Wednesday, January 22, 2020

मोबाईल एक व्यसन

"मोबाईल एक व्यसन"

         एखाद्या गोष्टीच्या अति आधीन जाणे म्हणजेच व्यसनाधीन होणे.चांगले असो अगर वाईट,परंतु प्रमाण जास्त वाढले म्हणजे त्याचे रुपांतर व्यसनात झाले.मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने बायकोला बेदम मारले,ही बातमी टीव्हीवर पाहिली आणि या मोबाईल नावाच्या मानवचलित यंत्राने माणसाच्या जीवनात केलेल्या आगमनाने माणसाला लागलेले त्याचे व्यसन,हे नक्कीच जीव घेणे आहे,असे वाटू लागले.ज्या महापुरुषाने मोबाईलला जन्मास घातले तो धन्य.मोबाईलचे वाढते चमत्कार दिवसेंदिवस लक्षात येऊ लागले.हा दिसतो लहान पण भल्याभल्यांनाही वेडं करून सोडलय यानं.वरवर दिसायला फूलपाखरासारखा पण आतून मात्र गांधीलमाशी समान.कुणाच्या भावनांना कुठे दंश करील आणि कुठे त्या उत्तेजित होतील याचा भरवसा नाही."लहान तोंडी मोठा घास"असा याचा स्वभाव.कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशास कारणीभूत ठरतो.तद्वत आज मानवी पिढ्याबद्दल झाले आहे.लोक एकवेळ पायात चप्पल घालायची विसरतील,अंगात शर्ट घालायला विसरतील,पण मोबाईल मात्र हातात किंवा खिशात असल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकण्यास धजावणार नाहीत आणि चुकून मोबाईल जर विसरला तर आयुष्याचा जोडीदार हरवल्यागत हुरहूर मनाला लागावी,एवढा प्रत्येकाला याचा लळा लागला आहे.या निर्जीव वस्तूनं माणसाला प्रमाणापेक्षा जास्त आपलंसं केलं आहे.लोकांना अन्नपाण्यापेक्षाही याचा मोह जास्त वाढू लागला आहे.काय किमया केली या छोट्याशा वस्तूनं की लहान थोरांना पूर्ण बिघडून ठेवले आहे.
      मोबाईलचा इतिहास पाहिला तर तीन दशकांपेक्षा जास्त नाही.सुरुवातीच्या काळात फक्त एकमेकांशी संवाद साधन्यापुरता मोबाईलचा वापर होत होता.जसजसा मोबाईल कात टाकत गेला तसतसा त्याचा वेग जास्तच वाढत गेला.आज सगळं जग या छोट्या वस्तूंमध्ये सामावलं आहे.लेखन,वाचन,टीव्ही,रेडिओ,एवढेच नव्हे तर संगणकाचे कामही आज मोबाईल करत आहे.हा अविश्वसनीय बदल झाल्यामुळेच मोबाइलला हल्ली स्मार्टफोन हे आधुनिक नाव देण्यात आले.अल्पावधीतच सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा एक किमयागार ठरला आहे.ज्या ठिकाणी माणूस,त्या ठिकाणी मोबाईल.मोबाईल शिवाय माणूस हे समीकरण आज होऊच शकत नाही.माणसाला त्याची सावली जशी सोडत नाही,अग्नीला उष्णता सोडत नाही,तसा मोबाईल पासून माणूस क्षणभरही वेगळा राहू शकत नाही.आनंद असो अगर दुःख,कुठल्याही प्रसंगी आपल्याला साथ देतो,हा याचा एक सद्गुणच म्हणावा लागेल.संवेदनाहीन असला तरी संवेदनशील माणसांच्या हृदयाला पाझर फोडण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे.चोर-पोलिसांचा खेळ खेळण्यात मोबाईल फारच पटाईत.खोटं बोलण्याचे प्रशिक्षण घ्यावं ते मोबाइल कडूनच.
             मोबाईलमुळे माणसातला माणूस हरवला आहे.माणसात असून एकटेपणाचा गुण मोबाईलने माणसाच्या अंगी बानवला आहे.उठताना मोबाईल,बसताना मोबाईल,खाताना मोबाईल,चालताना मोबाईल, गाडीवर मोबाईल,अहो एवढेच काय तर बाथरूममध्येही मोबाइल,हा तर अतिरेकपणाचा कळस झाला.कोणत्या वस्तूच्या किती आहारी जावं,हे मात्र माणसाने विचार करण्यासारखं आहे.थोडा जरी वेळ मिळाला तरी काढला मोबाईल की लागलेच पहायला.जे सुरुवातीच्या काळात दळणवळण तथा संदेशवहनाचं साधन होतं,आज तेच मृत्यूच्या खाईपर्यंत घेऊन जाणारं साधन झालं आहे.
      आज मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सने खूप धुमाकूळ घातला आहे.पब्जीसारख्या गेमने तर कित्येकांना मृत्यूच्या स्वाधीन केले आहे.काहींनी गेम खेळू दिली नाही म्हणून आपल्या जवळच्यांचा घात केला आहे.मोबाईल दळणवळणाचे साधन राहिले नसून मृत्यूचा एक सापळाच झाला आहे.मोबाईलचा वापर किती करावा याला काहीच मर्यादा उरली नाही.मोबाईलचा अवाजवी वापर आज सर्वांच्याच विनाशाला कारणीभूत ठरत आहे. सतत मोबाईलकडे पाहिल्याने डोळ्यावर होत असलेले विघातक परिणाम काहींना जाणवू लागले आहेत.डोळ्यांना नंबर लागणे,दिसण्यास कमी होणे,मोबाईलमुळे कितीतरी मनोरुग्ण सुध्दा झालेली आहेत.
      मोबाईलमुळे माणसाला एकलकोंडेपणा चिकटला आहे.कुणाशी कसला संवाद नाही.त्यामुळे प्रेम,आपुलकी,सहानुभूती या प्रत्येकाच्या भावना अतृप्तच राहत आहेत.एकमेकांबरोबरचे संवाद,संभाषण कमी झाले.परिणामी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणे,त्याला आपले मानने,या गोष्टी आज दुरापास्त झाल्या आहेत.एखाद्याला आजारपणात भेटायला गेल्यावर आजारी व्यक्तीची चौकशी करण्याऐवजी स्वतःच्या मोबाईलमध्येच मानसं दंग होऊन बसतात.मोबाईलच्या अतिरेकामुळे कानाचेही आजार उत्पन्न झाले आहेत.
       पूर्वीच्या काळी परगावी काही काम असेल तर पत्रलेखन अथवा त्या गावी जाऊन निरोप दिला जात असे.काळ बदलल्यामुळे आज ती गरज राहिलेली नाही.आजच्या पिढीचा गैरसमज आहे कि मोबाईलमुळे आपला वेळ वाचतो,परंतु वाचलेल्या वेळेचा आपण किती सदुपयोग करतो,हे महत्त्वाचे आहे,कारण क्षणात मोबाईलद्वारे निरोप देऊन आपण मोकळे होतो खरे,पण बाकी वेळ आपण सत्कारणी लावतो का?काम न करता नुसते बसून कुठला शारीरिक व्यायाम नाही,की कसले कामही नाही.त्यापेक्षा परगावी जाऊन निरोप दिला तर शारीरिक व्यायाम होत असे.एकमेकांबद्दल प्रेम,आदरभाव वाढत असे.
           घरामध्ये सगळ्यांकडे जर स्मार्टफोन असेल तर घरात कसलाही संवाद घडून येत नाही,जो तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त,त्या घरातलं घरपण हरपून जातं.एकत्र बसून संवाद साधल्याने अविर्भाव,प्रेम नक्कीच वाढीस लागतो.विचारांची देवाण-घेवाण होते.एकमेकांचा आदर सन्मान केला जातो.जिव्हाळा उत्पन्न होतो.मोबाईल हा आज एक स्लो पॉयझन सारखा झाला आहे.याचे वाढते प्रमाण एक दिवस माणसाला विनाशाकडे घेऊन जाणार आहे.मोबाईल पाहण्याचा,बोलण्याचा,वापरण्याचा काहीतरी वेळ असावा.पण दुर्दैवाने इतर काम आपण थोड्या प्रमाणात करतो आणि दिवसातला बराचसा वेळ मोबाईलच्या दुनियेतच रममाण होतो.मोबाईलचा ना कुठला शारीरिक फायदा,ना मानसिक.मानसिक स्वास्थ्य मात्र नक्कीच मोबाईलमुळे बिघडले जात आहे.
        आता तर नेटवर्क कंपन्यांनी देऊ केलेला डाटा संपविण्यासाठी जशी पाहणारांची आणि मोबाईलच्या बॅटरीची स्पर्धाच आहे.कोण लवकर कंटाळतोय.हे जसे एकमेकांशी चुरस लावतात. अन लिमिटेड व्हॉइस कॉल यामुळे लोक आपले काम सोडून फोनवर तासनतास बोलत राहतात. काय बोलावे याचेही लिमिट राहिले नाही.फक्त अमर्यादित मिळतय म्हणून कसाही वापर करायचा,हा माणसाचा मूळ स्वभावगुण."फुकटचं घावलं अन बाप लेक धावलं"अशी गत झाली लोकांची.त्याचा आपल्या जीवन मानावर विघातक परिणामा बरोबरच आपला अमूल्य वेळही आपण त्यासाठी विनाकारण खर्ची घालत आहोत,याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
         मोबाईलनं लोकांना"विनाशकाले विपरीत बुद्धी"असं झालंय.लोकांची बुद्धीसुद्धा बिथरली.अगदी वयोवृद्ध मंडळी सुद्धा याला अपवाद राहिली नाही.मोबाईलसारख्या एवढ्या छोट्या वस्तूनं आज मानवाचा एवढा विकसित मेंदू असूनही त्यावर कब्जा मिळवला आहे.मग प्रश्न असा पडतो,की मानवाने मोबाईलला निर्माण केले,की मोबाईलने मानवाला.आपण तयार केलेल्या वस्तूच्या आपण आधीन जात असू तर आपल्या बुद्धीची वाटचाल कुठे होते आहे,हेही ध्यानी घ्यायला हवे.आपणच निर्माण केलेली वस्तू आपल्यासाठी हानिकारक ठरत आहे.या व्यसनातून बाहेर येण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.नाहीतर घोडामैदान समोरच आहे आणि त्याचे परिणाम अल्पावधीतच प्रत्येकाला कळणार आहेत.त्याकरिता आपला सावध पवित्रा असावा म्हणजे ही एक भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूलच आहे.मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा‌.अनावश्यक फोटोज,व्हिडिओज,पोस्ट टाकणे आणि पाहणे टाळावे.विनाकारण फालतू गेम खेळत बसणेही नक्कीच धोक्याचे आहे.जवळजवळ बहुतांश व्यक्ती या व्यसनात अडकून पडल्यामुळे एक दिवस आपले स्वास्थ्य गमावून बसणार आहेत.त्याकरता वेळीच खबरदारी घ्यावी.आजपासूनच चारतास मोबाईल पाहणाऱ्यांनी दोन तास,दोन वाल्यांनी एक तास वापरावा,तर एक तास पाहणारांनी अर्ध्या तासात कसं आटोपते घेता येईल याचा प्रयत्न करावा.तरच आपण भविष्यात आनंदी आणि समाधानी जीवन जगू व इतरांनाही जगू देऊ हे निश्चित आहे.


                 लेखक,
          श्री.अजिनाथ सासवडे (सर)
           मु.पो.लोणी(स) आष्टी,
           मो.९४२१३३६०५९

Tuesday, January 21, 2020

जीवन

"जीवन"
     🖕येथे टच करू नका.)

       जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचा कालखंड ढोबळमानाने आपण जीवन म्हणून ओळखतो.प्रत्येकाची जीवनाची परिभाषा वेगवेगळी असते.सौख्य प्राप्तीसाठी प्रत्येकजण कसोशीने प्रयत्न करत असतो.जीवन प्रवासात प्रत्येकाला चढउताराचा अनुभव येत असतो.कधी कुणाला सुरुवातीच्या काळात काही गोष्टी सहजच प्राप्त होतात,तर कुणाला उतरत्या काळात जीवन सुखासाठी नियतीशी झगडावे लागते.जेवताना सुरुवातीच्या घासाला खडा लागावा आणि मग इतर घासही भीत भीत घ्यावे अशीच काही अवस्था जीवनामध्ये होते.काळ वाईट असो अगर चांगला,पण प्रत्येक परिस्थितीत कणखरपणा अंगी बाळगणे निश्चितच हितकारक ठरते.कामापुरते मामा भरपूर असतात परंतु,प्रत्येकालाच आपल्या जीवन प्रवासात नातलग,मित्र तथा स्वकीयांची साथ मिळेलच याविषयी खात्री देता येत नाही. किंबहुना स्वत:च्या जीवनाची साथ आपल्याला किती काळासाठी आहे,हे ही कुणी निश्चितपणे सांगू शकत नाही.जीवन फुलपाखरासारखे हाती आलेलं क्षणात हुलकावणी देऊन जाते.
              प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचा अंश आहे,त्यामुळे आपला काय नि परका काय यामध्ये भेदाभेद मुळीच नसावा.सर्वांमध्येच चांगल्या वाईट गुणांचे मिश्रण असते.आपण बोलताना सहजच कधीकधी बोलतो की,"कातडं एक असून चालत नाही,तर आतडंही एक असावं लागतं",पण या गोष्टी आज दुरापास्थ झालेल्या दिसून येत आहेत,कारण रक्ताच्या नात्यातील कधी परके होतात,तर कधी परकेही मनात घर करून जातात.हा सर्व निसर्गनिर्मित नव्हेतर मानवनिर्मित खेळ अनेकांच्या आयुष्यात चालूच असतो.जीवनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा होऊन गेला आहे.जीवन म्हणजे कुणासाठी आनंदाचे डोही आनंद तरंग,तर कुणासाठी जीवन म्हणजे दुःखाची सरिता,तहान भागवायला जातो आणि आजार पदरी येतो.परमेश्वराने दिलेल्या जीवनाचा सदसदविवेक बुद्धीने आपण किती सुयोग्य वापर करायचा किंवा ते धुळीस मिळवायचे,हे प्रत्येकाला जीवनात लाभलेली संगत,त्यानी वाचलेली पुस्तके,त्याचे विचार,आचार व संस्कार या सर्वांची सांगड तो किती यथायोग्य घालतो यावरूनच ठरत असते.
            परमेश्वराने दिलेल्या आयुष्यात सत्संगत,सद्विचार आणि समाजव्यवस्थेचा कणा असलेली माणुसकी,तसेच परस्परांबद्दल असलेला स्नेहभाव,आपुलकी यामध्ये वृद्धी करणे,हाच जीवनाचा प्राधान्य विचार असावा.जीवनात सदाचार आणि सदविचारांना खूप महत्त्व आहे,त्यांचा अंगीकार होणे महत्त्वाचे,नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला,अशी फसगत होऊन जाते.त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.विवेकाची कास धरून सन्मार्गाने चालणाऱ्यास सुरुवातीच्या काळात जरी जीवन त्रासदायक वाटत असले,तरी अंतिमतः ते नक्कीच सुखावह ठरते.उलटपर्ती दुष्ट,छल,कपट हे मार्ग सुरुवातीच्या काळात जरी मोहक दिसत असले,तरी ते अंतिम काळात मृगजळासारखे ठरतात.आपल्या हाती कधीच येत नाहीत.
        जीवनात नाव असे कमवा की,घेताक्षणी काम झाले पाहिजे किंवा काम तरी असे करा,की कुणाच्या ओळखीची गरजच पडली नाही पाहिजे.मनुष्याला जीवनात काय हवं आहे,ह्याचंच कोड ज्याला त्याला उलगडलेलं नाही.पैसा मिळवायला जातो,तर प्रेमाला पोरका होतो,अन् प्रेम मिळवतो तर पैसा दुरावतो.कधीकधी दोन्ही मिळवतो अन् मानसन्मान,प्रतिष्ठेसाठी झटू लागतो व समाधान गमावून बसतो.पैशाने ज्ञान कुणी वाढवू शकत नाही,पण निश्चितच ज्ञानाने पैसा वाढवू शकतो किंवा कमावलेल्या पैशाचा सदुपयोग करू शकतो.जीवनात तुम्ही किती पैसा कमावता, यापेक्षा त्याचा वापर कशा पद्धतीने करता,हे जास्त महत्त्वाचे आहे.
              नियोजन जीवनाचा मुख्य पैलू आहे,कारण त्याशिवाय जीवनाला दिशा प्राप्त होत नाही,नियोजनाशिवाय कार्य योग्यरीत्या पार पडणे फार कठीण आणि पडलेच तर पैसा,वेळ किंवा इतर काही गोष्टींचे त्याठिकाणी वाताहत झालेली दिसून येते.समुद्रात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे जीवनाला कुठे पोहोचायचे आहे, हेच कळू शकत नाही किंवा मार्ग सापडत नाही. मग ते एखाद्या वादळाच्या भयंकर तडाख्यात सापडून नेस्तनाबूत होते.जवळजवळ जीवन हे कापरासारखे आहे,असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,कारण जसा कापूर उघडा ठेवल्यानंतर काही वेळानंतर संपून जातो,तसेच जीवनात कर्तुत्व केले,किंवा नाही केले,तरीही जीवन हे संपणारच आहे,मग आपण कुटुंब,समाज आणि देश हितासाठी त्याचा वापर का करू नये?सत्कृत्य करून इतरांबरोबर स्वतःचा उद्धार करून घ्यावा.जीवन हे आईस्क्रीमप्रमाणे आहे,टेस्ट करा किंवा नका करू ते वितळून वेस्ट होणारच आहे.
              जीवनात स्वहित साधून आपण किती मोठे झालो हे जास्त महत्त्वाचे नसून,आपल्यासोबत किती जणांना घेऊन चाललो आहोत हे महत्त्वाचे.आपल्यामुळे किती जणांचे आयुष्य सन्मार्गी लागले हे महत्त्वाचे.स्वतः चालता चालता इतरांनाही सोबत घेऊन चालणे हा खरा निसर्गनियम अथवा मानवधर्म.निस्वार्थ भाव शिकावा तो प्राण्यांकडूनच,एखाद्या ठिकाणी खाण्यासाठी अन्नपाण्याचा थोडाजरी मागमूस लागला,तरी त्याठिकाणी प्राणी आपल्या सहकाऱ्यांनाही संकेत अथवा आवाजाद्वारे बोलावतात.अपवाद मात्र मनुष्यप्राणी आहे.परमेश्वराची पृथ्वीवरील सर्वोत्तम निर्मिती कुठली असेल तर ती म्हणजे मानव,परंतु मानवाने आज इतर प्राण्यांपेक्षाही स्वार्थ व धूर्तपणामध्ये उच्चांकी पातळी गाठली आहे.जीवनाचा खरा अर्थ स्वार्थात नसून दातृत्वात आहे,या विचाराची आज मानवाला भुरळ पडली आहे.
         जीवनात पैसा,संपत्ती सर्वकाही एकटेपणाच्या मोबदल्यात दिलं तर कितीजण होकार देतील आणि किती नकार देतील हे सांगणं फार कठीण.ऐश्वर्या धन-दौलत सर्व काही मुबलक असले तरी जीवनात एकटेपणा फार कठीण,त्यासारखे दुःख दुसरे कुठलेच असू शकत नाही.आधुनिक पण बुरसटलेल्या विचाराने ग्रासलेला समाज जो की पैसा हे सर्वस्व मानून बसला आहे,ते मित्र,दोस्त,नातलगांशिवाय काही दिवस राहीले,तर ते काही दिवसातच सर्वकाही देऊन फक्त आपल्या माणसांच्या सहवासाचीच अपेक्षा करतील.प्रेमाची भूक निर्जीव वस्तूंपेक्षा सजीवच पूर्ण करतात.निर्जीव वस्तूने तात्पुरतं समाधान मिळतं.परंतु जीवनभर समाधान सजीव वस्तूच्या सहवासातच आहे,हे विसरून चालणार नाही."पैसा है तो सब पूछते है कैसा है"ही म्हण समाजाने पुरेपूर आपलीशी केली असली तरी मनःशांती त्यामध्ये नाही.
       जीवनात आपल्या आवडीनुसार काम मिळणे खूप महत्त्वाचे,कारण त्यामुळे कामाची गतीच नव्हे,तर जीवनाची दिशाही बदलत जाते.नको असलेल्या कामाने नैराश्याचा पीळ सदैव मनाला रूतत राहतो.जीवन चाकोरीबद्ध नव्हे तर आकारबद्ध असावे.
         कलियुगात प्रत्येकजण भुकेलेला आहे तो प्रेमासाठी.पद,पैसा,प्रतिष्ठा ह्या गोष्टी कितीही मिळवल्या तरी शेवटी समाधान नाही,प्रेमाची भूक ही अतृप्तच राहते.प्रेमाने एखाद्याची चौकशी केली,पाठीवरून हात फिरवला,आपलेपणा दाखवला तर,यापेक्षा आणखी समाजाला तरी काय अपेक्षित आहे.पैसा कमवाच,इतरांना फक्त प्रेम द्या,तेच पुष्कळ आहे,आपलेपणा निर्माण करण्यासाठी.पैशाने माणसंजवळ येतील मात्र प्रेमाची असतीलच असे नाही.स्वार्थापोटी जवळ आलेल्या माणसांचे काम झाल्यावर ती नक्कीच आपल्यापासून दुरावतात,परंतु प्रेमाने जवळ आलेल्या माणसांची नाळ सदैव आपल्या हृदयाशी जोडली जाते.निस्वार्थ भावनेतून जोडलेल्या दोन मनांना फक्त एकमेकांचे प्रेम, आधार आणि सहवासाची उभ हवी असते,हेच तर खरे जीवन.


           लेखक,
    श्री.अजिनाथ सासवडे (सर),
    मु.पो.लोणी(स),ता.आष्टी,
    मो.९४२१३३६०५९

Sunday, January 12, 2020

दुष्काळाच्या झळा

मराठी "लेख"संग्रह 👈 येथे टच करू नका.

शेतकऱ्याचा मुलगा म्हणून स्वत्वाच्या आंतरिक शक्तीचे आणि ज्ञानाचे उपयोजन करून "दुष्काळाच्या झळा"या लेखाचा उदय नि छावणी चालकांस झणझणीत अंजन....

"दुष्काळाच्या झळा"

मातीचा टिळा माथ्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या माझ्या शेतकरी राजाला "दुष्काळ" हा शब्द उच्चारला की काळीज पिळवटून टाकल्यासारखं होतं.घोटभर पाण्यासाठी वणवण फिरणारे बायका,माणसं,पोरं अन मुठभर चार्‍यासाठी सारा शिवार पालथा घालणारा कष्टकरी,शेतकरी हे विदारक चित्र दुष्काळ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
        समाजव्यवस्थेच्या आणि देशाच्याही अर्थव्यवस्थेचा मुळ आधार असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनाची ससेहोलपट कुठवर चालणार हे न उलगडलेले कोडेच आहे.दुष्काळात शेतकरी किती घायकुतीला येतो हे सांगताना शब्दांनाही सुकेपणा जाणवतो.गावात लोकांना एक हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल वणवण भटकत राहावे लागते.झोपेतून उठल्यानंतर कुठे पाणी मिळेल हा पहिला प्रश्न तोंडापुढे आ वासून उभा राहतो.सर्वांच्या ध्यानीमनी एकच विचार कुणाच्या विहीरीवर पाणी मिळेल,कुणाच्या बोअरवेलला पाणी आहे.हीच चर्चा रंग धरून असते.अष्टोप्रहर पाणी आणने हाच मोठा उद्योग.काल अंघोळ केली आज करावी की नाही,हाच विचार मनात घोळसा करू लागतो,की नुसतेच ओल्या फडक्याने अंग पुसून घ्यावे या विचाराने मन बेचैन होते.गावात कुठे हातपंप असेल तर तिथे भांड्याच्या लांबच लांब रांगा दिसतात.तेथेही दहा-वीस वेळा हापसल्यावर कुठं चुळकाभर पाणी येतयं.त्यातही पाणी कमी आणि भांडणाला जास्त उभारी हेच चित्र पहावयास मिळते.
      कुणी सायकलवरून,कुणी गाडीवर तर कुणी डोईवर दुरदुर जाऊन पाण्याची आपली तहान भागविण्यासाठी वणवण भटकतात आणि मिळेल ते गढूळ,काळे-निळे जशा रंगाचे मिळेल तसे पाणी घेऊन येतात.व आपला सुकलेला घसा ओला करतात.जनावरांही पचनी पडणार नाही ते पाणी माणसं घटाघटा पितात.काय करणार बिचारी निसर्ग कोपला आणि सरकारही.गटारीतील पाणी प्या नाहीतर नालीतील प्या सरकारला काही सोयरसुतक नाही.ते आपले गडगंज होऊन राहिले.ज्याच्या विहीरीला बोअरवेलला थोडेफार पाणी तोही त्याचे दोन रूपये करून स्वतःच्या खिशात कसे घालता येतील याच विचारात.शंभर रूपयाला एक दोनशे लिटरचे पिंप विकले जाते.ज्याला भाकरीचीच चिंता तो  पाणी विकत घेऊन कसे पिणार हा मोठा प्रश्न आहे.
    पाणी दुरून कुठून तरी आणता येईल पण ज्याच्या जिवावर माझ्या शेतकरी राजाचं पोट भरतं त्या जनावरांच्या काय व्यथा आहे.न पोटाला पोटभर चारा न पियाला पाणी.अशातच शेतकरी संघटना,राजकीय नेते,पुढारी झोपलेल्या सरकारला उठवतात नि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था म्हणून चाराडेपो,छावणी किंवा अन्य काहीतरी सोय करा मायबाप ही चर्चा जोर धरू लागते.अशातच छावण्यांना परवानगी मिळाली ही बातमी ऐकून शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहीला नाही.जणू भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकत राहावे आणि तितक्यात थंडगार पाण्याने भरलेली घागर दिसावी.
    छावणी सुरू होणार,चारा छावणी सुरू होणार ह्या बातमीने चैत्राच्या उन्हात अनवाणी चालणाऱ्या वाटसरूला एखाद्या गाडीवाणाने गाडीवर बसून न्यावे अशाप्रकारचे सुख होते.शेतकऱ्यांची लगबग सुरू होते.कुणी बांबू आणतात तर कुणी लाकडाच्या मोठमोठ्या मेखा तयार करतो,कुणी मेडी तोडू लागतो.प्रत्येकाला घाई की चांगली चारा डेपो जवळची जागा मिळावी.त्यामुळे जास्त लांब चारा वाहून नेण्याचा त्रास होणार नाही.तर काहींच्या मनात रात्रीचा गुपचूप चारा आणता येईल.सर्वांच्या छावण्या ऐटीत उभ्या राहू लागतात.कोण स्वतः ला झोपण्यासाठी कोपी तयार करतयं तर कोण जनावरांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी कापड कागद बांधतयं.कोणी जमीनीवर पालापाचोळा ठेवून त्यावर टाकी मांडतोय तर कुणी दोन लाकडे आडवे टाकून दावण तयार करतोय,सर्व सर्व लगीन घाई जणू छावणी चालकाचे लगीन हाय अन ही सर्व वऱ्हाडी मंडळी.सूर्य कुठं आहे हे सूर्यफुलाला कुणी सांगतं काय?त्याप्रमाणे छावणी कुठे आहे हे कुण्या शेतकऱ्याला सांगायची गरज पडत नाही.
    नारळ फोडून छावणीचे उदघाटन होते.सर्व शेतकऱ्यांना उद्देशून छावणी चालक भाषण सुरू करतात.सर्वांगाचा कान करून खजीलपणे शेतकरी ऐकू लागतात.भाषणात सर्व आश्वासनांचा पाडा वाचून झाल्यावर चालक महाशय आपल्या अलिशान गाडीत बसून संपूर्ण छावणीतून एक चक्कर मारतात नी सगळीकडे धूरळा उडवत निघून जातात.छावणी सुरू होते.सर्व शेतकरी आनंदात गप्पागोष्टी करू लागतात.जेमतेम आठ-दहा दिवस दिल्या भाषणाला चालक महाशय जागतात आणि कलियुगात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे हे दाखवण्यास सुरुवात करतात.कधी अर्धा चारा तर कधी एक दिवसाआड हे सत्र सुरू होते.शेतकऱ्यांनीही"पदरी पडले धोंड अन हसून केले गोड"याप्रमाणे जे मिळेल त्यात समाधान मानले.जनावरांना वेळीअवेळी चारा मिळू लागला.आज चारा मिळाला नाही,तर आज कमीच मिळाला हेच चालकाचे षडयंत्र सुरू झाले.जनावरांना कधी मिनरल मिक्स पावडर नाही.कधी संतुलित आहार नाही.फक्त आणि फक्त ऊस त्यामुळे लदलद जनावरेही अगदी रोडकी होऊन जोराच्या वार्‍यात जमीनीवर पडतील की काय या काळजीने शेतकऱ्यांना भिनभिनल्या सारखे व्हायचे.कितीतरी शेतकऱ्यांचे रोज एक ना अनेक डोरं पुरेशा चार्‍याअभावी घायाळ होऊन गतप्राण होत असे.लाळखुरकत,बुळकुंड्या होऊन जनावरे थकून जागीच बसत.जनावरांना मोकळे सोडले तरीसुद्धा ती पळत नसे,त्यांच्या पायाला मोठमोठे दगड बांधल्यागत ती जडपावलांनी चालत असे.शेतकरी बिचारा हवालदिल होऊन शून्य नजरेतून आपल्या जनावरांकडे पाहत असे.चारा कधी येतोय अन कधी मिळतोय हाच प्रत्येकाच्या जीवाला घोर लागून राहायचा.कधी एखादी गाडी वाजली तर तडफडून उठून बिटीबिटी डोळ्याने चार्‍याची गाडी हाय का ते पाहू लागे.जनावरांना वेळेवर चारा पाणी नाय मिळाला तर ते कसे काय जगायचे,या विचाराच्या डोहात शेतकरी बुडून जात.जनावरांच्या शिवाय कशी कुणबीक करणार नी कसा संसाराचा गाडा चालवणार या विचाराने शेतकऱ्यांच्या काळजाला कपार पडल्यासारखं व्हायचं.जनावरे हेच शेतकऱ्यांच्या संसाराचे खांब असतात.हे शेतकरी स्वतःच्याच मनाला सांगत असे.
         छावणीत बसल्या बसल्या दुपारी लोकांच्या गप्पांना फार उधाण येत असे.पूर्वीच्या काळी पाऊस पाणी भरपूर व्हायचे,भर उन्हाळ्यात सगळीकडे पाणी असायचे.आता दुनियाच बिघडली आहे.झाडांची बेसुमार कत्तल,यांत्रिकीकरण,वेगवेगळे उद्योगधंदे यामुळे पाण्याचा जास्त अपव्यय होतो.त्यामुळे आपल्यावर वाईट दिवस येत आहेत.असे काही मंडळी आपले मत व्यक्त करत.अगदी डोंगर माथ्यावर पाईपलाईनद्वारे पाणी उपसा करून पाण्याचा साठा संपविण्यासाठी जशी काही स्पर्धा लावली आहे असेच प्रत्येक जण वागतो आहे.हेही गप्पामध्ये मुद्दे येतात.कळतं पण वळत नाही,त्यातलेच हे सर्व महाभाग कारण पाण्याचा टँकर दिसला की आर्धीटाकी हेच खाली रिचवतात.अन पुन्हा टँकरपुढे हात पसरून उभे.विहीरी,बोअरवेलमुळे पाण्याची पातळी खोल जाते,हे सांगणारेच बोर घेण्यासाठी उतावळे झालेले.काहींना पाण्याचे महत्त्व समजते.आपण पाण्याचा आदर करावा.थेंबानथेंबाचा योग्य वापर करावा.असे केले तरच आपण जगू शकतो.तांब्याभर पाणी पिण्यासाठी घेऊन अर्धा टाकून देण्याचे दिवस आज नाहीत.'जल है तो कल है'असेच आपल्याला म्हणावे लागेल.ह्या सर्व चर्चा रंगलेल्या असतानाच ट्रकचा हाॅर्न कानावर पडतो न पडतो तोच सर्वांची पळापळ सुरू होई.ऊसाच्या गाड्या आल्या आता चारा मिळेल हे समाधान सर्वांच्या डोळ्यात तरळू लागे.
         सायंकाळ झाली की घरी जावे की इथेच छावणीत झोपावे हाच विचार प्रत्येकाच्या मनात घर करु लागतो.घरी जावे तर रात्रीला मोकाट कुत्र्यांचा त्रास.कधी येतील अन जनावरांना तोडतील भरवसा नाय.त्यांच्या तोंडाला मांस लागलय त्यामुळे ते जिवंत जनावरांना खायला बी मागेपुढे पाहणार नाहीत.छावणीत रोडकी जनावरे,वासरे मेली की जवळच टाकतात.ती खाऊन कुत्रे गलेलठ्ठ होतात.जनावरांच्या मरणात कुत्र्यांचे जगणे आहे हे बाकी खरे!रात्रभर कुत्रे आजूबाजूला विव्हळत बसतात.मेलेल्या जनावरांचा उग्रवास छावणीत नीटशी झोप लागू देत नाही.इथेच झोपावे तर बायको,पोरं रस्त्याकडे टक लावून अधीरतेने वाट पाहतात.जेष्ठातील शेतकरी जशी आपली नजर आभाळाला खिळून ठेवतो तसे.घरी गेल्यावर गरमागरम खायला मिळेल.तसं इथं जे शिळंपाकं हाय तेच गोड मानून घशाआड करावं लागल.सायंकाळी घरी गेल्यावर दिवसभराच्या सार्‍या शल्यांचा एका क्षणात विसर पडतो.आपल्या मुलांचा स्पर्श जणू त्या दुष्काळात शेतकऱ्यांना संजीवनी सारखा वाटू लागतो.
           पैशाची ऊब नसली,की शेतकऱ्यांच्या जीवनावर एक प्रकारची प्रेतकळा येते.हेच चित्र दुष्काळ आणि छावणीच्या काळात शेतकऱ्यांच्या जीवनात पाहावयास मिळते.शेतकऱ्यांच्या जवळ कायमचा पाण्याचा एकमेव साठा म्हणजे त्याचे अश्रू,हेच अश्रूरूपी पाणी त्याचे दुःख धुवून टाकण्याचा प्रयत्न करते.परमेश्वराने हे पाणी तरी त्याच्याजवळ ठेवले आहे हे त्याचे उपकारच म्हणा.दुष्काळात व छावणीच्या काळात हेच अश्रू शेतकऱ्यांच्या जीवनरूपी अंगावर कायम अभिषेक करत राहतात.....!

                    लेखक,
            श्री.अजिनाथ सासवडे(सर)
             मु.पो.लोणी(स.),आष्टी
             मो.९४२१३३६०५९

Monday, January 6, 2020

रौद्र शंभुराजे

"रौद्र शंभुराजे"

१४ मे१६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचा छावा संभाजीने जीवनाचा पहिला श्वास घेतला.ज्याच्या कुंडलीतच पहिल्या श्वासापासून संघर्ष व स्वकीयांकडून फसवणूक लिहिली आहे त्याला कसली आलीय जीवन मरणाची भीती.संभाजी राजांचे दुधी दातही उमलले नव्हते तेव्हाच मायेचा व दुधाचा पाझर आटला नि महाराणी सईबाई सारखी जन्मदात्री अनंतात विलीन झाली,पण संघर्ष व झुंज देत नाही तो छावा कसला.धाराऊ सारख्या पर मातेच्या दुधावर पोलादी शरीराची उभारणी करणाऱ्या या छाव्यात बुद्धी व शक्तीचा अजोड संगम होता.सह्याद्रीच्या मावळ मुलखात,जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणार्‍या संभाजी राजांचा दरारा पाहून मुघलांना सळो की पळो झाले होते.
        राजमाता जिजाऊंचे स्वराज्याचे गोमटे स्वप्न ज्या शिवरायांनी सत्यामध्ये उतरवलं,त्याचा वारसा लाभलेले संभाजी स्वातंत्र्याची मशाल कशी विजू देतील.जगाच्या पाठीवर सलग १२० लढाया जिंकणारा व एकदाही पराभूत न झालेला राजा म्हणून इतिहासाने ज्यांची नोंद घेतली ते राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिमानाने उल्लेख केला जातो.वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम्,सातशतक सारखें ग्रंथ संभाजी राजांनी लिहिले.एक नव्हे तर तब्बल १४ भाषा संभाजी राजांना बोलता येत होत्या.छत्रपती शिवाजी महाराज हे एक सिंहपुरुष होते,परंतु राजे संभाजी हेही एक छावाच होते,हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड हिंदुस्तानला नव्याने पण पुरेपूर उमजलं आहे.
        एकाच वेळी पाच आघाड्या विरुद्ध जिकिरीची पंजेफाड करणारा सेना-धुरंदर मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेले.तीस लाखांची फौज घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला बलाढ्य औरंगजेब,मुंबईचे टोपीकर,गोव्याचे फिरंगी,जंजिऱ्याचे सिद्दी या चार आघाड्या आणि पाचवी आघाडी होती विखारी विश्वासघातक्यांची स्वार्थांध स्वकीयांची,अगदी घरच्यांचीच.पाठीची ढाल व हाताची तलवार करून सर्वांबरोबर वादळासारखा सतत नऊ वर्ष झुंजत राहणारा राजा म्हणजे रौद्ररुपी संभाजीच होय.संभाजी राजे फितूर,स्वराज्यद्रोही दिलेरखानाला जाऊन मिळाले,अशा बाजार गप्पा उठवल्या जाऊ लागल्या;अरे ही तर शिवरायांची चाल आदिलशाही व मोगल यांच्यात हातमिळवणी झाली तर ते आपल्याला घातक ठरेल या दूरदृष्टीने शिवरायांनीच संभाजी राजांना दिलेरखानाच्या गोटात पाठवले होते.ज्याचा जन्मच रयतेच्या रक्षणार्थ झाला त्याने रयतेची लूट,अत्याचार निमुटपणे सहन करावी,हे कदापी शक्य नव्हते,'छातीतील धग व मनगटातील रग' याच्या जीवावर अवघे स्वातंत्र्य ९ वर्ष पेलून धरणारा मराठ्यांचा महाप्रतापी राजा म्हणजे शंभुछत्रपती.प्रभू रामचंद्राच्या रघुकुल वंशाचा वारसा सांगणारा मिर्झाराजे जयसिंग सारखा मोगलाची लाचारी पत्करलेला रजपूत अवघ्या दहा-बारा वर्षे वयाचे असताना संभाजीराजांनी बुद्धिबळात मात दिल्यानंतर मूर्च्छित होऊन म्हणतो,"संभा का दिमाग है या दौडता घोडा", एवढ्या कमी वयात एवढी बेडर नजर,काळजाची निशाणी साधणारे बोल,थोरा-मोठ्यांसाठी असलेली अदब मिर्झाराजानी आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती.अशी अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले राजे म्हणजे शिवपुत्र संभाजी.
          शंभू राजांचा चेहेरा पोतासारखा उजळलेला.राजांची शरीरयष्ठी निखार्‍यावर फुलल्या भाकरीगत डौलदार व रसरशीत अशीच होती.त्यांच्या पहाडी आवाजाने तर अवघा मुलुख ढाण्यावाघाच्या डरकाळीने गुंजावा तसा गुंजत असे.गळ्यात ६४ कवड्यांची माळ जनु साक्षात जगदंबेने त्यांच्या गळ्यात घातली होती,एवढा त्या माळेचा गवगवा होता.कपाळावरील शिवगंध तर पिता शिवरायांची निशाणीच होती.संभाजी राजांच्या सहधर्मचारिणी येसूबाई व दुर्गाबाई यांचाही स्वराज्यात चांगलाच मरातब होता.संभाजी राजांचा पांढराशुभ्र 'चंद्रावत' नावाचा घोडा फारच अबलक होता.
    शिवसूर्याच्या अस्तानंतर नऊ महिन्यांनी,१६ जानेवारी १६८१ रोजी स्वराज्याला दुसरे छत्रपती लाभले शंभूसूर्य.रायगडावरील तोफांच्या कडाडत्या बत्त्या टोपीकर,सिद्धी,फिरंगी,मोगल व कुतुब ह्या सर्व शाह्यांना जणू गर्जुन सांगत होत्या;मराठी दौलतीच्या सिंहासनावरील 'शिव' गेला तरी त्या आसनावर आता 'रुद्र' आला आहे.जरीपटका पुन्हा एकदा डौलाने फडकू लागला. संभाजीराजांच्या रूपाने स्वराज्याला एक तापता सूर्यच मिळाला होता आणि याला जो गवसणी घालेल त्याची राख होणार हे निश्चित होते.रयतेच्या रक्षणासाठी संभाजी राजांनी उभे आयुष्य बहाल केले,तसे रयतेतील एकेक मावळासुद्धा संभाजीराजांच्या एका शब्दाखातर आपलं काळीज त्यांच्या चरणी अर्पण करण्यास तयार होता.शिवरायांच्या जंजिरा या अधूऱ्या स्वप्नाचा सल,शंभूराजांनी पूर्ण करण्यासाठी बेधडक पावले उचलली.काही तासातच सिद्दी कासम व सिद्दी खैरात यांना जंजिऱ्यावरून पळ काढावा लागला.जंजिऱ्याजवळील असंख्य जललहरींनी जंजिरा स्वराज्यात आल्यामुळे छत्रपतींना माना उंचावून मुजरा केल्या.संभाजी राजांची युद्धनीती,न्यायनीती,चाणाक्ष बुद्धी व गनिमावर असलेली तीक्ष्ण नजर हीच गोष्ट रयतेला राजांच्या मोह बंधनात बांधून ठेवत होती. हिंदू धर्म व मायभूमीच्या रक्षणार्थ राजांसह मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक या मातीत करून धर्माचे व धरणीमातेचे रक्षण केले.म्हणून तर आजही आपल्या मातीचा रंग लाल आहे.
          दुर्बलांच्या हक्कांचे संरक्षण करणे हेच खरे "राजेपण"असा कातर विचार राजांच्या मनाला नेहमीच स्पर्श करत असे."मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा"हे समर्थांचे बोल राजांच्या कानात सदैव गुंजत होते.राजांनी धर्मरक्षणासाठी नेटाने प्रयत्न केले,पण शेवटी घडू नये तेच घडले,औरंगजेबाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्या मुकर्रबखानाने संगमेश्वराजवळ संभाजी राजांना कवी कलशांसह जेरबंद केले.तेथून राजांना अकलूज येथील औरंगजेबाच्या छावणीत घाईघाईने हलवण्यात आले.मावळ्यांचाही इस्लाम कबूल न केल्यामुळे तेथेच शिरच्छेद करण्यात आला.अकलूज वरून पुन्हा राजांना भीमा-इंद्रायणीच्या काठावर वसलेले वढु(बु)-तुळापूर येथे आणण्यात आले.चाळीस दिवस औरंगजेबाच्या अन्याय,अत्याचाराला भीक न घालता स्वराज्य व स्वधर्मासाठी जिवंतपणी स्वतःच्या मरणाला शंभुराजे रोज निधड्या छातीने सामोरे जात होते.अंगाची कातडी सोलली,जीभ कापली,डोळे काढले तरी धर्मवीर संभाजीराजे ना झुकले ना नमले.धर्मासाठीच मरायचं नि धर्मासाठीच जगायचं हा दृढनिश्चय ज्याच्या ठायी वसलेला,त्याला कसली आली मरणाची भीती.अरे मरणालाही मरणाची भीती वाटावी एवढी क्रुरशिक्षा शंभुराजांना दिली पण जीवाची भीक मागितली नाही,की दयेची याचना केली नाही.११ मार्च १६८९,फाल्गुन वद्य अमावस्याच्या दिवशी 'जगदंब-जगदंब' हे अखेरचे बोल मनी उच्चारून शंभुसूर्याचा अस्त झाला.शंभुराजे गेले पण सर्वांना सांगत गेले,अरे मातीत मरणारे कैक असतात,पण मातीसाठी मरणारे फक्त "मराठे"असतात.
        आपण सदैव शंभुविचार व आचारांना स्मरणात ठेवावे. नुसतेच राजे आमचे म्हणून चालणार नाही,तर जीवनात शंभुराजांच्या ठायी असलेले गुण आपण आचरणात आणले तर शंभुराजांना तेच विनम्र अभिवादन ठरेल.

महत्वाची टीप: हृदय हेलावून टाकणारे लेख,कथा वाचण्यासाठी कृपया http://ajinathsaswade.blogspot.com
या लिंकला भेट द्या.
                      लेखक,
              श्री.अजिनाथ सासवडे (सर)
               मु.पो.लोणी(स), आष्टी
               मो.९४२१३३६०५९

Thursday, January 2, 2020

बाप

वाचक मित्रांना सांगू इच्छितो की,"बाप"या लेखात मी दर्शवलेला बाप हा ग्रामीण भागातील आहे.त्यामुळे वडलांपेक्षा ग्रामीण भागातील प्रचलित बाप हाच शब्द मला योग्य वाटला."बाप"या एकेरी नावात जो दबदबा आहे तो मी माझ्या अल्पशा बुद्धिनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

"बाप"                                               

        "बाप या शब्दातच एवढा धाक आहे"की,नुसता उच्चारला तरी,भल्याभल्यांना धडकी भरते.बापाएवढा दरारा बाप सोडता भूतलावर कुणाचाही नाही.आजतागायत आईबद्दल लिहिण्यासाठी भरपूर कवी,लेखक,साहित्यिक सरसावले,परंतू बाप मात्र या सर्वांच्या शब्दांना जवळ जवळ पोरकाच ठरल्यासारखा आहे."स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"हे वाक्य अगदी सान-थोरांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे,पण स्वामी तिन्ही जगाचा बापाविना....काय?आईला लेखक,कवींकडे पुरेपूर न्याय मिळाला व ति धन्य पावली,पण बापाच काय?बापाचा थोरपणा,मोठेपणा सांगण्यास का कुणास ठाऊक लेखक,कवींचे मन लवकर धजावत नाही.बाप सर्व ठिकाणी उपेक्षित घटकांसारखा का ठरावा?हा मोठा प्रश्न मनाला चिरत जातो.आई सावलीसारखी आहे पण बाप झाडासारखा आहे. ऊन,वारा,वादळ यांचा सर्व त्रास झाडालाच सहन करावा लागतो.वरवर पाहता बाप नारळासारखा कठीण वाटत असला तरी,आतून बापाचे हृदय नारळाप्रमाणेच मुलायम असते.छोट्या छोट्या संकटाच्या प्रसंगी आपण'अग आई' म्हणून आईची आठवण काढतो,परंतु मोठे संकट आल्यावर आपसूकच तोंडातून "बापरे"हा शब्द केव्हा बाहेर पडतो हे स्वतःलाही उमगत नाही.यावरून मोठ्या संकटात बापच आपल्याला तारू शकतो हे ध्यानी येते.प्रत्येकासाठी स्वतःचा बाप संकट मोचनासारखा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.
          बापासारखा उत्तम सल्लागार जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही.मुलांच्या भल्यासाठी बाप कठोरपणा अंगीकारतो.बाप हयात नसल्यावर मुलांची अवस्था दिशाहीन जहाजासारखी होते.वारा घेऊन जाईल तिकडे जहाजाप्रमाणे वाहत जातात.आई भावना व वात्सल्याची देवी आहे,पण बाप मात्र कर्तव्य व जबाबदारीचा देवता आहे.मुलांना काही कमी पडल्यावर समाज बापाच्याच गळ्याभोवती फास आवळतो.चंदनाप्रमाणे स्वतः झिजून आपल्या मुलांच्या भाळी आनंद निर्माण करण्याचे काम बापच करतो.स्वतःच्या सुखापेक्षा आपल्या कुटुंबाचे सुख हे बापासाठी एक पर्वणीच असते. दुःखाने कितीही विषाद मांडला तरी,त्याला कणखरपणे हसत मुखाने बापच सामोरे जातो.दुःखाच्या सागरात कितीही बुडाला तरी बाप धाय मोकलून रडू शकत नाही.समाज त्याला तशी स्वाधीनता देत नाही.दुःखाच्या प्रसंगी कधीतरी बापाची उशी रात्री चाचपून पहा नक्कीच ती अश्रूंनी ओली झालेली जाणवेल,कारण बाप आपल्या अश्रूंना अंधारात,एकांतात वाट मोकळी करून देत असतो.तो हताश किंवा हतबल नसतो तर,कर्तव्याने बांधलेला असतो.कर्तव्याच्या,जबाबदारीच्या व दुःखाच्या झळा बापाला अगदी मुकाटपणे सोसाव्या लागतात.
        देवाने आपल्या नशिबात काय लिहिले आहे,हे कोणी सांगू शकत नाही,पण आपला बाप स्वतःच्या घामाच्या शाईने आपले भविष्य लिहित असतो.मुलांच्या भविष्याचे मनोरे उभारताना बापाला होत असलेल्या यातनांचा कल्लोळ कोणाला दिसत नाही.झाडावर चढल्यावर फळे चाखण्याच्या आनंदात आपल्याला स्वतःच्या खांद्यावर बसून ज्याने झाडावर पावते केले,त्या बापालाच आपण विस्मरून जातो.माघारी परतताना पुन्हा बापाचीच आठवण येते. बापाची आठवण दुःखात होते,परंतु आनंद लहरीत होत नाही.परीक्षेत घवघवीत यश मिळविले,नौकरी लागली तर, पेढ्याचा पहिला घास आपण आईला भरवतो.पण पुस्तकांसाठी लागणारा खर्च,शाळेची फी,गणवेश हे सर्व मागताक्षणी देणारा दुःखी,कष्टी बाप आपल्याला आठवत नाही.बाप लढवय्यासाठी ढाल आहे,उन्हातल्यासाठी सावली आहे,वाहत जाणाऱ्यासाठी आधार आहे,तर भुकेलेल्यासाठी अन्नाचा घास आहे. बाप हा बाप असतो,त्याची सर जगात कुणाला येणार नाही.बापाच्या वस्तूवर मुलं जेवढा हक्क गाजवतात तेवढा हक्क कुठेच गाजवू शकत नाहीत.मग ती बापाची"मांडी असो अथवा भांडी".
    मुले लहान असताना बापाने खाऊ आणावा आणि स्वतःला भूक नाही असे सांगून सर्व मुलांच्या मुखी घालावा,हे फक्त बापाचच काळीज करू शकते.मुलांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर सरून सुखाची वहिवाट,यावी त्याकरिता फाटका सदरा व तुटकी चप्पल वापरून बाप एक एक दिवस मावळतीला नेत असतो.दिवाळीच्या सणाला घरातील सर्वांना नवे कपडे खरेदी करून आणणारा बाप स्वतः मात्र जुनेच कपडे परिधान करतो.स्वतःचा जीव गहाण ठेवीन,पण मुलांना काही उणीव भासू देणार नाही,तो बापच असतो.मुलीच्या लग्नात आईला भरगच्च मानपान;बाप मात्र दवाखान्यातील पेशंट सारखा उसने हासू चेहर्‍यावर दाखवत,मंडपदारी केविलवाणी उभा असतो.मनात सल असतो की,माझा काळजाचा तुकडा सुखात तर राहील ना?अशा असंख्य विचारांचे काहूर मनी दडपून ठेवतो अन मुलीला जड अंतःकरणाने सासरी पाठवतो.
        समईतील वातीप्रमाणे स्वतः झिजून मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा बाप,मुलांच्या आठवणीत राहील की नाही,हा मात्र यक्ष प्रश्न आहे.ज्याने मुलांसाठी आपल्या आयुष्याचा होम करून त्यामध्ये स्वतःच्या इच्छा,आकांक्षाची समिधा म्हणून आहुती दिली,त्या बापाला मुलं मोठी झाल्यावर किती सन्मानाची,आदराची वागणूक देतात,का त्याची कुचेष्टा करतात हाही प्रश्न काळजात घर करतो.
        "बाप म्हणजे नुसता डोक्याला ताप"असे काही कुपुत्र मोठी झाल्यावर बापाची समाजात अवहेलना करतात.बापाचा विच्छाद मांडतात.उपकाराची जाणीव न ठेवता कृतघ्नतेचा पाढा वाचतात.मुलांच्या आजारपणात ज्या बापाने रात्र रात्र पापणीला पापणी भिडू दिली नाही,त्याच बापाच्या कृश काळात मुलांना त्यांच्या प्रकृतीकडे कटाक्ष टाकायलाही अवकाश नाही.बसने अथवा रिक्षाने दवाखान्यात जाऊन या,असा निर्भयपणे सल्ला देण्यासही त्यांचे मन कच खात नाही.ही आपल्याच फांदीला अगळीवेगळी कुसंस्काराची फळे कशी लगडली हे बापालाही समजत नाही.
        आई-बापावर नितांत प्रेम करा.ते गेले तर प्रेमाचा अथांग सागर आटला म्हणून समजा.त्यांच्या सेवेशिवाय प्रत्येकासाठी स्वर्गाची कल्पना बिलकुल धूसर.कितीही डगमगती परिस्थिती असुद्या,पण बापाची मान आपल्या कार्यामुळे कधीही झुकणार नाही हेच सदैव ध्यानी ठेवा.बापाच्या पैशावर कसला आलाय रूबाब,पैसा आपला अन रूबाब बापाने केला पाहिजे;तर कुठं आपलं नि"बापाच"नाव झाल म्हणून समजा........

        श्री.अजिनाथ सासवडे(सर)
        मु.पो.लोणी(स.)आष्टी
          ९४२१३३६०५९

तीन भावांची किमया

 सोलापूर जिल्ह्यातील रयत सत्ता दैनिकच्या आजच्या अंकात  प्रकाशित झालेली #तीन_भावांची_किमया" ही माझी कथा..               "तीन भावांच...