"ओढ लावणारं घर"
घर हा शब्दचं एवढा सुखद, आल्हाददायक आणि मनाला चेतना देणारा आहे, की तो सर्वांना तात्काळ प्रेम, वात्सल्य, या भावनांची जाणीव करून देतो. घर हा शब्दोच्चार कानावर पडला तरी, प्रत्येकाच्या दृष्टिपटलावर घरातील आठवणींची क्षणचित्रे उभी राहतात. मूलभूत गरजांपैकी निवारा ही गरज भागवते ते घर. दगडाच्या भिंतींनाही बोलके करते ते घर. निर्जीव असूनही सर्वांना प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवते ते घर. आपलेपणा, कर्तव्य, जबाबदारी यांची जाणीव करून देते ते घर. घर हे संपत्ती किंवा साधन नसून ते एक जीवनातील परमोच्च आनंदाचे साध्य आहे. मोठ-मोठे बंगले, गगनचुंबी इमारती आपण पाहतो. परंतु त्याठिकाणी प्रेमाचा, आपुलकीचा लवलेशही दिसून येत नाही, त्याला घर म्हणावे कसे? घर शब्दचंं मुळी प्रेमाचा प्रतीक आहे. घर या शब्दात आपलेपणा, सहानुभूती व प्रेमाची भावना दडलेली आहे. प्रेमाचा निवास म्हणजे घर. ज्या ठिकाणी पैसा, संपत्ती मुबलक आहे, परंतु सुख, समाधान नाही, एकमेकांविषयी सहृदयता नाही, ते घर नसून दुःखाचे उगमस्थान मानले जाते.
कितीही धनाढ्य व्यक्ती असू द्या, भक्कळ पैसा कमवू द्या, परंतु त्याच्या चेहऱ्यावर घरी आल्यावर जो आनंद ओसंडून वाहत असतो ना, तो इतर कुठल्याही ठिकाणी गेल्यावर दिसून येत नाही. घर म्हणजे प्रेम, आपुलकीचे माहेर. घरी आल्यावर आई-वडील, बायको, मुलांना पाहून जे समाधान मिळतं, ते स्वर्गसुखालाही लाजवेल अशा प्रकारचं असतं. पृथ्वीवर असा एकही मनुष्य नसेल की, ज्याला स्वतःचं घर असावं असं वाटत नाही. कित्येकांची तर उभी हयात जाते, परंतु स्वतःच घर मात्र त्यांच्याकडून बांधणं होत नाही. संपूर्ण आयुष्य एखाद्या झोपडीत किंवा बांबूच्या तंबूमध्ये व्यतीत करताना मनातला विचार मनातचं दाबून काही समाज बांधव अखेरचा श्वास घेतात. काहींना नशिबाने जन्मताचं अगदी चांगल्या प्रकारच्या घरामध्ये निवास मिळतो. परंतु काहींना मात्र आश्रितासारखं एखाद्या ठिकाणी इच्छेविरुद्ध जगून, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून संपूर्ण जीवन व्यतीत करावं लागतं. काहीजणांचं पहिलं आणि शेवटचं स्वप्न घर हेच असतं. घर झालं म्हणजे जीवनात सर्व काही झालं, ही इच्छा उरी बाळगून ते सदैव घर या स्वप्नाचा पाठलाग करत असतात. ते तडीस गेलं म्हणजे जीवाची घोर संपली.
दोन दिवस कुठे गावाला, तीर्थयात्रेला किंवा विरंगुळा म्हणून फिरायला गेलेल्या व्यक्तीला घराची आठवण मात्र क्षणोक्षणी सतावत असते. "भेटी लागे जीवा लागलीसे आस" या उक्तीप्रमाणे कधी एकदा घरी जातोय आणि घरदार पाहून जीव समाधानी पावतोय असे त्यांच्या जीवाला झालेलं असतं. घर हे प्रेम आणि वात्सल्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. घरापासून दूर बाहेरगावी राहणाऱ्याला घराची आठवण येऊन डोळ्यातून आसवे घाळताना कैकवेळा आपण पाहत आलो आहोत. बालपणात घरामध्ये जी दंगामस्ती केली. छोटसं घर असेल तर भावंडांमध्ये बसण्याच्या, झोपण्याच्या जागेवरून झालेले वाद-विवाद, भांडण-तंटे यांची मोठे झाल्यावर आठवण येऊन त्यांचे मन गहिवरून येतं. कारण तेथे प्रेमाची नाळ जोडलेली असते. जोपर्यंत घरातून झऱ्याप्रमाणे प्रेम झिरपत असते, तोपर्यंत आपली प्रेमाची तहान भागवण्यासाठी सगळ्यांनाच घराची ओढ सतावत असते. दिवसभर मनमुरादपणे भ्रमंती करणाऱ्यांचे पाय तिन्हीसांज झाल्यावर आपसूकच घराकडे ओढले जातात.
आपल्या घरापासून इतरत्र बाहेर शहरात, जिल्ह्यात अथवा राज्यात तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्य करण्यासाठी किंवा नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेल्या, भाडेकरूच्या रुपानं राहणाऱ्या लोकांना सुट्टीच्या काळात गावी येऊन घर आणि घरातील सगळ्या माणसांना भेटण्याची जी ओढ असते, ती अगदी शब्दात वर्णन न करण्यासारखी. त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. कधी एकदा घरी येतो आणि घरातील सगळ्यांना डोळे भरून पाहतोय असे त्यांना होऊन जाते. वाळलेल्या झाडाला वसंत ऋतूत पालवी फुटावी तसं त्यांच्या मनाला आनंदाची पालवी फुटत असते. आपले घर, शेत-शिवार याची प्रत्येकाला जी आस असते, ती जीवाला कासावीस करणारी असते.
अहो घरून शाळेत गेलेलं पोरगंसुद्धा सहा तास शाळेत थांबताना त्याला अनेकदा घराची आठवण होत असते. कधी घरी जातोय आणि घराच्या अंगणात खेळाचा डाव मांडतोय हे त्याच्या मनात सदोदित घोळत असते. शाळेत असताना घराची आठवण आली, मन बेचैन झाले, तर पोरांचं ठरलेलं वाक्य, सर माझ्या पोटात खूप दुखतयं, मी घरी जाऊ का? म्हणजे घरी जाण्यासाठी नाना प्रकारचे बहाणे लहान मुलेच नव्हेतर अगदी मोठी माणसेही करताना आपण पाहिलेली आहेत. घरी आल्यावर पोटचं काय पण सगळे विकार क्षणात होत्याचे नव्हते होतात, एवढी घराच्या प्रेमात, भेटीत शक्ती आहे.
खेड्यातल्या घराची तर संकल्पना फारचं छान असते. गोठ्यातील गाई अन् घरातील बाईशिवाय घराला घरपण नाही, असं आवर्जून खेड्यात म्हटलं जातं. घर हा शब्दच मुळी व्यापक अर्थाने वापरला जातो. घर म्हणजे फक्त मुक्कामाचे ठिकाण किंवा चार भिंती नव्हेतर, त्या भिंतीमध्ये जिवंतपणा असणं हे घराचे लक्षण आहे. बंगला, हवेली हे फक्त आकाराने मोठे, मात्र प्रेम, आपुलकीनं मोठं, ते घर. पैसा किंवा मोठमोठ्या वस्तू हे घराचे अलंकार नसून घराला घरपण येतं ते आपल्या माणसाच्या वास्तव्यानं. अवाढव्य परंतु माणूसपण हरवलेल्या चार भिंतींच्या इमारतीला घर म्हणता येणार नाही. सर्व गोष्टी विपुल प्रमाणात असूनही जिथं माणसं येण्यासही कच खातात. जिथं माणसं सोडून निर्जीव वस्तुंचेचं जास्त वास्तव्य, ते घर नव्हेतर चार भिंतींची इमारत म्हणता येईल.
एकत्र कुटुंब विभक्त झाल्यानंतर एकत्रपणातील घराच्या आठवणी मात्र त्यांच्या डोळ्यांतून टीपं घाळताना दिसतात. आता घरांचा आकार वाढला, मात्र प्रेम कमी झाले. भिंती उंचावल्या, परंतु माणुसकीचा पाया मात्र खचला आहे. पूर्वी घरी आल्यावर सगळ्यांच्या प्रेमाचं मोरपीस सर्वांगावरुन फिरल्यावर हायसं वाटायचं, तेच आता पैशाच्या लोभापायी वेगळे झालेले घर एकत्र पणाच्या आठवणींना स्मरून गळ्यात गळा घालून रडत आहे. पूर्वीचे घर छोटे, विचार मात्र मोठे. आज घराचा आकार वाढला, मात्र विचार तेवढेच तोकडे झाले. पूर्वीच्या काळी घर कितीही छोटे असले तरी जेवण करताना दाटीवाटीने, रेटारेटी करून एकत्रितपणे जेवण करत, त्यातच आपलेपणा होता. घर लहान असले तरी आई - बापाचा दबदबा मात्र मोठा होता. त्या छोट्या घरात पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले, पण ते पाहण्यास मात्र आता घर विखुरले. आज धनधान्य तर भरपूर आहे, मात्र आनंद व समाधान गमावले आहे. घराचा एकोपा विस्कटला आहे. बापाचा धाक, आईची माया, भावाची साथ आणि बहिणीचे प्रेम ह्या सर्वांची ओढ लावणारं घर आता क्वचितचं उरलं आहे.
लेखक,
अजिनाथ सासवडे सर
लोणी (स), आष्टी
मो.९४२१३३६०५९
घर हा शब्दचं एवढा सुखद, आल्हाददायक आणि मनाला चेतना देणारा आहे, की तो सर्वांना तात्काळ प्रेम, वात्सल्य, या भावनांची जाणीव करून देतो. घर हा शब्दोच्चार कानावर पडला तरी, प्रत्येकाच्या दृष्टिपटलावर घरातील आठवणींची क्षणचित्रे उभी राहतात. मूलभूत गरजांपैकी निवारा ही गरज भागवते ते घर. दगडाच्या भिंतींनाही बोलके करते ते घर. निर्जीव असूनही सर्वांना प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवते ते घर. आपलेपणा, कर्तव्य, जबाबदारी यांची जाणीव करून देते ते घर. घर हे संपत्ती किंवा साधन नसून ते एक जीवनातील परमोच्च आनंदाचे साध्य आहे. मोठ-मोठे बंगले, गगनचुंबी इमारती आपण पाहतो. परंतु त्याठिकाणी प्रेमाचा, आपुलकीचा लवलेशही दिसून येत नाही, त्याला घर म्हणावे कसे? घर शब्दचंं मुळी प्रेमाचा प्रतीक आहे. घर या शब्दात आपलेपणा, सहानुभूती व प्रेमाची भावना दडलेली आहे. प्रेमाचा निवास म्हणजे घर. ज्या ठिकाणी पैसा, संपत्ती मुबलक आहे, परंतु सुख, समाधान नाही, एकमेकांविषयी सहृदयता नाही, ते घर नसून दुःखाचे उगमस्थान मानले जाते.
कितीही धनाढ्य व्यक्ती असू द्या, भक्कळ पैसा कमवू द्या, परंतु त्याच्या चेहऱ्यावर घरी आल्यावर जो आनंद ओसंडून वाहत असतो ना, तो इतर कुठल्याही ठिकाणी गेल्यावर दिसून येत नाही. घर म्हणजे प्रेम, आपुलकीचे माहेर. घरी आल्यावर आई-वडील, बायको, मुलांना पाहून जे समाधान मिळतं, ते स्वर्गसुखालाही लाजवेल अशा प्रकारचं असतं. पृथ्वीवर असा एकही मनुष्य नसेल की, ज्याला स्वतःचं घर असावं असं वाटत नाही. कित्येकांची तर उभी हयात जाते, परंतु स्वतःच घर मात्र त्यांच्याकडून बांधणं होत नाही. संपूर्ण आयुष्य एखाद्या झोपडीत किंवा बांबूच्या तंबूमध्ये व्यतीत करताना मनातला विचार मनातचं दाबून काही समाज बांधव अखेरचा श्वास घेतात. काहींना नशिबाने जन्मताचं अगदी चांगल्या प्रकारच्या घरामध्ये निवास मिळतो. परंतु काहींना मात्र आश्रितासारखं एखाद्या ठिकाणी इच्छेविरुद्ध जगून, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून संपूर्ण जीवन व्यतीत करावं लागतं. काहीजणांचं पहिलं आणि शेवटचं स्वप्न घर हेच असतं. घर झालं म्हणजे जीवनात सर्व काही झालं, ही इच्छा उरी बाळगून ते सदैव घर या स्वप्नाचा पाठलाग करत असतात. ते तडीस गेलं म्हणजे जीवाची घोर संपली.
दोन दिवस कुठे गावाला, तीर्थयात्रेला किंवा विरंगुळा म्हणून फिरायला गेलेल्या व्यक्तीला घराची आठवण मात्र क्षणोक्षणी सतावत असते. "भेटी लागे जीवा लागलीसे आस" या उक्तीप्रमाणे कधी एकदा घरी जातोय आणि घरदार पाहून जीव समाधानी पावतोय असे त्यांच्या जीवाला झालेलं असतं. घर हे प्रेम आणि वात्सल्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. घरापासून दूर बाहेरगावी राहणाऱ्याला घराची आठवण येऊन डोळ्यातून आसवे घाळताना कैकवेळा आपण पाहत आलो आहोत. बालपणात घरामध्ये जी दंगामस्ती केली. छोटसं घर असेल तर भावंडांमध्ये बसण्याच्या, झोपण्याच्या जागेवरून झालेले वाद-विवाद, भांडण-तंटे यांची मोठे झाल्यावर आठवण येऊन त्यांचे मन गहिवरून येतं. कारण तेथे प्रेमाची नाळ जोडलेली असते. जोपर्यंत घरातून झऱ्याप्रमाणे प्रेम झिरपत असते, तोपर्यंत आपली प्रेमाची तहान भागवण्यासाठी सगळ्यांनाच घराची ओढ सतावत असते. दिवसभर मनमुरादपणे भ्रमंती करणाऱ्यांचे पाय तिन्हीसांज झाल्यावर आपसूकच घराकडे ओढले जातात.
आपल्या घरापासून इतरत्र बाहेर शहरात, जिल्ह्यात अथवा राज्यात तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्य करण्यासाठी किंवा नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेल्या, भाडेकरूच्या रुपानं राहणाऱ्या लोकांना सुट्टीच्या काळात गावी येऊन घर आणि घरातील सगळ्या माणसांना भेटण्याची जी ओढ असते, ती अगदी शब्दात वर्णन न करण्यासारखी. त्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. कधी एकदा घरी येतो आणि घरातील सगळ्यांना डोळे भरून पाहतोय असे त्यांना होऊन जाते. वाळलेल्या झाडाला वसंत ऋतूत पालवी फुटावी तसं त्यांच्या मनाला आनंदाची पालवी फुटत असते. आपले घर, शेत-शिवार याची प्रत्येकाला जी आस असते, ती जीवाला कासावीस करणारी असते.
अहो घरून शाळेत गेलेलं पोरगंसुद्धा सहा तास शाळेत थांबताना त्याला अनेकदा घराची आठवण होत असते. कधी घरी जातोय आणि घराच्या अंगणात खेळाचा डाव मांडतोय हे त्याच्या मनात सदोदित घोळत असते. शाळेत असताना घराची आठवण आली, मन बेचैन झाले, तर पोरांचं ठरलेलं वाक्य, सर माझ्या पोटात खूप दुखतयं, मी घरी जाऊ का? म्हणजे घरी जाण्यासाठी नाना प्रकारचे बहाणे लहान मुलेच नव्हेतर अगदी मोठी माणसेही करताना आपण पाहिलेली आहेत. घरी आल्यावर पोटचं काय पण सगळे विकार क्षणात होत्याचे नव्हते होतात, एवढी घराच्या प्रेमात, भेटीत शक्ती आहे.
खेड्यातल्या घराची तर संकल्पना फारचं छान असते. गोठ्यातील गाई अन् घरातील बाईशिवाय घराला घरपण नाही, असं आवर्जून खेड्यात म्हटलं जातं. घर हा शब्दच मुळी व्यापक अर्थाने वापरला जातो. घर म्हणजे फक्त मुक्कामाचे ठिकाण किंवा चार भिंती नव्हेतर, त्या भिंतीमध्ये जिवंतपणा असणं हे घराचे लक्षण आहे. बंगला, हवेली हे फक्त आकाराने मोठे, मात्र प्रेम, आपुलकीनं मोठं, ते घर. पैसा किंवा मोठमोठ्या वस्तू हे घराचे अलंकार नसून घराला घरपण येतं ते आपल्या माणसाच्या वास्तव्यानं. अवाढव्य परंतु माणूसपण हरवलेल्या चार भिंतींच्या इमारतीला घर म्हणता येणार नाही. सर्व गोष्टी विपुल प्रमाणात असूनही जिथं माणसं येण्यासही कच खातात. जिथं माणसं सोडून निर्जीव वस्तुंचेचं जास्त वास्तव्य, ते घर नव्हेतर चार भिंतींची इमारत म्हणता येईल.
एकत्र कुटुंब विभक्त झाल्यानंतर एकत्रपणातील घराच्या आठवणी मात्र त्यांच्या डोळ्यांतून टीपं घाळताना दिसतात. आता घरांचा आकार वाढला, मात्र प्रेम कमी झाले. भिंती उंचावल्या, परंतु माणुसकीचा पाया मात्र खचला आहे. पूर्वी घरी आल्यावर सगळ्यांच्या प्रेमाचं मोरपीस सर्वांगावरुन फिरल्यावर हायसं वाटायचं, तेच आता पैशाच्या लोभापायी वेगळे झालेले घर एकत्र पणाच्या आठवणींना स्मरून गळ्यात गळा घालून रडत आहे. पूर्वीचे घर छोटे, विचार मात्र मोठे. आज घराचा आकार वाढला, मात्र विचार तेवढेच तोकडे झाले. पूर्वीच्या काळी घर कितीही छोटे असले तरी जेवण करताना दाटीवाटीने, रेटारेटी करून एकत्रितपणे जेवण करत, त्यातच आपलेपणा होता. घर लहान असले तरी आई - बापाचा दबदबा मात्र मोठा होता. त्या छोट्या घरात पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले, पण ते पाहण्यास मात्र आता घर विखुरले. आज धनधान्य तर भरपूर आहे, मात्र आनंद व समाधान गमावले आहे. घराचा एकोपा विस्कटला आहे. बापाचा धाक, आईची माया, भावाची साथ आणि बहिणीचे प्रेम ह्या सर्वांची ओढ लावणारं घर आता क्वचितचं उरलं आहे.
लेखक,
अजिनाथ सासवडे सर
लोणी (स), आष्टी
मो.९४२१३३६०५९