सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..
"तीन भावांची किमया"
भाऊ-भाऊ म्हटलं का एकमेकांविषयी तू-तू, मी-मी, हेवेदावे हे अगदी वाऱ्यासारखे येतात नि जातात. एकाजवळ असलेली एखादी वस्तू दुसऱ्यांनाही हवीच हवी. मग ती छोटी असो अथवा मोठी. नमतं घेण्यास कुणीही तयार नसतो. फार फार तर आजचं उद्यावर ढकललं जाईल. पण एक दिवसाची उदारता पाण्याच्या बुडबुड्यासारखी अल्पावधीतच नष्ट होणारी. मला मिळो अथवा न मिळो, पण त्याला द्या म्हणणारे राम-लक्ष्मण क्वचितचं. प्रत्येकजण स्वार्थ, मीपणाच्या पाण्यात डुबक्या मारणारा. स्वत:चे लाड पुरवून घेण्यात जो तो सरसावलेला. हरेकजण स्वतःचा चांगुलपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन भाऊ देखील त्याला अपवाद कसे ठरतील?
प्रत्येक ऋतूची एकमेकांशी जणू चुरसच लागलेली, की कोण श्रेष्ठ? आपल्या एकट्यामुळेच सजीवसृष्टी सुरळीत चालत असल्याची सगळ्यांची मनोधारणा. माझ्याशिवाय सजीवांचे जगणे कठीण. मानवजातीसह सगळ्याच सजीवांसाठी आपण खूप महत्त्वाचे आहोत, या आंतरिक स्वाभिमानयुक्त भावनेचा प्रत्येकाला हेवा. थोरला कोण? अन् धाकटा कोण? या शंकायुक्त प्रश्नाविषयी सगळ्यांच्याच मनात अराजक. हे पाहुण्यांसारखे येतात न् जातात. यांचं येणं-जाणं हे सगळ्यांच्या मनाला हुरहूर लावणारं. न सांगता आश्चर्याचा धक्का देत दाखल होणार अन् पुन्हा सगळ्यांची नजर चुकवून कधी परागंदा होतील याचाही भरवसा नाही. एकदा रमल्यावर जास्तीचा काळ पाहुण्यांसारखेच त्यांचे महत्त्व कमी करणारा नि लोकांच्या नजरेत कमीपणाची भावना उत्पन्न करणारा. तिरस्कारयुक्त करड्या नजरा पडून नाराजीचे सूर उठू लागले, की आपण आपसुकच ओळखून घ्यायचं बहुदा आपली निघण्याची वेळ झाली. जास्त दिवसाच्या पाहुण्यांना जसे मान, मरातब राहत नाही. पाहुण्यांसमोर पती-पत्नी एकमेकांवर तोंड टाकू लागले, की पाहुण्याने समजून घ्यावे, बहुतेक हा आपल्याला निघण्याचा संकेत आहे. हे भांडण यांचे नसून आपल्यावरील रागाचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटत आहे. तसे जास्त दिवस स्थिरावल्यावर यांचे मोल कमी होऊन जाते. रोजच मिळणाऱ्या एखाद्या रूचकर पदार्थाला पाहूनही माणसं जसे दिवसागणिक नाक-तोंड वाकडं करतात, तसेच काहीसे यांच्याबाबतही होत असावे.
वसंतातील नवलाई घेऊन येतो तो उन्हाळा. सगळ्यांनाच या नाविन्याची ओढ. थंडीने गारठलेल्या चराचरातील सगळ्याच चेताचेतांना उब देतो तो उन्हाळा. झाडा-फुलांची थंडीने एकमेकांना बिलगून असलेली पानं टवकारून पाहू लागतात. माणसांना हा जास्तीचे काम देत नाही, आरामच आराम. ह्याची जास्तीची आस लागलेली असते, ती लग्नाळू तरूणांना. शाळेतील पोरांसह गुरुजनांचा तर हा फारचं लाडका. हा दाखल होतोय कुठं नाही की यांना सुट्ट्या मंजूर. मग सगळेच आनंदाने फुलपाखराप्रमाणे बागडण्यासाठी मोकळे. वर्षभर कष्टाने शिणलेल्या बळीराजाचे मन याच्या आगमनाने झाडाच्या फांदीवर हेलकावे घेणाऱ्या पक्षागत आनंदाने डोलू लागते. कामातून उसंत मिळते, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतात, दिलजमाई होते. दूरदेशी गेलेले सरकारचे गुलाम (नोकरदार) गावाकडे येऊन सगळ्यांच्या गाठीभेटी घेतात, विचारपूस करतात. सगळ्यांवर प्रेमाचा वर्षाव करणारा उन्हाळा कितीही तापट असला तरी याच्या काळात सगळ्यांचेच खिसे मात्र थंडावलेले असतात. तरीही एक अनामिक समाधान काळजात घर करते, की याच्या निमित्तानं प्रेमाच्या माणसाची गळाभेट झाली. आपलेपणाची जाणीव करून देतो तो उन्हाळा. आपल्यांना आपलसं करून प्रेमाचा धागा घट्ट करतो. कितीही तापट असला तरी आपल्या भेटीला येताना थंडगार फळांची अमृतधारा घेऊनचं हजर होतो. आंबा, टरबूज, खरबूज, संत्रा, मोसंबी अशा नानाविध प्रकारच्या आंबटगोड फळांच्या मेजवानीने भरलेले ताट आपल्यासमोर मांडतो. सूर्यदेवाचं याच्यावर भलतचं प्रेम. उन्हाळा आणि सूर्यदेव एकमेकांच्या हातात हात घालूनचं चालतात. यांची मैत्री जगजाहीर. थकलेल्यांसाठी उन्हाळा हा एक सुवर्णकाळ. उन्हाळा सदैव तापटपणाचा सदरा घालून असला तरीही जास्त रममाण झालेला पाहून पावसाळ्याला पोटशूळ उठतो. तो अचानक मध्येच वळवाच्या रूपानं हजेरी लावतो अन् उन्हाळ्याला काढता पाय घेण्यास भाग पाडतो. आपण लवकरचं दाखल होत असून सर्वांनी आपापली कामं तातडीनं उरकून टाकावी, ही वार्ता देऊन जातो.
उन्हाळा जडपावलांनी जातोय कुठं नाहीतर अगदी धूमधडाक्यात वाजत-गाजत नवरदेवासारखा येतो, तो पावसाळा. मंडपाच्या दारात नवरदेव यावा अन् त्याचे रूप पाहण्याकरिता जमलेल्या आसनस्थ मंडळींनी गरागर माना वळवाव्यात, त्याप्रमाणे याचे सर्वांनाच विलक्षण आकर्षण. उन्हाळ्यात घामाघूम झालेला पावसाळ्याच्या थंडगार शीतल सरींची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. पावसाळा शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता पाहुणा. हा आला म्हणजे याचे स्वागत कशाने करू न् कशाने नाही असे शेतकऱ्याला होऊन जाते. घरात, आडोशाला बसलेल्या सगळ्यांना याच्या येण्याची थंडगार वार्याच्या रूपानं चाहूल लागली, की रस्त्यावर, अंगणात येऊन सगळेजण अगदी आनंदाने त्याचे नाचून, गाऊन स्वागत करतात. काहीजण त्याच्या प्रेमसरीत मनसोक्त चिंबचिंब होईपर्यंत न्हाऊन घेतात. ढगांचे अक्राळ-विक्राळ रूप हलक्या काळजाच्या माणसाला धडकी भरवणारे. ढगांमध्ये धुमश्चक्री सुरू झाल्यावर वीज भीतीपोटी धरणीचा आश्रय करत होत्याची नव्हती होऊन जाते. ढगांच्या संघर्षातून त्यांचे अश्रू धाराच्या रूपानं वाहू लागतात. याचा डांगोरा जास्त, काम कमी. आसमंतात बेछूट गोळीबार करणारा हा. याचा नेम क्वचितच लागतो, नाहीतर एरव्ही विनाकारणचं बोंब उठवून आपली शक्ती खर्ची घालतो. पण याने जर एखाद्या वाटसरूला अरण्यात, रस्त्यात मधेच गाठले, तर त्याला मात्र पुरता सळो की पळो करून बेफाम झोडपून काढतो. गवळणींची वाट कृष्णानं अडवावी न् डोक्यावरचे मटके फोडून त्यांना दह्या-दुधानं अंघोळ घालावी तसे वाटसरूंना ढगांचे माठ फोडून पावसाळा अंघोळ घालतो. वाटा अडवण्यात हा फारच निष्णात. 'कहीपे निगाहे कहीपे निशाना' असा हा आगळावेगळ्या गुणावगुणांचा. दिसतो दुसरीकडे आणि अचानक प्रकट होतो तिसरीकडेच. भलतीकडेच जाऊन नदी, ओढ्याच्या मार्गाने पाण्याच्या रूपात अचानक कधी वाट अडविल याचाही नेम नाही.
हा शेतकऱ्यांना कधी शांत बसू देत नाही. एक पाय रोवत एक उपसत हा शेतकऱ्यांना घामेघूम करून टाकतो. नोकरदारांना कधीकधी उसंत देतो. याचे निमित्त करून शाळेतील मुलं घरी खेळण्याचा भरपूर आनंद घेतात. याच्या आगमनाचे कारण शाळेला दांडी मारण्यापूरतं पुरेसं ठरतं. झाडाझुडपांचं वर्षभराचं कळकटलेलं अंग धूवून त्यांना स्वच्छ आंघोळ घालण्याचं काम याच्याकडे ठरलेलं. याचाही अतिरेक झाला की, रुंदावलेले चेहरे हळूहळू बारीक होऊ लागतात. कधी एकदाचा जातो म्हणून मनोमन खडे फोडतात. कित्येकांना तर मोकळा श्वासही घेता येत नाही, गुदमरल्यासारखे वाटू लागते. इकडे-तिकडे कामानिमित्त घराबाहेर पडायचं म्हटल्यावर अगदी जीवावर बेतल्यासारखं होतं. छत्री, रेनकोटांनाही सोन्याचे दिवस येतात. ढाल म्हणून छत्री, रेनकोट यांचा याच्यापासून बचाव करण्यासाठी उपयोग करावा लागतो. एकदा गेल्यावर मात्र मनाला फार चटका लावून जातो, की आता परत कधी येणार? झाडंझुडपं, वेली याच्या येण्यानं जेवढे आनंदी झालेले असतात, त्यापेक्षा कैकपटीनं हा जाताना पाहून दुःखी होतात.
हिवाळा हा फुलासारखा नाजूकच. अलवार पावलांनी कधी येतो न् घरात शिरतो याचा पत्ताही लागू देत नाही. पावसाळ्याच्या परतीची न् याच्या आगमनाची वाट एकच. कधी कधी हा पावसाळ्यालाही माघारी चालण्याचा आग्रह करतो. नव्हे-नव्हेतर घेऊनही येतो. पावसाळ्याची परतीची चाल अगदी संथ. त्याला घाटात विसावा घेईपर्यंत हिवाळा त्याच्या अगोदर येऊन धडकतो नि नंतर कधी कधी एखादी वारी पावसाळ्याचीही होऊन जाते. गाठोड्यात मागील वर्षी बांधून ठेवलेल्या स्वेटरचा शोधाशोध केव्हा सुरू होतो, याचा पत्ताही लागत नाही. अंगावर स्वेटर चढल्यावर कळते, की हिवाळा नामक पाहूना घरात येऊन थबकला आहे. त्याच्यापासून आपला बचाव करायचा असेल तर अंगावर स्वेटर, हातापायात मोजे, नाका-कानाभोवती मफलर हा सगळा साज त्याच्याशी दोन हात करण्यासाठी. पण कितीही सावध राहण्याचा प्रयत्न केला, तरी तो तुमच्या गालांना, ओठांना आपल्या हाताने ओरबाडल्याशिवाय सोडत नाही.
हिवाळ्याची अनामिक ओढ लागलेली असते ती गरम कपडे विकणाऱ्या दुकानदारांना. वर्षभर दुकानात आराम केल्यामुळे वर्षभराच्या कामाची भरपाई या दिवसात करण्याचा त्यांनी जणू पणचं केलेला असतो. एरव्ही शे-दोनशे रुपयांचा माल ह्या दिवसात दामदुपटीने व्याजासह वसूल केला जातो. हा पाहुणा स्वतःच्या अंगावर उन्हाची लकेर सुद्धा पडू देत नाही. तिमिरातच याच्या सर्व गोष्टी घडत असतात. याच्यापुढे सूर्यदेवाची प्रखरताही थरथरू लागते. हिवाळा घरात शिरला की तो घरच्या लोकांनाही नादी लावून बाहेर निघू देत नाही. घरातच गरमागरम चहा, भजी असे पदार्थ आपल्या सेवेसाठी करायला भाग पाडतो. नाक्यावर, रस्त्याच्या कडेच्या ठेल्यावर गरमागरम भाजलेली कणसं, शेंगा, भजी, समोसे, वडापाव, चहा या पदार्थांना बेसुमार मानमरातब मिळू लागतो. काम कमी नि उचापती जास्त हेचं याचं वैशिष्ट्य. चहा तर त्याचा जीव की प्राण. पाणी आणि हिवाळा यांचं विळ्या-भोपळ्याचे वैर. त्यांची गाठभेट अगदीच दुर्मिळ. गरमागरम पदार्थांना सोन्याचा भाव येतो.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वाटणी पुरते भाऊ, बाकी गुणावगुण एकमेकांच्या विरुद्ध. भाऊ-भाऊ अन् वाटणी असमान अशक्य. जेवढे एकाला तेवढे दुसऱ्यांनाही. त्यामुळे तर कदाचित भावाला वाटेकरी हा समानार्थी शब्द मिळाला असावा. असे हे तीन भाऊ वर्षातले दिवस सुद्धा समसमान वाटून घेतात. कुणाला कमी नाही, कुणाला ज्यादा नाही. या तिघांची गाठभेट एकावेळी तशी दूर्लभच. नावाला भाऊ असून काय कामाचे? कर्मतर परस्परविरुद्ध. या तीनही भावांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपली एक वेगळीच छबी जनमाणसांच्या मनामध्ये निर्माण केली आहे. त्याचे दर्शन लोकांना ते वेळोवेळी घढवतात. कुणाला कमी तर कुणाला जास्त मान त्यादैनिकातसोलार्यामुळे प्राप्त झालेला. पण ते मात्र आपले गुणावगुण कधी सोडत नाहीत.
लेखक
अजिनाथ सासवडे
मो.९४२१३३६०५९