"मोबाईल एक व्यसन"
एखाद्या गोष्टीच्या अति आधीन जाणे म्हणजेच व्यसनाधीन होणे.चांगले असो अगर वाईट,परंतु प्रमाण जास्त वाढले म्हणजे त्याचे रुपांतर व्यसनात झाले.मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने बायकोला बेदम मारले,ही बातमी टीव्हीवर पाहिली आणि या मोबाईल नावाच्या मानवचलित यंत्राने माणसाच्या जीवनात केलेल्या आगमनाने माणसाला लागलेले त्याचे व्यसन,हे नक्कीच जीव घेणे आहे,असे वाटू लागले.ज्या महापुरुषाने मोबाईलला जन्मास घातले तो धन्य.मोबाईलचे वाढते चमत्कार दिवसेंदिवस लक्षात येऊ लागले.हा दिसतो लहान पण भल्याभल्यांनाही वेडं करून सोडलय यानं.वरवर दिसायला फूलपाखरासारखा पण आतून मात्र गांधीलमाशी समान.कुणाच्या भावनांना कुठे दंश करील आणि कुठे त्या उत्तेजित होतील याचा भरवसा नाही."लहान तोंडी मोठा घास"असा याचा स्वभाव.कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशास कारणीभूत ठरतो.तद्वत आज मानवी पिढ्याबद्दल झाले आहे.लोक एकवेळ पायात चप्पल घालायची विसरतील,अंगात शर्ट घालायला विसरतील,पण मोबाईल मात्र हातात किंवा खिशात असल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकण्यास धजावणार नाहीत आणि चुकून मोबाईल जर विसरला तर आयुष्याचा जोडीदार हरवल्यागत हुरहूर मनाला लागावी,एवढा प्रत्येकाला याचा लळा लागला आहे.या निर्जीव वस्तूनं माणसाला प्रमाणापेक्षा जास्त आपलंसं केलं आहे.लोकांना अन्नपाण्यापेक्षाही याचा मोह जास्त वाढू लागला आहे.काय किमया केली या छोट्याशा वस्तूनं की लहान थोरांना पूर्ण बिघडून ठेवले आहे.
मोबाईलचा इतिहास पाहिला तर तीन दशकांपेक्षा जास्त नाही.सुरुवातीच्या काळात फक्त एकमेकांशी संवाद साधन्यापुरता मोबाईलचा वापर होत होता.जसजसा मोबाईल कात टाकत गेला तसतसा त्याचा वेग जास्तच वाढत गेला.आज सगळं जग या छोट्या वस्तूंमध्ये सामावलं आहे.लेखन,वाचन,टीव्ही,रेडिओ,एवढेच नव्हे तर संगणकाचे कामही आज मोबाईल करत आहे.हा अविश्वसनीय बदल झाल्यामुळेच मोबाइलला हल्ली स्मार्टफोन हे आधुनिक नाव देण्यात आले.अल्पावधीतच सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा एक किमयागार ठरला आहे.ज्या ठिकाणी माणूस,त्या ठिकाणी मोबाईल.मोबाईल शिवाय माणूस हे समीकरण आज होऊच शकत नाही.माणसाला त्याची सावली जशी सोडत नाही,अग्नीला उष्णता सोडत नाही,तसा मोबाईल पासून माणूस क्षणभरही वेगळा राहू शकत नाही.आनंद असो अगर दुःख,कुठल्याही प्रसंगी आपल्याला साथ देतो,हा याचा एक सद्गुणच म्हणावा लागेल.संवेदनाहीन असला तरी संवेदनशील माणसांच्या हृदयाला पाझर फोडण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे.चोर-पोलिसांचा खेळ खेळण्यात मोबाईल फारच पटाईत.खोटं बोलण्याचे प्रशिक्षण घ्यावं ते मोबाइल कडूनच.
मोबाईलमुळे माणसातला माणूस हरवला आहे.माणसात असून एकटेपणाचा गुण मोबाईलने माणसाच्या अंगी बानवला आहे.उठताना मोबाईल,बसताना मोबाईल,खाताना मोबाईल,चालताना मोबाईल, गाडीवर मोबाईल,अहो एवढेच काय तर बाथरूममध्येही मोबाइल,हा तर अतिरेकपणाचा कळस झाला.कोणत्या वस्तूच्या किती आहारी जावं,हे मात्र माणसाने विचार करण्यासारखं आहे.थोडा जरी वेळ मिळाला तरी काढला मोबाईल की लागलेच पहायला.जे सुरुवातीच्या काळात दळणवळण तथा संदेशवहनाचं साधन होतं,आज तेच मृत्यूच्या खाईपर्यंत घेऊन जाणारं साधन झालं आहे.
आज मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सने खूप धुमाकूळ घातला आहे.पब्जीसारख्या गेमने तर कित्येकांना मृत्यूच्या स्वाधीन केले आहे.काहींनी गेम खेळू दिली नाही म्हणून आपल्या जवळच्यांचा घात केला आहे.मोबाईल दळणवळणाचे साधन राहिले नसून मृत्यूचा एक सापळाच झाला आहे.मोबाईलचा वापर किती करावा याला काहीच मर्यादा उरली नाही.मोबाईलचा अवाजवी वापर आज सर्वांच्याच विनाशाला कारणीभूत ठरत आहे. सतत मोबाईलकडे पाहिल्याने डोळ्यावर होत असलेले विघातक परिणाम काहींना जाणवू लागले आहेत.डोळ्यांना नंबर लागणे,दिसण्यास कमी होणे,मोबाईलमुळे कितीतरी मनोरुग्ण सुध्दा झालेली आहेत.
मोबाईलमुळे माणसाला एकलकोंडेपणा चिकटला आहे.कुणाशी कसला संवाद नाही.त्यामुळे प्रेम,आपुलकी,सहानुभूती या प्रत्येकाच्या भावना अतृप्तच राहत आहेत.एकमेकांबरोबरचे संवाद,संभाषण कमी झाले.परिणामी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणे,त्याला आपले मानने,या गोष्टी आज दुरापास्त झाल्या आहेत.एखाद्याला आजारपणात भेटायला गेल्यावर आजारी व्यक्तीची चौकशी करण्याऐवजी स्वतःच्या मोबाईलमध्येच मानसं दंग होऊन बसतात.मोबाईलच्या अतिरेकामुळे कानाचेही आजार उत्पन्न झाले आहेत.
पूर्वीच्या काळी परगावी काही काम असेल तर पत्रलेखन अथवा त्या गावी जाऊन निरोप दिला जात असे.काळ बदलल्यामुळे आज ती गरज राहिलेली नाही.आजच्या पिढीचा गैरसमज आहे कि मोबाईलमुळे आपला वेळ वाचतो,परंतु वाचलेल्या वेळेचा आपण किती सदुपयोग करतो,हे महत्त्वाचे आहे,कारण क्षणात मोबाईलद्वारे निरोप देऊन आपण मोकळे होतो खरे,पण बाकी वेळ आपण सत्कारणी लावतो का?काम न करता नुसते बसून कुठला शारीरिक व्यायाम नाही,की कसले कामही नाही.त्यापेक्षा परगावी जाऊन निरोप दिला तर शारीरिक व्यायाम होत असे.एकमेकांबद्दल प्रेम,आदरभाव वाढत असे.
घरामध्ये सगळ्यांकडे जर स्मार्टफोन असेल तर घरात कसलाही संवाद घडून येत नाही,जो तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त,त्या घरातलं घरपण हरपून जातं.एकत्र बसून संवाद साधल्याने अविर्भाव,प्रेम नक्कीच वाढीस लागतो.विचारांची देवाण-घेवाण होते.एकमेकांचा आदर सन्मान केला जातो.जिव्हाळा उत्पन्न होतो.मोबाईल हा आज एक स्लो पॉयझन सारखा झाला आहे.याचे वाढते प्रमाण एक दिवस माणसाला विनाशाकडे घेऊन जाणार आहे.मोबाईल पाहण्याचा,बोलण्याचा,वापरण्याचा काहीतरी वेळ असावा.पण दुर्दैवाने इतर काम आपण थोड्या प्रमाणात करतो आणि दिवसातला बराचसा वेळ मोबाईलच्या दुनियेतच रममाण होतो.मोबाईलचा ना कुठला शारीरिक फायदा,ना मानसिक.मानसिक स्वास्थ्य मात्र नक्कीच मोबाईलमुळे बिघडले जात आहे.
आता तर नेटवर्क कंपन्यांनी देऊ केलेला डाटा संपविण्यासाठी जशी पाहणारांची आणि मोबाईलच्या बॅटरीची स्पर्धाच आहे.कोण लवकर कंटाळतोय.हे जसे एकमेकांशी चुरस लावतात. अन लिमिटेड व्हॉइस कॉल यामुळे लोक आपले काम सोडून फोनवर तासनतास बोलत राहतात. काय बोलावे याचेही लिमिट राहिले नाही.फक्त अमर्यादित मिळतय म्हणून कसाही वापर करायचा,हा माणसाचा मूळ स्वभावगुण."फुकटचं घावलं अन बाप लेक धावलं"अशी गत झाली लोकांची.त्याचा आपल्या जीवन मानावर विघातक परिणामा बरोबरच आपला अमूल्य वेळही आपण त्यासाठी विनाकारण खर्ची घालत आहोत,याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
मोबाईलनं लोकांना"विनाशकाले विपरीत बुद्धी"असं झालंय.लोकांची बुद्धीसुद्धा बिथरली.अगदी वयोवृद्ध मंडळी सुद्धा याला अपवाद राहिली नाही.मोबाईलसारख्या एवढ्या छोट्या वस्तूनं आज मानवाचा एवढा विकसित मेंदू असूनही त्यावर कब्जा मिळवला आहे.मग प्रश्न असा पडतो,की मानवाने मोबाईलला निर्माण केले,की मोबाईलने मानवाला.आपण तयार केलेल्या वस्तूच्या आपण आधीन जात असू तर आपल्या बुद्धीची वाटचाल कुठे होते आहे,हेही ध्यानी घ्यायला हवे.आपणच निर्माण केलेली वस्तू आपल्यासाठी हानिकारक ठरत आहे.या व्यसनातून बाहेर येण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.नाहीतर घोडामैदान समोरच आहे आणि त्याचे परिणाम अल्पावधीतच प्रत्येकाला कळणार आहेत.त्याकरिता आपला सावध पवित्रा असावा म्हणजे ही एक भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूलच आहे.मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा.अनावश्यक फोटोज,व्हिडिओज,पोस्ट टाकणे आणि पाहणे टाळावे.विनाकारण फालतू गेम खेळत बसणेही नक्कीच धोक्याचे आहे.जवळजवळ बहुतांश व्यक्ती या व्यसनात अडकून पडल्यामुळे एक दिवस आपले स्वास्थ्य गमावून बसणार आहेत.त्याकरता वेळीच खबरदारी घ्यावी.आजपासूनच चारतास मोबाईल पाहणाऱ्यांनी दोन तास,दोन वाल्यांनी एक तास वापरावा,तर एक तास पाहणारांनी अर्ध्या तासात कसं आटोपते घेता येईल याचा प्रयत्न करावा.तरच आपण भविष्यात आनंदी आणि समाधानी जीवन जगू व इतरांनाही जगू देऊ हे निश्चित आहे.
लेखक,
श्री.अजिनाथ सासवडे (सर)
मु.पो.लोणी(स) आष्टी,
मो.९४२१३३६०५९