Monday, January 6, 2020

रौद्र शंभुराजे

"रौद्र शंभुराजे"

१४ मे१६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचा छावा संभाजीने जीवनाचा पहिला श्वास घेतला.ज्याच्या कुंडलीतच पहिल्या श्वासापासून संघर्ष व स्वकीयांकडून फसवणूक लिहिली आहे त्याला कसली आलीय जीवन मरणाची भीती.संभाजी राजांचे दुधी दातही उमलले नव्हते तेव्हाच मायेचा व दुधाचा पाझर आटला नि महाराणी सईबाई सारखी जन्मदात्री अनंतात विलीन झाली,पण संघर्ष व झुंज देत नाही तो छावा कसला.धाराऊ सारख्या पर मातेच्या दुधावर पोलादी शरीराची उभारणी करणाऱ्या या छाव्यात बुद्धी व शक्तीचा अजोड संगम होता.सह्याद्रीच्या मावळ मुलखात,जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणार्‍या संभाजी राजांचा दरारा पाहून मुघलांना सळो की पळो झाले होते.
        राजमाता जिजाऊंचे स्वराज्याचे गोमटे स्वप्न ज्या शिवरायांनी सत्यामध्ये उतरवलं,त्याचा वारसा लाभलेले संभाजी स्वातंत्र्याची मशाल कशी विजू देतील.जगाच्या पाठीवर सलग १२० लढाया जिंकणारा व एकदाही पराभूत न झालेला राजा म्हणून इतिहासाने ज्यांची नोंद घेतली ते राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिमानाने उल्लेख केला जातो.वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम्,सातशतक सारखें ग्रंथ संभाजी राजांनी लिहिले.एक नव्हे तर तब्बल १४ भाषा संभाजी राजांना बोलता येत होत्या.छत्रपती शिवाजी महाराज हे एक सिंहपुरुष होते,परंतु राजे संभाजी हेही एक छावाच होते,हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड हिंदुस्तानला नव्याने पण पुरेपूर उमजलं आहे.
        एकाच वेळी पाच आघाड्या विरुद्ध जिकिरीची पंजेफाड करणारा सेना-धुरंदर मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेले.तीस लाखांची फौज घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला बलाढ्य औरंगजेब,मुंबईचे टोपीकर,गोव्याचे फिरंगी,जंजिऱ्याचे सिद्दी या चार आघाड्या आणि पाचवी आघाडी होती विखारी विश्वासघातक्यांची स्वार्थांध स्वकीयांची,अगदी घरच्यांचीच.पाठीची ढाल व हाताची तलवार करून सर्वांबरोबर वादळासारखा सतत नऊ वर्ष झुंजत राहणारा राजा म्हणजे रौद्ररुपी संभाजीच होय.संभाजी राजे फितूर,स्वराज्यद्रोही दिलेरखानाला जाऊन मिळाले,अशा बाजार गप्पा उठवल्या जाऊ लागल्या;अरे ही तर शिवरायांची चाल आदिलशाही व मोगल यांच्यात हातमिळवणी झाली तर ते आपल्याला घातक ठरेल या दूरदृष्टीने शिवरायांनीच संभाजी राजांना दिलेरखानाच्या गोटात पाठवले होते.ज्याचा जन्मच रयतेच्या रक्षणार्थ झाला त्याने रयतेची लूट,अत्याचार निमुटपणे सहन करावी,हे कदापी शक्य नव्हते,'छातीतील धग व मनगटातील रग' याच्या जीवावर अवघे स्वातंत्र्य ९ वर्ष पेलून धरणारा मराठ्यांचा महाप्रतापी राजा म्हणजे शंभुछत्रपती.प्रभू रामचंद्राच्या रघुकुल वंशाचा वारसा सांगणारा मिर्झाराजे जयसिंग सारखा मोगलाची लाचारी पत्करलेला रजपूत अवघ्या दहा-बारा वर्षे वयाचे असताना संभाजीराजांनी बुद्धिबळात मात दिल्यानंतर मूर्च्छित होऊन म्हणतो,"संभा का दिमाग है या दौडता घोडा", एवढ्या कमी वयात एवढी बेडर नजर,काळजाची निशाणी साधणारे बोल,थोरा-मोठ्यांसाठी असलेली अदब मिर्झाराजानी आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती.अशी अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले राजे म्हणजे शिवपुत्र संभाजी.
          शंभू राजांचा चेहेरा पोतासारखा उजळलेला.राजांची शरीरयष्ठी निखार्‍यावर फुलल्या भाकरीगत डौलदार व रसरशीत अशीच होती.त्यांच्या पहाडी आवाजाने तर अवघा मुलुख ढाण्यावाघाच्या डरकाळीने गुंजावा तसा गुंजत असे.गळ्यात ६४ कवड्यांची माळ जनु साक्षात जगदंबेने त्यांच्या गळ्यात घातली होती,एवढा त्या माळेचा गवगवा होता.कपाळावरील शिवगंध तर पिता शिवरायांची निशाणीच होती.संभाजी राजांच्या सहधर्मचारिणी येसूबाई व दुर्गाबाई यांचाही स्वराज्यात चांगलाच मरातब होता.संभाजी राजांचा पांढराशुभ्र 'चंद्रावत' नावाचा घोडा फारच अबलक होता.
    शिवसूर्याच्या अस्तानंतर नऊ महिन्यांनी,१६ जानेवारी १६८१ रोजी स्वराज्याला दुसरे छत्रपती लाभले शंभूसूर्य.रायगडावरील तोफांच्या कडाडत्या बत्त्या टोपीकर,सिद्धी,फिरंगी,मोगल व कुतुब ह्या सर्व शाह्यांना जणू गर्जुन सांगत होत्या;मराठी दौलतीच्या सिंहासनावरील 'शिव' गेला तरी त्या आसनावर आता 'रुद्र' आला आहे.जरीपटका पुन्हा एकदा डौलाने फडकू लागला. संभाजीराजांच्या रूपाने स्वराज्याला एक तापता सूर्यच मिळाला होता आणि याला जो गवसणी घालेल त्याची राख होणार हे निश्चित होते.रयतेच्या रक्षणासाठी संभाजी राजांनी उभे आयुष्य बहाल केले,तसे रयतेतील एकेक मावळासुद्धा संभाजीराजांच्या एका शब्दाखातर आपलं काळीज त्यांच्या चरणी अर्पण करण्यास तयार होता.शिवरायांच्या जंजिरा या अधूऱ्या स्वप्नाचा सल,शंभूराजांनी पूर्ण करण्यासाठी बेधडक पावले उचलली.काही तासातच सिद्दी कासम व सिद्दी खैरात यांना जंजिऱ्यावरून पळ काढावा लागला.जंजिऱ्याजवळील असंख्य जललहरींनी जंजिरा स्वराज्यात आल्यामुळे छत्रपतींना माना उंचावून मुजरा केल्या.संभाजी राजांची युद्धनीती,न्यायनीती,चाणाक्ष बुद्धी व गनिमावर असलेली तीक्ष्ण नजर हीच गोष्ट रयतेला राजांच्या मोह बंधनात बांधून ठेवत होती. हिंदू धर्म व मायभूमीच्या रक्षणार्थ राजांसह मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक या मातीत करून धर्माचे व धरणीमातेचे रक्षण केले.म्हणून तर आजही आपल्या मातीचा रंग लाल आहे.
          दुर्बलांच्या हक्कांचे संरक्षण करणे हेच खरे "राजेपण"असा कातर विचार राजांच्या मनाला नेहमीच स्पर्श करत असे."मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा"हे समर्थांचे बोल राजांच्या कानात सदैव गुंजत होते.राजांनी धर्मरक्षणासाठी नेटाने प्रयत्न केले,पण शेवटी घडू नये तेच घडले,औरंगजेबाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्या मुकर्रबखानाने संगमेश्वराजवळ संभाजी राजांना कवी कलशांसह जेरबंद केले.तेथून राजांना अकलूज येथील औरंगजेबाच्या छावणीत घाईघाईने हलवण्यात आले.मावळ्यांचाही इस्लाम कबूल न केल्यामुळे तेथेच शिरच्छेद करण्यात आला.अकलूज वरून पुन्हा राजांना भीमा-इंद्रायणीच्या काठावर वसलेले वढु(बु)-तुळापूर येथे आणण्यात आले.चाळीस दिवस औरंगजेबाच्या अन्याय,अत्याचाराला भीक न घालता स्वराज्य व स्वधर्मासाठी जिवंतपणी स्वतःच्या मरणाला शंभुराजे रोज निधड्या छातीने सामोरे जात होते.अंगाची कातडी सोलली,जीभ कापली,डोळे काढले तरी धर्मवीर संभाजीराजे ना झुकले ना नमले.धर्मासाठीच मरायचं नि धर्मासाठीच जगायचं हा दृढनिश्चय ज्याच्या ठायी वसलेला,त्याला कसली आली मरणाची भीती.अरे मरणालाही मरणाची भीती वाटावी एवढी क्रुरशिक्षा शंभुराजांना दिली पण जीवाची भीक मागितली नाही,की दयेची याचना केली नाही.११ मार्च १६८९,फाल्गुन वद्य अमावस्याच्या दिवशी 'जगदंब-जगदंब' हे अखेरचे बोल मनी उच्चारून शंभुसूर्याचा अस्त झाला.शंभुराजे गेले पण सर्वांना सांगत गेले,अरे मातीत मरणारे कैक असतात,पण मातीसाठी मरणारे फक्त "मराठे"असतात.
        आपण सदैव शंभुविचार व आचारांना स्मरणात ठेवावे. नुसतेच राजे आमचे म्हणून चालणार नाही,तर जीवनात शंभुराजांच्या ठायी असलेले गुण आपण आचरणात आणले तर शंभुराजांना तेच विनम्र अभिवादन ठरेल.

महत्वाची टीप: हृदय हेलावून टाकणारे लेख,कथा वाचण्यासाठी कृपया http://ajinathsaswade.blogspot.com
या लिंकला भेट द्या.
                      लेखक,
              श्री.अजिनाथ सासवडे (सर)
               मु.पो.लोणी(स), आष्टी
               मो.९४२१३३६०५९

7 comments:

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...