रिमोट दोघेही धूळखात पडले आहेत.माझ्याकडे रागाने पाहत जणू मला बोलतच होते.अग किती दिवस साथ दिली आम्ही तुम्हाला,दोघांनी मिळून आम्हाला घरात आणलं आणि आज मोहनपाशी आम्हाला एकटं सोडून चाललीस.किती स्वार्थी आहेस,काय तर फक्त कष्टापाई.अगं आम्ही निर्जीव वस्तूसुद्धा कधी कुणाला सोडून देत नाहीत.म्हणे माणसं भावनिक, संवेदनशील असतात,मग मानव आसूनसुद्धा तू अशी भावनाशून्य कशी झालीस,हेही आम्हाला कळेना.एवढा चांगला घरसंसार बसलेला क्षणात तू होत्याचं नव्हतं केलं,काय मिळवलं आयुष्यात हे सर्व करून'सुख'..!अगं सुख हे,स्वतः कमावून दुसर्‍याला घास भरवण्यात आहे.दुसऱ्यासाठी खूप काही करणं यातच फार मोठा आनंद असतो आणि तो आनंद,समाधान यापासून तू खऱ्या अर्थाने आज पोरकी झालीस‌.कुठल्याही समारंभाला एकत्रितपणे गेले तर त्यातच खरा मोठेपणा आणि समाधान आहे.तेथे अंगावर भरमसाठ अलंकार जरी घालून गेलीस,तरी शेवटी एकटेपणाचे दुःख सोबत असणार.जीवनात जोडीदार नसण्याची किंमत त्यावेळेस कळेल.स्त्रीच्या आयुष्यातला खरा अलंकार तर तिचा पती असतो.तो आज तू गमावला आहेस.
       अचानक मोहनची नजर वनिताकडे गेली.दोघांनी एकमेकांकडे पाहिले.क्षणात त्यांचे डोळे प्रेमाची भाषा बोलू लागले.डोळ्यांनी एकमेकांना हळुवारपणे आलिंगन दिले होते. त्यांच्या जीवनातील पूर्वीच्या आठवणींना डोळे उजाळा देऊ लागले.तीन-चार वर्षाच्या प्रवासातल्या किती किती नव्हे त्या आठवणी आज जिवंत झाल्या होत्या.डोळ्याद्वारे वनिताचे मन केव्हाच मोहनच्या मिठीत गेले होते.कित्येक वेळा एकमेकांचा हात प्रेमाने हातात घेऊन सुखदुःखाच्या गुजगोष्टी केल्या होत्या.एकमेकांच्या साथीने कैक संकटांना निधड्या छातीने सामोरे जाण्याचे बळ मिळत होते. 
           जीवनरुपी समुद्रात वाहत जाणाऱ्या दोन ओंडक्यांनी काही काळासाठी एकमेकांना साथ दिली,पण आज अचानक फारकत नावाच्या तुंबळ लाटेनं जेव्हा ते वेगळे होत होते,तेव्हा एकमेकांकडे आसुसल्या नजरेनं व्याकूळ होऊन पाहत होती.की आता आपली भेट पुन्हा कधी?हे आता कुणाला माहीत?लग्नाच्या सात जन्माच्या फेऱ्यांनी एकत्र बांधलेल्या दोन जीवांना काही वर्षातच वेगळं केलं होतं.मोहनचे डोळे वनिताच्या डोळ्याशी अधीरतेने बोलत होते,नको जाऊ सोडून हा सर्व संसार,नको करू हेळसांड त्या चिमुकल्या जीवाची.

जोशी बाई: अगं वनिता, चल खुप उशीर झालाय…

वनिता:(डोळे पुसत) हो…..

(वनिताचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.आपण फार मोठी चूक केल्याचे दुःख तिला जाणवत होते.जड अंतःकरणाने दरवाजातून बाहेर निघत असताना,बाजूलाच बसलेल्या मोहनच्या खुर्चीला वनिताचा पदर अडकला.कदाचित तो सांगत होता,की माझी गाठ याच्याशीच बांधलेली आहे,नको ती जबरदस्तीने तोडायचा प्रयत्न करू.फारकत नावाच्या लाटेनं जरी आज त्यांना वेगळं केलं असलं,तरी मनाने मात्र ते वेगळे होऊच शकले नाहीत,कायमचे एकच राहिले....)


              लेखक,
       श्री.अजिनाथ सासवडे (सर)
        मु.पो.लोणी(स),आष्टी
        मो.९४२१३३६०५९
        

Wednesday, February 5, 2020

माझा महाराष्ट्र महान

"माझा महाराष्ट्र महान"


       मराठी मायबोली असलेला शूरवीर मावळ्यांचा प्रांत म्हणजेच आपला महाराष्ट्र.महाराष्ट्राची अगदी प्राचीन काळापासून पराक्रमी लोकांचा वारसा लाभलेला प्रदेश म्हणून ख्याती आहेत.दऱ्याखोऱ्यातील मावळ मातीतील उमद्या मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक या मातीवर झाला,तेव्हा कुठे ही भूमी गुलामीतून मुक्त झालेली आहे.महाराष्ट्राची भूमी संतांचे थोर कार्य आणि विवेकी विचाराने पवित्र झालेली भूमी आहे.संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत गाडगे महाराज,संत एकनाथ महाराज,संत जनाबाई ह्या थोर संतांच्या विचार व वाणीने महाराष्ट्राला पवित्र आणि मंगल केले आहे.हिंदू,मुस्लिम,सिख,इसाई अशा विविध धर्माचे आणि अठरापगड जातीचे लोक आज या ठिकाणी गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.अशा प्रकारे विविधतेतील एकता या ठिकाणी पहावयास मिळते.
            छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांसारखे महापुरुष या महाराष्ट्र देशांमध्ये धर्म रक्षणार्थ तथा धरणी मातेच्या उद्धारासाठी जन्मास आले.जगावे कसे हे शिवरायांनी जगाला आपल्या आचरणातून दाखवून दिले,तर मरावे कसे हे संभाजीराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.कैक परकीय सत्तांनी या महाराष्ट्रावर अत्याचार केला,पण त्याचा बीमोड करण्यासाठी येथे थोर महापुरुषांनी जन्म घेतला.इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच,डच तसेच मोगल,कुतुबशाही,आदिलशाही या सर्वच सत्तांनी महाराष्ट्राला अजगरासमान गिळंकृत करू पाहिले.पण गरुडाप्रमाणे उत्तुंग भरारी घेणारा हा महाराष्ट्र,कधी कुण्या परकीय आजगररूपी सत्तेपुढे नमला नाही,उलट त्यालाच आपल्या पंजात पकडून त्याचे नामोनिशान मिटवणारे शूरवीर या मातीत निपजले.महाराष्ट्र हा कणखर मनाच्या आणि निधड्या छातीच्या शूरवीर मावळ्यांचा.सुवर्ण अक्षरात ज्यांचा इतिहास लिहून ठेवावा अशी माणसे या मातीत जन्माला आली आणि मातीसाठी लढता लढता त्यांनी वीरमरण पत्करले.कितीही अन्याय,अत्याचार झाले तरी सर्व अत्याचारांना मोडीत काढणारा महाराष्ट्र नक्कीच अभिमानाने आज उभा आहे.
            शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचे या मातीत बीजारोपण झालेले आहे आणि आज त्याच विचारांचा वटवृक्ष अभिमानाने ताठ उभा आहे.मराठी मातीतल्या प्रत्येक माणसाच्या मनात शिवविचारांचा जागर रोजच होत असतो. महाराष्ट्रातील प्रगल्भ विचारांचा वसा लाभलेला माणूस अन्यायापुढे कधी झुकला नाही,की कुणापुढे नमला नाही.तो वंदन करतो फक्त धरणीमातेला आणि भगव्याला.
         महाराष्ट्राला विविध थोर कवी,लेखक,साहित्यिक यांचा वारसा पूर्वापार लाभलेला आहे आणि त्यांच्या सडेतोड लेखनीने दीनदुबळ्या,तळागाळात खितपत पडलेल्या समाजाचा उद्धार होऊन तो आज विकासाच्या मार्गावर रूढ झाला आहे.समाजाच्या विकास प्रक्रियेत या लोकांनी मोलाची पायाभरणी केली आहे.
       स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच मातीत जन्म घेतला आणि अखंड देशातील स्त्रीयांना शिक्षणाची गंगा खुली केली.शिक्षणाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्त कधी कुणापुढे नतमस्तक होत नाही,हे महात्मा फुले यांनी ठणकावून सांगितले.आज याच महाराष्ट्राची संपूर्ण देशातच नव्हे नव्हे तर विश्वात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख आहे.संपूर्ण जगातून आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात.संगणक क्षेत्रात घडून आलेली क्रांती याच महाराष्ट्रातील विजय भटकर नावाच्या युवकानी घडवून आणली.
       संपूर्ण देशात सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,औद्योगिक सर्व क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर पाऊल टाकत आले आहे.उद्योगधंदे,व्यवसाय,शेती,शिक्षण,माहिती तंत्रज्ञान,विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध तज्ञांनी देशासाठी मोलाची कामगिरी केली आहे.पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र नक्कीच आज देशाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो.मुंबईसारखे जागतिक उंचीचे शहर महाराष्ट्रात खुमासदारपणे उभे आहे.भारत देशाचे प्रवेशद्वार'गेटवे ऑफ इंडिया'महाराष्ट्रातच आहे.भारताची आर्थिक राजधानी अर्थातच मुंबई महाराष्ट्रात आहे.देशातले जास्त लोकसंख्येचे शहर म्हणून दिल्लीनंतर आज मुंबईच नावारूपाला येऊ पाहत आहे.
          महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरडोई अन्नधान्य उत्पादन निश्चितच जास्त आहे.शेती क्षेत्रातही हरितक्रांतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून मराठी माणसाने भरपूर प्रगती केली आहे.जगातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अन्नधान्य,फळे,भाजीपाला इत्यादी उत्पन्न निर्यात होत आहे.फुलशेती,फळशेती ही तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नगदी रक्कम तयार करून देणारी आहे.दुग्धव्यवसायात धवलक्रांती होऊन दूध उत्पादनात भरमसाट वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.
          शिक्षण क्षेत्रातही महाराष्ट्र वरच्या स्थानावर आहे.आज सक्तीच्या शिक्षणामुळे तळागाळातील दीनदुबळ्या लोकांनाही शिक्षण मिळू लागले आहे आणि या सर्व शिक्षणाच्या चमत्कारामुळे महाराष्ट्र प्रगतीच्या द्रुतगती मार्गावर विराजमान आहे.आज शिक्षण घेऊन आपलीच महाराष्ट्रातील मुलं बाहेरच्या देशात चांगल्या प्रकारचे काम करून नावलौकिक मिळवत आहेत.
       महाराष्ट्रातील देहू,आळंदी हे आज अध्यात्माचे विद्यापीठ म्हणून ओळखले जातात.महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून अध्यात्माचे धडे गिरवण्यासाठी अध्यात्मप्रेमींची आज देहू,आळंदीमध्ये रेलचेल दिसून येते.तुळजापूर,पंढरपूर,कोल्हापूर,त्र्यंबकेश्वर,पैठण,देहू,आळंदी,माहुरगड,सप्तशृंगी अशी सगळी मराठी माणसांची कुलदैवतं येथे एकवटलेली आहेत.लोकनाट्य,तमाशा,कोळीगीत,पोवाडे,भजन,कीर्तन अशा विविध पारंपारिक लोककला महाराष्ट्रात आजही जीवंत आहेत.महाराष्ट्रातील जनतेचा पेहराव हा अतिशय रुबाबदारपणाचा आहे.महाराष्ट्रातील माणसं ही डोंगरदऱ्यात,कडेकपाऱ्यात राहणारी अगदी दगडासारखी कणखर आहेत.एकमेकांबरोबर रोज भांडतील पण संकट आल्यावर मात्र एकमेकांना मदतीचा हात द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत,हीच खरी मराठी माणसं आहेत. महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हटलं,म्हणजे विश्वासाचे प्रतीक.मराठी माणूस म्हटलं की शौर्याची निशानकाठी हाती घेतलेला.कुठल्याही क्षेत्रात पराक्रम गाजवावा तो याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनं.संरक्षण दलामध्ये तर महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी मराठाबटालियन सुद्धा उभी केलेली आहे.याचा अर्थ महाराष्ट्रातील माणूस शूरवीर,पराक्रमी,निडर अशीच त्याची ख्याती संरक्षण क्षेत्रांमध्येही आहे.हसत हसत मरण पत्करीन पण शत्रूला शरण जाणार नाही,की कोणाची लाचारी पत्करणार नाही,हा खरा मराठी माणूस.
        शेती,उद्योगधंदे सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने भरपूर प्रमाणात प्रगती केली आहे.कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे मोठंमोठे उद्योगधंदे आज महाराष्ट्रामध्ये उभारले आहेत.त्याद्वारे कित्येक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाचे स्थिरीकरण झाले आहे.मोठंमोठ्या नद्यांवर बांधलेल्या धरणामुळे शेतीसाठी तसेच कारखान्यासाठी पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.पाण्यावरच विद्युत निर्मितीमुळे विजेचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.
           आज महाराष्ट्रातील महिलाही सर्वच क्षेत्रात पुढे सरसावल्या आहेत.विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला दिसत आहे.विविध प्रकारचे उद्योगधंदे असतील,संरक्षण दल असेल,किंवा परिवहन मंडळ असो सर्व क्षेत्रात महिला आज आपले कार्य नेटाने पुढे चालवत आहेत.खाजगी क्षेत्र असो वा सरकारी,महिला आज आपलं अमूल्य असे योगदान देताना दिसत आहेत.राजमाता जिजाऊ भोसले,अहिल्यादेवी होळकर,सावित्रीबाई फुले,सिंधुताई सपकाळ,प्रतिभाताई पाटील अशा थोर स्त्रिया याच महाराष्ट्रात जन्मास आल्या.महाराष्ट्राचे नाव त्या आकाशाच्या उंचीला भिडावे इथपर्यंत घेऊन गेल्या.अशा सर्व गोष्टीत सुजलाम-सुफलाम,प्रगती पथावर रूढ असलेल्या महाराष्ट्राने,देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपले नावलौकिक मिळवले आहे.म्हणूनच अभिमानाने महाराष्ट्र भूमीला म्हणावेसे वाटते,"वंदे मातरम्,वंदे मातरम्"..!


                लेखक,
         श्री.अजिनाथ सासवडे (सर)
          मु.पो.लोणी(स),आष्टी
          मो.९४२१३३६०५९.

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...