"व्यक्ती तितक्या प्रकृती"
संपूर्ण विश्वभ्रमण केले तरीही रंगरूपाने तंतोतंत जुळणाऱ्या दोन एकसमान व्यक्ती भेटणे निश्चितच दुर्धर आहे. कदाचित दिसण्यात एकसारखेपणा असेलही परंतु असण्यात वेगळेपण हमखास सिद्ध होईल. अगदी हुबेहुब दिसणाऱ्या जुळ्या भावंडात देखील बाह्यांगाखेरीज अंतरंगात तफावत असल्याबिगर राहत नाही. स्वार्थी-निस्वार्थी, प्रेमळ-कठोर, अबोल-बोलका, भित्रा-धाडशी या अन् अशा अनेक गुणावगुणांमध्ये त्यांच्यात भेदाभेद नक्कीच जाणवेल. काही व्यक्ती अगदी वामनमूर्ती तर काही खूपच उंच. काही प्रसन्न मुद्रेच्या तर काही अवघ्या जगाचं संकट त्यांच्यावरचं कोसळल्यावाणी उदास चेहरा मिरवत असतात.
व्यक्ती-व्यक्तींमध्ये नाना प्रकारचे अंतर स्थळ-कालपरत्वे आपल्याला जाणवते. ऑफिसात काम करणाऱ्या व्यक्तींपेक्षा शेतात काम करणाऱ्या व्यक्ती हसत मुखाने नजिक आलेल्या व्यक्तीचे स्वागत करतात. ऑफिसात काम करणाऱ्या व्यक्ती नेहमीच तुसडेपणाने वागताना दिसतात. एकांतवासात त्यांच्या चेहऱ्यावरची कळी खुललेली असते, परंतु त्यांच्याकडे कुणी माणूस येताना दिसला, की त्यांचा चेहरा आकाशातील ढगासारखा हळूहळू काळवंडू लागतो. सात जन्माचे वैर असल्यागत ते त्याच्याकडे तिरस्कारयुक्त नजरेने पाहत राहतात. स्वतःचे काम इमानेइतबारे करण्याऐवजी वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यात नि इतरांच्या कागाळ्या करण्यातचं कित्येकांचा वेळ निघून जातो. हरेकाला वाटते की या जगात सगळ्यात जास्त कामाचा उपद्व्याप आपल्याच नशिबी आला आहे. आपल्याशिवाय कुठलेच काम होणे शक्य नाही, हा त्यांचा गोड गैरसमज कुणी दूर करू शकला तर नवलचं. बहुदा वाणाने नव्हेतर गुणाने समान असणाऱ्या व्यक्तींची रास लवकर जुळते. गुणाने सारख्या असणार्या व्यक्तींची मैत्री सदोदित टिकून राहते. एकमेकांचे उणेदुणे काढणे त्यांना न परवडण्यासारखे असते, कारण दोघेही एकाच माळेत गुंफलेले असतात. सडपातळ बांधा असलेल्या व्यक्तीला शरीराने धष्टपुष्ट व्यक्तींविषयी आकर्षण राहते. आपण त्याच्यासारखे ऐटबाज असतो तर किती बरे झाले असते, ही बोचणी लावणारी गोष्ट त्यांच्या मनाला क्षणात स्पर्शून जाते. शरीराने चौरसाकार धारण केलेल्या व्यक्तींना बहुदा पिळदार शरीरयष्टीच्या व्यक्तींविषयी अनामिक ओढ लागून राहते.
काही व्यक्तींचे जीवन एवढे निरंक असते, की त्यांना जीवनात सुख अन् दुःख, आपला अन् परका या गोष्टींनी काही फरक पडत नाही तथा हे भावचं जणू त्यांच्या आयुष्यातून परागंदा झाल्यासारखे असतात. कुठल्या प्रसंगात कोणती प्रतिक्रिया द्यावी याचे त्यांना भानही उरलेले नसते. फक्त शून्य नजरेतून ते पाहत राहतात. 'जन्माला आला हेला नि पाणी वाहून मेला' अशी यांची गत. जीवन मिळाले म्हणून ते ढकलत राहायचे. दुसऱ्यांसाठी तर सोडा, पण स्वतःसाठी काही करण्याचीही यांच्याकडे उदारता नसते. फक्त नि फक्त काम भले अन् हे. सामाजिक, नैतिक जबाबदारी राहूद्या कौटुंबिक जबाबदारीही यांनी पूर्णपणे झिडकारून टाकलेली निदर्शनास येते. जीवनात त्याग करण्याजोगी कुठली बाब नि भोगण्याजोगी कुठली? यांमधील अंतर न कळण्याइतपत यांचे आपल्या बुद्धीशी हाडवैर. सर्वांगाने परिपूर्ण असून देखील केवळ समाजाच्या विचारापोटी हे आपले आयुष्य रडतरावासारखे जगतात. जीवन जगताना कुठे हात सैल सोडावा अन् कुठे खमता घ्यावा याचा ताळेबंद यांना कधीच जमत नाही.
काही व्यक्ती तर एवढ्या प्रचंड पैशाच्या लोभी की त्यांना पैसा हेच जीवन वाटते. पैशाअभावी ते क्षणभरही तग धरू शकत. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडू लागतो त्याहून अधिक बेचैनी यांना बकोटीला पैसा नसल्यावर सुटते. त्यांच्या जीवाची नुसती घालमेल होत राहते. पैशाची उभ असली तरच त्यांना हायसं वाटतं नाहीतर जीवन निरर्थक वाटते. आई-वडील, पत्नी, मुलं या सर्वांहून अधिक पैशावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कितीतरी आकृत्या पावलोपावली भेटतात. प्रेम, ममत्त्व, आपलेपणा, दया या शब्दांना त्यांनी स्वत:च्या शब्दकोशातून केव्हाच हद्दपार केलेले असते. फक्त स्वतःच्या नावे पैसा असला म्हणजे झालं. परगावी गेल्यावर दिवसभर वणवण अन्नपाण्याबिगर भटकतील पण चार पैशाचं काही विकत घेऊन स्वतःच्या पोटाला खातील तर शपथ.
काही महाशयांनी एवढा एकलकोंडेपणा अंगिकारलेला, की इतरांबरोबर चौकशीवजा हिताफाराचे दोन बरे-वाईट शब्द बोलतील तर यांना महापाप लागण्याची शक्यता. फक्त मी न् माझे यापलीकडे यांना काहीही सुचत नाही. दुसऱ्याची उन्नती होत असेल तर काहींना असा पोटसूळ सूटतो, की त्यांचं चित्त थाऱ्यावर राहत नाही. श्रीमंत झाला तर दोन नंबरची कमाई आहे त्याला नि गरीब राहिला तर दळबद्री, बेअक्कल आहे, अशा ठेवणीतल्या मोठमोठ्या विशेषणांची पोटतिडकीने फैर झाडतात.
मी तर काही अशी माणसं पाहिली, की ज्यांनी आयुष्यात इतरांना नावं ठेवण्याखेरीज काही केलं नाही. सगळ्यांना उठता-बसता नावं ठेवणं जणू यांच्या हक्काचा मामला आहे. काही व्यक्तींशी आंबट-गोड कसेही बोला पण कुत्र्याच्या शेपटागत यांचं बोलणं कायमचं वाकडं ते वाकडंच. सरळ बोलतील तर ते महा पातकाचे धनी होतील, अशी जणू त्यांना भिती असते. दुसऱ्याच्या पोळीवरचं तूप आपल्या पोळीवर कसं ओढता येईल यामागे बरेचसे महाशय उद्युक्त असतात. दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ, अडचणी निर्माण करण्यात काहींना मोठा रस वाटतो नि त्याचाच बडेजाव चारचौघात करण्यात ते मोठी धन्यता मानतात. एखाद्याच्या पेटत्या घरावर आपली पोळी भाजणारेही कैक असतात. पण 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' या उक्तीचा त्यांना विसर पडलेला दिसतो. आपण जे करतो ते सर्व योग्यचं आहे, हा यांचा गैरसमज दूर होईल तर नवल.
काहीजणांच्या बुद्धीवर सर्व नियंत्रण दुसर्याचे. स्वतःची बुद्धी गहाण ठेवून कळसूत्री बाहुलीप्रमाणे इतरांच्या तालावर नाचणारे समाज बांधव खूप आहेत. कुणाकुणाला फुशारकी मारण्यात भारी शान वाटते. घडलेला प्रसंग तेलमीठ लावून सांगण्यात काही लोकांचा फारचं हातखंडा असतो. हातभर लाकडाला सव्वाहात छिलपी निघाल्याचे ते मोठ्या हिरीरीने सांगतात. काही महान विभूती लाखो हृदयांवर आपलं नाव कोरून जातात, तर काहींना आपल्या संपूर्ण हयातीत बायको-मुलांच्या हृदयात तसूभरही जागा मिळवता येत नाही. काही व्यक्तींच्या अंगी एवढा भाबडेपणा की आपण एखादे कार्य कुणासाठी करत आहोत याचेही त्यांना भान राहत नाही. काहींना वेड पांघरून पेडगावला जाण्यात थोर आनंद. विचार अन् आचारामध्ये जमीन-आसमानाचे अंतर असणारे बहुसंख्य, पण विचारानुसार कृती करणारे अगदीच नगण्य. जमदग्नीचा अवतार असलेले काही गृहस्थ सर्वांगाने आग ओकत असतात. निखारा हाती धरावा, परंतु यांच्याशी वाद घालून स्वत:चा बुद्धीभेद करून घेऊ नये. अशा लोकांना सुधारण्याकरीता कुठलीही मात्रा कामी येत नाही.
सर्वांगाने पुरुषोत्तम होणे कठीण असले तरी माणूस म्हणून सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून सर्वसमावेशक स्वहितासह समाजहित जोपासने आणि अति स्वार्थार्त वृत्ती त्यागून अल्पशी परोपकारी वृत्ती धारण केल्यास काय गैर? जीवनामध्ये कमावलेली जी काही धनदौलत, संपत्ती आहे, ती शेवटी परस्वाधीनचं होणार आहे. इतरांच्या उपयोगी पडण्यातचं मोठे पुण्य आहे. आपल्या अंतरंगाला चिकटलेल्या षड्रिपूंचे दहन करून आपले जीवन कृतार्थ करावे. साधूसंतांनी आपल्या परोपकाररूपी सद्कार्याने मातृभूमीचे पांग फेडले. आपल्याकडून त्यांच्यासारखे काम भलेही न होवो, पण मातृभूमीच्या ॠणार्थ देश, धर्म, समाज कार्यासाठी थोडेसे तरी झटावे. रंजल्या, गांजलेल्या दिशाभूल झालेल्या वाटसरूंना मार्गस्थ करावे, हेच मोठे महतभाग्य.
लेखक
अजिनाथ सासवडे सर
लोणी (स), आष्टी
मो.९४२१३३६०५९